संध्याकाळी राईजवळच्या सगळ्यात गर्द झाडाखाली खुप दाटी होती. सगळे जण डोकावुन,वाकुन पहात होते. हे तेच झाड होतं…वैजयंतीच.
तीच वैजयंती जी तीच्या मैत्रिणीला,चांगुणाला म्हणायची “मला खात्री अाहे, शांत डोळे मिटुन अच्युताचे नामस्मरण करत,मी जेव्हा ठरवेन तेव्हा माझ्यातला अात्मा ह्या देहाला सोडु शकतो. हे जग मरण मरण ज्याला म्हणतं ते माझ्या मर्जीत अाहे. पण मी वाट पहातेय ‘त्या'ने माझ्याकडे एकदा फक्त बघायची. मग ह्या जन्माचं सार्थक झाल्यासारखंच अाहे.”
वैजयंती माळरानच्या पलीकडल्या पाणवठ्यावर जातायेता लागणा-या गुलमोहराखाली नेहमी दिसायची. नीटंस नाकीडोळी, इवलीशी हनुवटी, पायात पैंजण, अशी इतर गोपिकांसारखीच दिसणारी ,किंवा त्यांच्यापेक्षा किंचीत डावीच अशी , हातावर नावाचं गोंदण असलेली ‘वैजयंती’.
रोज सकाळी सगळ्याजणी घोळक्या घोळक्याने गावातल्या चौकात रासचबुत-याजवळ थांबायच्या अाणि पाणी भरायला निघायच्या. गावातल्या गल्लीबोळांतुन वाट काढत , माळरान तुडवत सगळ्याजणी अाभाळात ढगांचे जत्थे विशिष्ट लयीत सरकावे तशा सवयीने पाण्याला निघतसे. गाव अोलांडल्यानंतर अाणि पाणवठ्याच्या अाधी गर्द अांबेराईतुन वाट जायची. तिथुन जातांना सगळ्यांचा वेग मंदावायचा तर काहींचा वेग भरभरायचा..त्याच कारणही तसंच होतं म्हणा. तरी एक साम्य मात्र सगऴयांच्यात असायचं ते म्हणजे सगळ्यांचे लाजुन लालबुंद झालेले गाल, भिरभिर नजर अाणि कसल्याशा अनामिक हुरहुरीने धपापणारा ऊर,
गर्द राईच्या एखाद्या झुपक्यातुन अाधी ‘साट्’ अावाज यायचा मग पुढच्याच क्षणी ह्या गर्दीमधल्या एखाद्या हंड्यांला भिडायचा…’ठप्प् !’.जणू मधलं अंतर नव्हतंच त्या दगडाला ,इतका वेग. जिच्या डोक्यावरचे अाभाळ फुटायचे तिच्या अंगभर पाणीच पाणी. मग सुक्या असलेल्या सगळ्या जणी अोल्या पदराने तोंड दाबुन फिदीफिदी हसायच्या अाणि हि जिचा एव्हाना वा-यावर फरफरणारा पदर अाता अोला झाल्याने अंगभर चिकटला होता ,ती अाधी लाजायची पण नंतर लगेचच लटक्या रागाने बडबड सुरु करी,”मेला चेटक्या ! एकतर दिसतही नाही” मग खालच्या अोल्या मातीतलाच एखादा दगड उचलुन जिथुन तिला लागलेला दगड अाला असावा अशा अंदाजाने दिशाहिनपणे नुसता भिरकावत असे. फार फार तर पंधरा पावलांवर तो दगड जाऊन पडायचा पण फेकणारीचा राग क्षणभर शांतावायचा. हवेने म्हणा किंवा अजुन कशाने, पण कुठलं तरी झाडं मग नुसतं सळसळायचं जणू ह्या पंधरा पावलांवर पडलेल्या दगडावर नुसतं हसायचं. त्यामुळे ती देखील अजुन चडफडायची. मग बाकीच्या सख्या तिला हाताला धरुन अोढुन न्यायच्या. ह्या सगऴया सख्यांना हे माहिती असायचं कि कुणातरी एक अाज भिजणार. म्हणुन घरात जितके हंडे पाणी लागणार त्यापेक्षा प्रत्येक जण एक हंडा सोबतीला जास्त घ्यायच्या. अाणि गाव लागायच्या अाधी वेशीजवळच भिजलेल्या गोपिकेला द्यायच्या. म्हणजे घरी गेल्यावर अोरडा नको. असं सगळं अगदी ठरल्याप्रमाणै ,खेळीमेळीने,समंजस त्रागा चालु असायचा. प्रत्येकी ७-७ वेळी भिजुन गेल्या तरी वैजयंती अजुनही कोरडीच होती.
सगळ्या मैत्रिणी दिवसभरात कधीही भेटल्या तर ‘त्या’ दिवशी कनुने मला कसं अडवलं , ‘त्या’दिवशी केशाने कसं भिजवलं ह्याच्याच चर्चा रंगायच्या अाणि वैजयंती त्याच्यात मूक सहभागी व्हायची. ह्या गप्पांमध्ये सहभागी होता यावं म्हणुन वैजयंतीने एकदोन वेळा ‘पाण्याला जाण्याच्या वेळेच्या' खुप लौकर जायचा प्रयत्न ही केला होता. म्हणजे पाण्यावरुन येतांना गावगल्ली सुरु होण्याच्या अाधीच्या वळणावर हाताल्या कड्याने टचकन् हंडा फोडायचा म्हणजे जाता येता सगळे बघुन विचारतील कि काय झालं,कसं झालं वगैरे.आणि वैजयंती लग्नात 'नाव घेताना' नववधु जितकी लाजेल तशी लाजत नाव सांगेल.हे सगळ्यांची तिने कितीतरीदा मनात उजळणी केली होती. पण एेनवेळेस ती डुचकी चांगुणा तिथे अाली होती. मग वैजयंतीचा हा बनाव पण विनापावसाच्या नुसत्या भरल्या अाभाळासारखा सरुन गेला.
वैजयंती गुरांना चरायला पण नेतसे. मग सख्या राईजवळ अाल्या कि ती त्यांच्यात मिसळुन पुढे पाण्याला जात असे. ब-याचदा ती राईतल्या वेगवेगळ्या झाडापाशी रेंगाळत बसायची. सकाळी कधी कधी थकुन झाडाला टेकुन बसायची तेव्हा पायाजवळ हंडा अाणि खांद्याला काठी टेकवुन उभी ठेवलेली असायची तेव्हा दुरुन सुर्यडुबीच्या पार्श्वभुमीवर झाडाला टेकलेली तिची केवळ एक काळी अाकृती दिसायची. तेव्हा ती अगदी एकतारी घेऊन बसलेल्या जोगिणी सारखी भासायची.
सुर्यडुबीच्या अात घरी परतायची सगळ्या मुलींना घरातुन तंबी होती पण वैजयंती गुरांसोबत असल्याने तिला कधी कधी जर्राशी मुभा असायची.हो पण जराशीच. कधी कधी सावळ्याच्या तंद्रीत ती हरवुन जायची .भानावर अाली कि वेळ टळुन गेलेली असायची. मग घरी उशीर का झाला हि विचारणा झाली कि ‘हरवले होते’ इतकं कारण पुरेसं होतं. घरच्यांना तिच्या अावडत्या वासरा विषयीचा,वासंतीविषयीचा लळा माहिती होता.त्यांना वाटे हि म्हणतेय कि वासरु हरवले होते. अगदी त्याच वेळी गोठ्यातुन वासंती मान हलवुन ,घंटी किण्किणत नाही-नाही म्हणत असे पण वासरांची अन् पाखरांची हि असली भाषा फक्त वैजूलाच माहित होती. वैजू तुळशीजवळुनच डोळे वटारुन ‘श्श्श् !’ करुन वासंतीला दरडावायची.
तसं पाहिलं तर वैजयंतीची भिजण्याची तयारी खुप अाधी पासुन सुरु व्हायची.हो तयारीच. दररोज चुन्याने हंडा माखुन ती अाधी पांढरा लख्ख करतसे. नंतर त्यावर कधी काजळाने , कधी गेरुने , कधी हिरवी पानं वाटुन , कधी कोळशाने , कधी लाल जास्वंद चोळुन वेगवेगळ्या रंगाची नक्षी बनवत असे. अाणि सगळ्या गोपिकांमध्ये अापला हंडा सगऴयात अाकर्षक कसा दिसेल याची तयारी ती रोज संध्याकाळी पाण्यावरुन हिरमुसुन अाली कि करतसे. हंडा नक्षीदार करतांना तिची मनातल्या मनात बडबड चालु असायची ,” अाज त्या कौशीचा हंडा फोडला , परवा गौराचा, मागे मंगलाचा, त्याअाधी एकदा लक्षीचा, त्याअाधी…..सगळे सगळे झाले पण माझा ना कधी हंडा फुटला ,ना कधी माधोने अडवलं. एकदा तर चांगुणाची मटकी लागोपाठ दोनदा फुटली. ती पण अशी कि चांगुणाला समोरुन पत्थर येताना दिसला अाणि तो मागे जाणार ह्याचा अंदाज येताच चांगुणा जराशी तिरपी झाली अाणि स्वत:हुन तो पत्थर स्वत:च्या हंड्यावर झेलुन घेतला.
एकदा वैजयंतीने ज्वर असल्याचं नाटक करुन घरीच थांबुन घेतलं अाणि त्या दिवशी लपुन शुभ्र पांढ-या हंड्यावर रानफुल चोळुन असा काही किरमिजी रंग तयार केला कि सगऴयांचे डोळे विस्फारले. जिवघेण्या मोरपीसाचे चित्र बनवले होते तिने हंड्यावर. रस्त्याने जाताना चौकाचौकात, नाक्यानाक्यावर लोक तिला थांबवत होते. काहीजण वळुन वळुन पहात होते. एकजण तर वळुन पाहतांना वाटेत बसलेल्या कुंकमभांडारावाल्याच्या टोपलीत तोल जाऊन लाल झाला. तेव्हा चिडलेला कुंकुमभांडारवाला अाणि लालबुंद गृहस्थ सोडुन सगळं वृंदावन हसुन बेभान झालं होतं. नेहमी सारख्या सगळ्याजणी रांगेने राईजवळुन जाऊ लागल्या. पाऊल पाऊल नदीत उतरत गळाभर पाण्याशी उभं राहिल्यावर जसा श्वास भरुन रहातो तशा सगळ्याजणी उर भरुन श्वास घेत होत्या…..ह्या अनामिक चैतन्याने कि कधीही हंडाफुटीची वेळ येईल. सगऴयांनाच अाज असं वाटत होतं कि अाज वैजयंतीच भिजणार. सगळ्यांच्यात इतकी उठून जी दिसत होती. पण सावळ्याने नेम धरला तो कावेरीवर. हिरमुसुन हंडा तसाच टाकुन वैजयंतीने घराकडे उरफुटी धाव घेतली. अाणि घरी बसुन रडत राहिली. दोन दिवस. शेवटी सख्यांनी खुप मनवल्यावर ती तिस-यादिवशी उठली. अाणि अायुष्यात पहिल्यादाच वैजयंतीच्या कटीवर अाणि डोक्यावर बिननक्षीचा हंडा होता. सगऴयांच्या डोळ्यांना तिच्याकडे पाहिलं कि चुकचुकल्या सारखं वाटावं इतकी सवय झाली होती तिच्या नक्षीदार हंड्याची. सगळ्या सख्यांनी पाणी भरलं अाणि त्या परतीला निघाल्या तितक्यात “ साट्” अावाज अाला अाणि पुढच्या क्षणी वैजयंती नखशिखांत भिजलेली होती. वैजयंतीच्या मुखातुन “कान्हा !” अस्फुट स्वर उमटले.
कान्हाचं लक्ष वेधण्यासाठी रोज नक्षीदार हंडे बनवणा-या वैजयंतीला अखेर साध्या हंड्याने भिजवलं. जणू देवकीनंदन सांगु पहात होता कि देखावा म्हणुन केलेल्या भक्तीपेक्षा त्याला साधंसरळ मिटल्या डोळ्यांचं मनस्वी नामस्मरण मला अधीक प्रिय अाहे.
नंतर काही दिवस इतर सख्यासारखीच नित्यनियमाने वैजयंती भिजत राहिली.
एकदा संध्याकाळी राईजवळच्या सगळ्यात गर्द झाडाखाली खुप दाटी होती. सगळे जण डोकावुन,वाकुन पहात होते. हे तेच झाड होतं…वैजयंतीच. गर्दीत विचारणा होत होती कि नेमकं काय झालं वैजयंतीला ? तेव्हा चांगुणा म्हणाली “ काहीच नाही ! मी तिलाच शोधायला घरी अाणि मग पाण्याजवळ गेले तर हि इथे बसली होती” कुणीतरी म्हणालं , “ अगं हो पण तू तिला का शोधत होतीस? काय सांगितलं तू तिला? ”
चांगुणा म्हणाली ,” मी तर तिला हेच सांगितलं कि मला अात्ताच महालातल्या दासी कडुन कळालं कि श्रीकृष्ण नुकतेच स्नानादिक अाटोपुन अाले होते अाणि तयार होतांना समोरच्या तबकात मोरपिस,मोत्यांची माळ, तुळशीची माळ असा त्याचा नेहमीचा साज होता. त्यांचा सेवक एकएक करुन त्यांना साज देत होता तेव्हा ते तुळशीमाळे कडे बोट दाखवुन म्हणाले कि ‘ ती वैजयंतीमाळ’ द्या घालायला.
सगळे म्हणाले “ मग?
चांगुणा म्हणाली,” मग ? मग काहीच नाही . वैजू ने ते एेकुन डोळे झाकले ते शेवटचेच……"