Friday, November 3, 2017

मास्तर उवाच ( जागतिक रंगभुमी दिन) ५ नोव्हेंबर २०१७


प्रति ,
तोंडाला रंग लावलेल्या 
जागतिक सगळ्यांना
सनविवि,
त्याचं झालं अास्सं कि गेल्यावर्षी अाम्ही सगळ्या गावक-यांनी एका अोळीची पाण्याची गीता सांगायला मावळवाडीची वेस अोलांडायची 
ठरविली. ह्ये तांडा निघाला ना अामचा. संभ्या , चंद्री तांड्याच्या सगळ्यात पुढं. अानी गावक-यांच्या तांड्यासोबत काय कमीजासं पहाला गावाचे खंदे लोकं बी होते. जशे कि मलेरिया डाक्टर, तुणतुणंवाला मास्तर, गाणारं गुरुजी, तहसिलदार बाई, चायवाला, कंडक्टर, बायजा, पुर्वी, शांताक्का, असे हाय नाय ते समदे . अाणि सगळ्यात शेवटाला मी. कसंय शेवटी अासलं कि मागं वळुन पाह्यल्यावं तांड्यांने किती वाट तुडवलीय हे तं दिसतंच पन तांडा कुठं चाल्लाय ह्ये पन पटदिशी कळतं. 
गायकवाड चौकातल्या दत्ताच्या देवळाजवळच्या सच्चा पीराच्या सांगण्यावरुन अाम्ही सुरवात केली. गावापासुन सुरु झालेली अामची गीता समद्या लोकांना ‘काय त्येच त्येच टुमणं’ वाटंल असं वाटलं होतं पन तसं नाई झालं अो ! जो तो म्हणायचा हे ‘जिवाला घोर लावणारं अाहे’ , ‘तुमच्या गीतेपायी अामचा अावंढा बाटलीचं बूच वाटुन श्वास अडकायला झाल्तां’. काही सुशिक्षित लोकं ‘हे फारच जिवघेणंय, अस्सल मातीतमदलं’ वगैरे पन म्हणाले. ‘पानी नाही पाणी म्हणा’ सांगणा-या मंडळींना तहानेची व्याकुळता कळाल्याने त्यांनी कुणी तसली दुरुस्ती सुचवायचा प्रयत्न कधी केला न्हाई. शेवटी ‘पानी-पानी म्हणत मेले काय अाणि पाणी पाणी म्हणत मेले काय’ मरणा-यांच्या फक्त नोंदी घेणा-यांबद्दल किती शिरिअस रहायचं हे अाधीच गीतेत लिहुन ठेवलंय ते एक बरं होतं. 
अामचा प्रवासाची गंमत हि होती कि प्रत्येक थांबा अाम्हाला अामचाच वाटायचा. नक्की शेवटं ठरवुन ‘झेंडा तिथं जाऊन रोवायचा’ हे असलं अाम्ही ठरवलंच नव्हतं. जिथं जाऊ तिथं तिथं झेंडा रोवायचा असंच ठरलं प्रवासात अामचं. थोरामोठ्यांयच्या पाया पडल्यावर ते अाशिर्वाद द्यायचे तवा अाम्ही ‘अाशिर्वादापेक्षा दोन हंडे पानी द्या म्हनायचो’ ते त्यांनला अाधी अागोचरवानी वाटलं अासलं पन अाम्ची गीता एेकल्यावर त्यांना त्यातली खोली कि काय म्हणता ती अाकळली अासलं. खोल डोहापेक्षा पिचलेल्या अॅल्युमिनअम हंड्यातलं पानी कधी पहा मग कळलं कि खरं ‘गहन’ काय असतं ते !
भाषेचा अडसर अोलांडणारी अाम्ची गीता दिल्लीला पोहोचल्यावं ख-या अर्थाने कळालं कि अापन ज्ये करतोय त्ये किती महत्वाचं हाय. तसं सगळं दुन्येला माहिती असतं पन कुनतरी शिक्का मारल्याबिगर दुन्या झुकत बी न्हाई तसंच झालं. दिल्लीनं ‘या’ म्हनल्यावर ‘अामची गीता जागतीक का काय म्हंता तशी झाली’. जेव्हा गीता एेकल्यावं लोकं टाळ्या वाजवित उभी राहिली तेव्हा टाळ्या वाजवणारी मंडळी हळुहळु अस्पष्ट दिसाय लागली. अानी अासं काय हुतंय हे कळेपर्यंत डोळ्यातला चोरटा थेंब गालावर अाला. 
दिल्लीचं एकवेळ समजलं पन बिहार सारख्या अगदीच मराठीचा मागमुस नसलेल्या ठिकानी दिल्लीपेक्षा जास्ती गळाभेटी झडल्या तवा अाम्ही जरा बुचकाळ्यात पडलो कि नाटकानं संगीताचा अांगडं टोपडं घातलंय कि काय जणु . कारण संगीत म्हंजे लईच जालिम विद्रोही प्रकरण. कसलंच बंधनं न्हाई तेला. मंग जरा डोक्यातली ढवळाढवळ अाणखी शांत झाल्यावर लक्षात अाल्तं कि ‘माणुस नावाच्या त्वचेला एकदम घट्ट चिकटलेल्या वेदनेला संगीत काय, नाटक काय, गीता काय कशातही बांधा. ती थ्येट पोहचणारंच. अामची माई लहानपनी सांगायची ‘पाण्याचा धर्म असतो’, ‘पाण्याला न्हाई म्हणु नई’. दुन्येने अामच्या माईला खोटं पाडलं न्हाई ह्याचं लई बरं वाटलं. अामच्या पाण्याच्या गीतेला सगळ्यांनी डोस्कावर नाचवलं. ठाण्या-मुंबईला लोकांयच्या डोळ्याचा कडा पानावल्या. एक पांढ-या केसाची म्हातारमाऊली तर बोचकंभर पैशे घेऊन थेट स्टेजावर चढली अानी म्हणाली हे राहु द्या. नंतर माईक हातमदी घेऊन गहिवरल्या स्वरात म्हनली ‘ माझ्याकडे अात्ता इतकेच पैसे अाहे म्हणुन तितके दिले कृपया ते तुमचं मुल्यमापन अाहे असं कृपा करुन समजु नका’. अामच्या चारदोन शब्दानी लोक पसापसा पैसे अोंजळीत टाकुन जात्येत हे पाहुन खरं सांगतो अातडीला पीळ पडला. 
अशी कितेक गावखेडी असतील, रुसलेल्या निसर्गाचे पाडे असतील जिथं सरकारी अोलावा नसेल पोचत पण अापुलकीची अोल पोचतेच. देशादेशात, राज्याराज्यात ,कितीही भिताडं उभी करा पन मनं जुळली कि कापुरासारखी सगळी अंतर नाहीशी हुत्यात. 
हे सगळं वै श्विक अनुभव कुठे अनुभवलं अाम्ही? तर एका रंगमंचावर अनुभवले. 
विंगेत डफडी,तुणतुणंवाले संभ्याच्या बापाला परत परत मरतांना पहाचे, परत परत संभ्या बापाला अागीच्या हवाले करायचा, चंद्री परत परत सोडुन गेलेल्या नव-याच्या अाठवणी कोरड्या हंड्यात पहाची, मास्तर परत सगळा धीर एकवटुन मरणाला मिनतवा-या करुन संभ्यापुढं धीरानं उभा रहाचा. सगळं त्येच त्येच परत परत. कापल्यानंतर काळ जातो तशी कट्यारीची धार बोथट होत जाती पण हिथ मात्र नव्यानं काळीज कापल्या मावळवाडीच्या दु:खाला  प्रत्येक वेळी नवी धार यायची. 
काय होती अामची एक अोळीची पाण्याची गीता ? असा कोण्चा अाशावाद सांगत सुटलो होतो? असं कोण्चं तत्वज्ञान मांडत निघालो होतो अाम्ही मावळवाडीवाले ? हेच कि  ‘शेवटी उशीरा का होईना पाण्याचा टॅंकर येतोच’ अानी फक्त अापल्या गावाची वेस अोलांडली कि समदं जागतिक असतं. ह्याच अामच्या उण्यापु-या हंडाभर चांदण्या. 

- अापलाच मास्तर (मुपो: मावळवाडी)

No comments:

Post a Comment

अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...