Friday, May 8, 2015

'तो' उन्हाळा कुठे गेला (मटा ९मे १५)

अापण लहानपणी दोन कारणांसाठी उन्हाळ्याची वाट पहात रहायचो. एक म्हणजे अांबा अाणि दुसरं म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या. विकत घेण्यापेक्षा गरम झळा खात ,कानशीलामागुन एक गारट घामाची धार अनुभवत अांब्याच्या झाडाखाली उभं राहुन अर्जुन होण्यातली मजा बाजारात जाऊन नुसता वास घेत ‘कशी दिली पेटी?’ ह्यात नाही. अाताशा लाईफस्टाईलमध्ये सुट्ट्या त्याच ज्या शनिवार-रविवारला जोडुन येतात. बाकी कामाच्या गु-हाळ्यात जुंपलेलं अायुष्याला सिनेमा किंवा मॉलच्या घुंगरांची तेवढी करमणुक. पण तरी अशा उन्हाळात अॉफिसमधल्या एखादया तुम्हा अाम्हाला एक प्रश्न दरवेळी पडतो कि ‘तो' उन्हाळा कुठे गेला ?
उन्हाळा अाला कि सुट्टी अाणि सुट्टी असलं कि गाव हे समीकरण पक्कं होतं. मग शेण सारवलेल्या अंगणात उन्हाळ्याची वाळवणं दिसायची. पावसात डबकी चुकवत चालवं तसं ऎन उन्हाळ्या वाळवण चुकवत उड्या मारत शेवटी दाराला अाधार घ्यावा लागायचा. दारावरची साखळीकडी खडडखट्ट करत लाकडी दारावर वाजायची. मग अातल्या अंधा-या कोप-यात माळ जपत बसलेली म्हातारी घोंगडी अोरडणार ‘कोण खेळतय रे कडी-कोयड्याशी? अशी खटखट नाही करु,कटकट होते मग” तितक्यात तसाचसा खटखट अावाज अॉफिसच्या तुमच्या दारावर होतो तंद्री तुटते. प्रश्न उरतो ‘तो' उन्हाळा कुठे गेला ?
मग लंच टाईम होतो तुम्ही डबा उघडता खालच्या पोळीत लोणच्याची पोळीची गुंडाळी असते. हळदमसाल्याच्या घमघमत्या वासांनी परत तुमचं मन अंगणात रमतं. जात्याचा भरारा, कै-याच्या चार खापा करतांना धारदार विळ्यावर अाईचा बांगडी मिश्रीत दणका. त्या कच्च्या कै-यामधे एखादा पिकलेला अांबा असायचा मग तो अापल्या झोळीत यायचा. घसा कोरडा झाल्यावर कोणीतरी  पाणी अाणायला लावायचं. काळ्या कुट्ट मडक्यामध्ये पितळी तांब्या चुबकन बुडवायचा. एकदा त्याच तांब्यामध्ये उंदीर सापडला म्हणुन सगळ घर डोक्यावर घेतलं होतं. नंतर पोटातली कळ लपवत लपवत प्रत्येक जण सांगत होता कि तो उंदीर नाही वाळा अाहे. अॉफिसात थंड ठणका बसेल इतकं गारपाणी घशाखाली घरंगळतांना वाळ्याच्या निथळत्या चवीची अाठवण विचारत राहते कि 'तो' उन्हाळा कुठे गेला ?
हात धुवून रुमाल अोला करुन तोंडावरुन फिरवल्यावर भर उन्हात कामाची भगभग जरा कमी होईल असं वाटत राहतं तेव्हा नदीवर तासभर डुंबून सुस्तावलेले अापण स्मरत राहतो. अापल्याच घरातल्या अाया-बायका धुणी पिळुन खांद्यावर घेऊन निघतात. तेव्हा धुतलेल्या पिळ्यातुन चुकून एखादं खाली पडलेलं उपरणं नदीच बुचकाळुन अाणायची हुकूम दिला जातो अाणि अापण उपरणं घेऊन नदीच्या प्रवाहात उतरतात. वडाखाली वाट पहात असलेल्या अापल्या अायाबायका कपाळी पालथा हात लाऊन किलकिल्या डोळ्यानी अावाज दिल्यावर अापण भानावर येतो अाणि उपरणं पिळुन गऴयाभोवती लपेटुन उन्हाच्या झळा कापत झपाझपा चालु लागतो. अोल्या उपरण्याची पिळ अाणि अोल्या रुमालाची अाणि मानेभोवतीची अोली रेष विचारत राहते कि ‘तो' उन्हाळा कुठे गेला. 
अॉफिसचा पंखा लावतो,भरभरु लागतो, कागदं फडफडतात. त्यांना शांत ठेवण्यासाठी काचेचे गारट ‘पेपरवेट’ तुम्हीअाम्ही कागदावर टेकवतो.तेव्हा अाठवतो कोतुळेश्वराच्या टेकडीखाली पिंडीखालचा जिवंत झरा अाणि अाठवतो शिवाईच्या पाणथळीजवळ खोलेश्वरच्या पन्नास फुटी खोल गाभा-यातला पिंडीवरचा गारवा. तेव्हा अंगावर शहारा उभारत तो गारवा विचारत राहतो कि 'तो' उन्हाळा कुठे गेला.
त्याच उन्हाळ्यात अांब्याच्या झाडावर काठी मारल्यानंतर सुकलेल्या बुंध्यावरुन एक पोपडा खाली पडतो अाणि त्यामागुन सैरावैरा पळणा-या मुंग्या दिसतात. अगदी तसं सुटतं मग अॉफीस. ‘त्या’ सुट्ट्यांमध्ये घडत असं खुप काही नसतं पण तरी काहीतरी अविरत चालु असतं. 
तरी अापण परत परत वाट पहात राहतो उन्हाळ्याची. परत परत अाठवतं कि अापण लहानपणी दोन कारणांसाठी उन्हाळ्याची वाट पहात रहायचो. त्या उन्हाळ्याच्या शोधातलं उतारावरचं पाणी एका उत्तरावर येऊन थांबत कि नंतर हळुहळु उन्हाळा भीषण होत गेला.
नंतर हळुहळु अापण मोठे होत गेलो,अांबे महाग होत गेले अाणि सुट्ट्या कमीकमी होत गेल्या इतकंच.

- प्राजक्त 
मटा ९।मे।१५


No comments:

Post a Comment

अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...