कल्पना करा कि मी तुम्हाला एक नाणं दाखवतोय अाणि विचारतोय कि हे काय अाहे ? तुमच्याकडुन एक उत्तर येईल उदा. ’काटा’.
तर , नाटकाची बीजे नेमकी कोठे असतात ? ह्याक्षणी मला अचानक एक अभंग अाठवतोय.
नामदेव केले स्वप्नामाजी जागे । सवे पांडुरंगे येऊनिया ।। सांगितले काम करावें कवित्व । वाऊगे निमित्य बोलो नको ।।
तुकोबांनी ‘त्यांच्या’ काव्यसर्जनशीलतेचे बीजं कधी रुजली ह्याची नोंद अशी करु ठेवली अाहे. जागृताअवस्थेत अाजुबाजुला घडणा-या घटनांबाबत अनभिज्ञता असलेल्या अापल्या सारख्यांकडुन अापल्या 'अशा' नोंदींच्या अपेक्षा ठेवणं म्हणजे तशी अत्युक्तीच म्हणावी लागेल.
अापल्याच अाजुबाजुला घडणा-या एखाद्या घटनेमुळे किंवा एखाद्या एेकिव प्रसंगामुळे नाटक सुचत असेल असं नसावं. पहिल्याच धारेत घडा पुर्ण भरत नसतो. अशा असंख्य धारांचा संचय झाल्यानंतर अापण ‘घडा भरला’ असं म्हणतो. एखादं भाषण किंवा ‘आसुड..’ सारख्या लेखनापेक्षा फुलेंना 'तृतीय रत्न' हा विषय नाटकातच का मांडावा वाटला असेल? तर ह्याच संचयातुन. एखादी घटना किंवा एखाद्या घटनेतुन तयार झालेली अवस्था कुठेतरी मनात घर करुन रहात असावी. अाणि अनेक तशाच घटनांची जंत्री जमली कि मग वाटतं कि ‘ हा विषय मांडायला हवा.’ तेंडुलकरांच्या ‘गिधाडे’ सारखं उदाहरण एखादंच.
तेंडुलकर म्हणतात, “गिधाडेच्यावेळी मी एखादी व्यक्ती भडाभडा बोलत जावी तसं लिहत गेलो. कथा, पात्र, रचना काही काही डोक्यात नव्हतं . मुळात मी ‘लिहतोय’ ह्याचंच मला भान नव्हतं.” ‘एका सुस्त पडलेल्या समाजावर कुणीतरी बॉंब टाकावे’ असं ‘गिधाडे’चं वर्णन गिरिश कर्नाडांनी कुठंतरी केलं होतं. पण मुळात हे नाटक ‘चला समाजाला घडवुया किंवा समाजविघातकांना अद्दल शिकवुया’ अशा भावनेनं लिहलेलंच नव्हतं. मुळात नाटक हे समाजासाठी असतं, प्रेक्षकासाठी असतं, त्यातुन प्रबोधन वगैरे करायचं असतं ह्या असल्या धास्तीतुन तेंडुलकरांनी कुठलंच लिखाण कधी केलं नाही. अाणि ‘गिधाडे’ लिहतांना तर तसं तत्कालिन निमित्तंही नव्हतं. नाटक पुर्ण झाल्यावर ‘मुदतीच्या तापातुन बाहेर अालेल्या माणसासारखं वाटलं’ असं स्वत: तेंडुलकरांनी म्हटलंय. मग हे कसं झालं ? त्यांचं मध्यमवर्गीय जगणं, घर सोडुन एकटे मुंबईला येऊन रहायला अाल्यानंतर मोठ्या भावाचा अाजारात सांभाळ करणं हे सगळं त्यांच्यासाठी नविन होतं. पण ह्याचा अाणि ‘गिधाडे’चा तसा काहीच संबंध नाही. परंतु तत्कालिन निमित्त नसलं तरी नाटक हे माध्यम त्यांच्या ‘अात’ पर्यंत शिरलेलं होतं. त्यामुळे त्या अनुभवांतुन झालेल्या अवस्थेचं रुपांतर होऊन ते लिहल्या गेलं असु शकतं. चार दिवसात कोणताही विषय डोक्यात नसतांना लिहलं. किंबहुना हे नाटक लिहतांना तेंडुलकर दुसरंच नाटक (शांतता,कोर्ट चालु अाहे) लिहित होते. ते बाजुला ठेऊन त्यांनी गिधाडे लिहुन काढलं.
‘शांतता…’चं देखील तसंच. ह्या नाटकाला तर मानाचा ‘कमलादेवी चट्टोपाध्याय पुरस्कार’ मिळाला. पण ‘तें’ म्हणतात कि लेखकाने एखादं नाटक कसं लिहु नये ह्याचं उत्तम नमुना म्हणजे हे नाटक. नाटक केलं नसतं तर संस्था बंद पडायला येईल म्हणुन अगदी डोक्यावर बसुन लिहुन घेतलेलं नाटक. ते नाटक पण ठरलेल्या वेळेपेक्षा कमी होत असल्याने अाता काय तर … नाटकाच्या शेवटी बेणारेबाईचं स्वगत लिहुन टाकलं. अर्थात तालमी बघितल्यानंतर त्यांनी लिखाणाची पुनर्बांधणी देखील केली होती. पण नाटक लिहतांना, त्याबद्दल चर्चा करतांना कधी कधी असं बळजबरी लिखाणही करावं लागतं पण नाटककाराच्या डिएनएमध्येच नाटक असलं तर हाती अालेलं साध्य सकसच असतं ह्याचा हा नमुना.
अार्थर मिलरच्या ‘डेथ अॉफ सेल्समन’चं बीज १९४९च्या अमेरिकेच्या अार्थिक घडामोडीचं केंद्र असलेल्या ‘अमेरिक ड्रिम’ ह्या संकल्पनेत होतं. तेंडुलकरांच्या अगदी उलट, म्हणजे अापल्या नाटकातुन काहीतरी संदेश गेला पाहिजे , नाटक प्रेक्षकाला डोक्यात ठेऊनच लिहलं गेलं पाहिजे अशी त्यांची धारणा होती.
एलकुंचवारांचा जन्म ‘वाडा चिरेबंदी’ सारख्याच वाड्यात झाला. त्यांचे वडिल तिथले जमिनदार होते. एलकुंचवार कुटुंबाची जरी ‘वाडा..’तल्या देशपांड्यांसारखी परिस्थिती नसली तरी अाजुबाजुला असे अनेक वाडे त्यांनी ढासळतांना पाहिले होते. स्वातंत्र्योत्तर काळातल्या अशा कुटुंबाची घुसमट अाणी कोलमडण्याबद्दल एलकुंचवार एकदा सत्यदेव दुबें बरोबर चर्चा करत होते. दुबेजी सुद्धा अशाच पार्श्वभुमीमधुन अालेले असल्याने त्यांनी त्यांच्या एका लिथार्जिक मनोवृतीच्या मित्राचा दाखला दिला. बदलाशी जुळवुन न घेणा-या अशाच एका परिवारातल्या त्याने एक ट्रॅक्टर घेतला जो त्याने कधीच वापरला तर नाहीच पण नंतर कधी विकलाही नाही. तो तसाच अंगणात पडुन राहिला. अाणि हीच ट्रॅक्टरची प्रतिमा त्यांनी नाटकात वापरायची ठरवली. ट्रॅक्टरच्या प्रतिमेने विचारांची घुसळण सुरु केली अाणि मग ‘वाडा चिरेबंदी’च्या पात्रांनी हळुहळु अाकार घ्यायला सुरवात केला.
शेक्सपिअर अाणि त्याच्या नाटकविषयक तथ्यांच्या तर अाता मिथ्यकथा झाल्या अाहेत. तो दिवसा खाटीकखान्यात अाणि रात्री नाट्यगृहाच्या अावारात अालेल्या प्रेक्षकांच्या घोडागाडी सांभाळत होता म्हणे. नाट्यगृहाची पार्किंग ते नाट्य जगतातला सर्वश्रेष्ठ नाटककार ह्या प्रवासात कितीतरी मनात घर करुन बसलेल्या गोष्टींनी मुर्त रुप धारण केलं असेल. तत्कालीन गरीबी , बेरोजगारी अाणि मध्यमवर्गीयांच्या द्विधावस्था बघुन बादल सरकारांचे ‘एवम इंद्रजीत’ अाकाराला अाले. सफदर हाश्मींची नाटकं तर सरळ सरळ यंत्रणेच्या विरुद्धची बंड असायची. तत्कालीन एखाद्या समाजविरोधी घटनेने पेटवलेल्या ठिणग्यांचं रुपांतर ते नुक्कडच्या माध्यमातुन वणव्यात करण्यात वाकबगर होते. अशा नाटककारांची नजरच अशी तयार झालेली होती कि अाजुबाजुला दिसणा-या अन्यायाला वाचा फोडणं हे त्यांचं साध्य होतं अाणि नाटक हे साधन.
हि उदाहरणं एवढ्यासाठी की बहुतांशी हि नाटकं पाहिलेली, वाचलेली असतील मग त्यांच्या मुळाचा अंदाज घेणं सोपं पडेल. सरतेशेवटी अापण पुर्ण तयारीने लिहायला बसलेलो असु द्या किंवा काहीही डोक्यात नसतांना नुसतंच लिहायला बसु द्या परंतु कळत नकळत अापल्याच जगण्यातल्या तुकड्या तुकड्या पासुन अखेरीस एक कॅलिडोस्कॉप तयार होतो. एकुण जगण्याचंच कथारसिस म्हणजे नाटक. हि वरची अनेक यशस्वी उदाहरणं तर त्याच दिशेने अंगुलीनिर्देश करताय.
मी एकदा जेवण करत असतांना समोर बातम्यांमध्ये, अोरिसाची एक बातमी बघितली. अॅंब्युलंसला पैसे नसल्याने खांद्यावर बायकोचं प्रेत वाहुन नेणा-या एका माणसाची बातमी. मी प्रचंड अस्वस्थ झालो. कुठेतरी 'हे असं' घडतंय अाणि त्याच कुठेतरी पासुन काही शे अंतरावर असलेले अापण निवांत जेवण करतोय? ह्या सगळ्याचा मला प्रचंड तिटकारा अाला. नंतर अनेक दिवस ते दृश्य छळत रहायचं. वरवर तुम्ही चॅनल बदलुन भौतिक देहाला फसवु शकाल पण अंत:करणाच्या पडद्यावर तेच चित्र लूप मध्ये चालु राहतं. त्याच दरम्यान मला विचारणा झाली अाणि मी '१२ किलोमिटर' लिहुन काढलं. अाता फक्त तेवढी बातमीच कारणीभुत होती असंही नाही. कारण नंतर तशीच एक बातमी पुन्हा वाचण्यात अाली त्यावर मला लिहावं नाही वाटलं. जेवण अाणि बातमी पैकी एकच गोष्ट जर मी करत असतो तर ह्या लिखाणाचे बीज मिळाले नसते. अाणि एकुणच अाजवरच्या यंत्रणेवरच्या कडेलोटातुन हे अालं असावं.
माझ्या जगण्याच्या चारही बाजुने प्रिझम फिरला गेला पाहिजे. जिथे रंगांचा पसारा प्रकट झाला ती तिरिप अापली. पण अट हि अाहे कि प्रिझम सातत्याने फिरला पाहिजे. स्वत:बाबतीत तर माझे मत फारच निष्करुण अाहे. माझ्यातला लेखक स्वार्थ पाहतो. मला ज्या गोष्टींचा त्रास होतो ती गोष्ट माझ्या यंत्रणेबाहेर गेली पाहिजे हि माझी प्राथमिक गरज होऊन बसते. हा त्रास जाऊन माझा त्रास कमी झाला पाहिजे. इतकं साधं. कधी कधी असंही होतं कि फक्त एखाद्या पात्राच नाव, एखादी अाकृती दिसते अाणि अापण ती कुठेतरी नोंदवुन ठेऊन देतो. योग्यवेळी ते पुढे येतं. त्याच्या तसं पुढे येण्याला कालमर्यादा नाही. अंगणातल्या झाडाला एखादं फळ अाल्यावर कसं अापण ते धान्यात पिकायला ठेवतो तसं असतं ते.
मजुरावरचं नाटक लिहुन लगेच कुठेतरी मजुरांचा रोज वाढणार नसतो कि दुष्काळावर लिहुन लगेच पाऊस पडणार नसतो. एखाद्या मानवी संबंधांवर लिहुन लगेच माणुस आत डोकावून पहातही असेल पण वागण्यात लगेच बदल घडेलच असं नाही. पण मांडलं जाणं गरजेचं आहे. त्याची नोंद गरजेची असते.
सुरवातीला दाखवलेल्या नाण्याला तुम्ही 'काटा' म्हटला होतात ना? पण माझ्याबाजुने तो 'छापा' होता. माझा छापा तुमचा काटाही असु शकतो. मी फक्त माझं गवसलेलं मांडलं. इतकंच.