Thursday, March 23, 2017

लेख : तिच्या असण्या नसण्याचे मोंटाजेस्

ती दुसरं काहीही झाली असतीस तरी चाललं असतं. पण ती नको त्याच क्षणांची झाली अाणि सगळाच गोंधळ होऊन बसला.
ती देव्हारा होत समईची झाली असती तरी चाललं असतं. म्हणजे ती तेवत राहिली असती अाणि ह्याला घरातल्या कुठल्या तरी कोप-यात एक स्निग्धता तेवतेय हि अाणि इतकीच अाठवण राहिली असती. किंवा ती भिंत होऊन सवयीची झाली असतीस तरी चाललं असतं. म्हणजे त्याच्या छताला तेवढंच घर म्हणुन मिरवता अालं असतं. घरासाठी छतापेक्षा भिंत महत्वाची असते हे छताच्या पुरुषत्वाला कळायला जरा वेळच लागतो. किंवा ती जिना होऊन कलंडत्या पेल्याची झाली असती तरी चाललं असतं. म्हणजे चटका बसावा तसा अादळण्याचा अावाज क्षणभरानंतर विझला असता किंवा घरातलंच एखादं बंद घड्याळ ज्याला पुन्हा चालु करण्याच्या भानगडीत कुणी पडत नाही. अशा अडकल्यावेळेची जरी ती झाली असती तरी त्याला चाललं असतं मग येता जाता त्याला त्रास झाला नसता. किंवा त्रास सवयीचा झाला असता. 
पण एकदा तीने अंगणात हौसेने पारिजात लावला होता.  मग दारात येता जाता पायाखाली पारीजात यायचा. पाय अडखळायचा, जीव हळहळयचा. ती पायदळी येणारा प्राजक्त झाली होती .
तीने प्राजक्त व्हायला नको होतं. ती दुसरं काहीही झाली असती तरी चाललं असतं त्याला.
ती वेणू होत त्याच्या अोठांची झाली असती तरी कृष्णसुख होतं. किंवा तीने रागारागात अंगठ्याला होणारी एखादी जीवघेणी ठेच व्हायला पण हरकत नव्हती. ती रुक्मा होत प्रश्नांची ही होऊ शकली असती किंवा राधा होत अाठवांची होऊ शकली असती. 
पण ती काहीही अपेक्षा नसणारी,निरपेक्ष पण तरीही त्याच्याच नावात तल्लीन होणा-या मीरेच्या एकतारीचा अखंड सूर झाली. तीने तो सूर व्हायला नको होतं. ती दुसरं काहीही झाली असती तरी चाललं असतं त्याला.
ती डुगडुगत्या टेबलावर ठेवलेल्या जुन्या ग्रामोफोनची झाली असती तरी चाललं असतं. तिथेच ठेवलेल्या रॅकॉर्डस् मधल्या मेहंदीच्या ‘रंजिश हि सही’ च्या मखमली अार्जवाची झाली असतीस तर चिंता नव्हती. कारण ‘तू भी तो कभी मुझको मनाने के लिए अाss’ ह्या उतरंडीवर अाश्वस्थ होता येतं होतं त्याला. किंवा ती पुस्तकाच्या शेल्फमधल्या डावीकडुन नवव्या जागीच्या दिवान ए गालिबच्या एकशे अडुसष्टाव्या मुडपलेल्या पानावरच्या “…कि समझ नही अाता ज़िंदगी सासों सें है या तेरी याद से” ह्या अोळीची झाली असती तरी खपवुन घेतलं असतं त्याने. कारण शक्यतांचं अर्ध अांदोलन 'सासों से है' वर टिकलेलं होतं.
पण मग नंतर रात्र झाली अाणि त्याल्या अातुनच अोळ सुचली “तेरी याद नब्ज होती तो ठिक होता , ये रात बनी बैठी है। नही कटती”
तीने ‘रात’ व्हायला नको होतं. ती दुसरं काहीही झाली असती तरी चाललं असतं त्याला.
ती ठसका होत पाण्याची झाली असती तरी चालणार होतं. मग तहानेच्या नावाखाली झाकली असती. किंवा डोळ्यांत चूरचूर होत वेगळ्या पाण्याची झाली असती तरी ठिक होतं. मग धुळीच्या नावाखाली टाळता अाली असती. 
पण ती चार चौघात घशातला शब्द थोपवणारा गच्च अावंढा झाली. तीने शब्द थोपवायला नको होतं. ती दुसरं काहीही झाली असती तरी चाललं असतं त्याला
‘पेपर नाही’ , ‘दुध अर्धा लिटर’ , ‘भिशी’ , ‘किराणा भरला’. ती कॅलेंडरवरच्या खुणांची झाली असती तरी चालणार होतं त्याला. कामाच्या जात्यात भरडणारा  लाल खुणांनी सुखावणारा जीव कॅलेंडरवरचे तीचे टिपणं फारसे निरखत नाही.  किंवा मागच्या खिडकीतुन डोकावणारा गुलमोहर होत ती सावळ्या उन्हाची झाली असती तरी चाललं असतं. किंवा कवीतेच्या वहीच्या मागे फावल्या चिन्हाची झाली असती तरी चाललं असतं त्याला किंवा ढग पसरलेल्या रविवारच्या मध्यान्हाची झाली असती तरी हरकत शुन्य होती. 
पण अशाच मध्यान्ही, जेव्हा तो तीच्या भिंतीवरच्या चंदनाच्या हारामागे दडलेल्या फोटोवर तंद्री लावुन बसलेला असतो… तेव्हा ती रद्दीवाल्याचा दर रविवारी मध्यान्हाचा प्रश्न झाली. “बाईसाहेब अाहे का घरी ?” तीने तो प्रश्न व्हायला नको होतं. ती दुसरं काहीही झाली असती तरी चाललं असतं त्याला.
थोडक्यात , ती दुसरं काहीही झाली असतीस तरी चाललं असतं. पण ती त्याच्या नको त्याच क्षणांची झाली अाणि सगळाच गोंधळ होऊन बसला.

- प्राजक्त २३ मार्च २०१७



Friday, March 17, 2017

देवबाभळी प्रतिक्रिया

1) Shripad Deshpande : 

काही-काही गोष्टी लहानपणापासून माझी तंद्री लावणाऱ्या.
म्हणजे गरम गरम कातळावर तांब्याच्या पेल्यातून पाणी सोडलं तर येणारी वाफ .. ऐन श्रावणात बावडीचं डोळा टीपणारं चमचम पाणी .. देवडीच्या तड्यातून दुपारभर येणारे-जाणारे मुंगळे .. कुठल्याश्या ओसाड गावातून उशिराने तडतडत येणाऱ्या लाल बसच्या आतले निळे-निळे लाईट .. नदीवर पितळाच्या घागरी चुबकून घेताना घडघडणारे आवाज .. देवघराच्या वस्त्रांवरचे तेलकट डाग .. आईच्या झुब्यांची कचकडीची डबी .. एकट्या राहणाऱ्या स्टीव्हन्स काकांच्या घरावर येणारे भारद्वाजाचे जोडपे आणि असं बरंच काही ..
ह्या तंद्री लावणाऱ्या गोष्टींमध्ये भर पडत चालली आहे.
काल पुन्हा एकदा “देवबाभळी” बघितलं आणि पुन्हा एकदा तंद्री लागली .. प्राजक्तच्या लिखाणाने तंद्री लावली. ह्याच तंद्रीमध्ये संहितेमधून तुकारामाचे अभंग वेगळे काढायला घेतले तर चुकून प्राजक्तचे अभंग वेगळे काढले गेले .. नंतर लक्षात आलं. ( नशीब तुकारामाने “तुका म्हणे ” असं त्याच्या अभंगाच्या शेवटी लिहून ठेवलंय ) ..
ढगांच्या गडगडाटाने इवल्याश्या विठ्ठलावर येणारा प्रकाश आणला कुठून बाबा ह्या विचाराने तंद्री लागली. विरक्तीचे-भक्तीचे अभंग लिहिण्यासाठी असलेल्या तुकारामाच्या डेस्कवर , ऐटीत बोरू म्हणून ठेवलेल्या मोरपिसावर .. गडद गुलाबी Romantic रंग उधळण्याचा आगावूपणा का केलास प्रफुल्ल .. कुठे जायचं आम्ही देहभर भिनलेला हा रंग घेवून ..
पितळी पराती .. लोखंडी खलबत्ते .. रिकामे डबे .. सारवून घट्ट बांधली चूल वापरली रे .. तुला कसं कळत नाही प्रणव त्या सगळ्या नेपथ्याच सुद्धा संगीत होतं आणि मी तिथे जातो त्याच तंद्रीत .. तिथून मला परत आणण्यासाठी मिठी मारून जा .. !
श्वास गुदमरेपर्यंत आरोह अवरोहांमध्ये बुचकळून ठेवणाऱ्या , संगीताचा डोह गाठीशी घेवून बसलेल्या आनंदला माफ करण्याइतका मी तुकाराम नाही .. अवली आणि लखूमाई गाताना अश्याच दिसतात का .. तर अश्याच दिसतात .. आता ..
.. तुकारामाच्या चिपळ्या .. खणखणणारे टाळ .. अर्ध्या-मुर्ध्या धुपाच्या कांड्या .. मोरपंखी अर्धवट जळालेले जिलेटीन पेपर .. मागे उरल्या स्टेजवरच्या जोंधळ्याच्या भाकऱ्या .. खलबत्ते .. पराती .. पायाला बांधली चमचम चिंधी .. असा सगळा पसारा ह्या तंद्रीत मांडून बसलोय !
.. ह्या सगळ्या पसार्याच आता काय करू .. ?


2)Simparpal Birdi 
 The true Alchemists do not change Lead into Gold, they Change world into WORDS...!!
You are the Truely Alchemist#PrajaktDeshmukh
देवबाभळी ~ a musical play
An Experience blended with Divine, Engaging Performances, Mesmerizing Music and the most important Soulful Words.
An Aura of Spirituality created by the Brilliant writer Prajakt Deshmukh.
Your writing do touch the strings of HUMAN SPIRIT. THOUGHT perceived from this play will take you down to your roots of Feelings, Memories, Emotions and FAITH.
PS : Goosebumps assure (Epitome of Your emotions will lead you to cry) when the curtain comes down. 


3)
संत तुकारामांचं अफाट आयुष्य आकाशाएवढं! प्रत्येक संवेदनशील लेखक कवींना या आकाशानं नेहमीच साद घातलीये. तुकोबांच्या जगण्याच्या एकेका क्षणावर चिंतन करीत लिहित बोलत राहिलं तर बरेच जन्म खर्ची पडतील... या आकाशाकडे झेपावण्याचं आकर्षण संवेदनशील लेखक कवीच्या मनात असणं हेच त्याच्या माणूसपणाचं लक्षण... नाशिकचा आमचा युवा मित्र प्राजक्त देशमुख हा याच वर्गातला. तरल आणि हळुवारपणे विषय निष्णात सर्जकागत उलगडत नेणं ही त्याची खासीयत. त्याच्या सध्याच्या वयाला साजेसा रोमॅंटिसिझम त्याच्या लेखनात येणं स्वाभाविक! काल त्यानं लिहिलेलं व दिग्दर्शिक केलेलं "देवबाभळी" नाटक पाहिलं. आवली आणि लखूमा (रखुमाई) यांच्या भेटीचं. संवादाचं. आवलीतील वरवर कजाग, शिवराळ स्त्रीच्या काळजातील देवळीत खोलवर शांत तेवणारी अध्यात्माची अढळ ज्योत आणि दुसऱ्या बाजूला रखुमाईच्या दयार्द्र प्रेमळ डोळ्यांच्या कडेला विठ्ठलाबाबतची अनाकलनीय हलकीशी काजळी.. दोघींच्या तरल संवादातून प्राजक्तनं चांगल्या विषयाला हात घातलाय. संगीत नाटक असल्याने नकळत कृतकतेची छाया सबंध नाटकभर जाणवत असली तरी दोघींचा वावर आणि गायन छान शिडकावा करीत राहते. आनंद ओक याने लेखनाला पूरक असा तरल संगीतसाज चढवलाय. प्रफुल्लची प्रकाशयोजना दाद देण्यासारखी !
संगीत देवबाभळीच्या निमित्ताने नाशिकच्या रंगभूमीवरची नवी पिढी केवढ्या संवेदनशील विचारातून नवनिर्मिती करू पहातेय, हे पाहून खूपच आनंद झाला.
संपूर्ण टीमचं मनापासून कौतुक!
- दत्ता पाटील

४) 
दोन स्त्रियांच्या अंतर्मनाचा ठाव घेणारी *देवबाभळी*.!
राज्य नाट्य स्पर्धेत *गांधीहत्या आणि मी*ने मिळविलेलं घवघवीत यश व *हंडाभर चांदण्या*ने राष्ट्रीय पातळीवर रचलेला एक नवा इतिहास आणि या नाटकाला झी गौरव व मटा सन्मान या पुरस्कारांत विविध श्रेणीत मिळालेली नामांकने पाहता नाशिकच्या प्रायोगिक रंगभुमीची सर्वत्र विजयी घोडदौड सुरु असल्याचं चित्र दिसुन येत आहे.
या यादीत आणखी एका कलाक्रुतीचा आवर्जुन समावेश करावा लागेल. ती म्हणजे संगीत *देवबाभळी*.!
स्पंदन| परिवार आणि अश्वमेध थिएटर्स या नाट्यक्षेत्रातल्या दोन नावाजलेल्या संस्थांची संयुक्त निर्मिती असलेल्या, वोडाफोन - थिएटर ॲकॅडमी, पुणे आयोजीत रंगसंगीत स्पर्धेत सर्वोत्कृष्ट संगीत नाटकाच्या प्रथम पारितोषिकासह ७ पारितोषिके पटकवणार्या या दिर्घाकाचा नाशकातील शुभारंभाचा प्रयोग रसिक प्रेक्षकांच्या मोठ्यासंख्येच्या उपस्थितीत व उदंड प्रतिसादात नुकताच पार पडला. प्रेक्षकांमधे *देवबाभळी* पाहण्याची किती कमालीची उत्सुकता होती हेच यावेळी दिसुन आले. *देवबाभळी* या नावावरुन तरी नाटकाच्या आशय, विषयाचा काहीही बोध होत नसला तरी एक दर्जेदार कलाक्रुती पहायला मिळणार याची खात्री होतीच.
पडदा उघडतो तेव्हा रंगमंचावर एका तरुण स्त्रीची दैनंदीन दिनचर्या सुरु असल्याचं दिसतं. तिचं घर सावरणं, चुलीसमोर बसुन भाकरी थापणं, नदीवर जाऊन कपडे धुणं आणि त्याचबरोबर मुखातुन ओवी, अभंग गुणगुणणं सुरु आहे. त्यानंतर तिच्या धन्यासाठी शिदोरी घेऊन ती निघते. माळरान, डोंगरमाथा असा ठिकठिकाणी त्याचा शोध घेते, आरोळ्या देते. आणि अचानक, तिच्याही नकळत तिच्या नाजुक पायाच्या टाचेत काटा रुततो. हाच ते 'देवबाभळी'. ती काटा काढते. वेदनेने कळवळते आणि ग्लानी येऊन क्षणार्धात कोसळते.
शुध्दीवर आल्यावर पाहते तर ती तिच्याच घरात. पण तिच्या घरातील चुलीचा ताबा दुसर्याच एका स्त्रीने घेतलाय. ती स्त्री एकटी आलेली नाही तर तिच्यासोबत येतांना तिने दोन्ही हात कटेवर ठेऊन उभा असलेल्या विठ्ठलाची मुर्ती आणलेली आहे. आणि मग प्रेक्षकांना त्या दोन स्त्रीयांची ओळख पटते. असामान्य व्यक्तिमत्वांच्या सहचारिणी वरवर जरी सामान्य भासत असल्या तरी असामान्यच असतात. त्यातील एक स्त्री आहे आवली, विठ्ठल भक्त संत तुकारामांची पत्नी आणि दुसरी स्त्री आहे साक्षात विठ्ठलाची रखुमाई. पुढे या दोन स्त्रीयांच्या आपसातील संवादांतुन त्यांची अंतर्मने अलगदपणे उलगडत जातात. दोघींचा स्वभाव परस्परांशी भिन्न. मात्र एका गोष्टीचे दोघींमधे साम्य आहे. दोघीही आपापल्या पतींवर जीवापाड प्रेम करत त्यांच्याशी पुर्णपणे समरस झालेल्या आहेत.
सावकारी गेल्याने आलेली निर्धनता, संसाराची, ग्रुहस्थीची झालेली परवड याला कारणीभुत समजुन विठ्ठलाचा, विठ्ठल नामाचाही द्वेष करणारी आवली तर आवलीला जखम झाली म्हणुन विठ्ठलाच्या सांगण्यावरुन तुकारामाच्या घरी येऊन त्याचं घरदार सांभाळणारी संयमी, तेजस्वी रखुमाई. आवलीच्या रोजरोज विठ्ठलाला कोसत राहण्याने तिची आतुन घुसमट होत राहते. कधी एकदा गर्भवती असलेल्या आवलीच्या पायाची जखम भरते आणि ती जाते असे झालेली रखुमाई तर द्वेष करुन का होईना पण दिवसातुन हजारदा विठ्ठल नामाचे नामस्मरण करणारी आवली अशी द्रुश्य स्वरुपातील ही दोनच पात्रं या दिर्घाकांत आहेत. विठ्ठल आणि तुकाराम प्रत्यक्ष दिसत नाहीत. पण दोघांचं अस्तित्व या दोन स्त्री व्यक्तीरेखांमुळे जाणवर रहातं. विठ्ठलाची निदान मुर्ती तरी दिसते पण तुकाराम मात्र त्यांच्या अभंगातुनच डोकावतात.
तुकारामांवर दोन चित्रपट येऊन गेलेत. एक दैनंदीन मालिकाही सुरु आहे. पण त्याचविषयावरील *देवबाभळी* मात्र वेगळ्या अंगाने जातो. विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या तुकारामांची गाथा असली तरी आवली आणि रखुमाई या दोन स्त्री व्यक्तीरेखांवरच लक्ष केंद्रीत करण्यात आलेलं आहे. त्यामुळे यात तुकारामांचे तथाकथित चमत्कारही दिसत नाहीत. लेखकाने जाणिवपुर्वक विषयाच्या मांडणीत वेगळेपण ठेवलेल्याचं जाणवत रहातं. प्राजक्त देशमुख याचं लेखन-दिग्दर्शन सशक्त आणि प्रचंड ताकदीचं आहे. भक्तीप्रधान विषयात स्वारस्य असणारा एक मर्यादीत प्रेक्षक असतो. परंतु *देवबाभळी* त्याला अपवाद ठरणार आहे. सर्व थरांतील, सर्व वयोगटांतील प्रेक्षकांच्या पसंतीला उतरण्याची क्षमता या दिर्घाकांच्या संहितेत आणि सादरीकरणात आहे. प्राजक्तने लेखक म्हणुन केलेली आशयाची मांडणी आणि दिग्दर्शक म्हणुन केलेली विषयाची हाताळणी दोन्हीही निव्वळ लाजवाब.! आवली-रखुमाई यांच्यातील प्रसंग खुमासदार संवादांद्वारे छान खुलवले आहेत. आवलीच्या तोंडी असणारी शिवराळ ग्रामीण भाषा अत्यंत चपखल वाटली आहे.
संगीत हा तर *देवबाभळी*चा आत्मा आहे. आनंद ओक या तरुण संगीत दिग्दर्शकाने तुकारामांच्या आणि प्राजक्तच्या अभंगांना सुश्राव्य चाली बांधल्या आहेत. त्या ऐकतांना प्रेक्षक भक्तीरसात अक्षरश: न्हाऊन निघतो. आनंदचा शास्त्रीय संगीत देण्याचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचं मात्र जराही कुठे जाणवत नाही. देवबाभळीत संवांदांपेक्षाही संगीत अधिक प्रमाणावर आहे. आनंद ओकने त्याचं काम अत्यंत चोखपणे केलं आहे. प्रेक्षक संगीताच्या तालावर डोलायला लागतात आणि मंत्रमुग्ध होऊन जातात. अमित चंद्रमोरे, भुषण काळोखे, सौरभ कुलकर्णी, रोहन कानडे, मयुर भालेराव, अभिषेक दांडेकर या सर्वांची उत्तम संगीत साथसंगत देवबाभळीला लाभलेली आहे.
प्रणव प्रभाकरच्या नेपथ्याला आणि प्रफुल्ल दीक्षितच्या प्रकाश योजनेला पुर्ण गुण द्यावेच लागतील. चुल, पितळी परात, लोखंडी खलबत्ता, रिकामे डबे असं मोजकंच सामान दाखवत तुकारामांची खालावलेली आर्थिक परिस्तिथी तसेच इंद्रायणी नदीचा काठ कल्पकतेने उभे केले आहेत. प्रकाश योजना तर या एकांकिकेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. साक्षात विठ्ठलाचे दर्शन घडविण्याची किमया याच प्रकाश योजनेची.
शुभांगी सदावर्ते आणि रसिका नातु यांनी आवली आणि रखुमाई या व्यक्तीरेखा जिवंतपणे साकारल्या आहेत. दोघीही उत्तम अभिनेत्री तर आहेतच त्याचबरोबर उत्तम गायिका देखील आहेत. दोघींनी आपापल्या भुमिका समजुन-उमजुन व पुर्णपणे समरसुन केलेल्या आहेत. स्नेहल एकबोटे यांची वेशभुषा तसेच पात्रांची रंगभुषा त्यांच्या व्यक्तीरेखांना अनुरुप आहेत. पुर्वा सावजी आणि अभिषेक वालझाडे यांनी रंगमंच व्यवस्था सांभाळली आहे. तर राजेश भुसारे व श्रीपाद देशपांडे हे या देवबाभळीचे सुत्रधार अाहेत. हेमंत महाजन आणि गिरीष गर्गे यांच्या निर्मिती सहाय्यातुन एक दैवी अनुभुती देणारी अद्भुत कलाक्रुती उभी राहीली आहे. महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे आयोजित रंगमहोत्सवात सादरीकरण झालेल्या या दिर्घांकाने अहमदनगर महाकरंडक स्पर्धेत सर्वोत्कृष्ट संगीतासह दोन पुरस्कार पटकावले आहेत.
संगीत नाटकांचा काळ पुन्हा आला तर *देवबाभळी* नक्कीच मैलाचा एक दगड ठरणार आहे.
-श्रीराम वाघमारे

18 sept 2017

काल 'सं. देवबाभळी' पाहिलं.. अतिशय वेगळा पण आपल्या मातीतला विषय, उत्तम बांधणी आणि अप्रतिम सादरीकरण.. प्राजक्त देशमुख कवितेतून जितका सहज, सुंदर व्यक्त होतो, त्याच सहजतेने लेखक-दिग्दर्शक म्हणून या नाटकातून भेटतो.. आणि ही सहजता संपूर्ण नाटकात जाणवत राहते.. त्यामुळे प्रेक्षक आणि कलाकार यांच्यातलं अंतर नाहीसं होतं. नाटक मनाला भिडतं. हे नाटकाचं आणि संपूर्ण टीमचं यश आहे. यातल्या ओेव्या , अभंग नाटकाचा अविभाज्य भाग आहेत. आणि आनंद ओक याच्या संगीताने त्या काव्याची परिणामकारकता राखली आहे.. केवळ दोन स्त्रीपात्र असलेल्या या नाटकातल्या या दोन अभिनेत्रींचं कौतुक केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. शुभांगी सदावर्ते आणि रसिका नातू.. दोघीही अप्रतिम गातात. आणि अतिशय सहजपणे अभिनय आणि गाण्यात संचार करतात.. सर्वात महत्वाचं म्हणजे या transition मध्ये क्षणाकरता सुद्धा त्या भूमिकेपासून वेगळ्या होत नाहीत. अनेक ओव्या डोळे भिजवतात. अनेक गोष्टींचं खोलात शिरून आणखी कौतुक करण्यासारखं आहे.. पण त्या वेगळ्या पाहण्याकरिता याचे आणखी प्रयोग पाहायला हवेत.. सगळ्या बाजू उत्तम जुळून आल्याने एकसंधपणाची खूप मजा येते.. मूळ दीर्घांकाचं सादरीकरण काल जरी एकांकिका स्वरूपात झालं असलं तरी त्याची परिणामकारकता कमी होत नाही. या नाटकाचे अधिकाधिक आणि उत्तमोत्तम प्रयोग होवोत , अशी इच्छा!
बाकी कालच्या बक्षीसाबद्दलही अभिनंदन!
- अानंदी जोशी



अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...