कधी उंचशा आभाळातुन, रिमझिमणारा श्रावण होते
कधी तारका वीजेत गुंफून, लुकलुकणारे पैंजण होते
खडा शांतशा तळ्यात अन तु, गोल गोल राणी होते
कधी उकळती कढई चुकले ,तडतडणारे पाणी होते
कधी एकांती पोकळवेळी,अस्पष्ट हळुचशी कुजबुज होते
कधी गर्दीच्या झुंबडवेळी,स्पष्ट ठळकशी अलगूज होते
लाळ टपकत्या सभेत तन्मय, लज्जारक्षण धावा होते
कधी सावळ्या ओठांखाली, सांजभुलीचा पावा होते
कधी कलंडती रंगबादली,विस्कटलेले आभाळ होते
कधी कुडकुडत्या थंडीमध्ये,वाफ बोलकी सकाळ होते
कधी थांबल्या ओळीवरती, टोक मुडपले पान होते
कधी छातीला खोपा पुस्तक,घसरुन दचकते भान होते
कधी वेडसर डोळ्यांमधली,स्थिरबाहुली तंद्री होते
भिवईमध्ये नटुन बसता,चित्त पछाडुन ‘चंद्री’ होते
तु नसल्याची जाणीव..
- प्राजक्त