वारी-विठोबाचा अनुवाद
मला वारी कशी दिसते ? असा प्रश्न विचारल्यानंतर वारी-विठोबाचा माझ्यापुरता केलेला अनुवाद सांगणं अाधी मला महत्वाचं वाटतं. कारण ‘वारी का?’ ह्या गावची वाट ‘विठ्ठल कोण?’ ह्या डोंगरावरुन जाते. ह्याच दोन ‘का’ अाणि ‘कोण’ मध्ये पांडुरंगाचा माझ्यापुरता अनुवाद अाणि वारीचं माझ्यापुरतं भाषांतर दडलेलं अाहे.
अापल्या देशात देवी-देवतांची कमी नाही. त्यांच्या दर्शनासाठी जाणा-या यात्रा,जत्रा, उरुसही अनेक अाहेत. पण मग वारीमहात्म काय अाहे ? खरं तर असं अाहे कि वारीचं महात्म असं शोधत असाल तर ती पहिली चूक अाहे. कळत-नकळत, कमी-अधिक फरकाने सगळेच अापल्या अस्तित्वाचं कारण शोधत असतो. अापण अापले भटकत असतो काहीतरी शोधत. अापण ‘इथं’ का अवतरलोय ह्याचं उत्तर शोधत. ह्याला कुणी अात्मशोध म्हणेल ,कुणी परमेश्वरशोध, कुणी काहीच न म्हणता म्हणेल ‘छ्ये! मी असलं काही शोधतच नाहीए’. हि सगळीच उत्तरं खरीय.
एकदा मी विठोबा शोधत असतांना अापला अापला भटकत होतो. अनेकांना पत्ते विचारले पण मला समजेल असा पत्ता सांगितला तो तुकोबांनी. तो ही अाधी त्यांच्या काखोटीची पुरचुंडी पुढ्यात ठेवत कि ‘ पत्ता मस सापडेल रे, अाधी बस दोन घास खाऊन घेऊ’ .
‘वारी का?’ ह्या गावची वाट ‘विठ्ठल कोण?’ ह्या डोंगरावरुन जाते. ह्याच ‘का’ अाणि ‘कोण’ मध्ये माझं पांडुरंगाबद्दलचा माझ्यापुरता अनुवाद अाणि वारीचं माझ्यापुरतं भाषांतर दडलेलं अाहे.
अाता विठ्ठल नावाचा डोंगर अाधी चढू. खरं संतामहंतांच्या अाणि भक्तांच्या गाथागोष्टीतुन हा देव अक्षरश: तयार झालाय. अभंग-निरुपणात जे येतं त्याकडे इतिहास म्हणून पहायला कुणी लावत नाही तर जगणं सोडवण़्याचं नितीतत्वांचं प्रमेय म्हणून ते बघावं असा त्या मागचा उद्देश असतो.
राधाकारणे रसलेली रुक्मिणी द्वारकेच्या दक्षिणेला दिंडीरवनात येऊन लखुबाई(रखुमाई) झाली. तिची समजुत घालायला कृष्ण पंढरपुरास विठ्ठलरुपात अाला. अाणि भक्त पुंडलिकाच्या अाळवणीमुळे कृष्ण पंढरपुरात अाला. भक्त पुंडलिक मातापित्याच्या सेवेत मग्न होता. त्याने विट फेकली अाणि त्याला थांबायला सांगितलं. तो थांबला. तो हा विठ्ठल. हि दोन स्वतंत्र कारणं विठ्ठलाची अाणि पंढरपुराचं नातं सांगणारी अापल्याला वेगवेगळ्या कथा-पुराणा-अाख्यायिकांमध्ये सापडतात.
विठ्ठल हे एक अत्यंत मानवी रुप अाहे. अगम्य अाणि जगाला चाट करणारे चमत्कार ह्याला येतात असा कुठेही त्याचा दावा नाही. (कथा-सिनेमे-मालिकेवाल्यांना त्यांची पोटं चालवाची असतात. ते बघा अाणि विसरा. ते पाहूच नये किंवा ते संदर्भ म्हणून पाहु नये.) ‘परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्’ असं काही प्रतिपादन नाही त्याचं. कुणाला वाचवायला म्हणून खांब फोडुन अालेला हा अक्राळविक्राळ देव नाही, हा कुणी धर्मरक्षणासाठी अवतरलेला राजपुत्र नाही, हलाहल प्राशुन घ्यायला अालेला हा संकटमोचक देव नाही, नितीअनितीच्या महाभारतात दिशादर्शक सारथ्य करण्यासाठी हा देव अालेला नाही, असुरांचा नि:पात करण्यासाठी अालेल्या देविकांसारखा हा दुर्गात येऊन वसलेला नाही, कोsहम हा जडजटील प्रश्नाची बुद्धी तुम्हाला प्राप्त व्हावी म्हणून काही मांडायला अालेला अवतार नाही. केवळ एका भक्ताने भेटीची इच्छा व्यक्त केली म्हणून अालेलं हे काळंसावळं रुप अाहे. बरं त्यातही ‘भक्त पुंडलिकाच्या घरी साक्षात मी अालोय तरी हा अाईबापाची सेवा करत बसला? अाणि माझ्याकडे विट फेकुन मला प्रतिक्षा करायला लावली? मला?’ हा असा अहंभाव पण त्याच्याकडे नाही.त्याने तसं केलं म्हणून लगेच ‘ढिश्श!!’ करुन शाप नाही दिला विठ्ठलाने. तो कंबरेवर हात ठेवुन बापुडा उभा राहिला. अापापली कर्तव्ये यथायोग्य पार पाडावी हेच त्याला हवंय. अाधी कर्मयोग !
अगम्य सुरस चमत्कारिक अशी जादू वगैरे काही नाही. नाही म्हणायला मनुष्याकडेही असेल असं सामर्थ्य त्याच्याकडे अाहे, पण तेही मानवी अाहेत हो. जनीला दळणकांडणातच मदत केली, एकनाथाचं रुप घेऊन राण्याकडेच गेला, बादशाहाची हजामतच केली, गोरोबाला चिखलच तुडवुन दिला, दामाजीला रसदच पोचवुन दिली. त्याच्याबद्दलच्या चमत्काराच्या कथा ह्या विठ्ठलपुराणातल्या मूळ कथा नव्हे. विठ्ठलाप्रतीच्या उत्कट भक्तीच्या दाखल्याखाली त्या रचल्या गेल्या असाव्या.
ह्याच्याकडे त्रिशूळ नाही, ह्याच्याकडे चार हात , पाच डोकी नाही, गदा-सुदर्शन अशी कोणतीच अस्रशस्त्र नाहीत. कंबरेवर हात ठेऊन तो फक्त वाट पाहतोय.
उंदराच्या किंवा नंदीच्या किंवा अाणखी कुणा देवाच्या वाहनाच्या कानात अापली कामना सांगुन देवाकडुन काही मागाचंय का ? मग ती ही सोय इथं नाही. काय असेल तर थेट बोला कि राव. बरं अमूक-तमुक अायास सायास नाही. ते केले म्हणून तो चिडेल वगैरे असंही नाही. इतरां ठायीच्या अादर, अप्रुप, धाक, शरण वगैरे भावना त्याच्या भक्तीत नाही. इतर कोणत्याही धर्मात असा कोणता देव अाहे ज्याच्याकडे गेल्यावर भक्त अाधी त्याला मिठी मारता अाणि मग पाया पडतात? ‘प्रथम भेटी अलिंगन । मग वंदावे चरण’-तुकाराम. विठ्ठल हे रुपच मुळी ‘सांगाती’ म्हणून. न बोलावता कुणाच्यातरी मनात इच्छा झाली म्हणून अालेला. सखा सांगाती.
सोळा सोमवार, खणानारळाची अोटी, बोकड-बकरु, कार्यप्रारंभ म्हणून गणेशपूजा, कार्यपुर्ती म्हणून सत्यनारायण, संकटमोचन म्हणून महा-लघुरुद्र, तेल-नारळ-धान्य-शेंदूर असलं सगळं किंवा व्रतवैकल्य काहीही नाही. अापण अापल्या माथ्यावरची संकटं जावी म्हणून करावयाच्या ह्या गोष्टी असतील पण मग ह्या जातात कुठं? सृष्टीचा नियम अाहे कि त्या एकाठिकाणाहुन दुसरीकडे जातील फारफार तर. पण नाहिशा नाही होत. ढिग असेल तर खड्डा होतोच कुठं तरी हा निसर्गनियम अाहे तसा. मग हि संकटं अापली जावी अाणि त्याने ईसासारखी त्याच्या माथ्यावर घ्यावी का? पण मग हे भक्तीला , भक्तीमार्गाला अाणि भक्ताला शोभतं का? ह्यात स्वार्थ अाला. ‘त्याच्याकडे धाव म्हणजे अाता लगेच पाव’ असं नाही का? विठ्ठलाचं जेव्हा जेव्हा स्मरण केलंय तेव्हा तेव्हा ते संकट पेलण्यासाठी सामर्थ्य हवं ह्या अांतरिक उर्जेसाठीच केलं गेलंय. म्हणूनच त्याच्यानावाने वर सांगितलं तसलं काही कर्मकांडं अाजवर एेकिवात नाही (असतील तर सब झूठ-कोपलकल्पित)
अाता ‘वारी’ नावाच्या गावाला जाऊ. तर वारी !
पांडुरंगाची भक्ती हि भागवतधर्मानुसार अाहे. अाणि भागवतधर्मात माणसाच्या योग्यतेचं मुळ भक्तीत असतं, जातीत नव्हे. त्यामुळे गंमत अशी कि वारीमधल्या ज्या दिंड्या निघतात त्यात बायका-माणसं, मुलं-मुली , अाबाल-वृद्ध तर अाहेच पण ज्ञानदेव, तुकाराम, एकनाथ, निवृत्तीनाथ, मुक्ताई, सोपानदेव, चांगदेव अाणि असे अनेक संतही सहभागी होतात. ( पुर्वी ‘ते’ जायचे, अाता पालख्या.इतकंच) अाणि वारकरी सांप्रदायात संत हे देवाहुनही श्रेष्ठ समजले जातात. त्यामुळे त्यांच्या सहवासात ह्या दिंड्या निघतात.
अापल्याकडे चारधाम किंवा अमरनाथ किंवा जगन्नाथ यात्रेला जाण्याची प्रथा अाहे. ती यात्रा अापण मित्र-कुटूंबासमवेत ठरवुन निघतो. पण इथे वारी मध्ये सगळे एकत्र जमुन एक जत्राच ‘वारीला’ निघालीय असं स्वरुप असतं. ज्यात ‘भेदाभेद नूरे’ हे जगण्याचं ब्रीद केंद्रस्थानी.
पापं धुवून काढायचीय ? चारधामासारखं पुण्य पदरी पाडायचंय? मोक्षप्राप्ती हवीय ? इच्छित फलप्राप्ती हवीय? मग नाही. वारी त्यासाठी नाही. अापल्या परंपरेत वेगवेगळ्या कारणाने माहेरी जाण्याची निमित्तं असतात. अाणि ती निमित्त संपली तरी नंतर ती वर्षातुन का होईना माहेरा जातेच. मग ती माहेरी कोणत्या हेतूने जाते ? काही मिळवायला? नाही. ती तिथे जाते ते केवळ तिची इच्छा असते म्हणून. तिथं गेल्यावर तिचे अाईबाप,भाऊबहिण, जुने सवंगड्यांना नितांत अानंद होईल म्हणून. संसारातला शीणभाग जाईल म्हणून. वर्षभराचा सासुरवास उतरावा म्हणून. बरं सासुरवास म्हणजे त्रास अशा अर्थी नव्हे. कर्मयोगवादात संसारालाच सासर म्हटलंय. अाणि ती माहेरी गेल्यावर ती अाई पुढे गा-हाणे करीत नाही कारण तिला ठाऊक अाहे कि त्याने अाईला त्रास होईल अाणी परतल्यावर अाईच्या जिवाला घोर लागुन राहिल. तसाच वारकरी काही मागायला वारी करत नाही . तो तिथं जातो. विठ्ठलाला अलिंगन देतो अाणि मग पाया पडतो. एकुणच जगणं काय अाणि संसार काय तो म्हणजे एक लांबच्या पल्ल्याचा प्रवास. मग अशा प्रवासाला निघाल्यावर अापण मध्ये कुठं जर थांबलो तर त्या थांब्याकडुन अापल्याला ईप्सित स्थळी पोहोचण्याच समाधान नको असतं. अापल्या हवं असतं तर ईप्सित स्थळी पोहोचण्यासाठीची शक्ती. प्रवासाचा शीणभाग घालवण्यासाठी अापण तिथं थांबतो. तीच प्रसन्नता वारीत असते.
अायुष्यात एकदा अायुष्य कंठल्यानंतर कलत्या वयात चारधाम करावं अशी अापल्याकडे पद्धत अाहे. कारण कलत्या वयात म्हणजे मृत्युची वर्दी अालेली असते. मग अशा तिर्थक्षेत्री मृत्यु अाला तर अाल्या जन्माचं सार्थक होईल. पण हे असलं सार्थकी लागण्यासाठी अायुष्यात एकदा म्हणून वारी करावी असं नाहीच. ती दरवर्षी करायची गोष्ट अाहे. दरवर्षीच्या पेरणी सारखं. फलप्राप्ती वगैरे भानगड इथे नाही .अाणि म्हणूनच वारीमहात्म्य नावाचं थोतांडही इथं नाही.
अाणि म्हणूनच तुकोबांना पत्ता विचारायला थांबलेला मी. पुन्हा काही हुडकायच्या प्रवासाला निघालो नाही. समोर सगळ्याच्या माथ्यावर अबीरबुक्का अाणि पायाखाली विट दिसली कि उरतं काय ? उरते फक्त उराउरी भेट ! जरा अापणच अापल्या पायाच्या अंगठ्याने चाचपडलं कि अापल्याही पायाखाली विट जाणवेल. इतका जवळचा पत्ता तुकोबा सांगतात. बरं म्हणून मी अात्यंतिक अाध्यामिक - अास्तिक अाहे का? तर नाही ! मी स्वत:ला डोळस नास्तिक म्हणवत असतो. ‘अाहे एेसा देव वदवावा वाणी । नाही एेसे मनी अोळखावा.’
मला वारी कशी दिसते ? मला वारी ‘अशी’ दिसते. वारी-विठोबाचा अनुवाद.
- प्राजक्त देशमुख
लोकमत : http://www.lokmat.com/blog/adhyatmik/manimatala-vithuraya/
लोकमत : http://www.lokmat.com/blog/adhyatmik/manimatala-vithuraya/
No comments:
Post a Comment