Showing posts with label ऋतू निबंध विदर्भ. Show all posts
Showing posts with label ऋतू निबंध विदर्भ. Show all posts

Friday, May 22, 2015

निबंध ( १६ मे मटा मैफल)

कोसा कोसावर जशी भाषा बदलते तशी लाईफस्टाईल पण बदलते.त्यात लहान मुलांचं विश्व वेगळंच. लहान मुलांचं खरं अंतरंग पहायचं असेल तर त्यांचे निबंध वाचायला पाहिजे. ते निबंध वाचल्यावर कळतं कि त्यांच्या मनातलं जग कसं असु शकेल अाणि त्या जगातली त्यांची लाईफस्टाईल कशी असते.
एक मित्र शाळेत शिक्षक अाहे. तो ब-याचदा शाळेचे पेपर तपासायला घरी अाणतो. त्यात एकदा दोन निबंध वाचले. एक मुलगा इथलाच तर दुसरा नुकताच विदर्भाचा जो शिकायला इकडे मामाकडे अालेला.
इथला मुलाच्या निबंधात पाऊस होता, मोर होता, पाण्याचं डबकं होतं,आईच्या पदराने घासलेलं डोकं होतं, कागदाची होडी होती, छत्री होती, रेनकोट होता, अळुच्या पानावरचा मोत्याचा थेंब होता, चिखलाचे पाय होते,सुसाट चालवलेली सायकल होती. पण त्या दुस-या मुलाचा निबंध अनुभवणं जास्त महत्वाचं आहे. त्याच सबंध वेगळं जग होतं. त्याचा पेपर मध्ये सगळ्यात वर मध्यभागी लिहलं होतं...
"माझा अावडता ऋतू"
शाळेत शिकवत जरी असले तरी जन्माला अाल्यापासुन मी कधी तीन ऋतू पाहिले नाही. अामच्या गावाकडं फक्त उन्हाळा असतो. अाणि हिवाळ्यात रात्रीपुरता गारवा असतो. बाकी भुगोलात शिकवलेलं खरं असंल तर पावसाळा हा माझा सगळ्यात अावडता ऋतू असु शकतो. पावसात उभं राहिलं कि म्हणे अंगावरुन थेंब निथळतात. अाम्ही मित्र पकडा-पकडी खेळुन दमलो की घामाच्या धारा लागतात अाणि अंगावरुन जमीनीवर थेंब निथळतात तेव्हा अाम्ही "पाउस अाला,पाउस अाला" असं म्हणतो.तेव्हा खुप मजा येते म्हणुन मला पावसाळा अावडतं असावा. माझ्यामध्ये कधी कधी जादु अाहे असं वाटतं,कारण माझ्या घामाचा थेंब जमिनीवर पडल्यावर तसाच वाफ होऊन गायब होतो जसा अाईचा गरम तव्यावरचा पाण्याचा शिपकारा गायब होतो. पावसात म्हणे सगळीकडे हिरवं हिरवं होतं. मी एकदा चित्रकलेच्या तासाला तसं चित्र पण काढुन पाहिलं. अामच्या कडे जे तेलकट खडु अाहे त्यात पांढरा अाणि हिरवा खडु कशाला अाहे हे मला अाज पर्यंत कळालंच नाहीए. म्हणुन मी मित्रांचे पण हिरवे खडु घेऊन सगळीकडे हिरवळ दाखवली.पण पोरं खुप हसले म्हणाले 'असं हिरवं कधी असतं का?' म्हणुन मी ते चित्र माझ्या उशीच्या खोळात लपवुन ठेवलं अाहे.मला ते चित्र अावडतं, म्हणुन मला पावसाळा अावडतं असावा. अामच्या इथं एक किराणा दुकानदार दर जून मधे रंगीत छत्र्या विकायला अाणतो. त्या दुकानदाराला अाम्ही नेहमी "सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का?" असं चिडवतो. तो खुप चिडतो अाणि दगडं घेऊन अामच्या मागे लागतो. तेव्हा दुसरा मित्र हळुच बरणीतुन चार-पाच खोब-या गोळ्या काढतो. फुकटच्या खोब-या गोळ्या जास्त गोड का लागतात माहित नाही पण अाम्हाला त्या खुप अावडतात. हे फक्त ह्याच ऋतुत घडतं म्हणुन मला पावसाळा अावडत असावा. 
अाप्पा म्हणतात त्यांच्या लहानपणी पाऊस यायचा तेव्हा ते खालच्या मळ्यात सायकलीवरुन रपेट मारायचे अाणि गार वारा अंगाला झोंबायचा. मी पण कधीकधी गुपचूप थोडं पाणी डोक्यावर अोतुन सायकलीची रपेट मारतो. मग नुकत्याच अोसरलेल्या पावसातुन फिरल्यासारखं वाटतं अाणि लहानपणीचा अाप्पा झाल्याचा भास होतो. मला अाप्पा अावडतात,म्हणुन कदाचित मला पावसाळा अावडत असावा.जून मध्ये पाऊसाची सुरवात होते असं पुस्तकात लिहलं अाहे. पण अामच्याकडे जून मध्ये साथीचा रोग येतो.त्या रोगाला काय म्हणतात माहित नाही पण लोक इकडे तिकडे फोन करुन "अाला का?" "कुठवर अाला?" "ह्या वेळेला जोरात असावा हो ना?" , "थोडथिडका का होईना पण अाहेच " असं बरळायला लागतात. काही लोक तर मुर्खासारखा पैसा खर्च करुन कौलाच्या अाणि घराच्या फटी पक्क्या सिमेंटने बुजवतात. ह्या पावसाळ्यात कदाचीत साथीचा रोग पसरतो म्हणुन दर दोन दिवसा अाड झाडावर लटकुन काही लोक मरतात. साथीच्या रोगामुळे दरवर्षी ह्याच ऋतुत खुप लोकं मरतात. सुरेखाचा बाबा असाच साथीच्या रोगामुळे मेला. इतकं अाजारी असतांना झाडावर जाऊच नये असं मला तरी वाटतं. ह्या साथीचं रोगाचं एक सोडलं तर बाकी नावं ठेवण्यासारखं काही नाही.म्हणुन मला असं वाटतं कि मला बहुतेक पावसाळा हा ऋतु अावडतं असावा.जय भारत.

इयत्ता तीच,विषय तोच,ऋतु तोच, निबंधही तोच.फक्त ‘परिक्षा’ वेगळी.

- प्राजक्त २३ मे १५

मटा मैफल 



अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...