ती दुसरं काहीही झाली असतीस तरी चाललं असतं. पण ती नको त्याच क्षणांची झाली अाणि सगळाच गोंधळ होऊन बसला.
ती देव्हारा होत समईची झाली असती तरी चाललं असतं. म्हणजे ती तेवत राहिली असती अाणि ह्याला घरातल्या कुठल्या तरी कोप-यात एक स्निग्धता तेवतेय हि अाणि इतकीच अाठवण राहिली असती. किंवा ती भिंत होऊन सवयीची झाली असतीस तरी चाललं असतं. म्हणजे त्याच्या छताला तेवढंच घर म्हणुन मिरवता अालं असतं. घरासाठी छतापेक्षा भिंत महत्वाची असते हे छताच्या पुरुषत्वाला कळायला जरा वेळच लागतो. किंवा ती जिना होऊन कलंडत्या पेल्याची झाली असती तरी चाललं असतं. म्हणजे चटका बसावा तसा अादळण्याचा अावाज क्षणभरानंतर विझला असता किंवा घरातलंच एखादं बंद घड्याळ ज्याला पुन्हा चालु करण्याच्या भानगडीत कुणी पडत नाही. अशा अडकल्यावेळेची जरी ती झाली असती तरी त्याला चाललं असतं मग येता जाता त्याला त्रास झाला नसता. किंवा त्रास सवयीचा झाला असता.
पण एकदा तीने अंगणात हौसेने पारिजात लावला होता. मग दारात येता जाता पायाखाली पारीजात यायचा. पाय अडखळायचा, जीव हळहळयचा. ती पायदळी येणारा प्राजक्त झाली होती .
तीने प्राजक्त व्हायला नको होतं. ती दुसरं काहीही झाली असती तरी चाललं असतं त्याला.
ती वेणू होत त्याच्या अोठांची झाली असती तरी कृष्णसुख होतं. किंवा तीने रागारागात अंगठ्याला होणारी एखादी जीवघेणी ठेच व्हायला पण हरकत नव्हती. ती रुक्मा होत प्रश्नांची ही होऊ शकली असती किंवा राधा होत अाठवांची होऊ शकली असती.
पण ती काहीही अपेक्षा नसणारी,निरपेक्ष पण तरीही त्याच्याच नावात तल्लीन होणा-या मीरेच्या एकतारीचा अखंड सूर झाली. तीने तो सूर व्हायला नको होतं. ती दुसरं काहीही झाली असती तरी चाललं असतं त्याला.
ती डुगडुगत्या टेबलावर ठेवलेल्या जुन्या ग्रामोफोनची झाली असती तरी चाललं असतं. तिथेच ठेवलेल्या रॅकॉर्डस् मधल्या मेहंदीच्या ‘रंजिश हि सही’ च्या मखमली अार्जवाची झाली असतीस तर चिंता नव्हती. कारण ‘तू भी तो कभी मुझको मनाने के लिए अाss’ ह्या उतरंडीवर अाश्वस्थ होता येतं होतं त्याला. किंवा ती पुस्तकाच्या शेल्फमधल्या डावीकडुन नवव्या जागीच्या दिवान ए गालिबच्या एकशे अडुसष्टाव्या मुडपलेल्या पानावरच्या “…कि समझ नही अाता ज़िंदगी सासों सें है या तेरी याद से” ह्या अोळीची झाली असती तरी खपवुन घेतलं असतं त्याने. कारण शक्यतांचं अर्ध अांदोलन 'सासों से है' वर टिकलेलं होतं.
पण मग नंतर रात्र झाली अाणि त्याल्या अातुनच अोळ सुचली “तेरी याद नब्ज होती तो ठिक होता , ये रात बनी बैठी है। नही कटती”
तीने ‘रात’ व्हायला नको होतं. ती दुसरं काहीही झाली असती तरी चाललं असतं त्याला.
ती ठसका होत पाण्याची झाली असती तरी चालणार होतं. मग तहानेच्या नावाखाली झाकली असती. किंवा डोळ्यांत चूरचूर होत वेगळ्या पाण्याची झाली असती तरी ठिक होतं. मग धुळीच्या नावाखाली टाळता अाली असती.
पण ती चार चौघात घशातला शब्द थोपवणारा गच्च अावंढा झाली. तीने शब्द थोपवायला नको होतं. ती दुसरं काहीही झाली असती तरी चाललं असतं त्याला
‘पेपर नाही’ , ‘दुध अर्धा लिटर’ , ‘भिशी’ , ‘किराणा भरला’. ती कॅलेंडरवरच्या खुणांची झाली असती तरी चालणार होतं त्याला. कामाच्या जात्यात भरडणारा लाल खुणांनी सुखावणारा जीव कॅलेंडरवरचे तीचे टिपणं फारसे निरखत नाही. किंवा मागच्या खिडकीतुन डोकावणारा गुलमोहर होत ती सावळ्या उन्हाची झाली असती तरी चाललं असतं. किंवा कवीतेच्या वहीच्या मागे फावल्या चिन्हाची झाली असती तरी चाललं असतं त्याला किंवा ढग पसरलेल्या रविवारच्या मध्यान्हाची झाली असती तरी हरकत शुन्य होती.
पण अशाच मध्यान्ही, जेव्हा तो तीच्या भिंतीवरच्या चंदनाच्या हारामागे दडलेल्या फोटोवर तंद्री लावुन बसलेला असतो… तेव्हा ती रद्दीवाल्याचा दर रविवारी मध्यान्हाचा प्रश्न झाली. “बाईसाहेब अाहे का घरी ?” तीने तो प्रश्न व्हायला नको होतं. ती दुसरं काहीही झाली असती तरी चाललं असतं त्याला.
थोडक्यात , ती दुसरं काहीही झाली असतीस तरी चाललं असतं. पण ती त्याच्या नको त्याच क्षणांची झाली अाणि सगळाच गोंधळ होऊन बसला.
- प्राजक्त २३ मार्च २०१७
- प्राजक्त २३ मार्च २०१७
No comments:
Post a Comment