मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत्त्वाचं नसतं. यशापयशाची गणितं हा धंद्याचा भाग आहे. कलात्मकतेशी त्याचा काहीच संबंध नाही. निखळ कलेचे उपासक हे बहुतांश शेवटपर्यंत भणंगच राहतात, पण पराकोटीची मेहनत आणि असामान्य प्रतिभा ही आपल्या रंगभूमीने नेहमीच जपली आहे आणि त्याहीपेक्षा गौरवलेली आहे. मराठी रंगभूमी मग अशा रंगकर्मींना खूप सांभाळते, त्यांची काळजी घेते आणि त्यांना नावलौकिक आणि प्रतिष्ठा देते. भद्रकाली प्रॉडक्शन्स हे नाव असेच मराठी रंगभूमीच्या इतिहासात अत्यंत मानाचं स्थान प्राप्त केलेल्या सस्थेचं नाव आहे. मच्छिंद्र कांबळी यांची ही संस्था. मच्छिंद्र कांबळी हे असेच मराठी रंगभूमीचे अत्यंत प्रतिभावान, मेहनती आणि म्हणूनच लाडके रंगकर्मी. नाटकाचा कपडेपट सांभाळण्यापासून ते अखिल भारतीय मराठी नाटय़परिषदेचं अध्यक्षपद दीर्घकाळ भूषवण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास हा केवळ मच्छिंद्र कांबळी यांची महती सांगणारा नव्हे तर मराठी रंगभूमीचं निःपक्ष, प्रामाणिक आणि मेहनत व टॅलेन्ट जोपासणारं रूप दर्शवणारी आहे. सांगण्यास आनंद वाटतो की, मराठी रंगभूमीची ही जोपासण्याची वृत्ती आज मच्छिंद्र कांबळींच्या नंतरही भद्रकाली प्रॉडक्शन्सने कायम ठेवलेली आहे. त्यांची ५५ वी कलाकृती ‘संगीत देवबाभळी’ हे सिद्ध करणारी कलाकृती आहे. या नाटकाच्या जाहिरातीवरून ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक शास्त्रीय संगीताची विशेष आवड असणाऱ्या दर्दी लोकांच्या पसंतीचं असेल असं वाटण्याची शक्यता आहे, पण खरं तर हे नाटक तुकोबांच्या अभंगांमुळे संगीतमय आहे आणि म्हणूनच ते दर्दी आणि गर्दी अशा सगळय़ा प्रेक्षकांना भावणारं म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं नाटक आहे.
‘संगीत देवबाभळी’ हे नाटक विविध पातळय़ांवर लक्षणीय आहे. सर्वप्रथम हे नाटक संत तुकाराम आणि विठू माऊली यांच्यातलं नातं सांगणारं नाटक आहे. तरीही नाटकात तुकोबा किंवा विठ्ठल नाही. देव आणि भक्त यांच्या पत्नींच्या माध्यमातून उलगडणारं हे नाटक आहे. ‘संगीत देवबाभळी’ हे याआधी एक एकांकिका म्हणून सादर झालं होतं. म्हणजे हल्लीच्या मराठी रंगभूमीच्या सशक्त संहितेच्या एकांकिकांवरून व्यावसायिक नाटकं बेतण्याच्या ट्रेंडमधलं नाटक आहे. तरीही हे नाटक भद्रकालीने तद्दन व्यावसायिक रूपात न करता ते त्यांची विलक्षण कलात्मकता जोपासत सादर केलेलं आहे. ‘संगीत देवबाभळी’ हे संगीत नाटक आहे. तरीही यातलं संगीत हे कुठेही संगीत शास्त्राचा उहापोह करणारं नाही. नाटकातली गीतं हे तुकोबांचे अभंग आहेत. तरीही नाटकाचं संगीत हे निव्वळ भक्तिसंगीतही वाटत नाही. आनंद ओक या संगीतकाराने या नाटकात अभंग आणि भावगीत यांच्या मधला प्रकार गाठून नाटकाला एक वेगळीच गंमत आणलीये. एकूणच ‘संगीत देवबाभळी’ हे भद्रकाली प्रॉडक्शन्सने कोणताही अधिकचा आव न आणता व्यावसायिक रंगभूमीवर सादर केलेला एक खूपच विलक्षण नाटय़ानुभव आहे. निर्माते प्रसाद कांबळींचं यासाठी विशेष कौतुक करायलाच हवं.
प्राजक्त देशमुख हे एक नवीन नाव ‘संगीत देवबाभळी’मुळे व्यावसायिक रंगभूमीवर आलं आहे. हा तरुण रंगकर्मी अत्यंत प्रतिभावान असल्याचा दाखला हे नाटक देतं. ‘संगीत देवबाभळी’चं लिखाण हे नाटकाची दृष्यात्मकता लक्षात घेऊन केलेलं लिखाण आहे. प्राजक्तने जे नाटक लिहिलंय तसं लिहिणं सोपं नाही. कारण दृष्यात्मक लिखाण करताना त्याने कुठेही आशय ढळू दिलेला नाही. वरवर विठ्ठल भक्तीवरचं वाटणारं ‘संगीत देवबाभळी’ हे एका वेगळय़ा पातळीवर स्त्रियांच्या मानसिकतेवरही प्रकाश टाकून जातं. तरीही नाटक कुठेही अवजड, बोजड वाटत नाही हे प्राजक्त देशमुखचा वेगळेपण दाखवतं. प्राजक्तने जी गीतं ‘संगीत देवबाभळी’साठी लिहिली आहेत तीदेखील विलक्षण आहेत. कारण ती इथे तुकोबांच्या अभंगांबरोबर अगदी गुण्यागोविंदाने नांदतात. दिग्दर्शनात प्राजक्तने प्रचंड कल्पकता दाखवली आहे. जवळजवळ टॅबलो वाटावं असं त्याने हे नाटक बसवलंय. नाटकातल्या प्रत्येक मुव्हमेन्टमध्ये एक विलक्षण लयबद्धता दिसते. ही लय नाटकातल्या गाण्यांची नाही किंबहुना नाटकातील गाण्यांनाही नाटकाची म्हणून एक वेगळी लय आहे. कारण ‘संगीत देवबाभळी’मधली गीतं ही नाटकाच्या गद्याचाच भाग म्हणून येतात. ‘संगीत देवबाभळी’ची दोन तांत्रिक अंगही अप्रतिम झालेली आहेत. एरवी देदीप्यमान सेट निर्माण करणारे जादूगार प्रदीप मुळय़े इथे आपल्या कलात्मक बेस्ट फूटवर आहेत. त्यांनी सूचकपणे उभा केलेला तुकोबांचा वाडा आणि संपूर्ण नाटकाला प्रकाशयोजनेतून प्रफुल्ल दीक्षित यांनी दिलेला फिल टेरीफिक आहे. नाटकाच्या प्रकाशयोजनेलाही काळाचं भान कसं राखता येतं हे ‘संगीत देवबाभळी’ दाखवतं.
हे दोन पात्री नाटक आहे. खरं तर दोन कलाकारांचं नाटक आहे. आवलीच्या भूमिकेत शुभांगी सदावर्ते आणि रुक्मिणीच्या भूमिकेत मानसी जोशी. दोघी उत्तम गातात. आपल्या सहज अभिनयातून आणि वावरातून दोघीही प्रेक्षकांना बांधून ठेवण्यात कमालीच्या यशस्वी झाल्या आहेत. आपल्या अभिनय कौशल्यातून प्रसंग रंगवत असताना या दोघी लीलया गाऊ लागतात आणि प्रेक्षक म्हणून आपण मुग्ध होतो. शुभांगी आणि मानसी या दोघींची या नाटकासाठीची निवड अचूक आहे.
अशा पठडीचं नाटक व्यावसायिक रंगभूमीवरून सादर करणं हा जोखमीचा निर्णय आहे. प्रसाद कांबळींनी हा निर्णय करून मराठी रंगभूमीवर आणि प्रेक्षकांवरचा त्यांचा विश्वास दाखवलाय. खूप तुरळक नाटकं अशी असतात जी प्रेक्षकांनाही भूमिका घ्यायला लावतात. ‘संगीत देवबाभळी’ हे असं नाटक आहे. मराठी प्रेक्षकांनी आपण नाटय़कलेचे भोक्ते आहोत की नाटकांमधून आपली केवळ मनोरंजनाची गरज पूर्ण करणं एवढीच अपेक्षा आहे ही भूमिका स्पष्टकरण जरुरीचं आहे. ‘संगीत देवबाभळी’ हे विलक्षण नाटक कोणत्याही नाटकवेडय़ा प्रेक्षकाला आवडल्यावाचून राहणार नाही.
– दर्जा : साडेचार स्टार
– नाटक : संगीत देवबाभळी
– निर्मिती : भद्रकाली प्रॉडक्शन्स
– निर्माती : कविता मच्छिंद्र कांबळी
– सादरकर्ते : प्रसाद कांबळी
– नेपथ्य : प्रदीप मुळ्ये
– संगीत : आनंद ओक
– पार्श्वगायक : आनंद भाटे
– लेखक, दिग्दर्शक : प्राजक्त देशमुख
– कलाकार : शुभांगी सदावर्ते, मानसी जोशी
– नाटक : संगीत देवबाभळी
– निर्मिती : भद्रकाली प्रॉडक्शन्स
– निर्माती : कविता मच्छिंद्र कांबळी
– सादरकर्ते : प्रसाद कांबळी
– नेपथ्य : प्रदीप मुळ्ये
– संगीत : आनंद ओक
– पार्श्वगायक : आनंद भाटे
– लेखक, दिग्दर्शक : प्राजक्त देशमुख
– कलाकार : शुभांगी सदावर्ते, मानसी जोशी
http://www.saamana.com/review-of-marathi-play-sangeet-devbabhali/