Sunday, August 16, 2015

बॅक बेंचर्स : ५ Whats in the Bench ?


रेल्वेमध्ये बसायला जागा न मिळणं हा काळाने तुमच्यावर हलगर्जीपणा केल्याचा उगवलेला सुड असतो. हो म्हणजे एक लोकल चा विषय सोडुन देऊ कारण तिथे मुळातच गर्दी असते. चाळीसेक हजार लोकांसाठी ती केलेली सुविधा होती अाता चाळीसेक लाख लोक 'सुविधा' उपभोगल्यावर अाणखी काय होणार. तर अशा उगवलेल्या सुडामुळे तुम्हाला रेल्वेच्या दाराशी उभं राहुन करावा लागलेला प्रवास हाही बॅक बाकावर बसल्याचा प्रकार. त्यापेक्षा मास्तरांनी शिक्षा म्हणुन मागल्या बाकावर उभं रहायची शिक्षा दिल्यासारखा प्रकार.
असाच दारात बसुन एक प्रवास सुरु झाला. मध्ये एका ठिकाणी एकजण चालत्या गाडीत सराईतपणे लटकुन मला 'थोडं अडजस्ट' खुणावत बसुन राहिला. मग तो म्हणाला 'घरातलं शेंडेफळ अाणि शाळा कॉलेजातला शेवटच्या बाकावरचा दिसतो'.पांढरे केस,पांढरी दाढी, बाह्या वळलेला चेक्सचा शर्ट, अाता फॅशन नसलेलं ससपेंडर, पट्टीने अाखाव्या तशा ठसठशीत कपाळावर चार रेषा अाणि तंबो-याला चुकून हात लागल्यावर कितीतरी वेळ घुमत राहावा तसा घनगंभीर 'बेस'चा अावाज. असा माणुस मी पहिल्यादा पहात होतो. मी म्हणालो 'हो,कसं अोळखलं?'
" शाळेत अाणि घरात शेवटी असलेले जरा शेफारलेले असतात. म्हणुन निघायला उशीर होतो.अाणि दारात बसावं लागतं.पण याची चिडचिड कमी असते अापल्याला. हो अापल्यालाच म्हणालो मी. कारण दारात बसता येतं.मिळाली जागा तर ठिक नाही तर हवेचा प्रवास.दोन्ही बाजुने जिंकल्याची भावना नाही का?  तुझं नाव सांगु नको,माझं विचारु नको. शेक्सपिअर म्हणतो,नावात काय अाहे? हाच नियम बाकाला पण लागु होतो बरका. बाकात काय अाहे? पहिला-शेवटचा. तुम्ही काय शिकला ते महत्वाचं.बरं पेपर वाचतो का ? मागच्या महिन्यात भारत-पाक युद्ध संपलं. काय वाटतं ? सोड,अाता कोणाला वाटुन काय फायदा म्हणा. "
मी बोलायच्या अात तो बोलत होता जणू त्याला फक्त कुणीतरी ऎकणारं पाहिजे होतं. मी फक्त ऎकायचं ठरवलं. " See, Wars are not won on Field , my son. (हृदयाकडे हात नेत) Real war is here" अातला लढा जिंकला तरच जिंकला तू. अाणि मारायला काय लागतं? सांग, बंदुक?रायफलं? नाही. कोणाला मारायला लागतात फक्त "steady hands".अाणि जेव्हा तू चारीबाजुने घेरला जातो तेव्हा देश,प्रदेश,मान,सन्मान हे सगळं सारुन तू लढतो फक्त स्वत:साठी.जगण्याची लढाई. War is old man talking & young ones dying.मग सगळं जिंकल्यावर हाताशी येतात पडलेल्या इमारती,लाल जमिनी वगैरे. मग वाटतं हे जिंकायला लढलो अापण? मग शोध सुरु होतो काय जिंकल्याचा. पण शोधल्यावर हरवलेलं मिळतं बदलेलं नाही. एनी वे, टू मच फिलॉसोफी इन वन जर्नी. हे सगळं तुला का सांगतोय मी? कारण यू अार अ बॅकबेंचर."
बाहेर धुकं,पाऊस अाणि मधेच घाटात इमरजंसी गाडी थांबली.. तो उतरुन सिगारेट पिऊ लागला. गाडी सुरु झाली. मी त्याला अावाज दिला. त्याने बेफिकीरपणे मला टाटा केलं.मी त्याला नाव विचारलं. त्याने उत्तर दिलं. Nobody, बाकात काय अाहे?  
 
-प्राजक्त १७/०८/१५

Monday, August 10, 2015

बॅकबेंचर : ४ शेवटची खिडकी

बसमध्ये सहसा शेवटी कोणी बसतं नाही. कंडक्टरने मागे जाऊन बसा असा इशारा केला कि ‘शेवटची सीट ? नको रे देवा’ असे यांत्रिक शब्द नेहमीच कानावर पडतात. पण मी बसमध्ये सुद्धा ‘लास्ट बेंचर’च. बसमध्ये पुढे बसलं कि जरावेळाने मागुन कुणीतरी अातला राग दाबत उसन्या-खोट्या अादरयुक्त अवसानात अापल्याला म्हणतं ‘ अहो जरा खिडकी लावता का प्लिज’.  झालं ! संपला कि हो विषय. बंद खिडकीचा प्रवास म्हणजे छळ अाहे. त्यात पावसाळा असेल तर ते पाप ही असु शकतं. नाही ते चित्रपटात वगैरे दाखवतात तसं  अर्ध अंग बाहेर काढुन , तळहातावर अाणि चेह-यावर पावसाचे थेंब झेलत “ अहा अहा रम्य निसर्ग “ असा फालतु थिल्लर दिखाऊपणा नाही म्हणत मी. पण नुसती उघडी खिडकी , मागे जाणारं जग अाणि अापलाच अापल्याशी चालेल्ला ‘ ते बघ , हे बघ,  हे काय असेल ? तिकडे एकदा जाऊया ‘ असा संवाद. हे मजेशीर असतं.
बाहेर डोकावत असतांना मध्येच एखादं लहानसं गावं , पडकी भिंत, गर्द पारंब्यांच झाडं लागतं हे सगळं अगदी हिरवंशार. शेवाळाच्या नावाखाली का होईना पावसात पडक्या दुर्लक्षित भिंतींना पालवीचा मोह होतो. हे पाहुन कधीही विस्मरणात न जाणारा ताजेपणा मनामध्ये भरुन राहतो. कधी कधी निराश व्हायला झालं कि हे क्षण अाठवल्या बरोबर परत रिचार्ज मिळतो. अाणि हे चालु असतांना अापल्यामागे कुणीच नसतं कारण अापणच सर्वात शेवटचे असतो. अाणि त्यामुळे खिडकीतुन येणारा पाऊस, वारा यांचावर फक्त अापलाच निर्विवाद हक्क असतो. ह्या शेवटाबद्दलच्या अोढीचं मुळ खुप जुन्या लहानपणीपासुनच्या प्रसंगांमध्ये अाहे.

वडिल लहानपणी गोष्ट सांगायचे राजपुत्राची. तो तलवार घेऊन निघतो वाटेत त्याला कोण कोण भेटतं त्यांना तो सवयीने मदत करतो अाणि ते लोक अानंदी होऊन राजपुत्राला अशी एकएक जादुई वस्तु देतात ज्याचा फायदा राजपुत्राला पुढे राक्षसासोबत लढतांना होणार असतो. कमीत कमी शंभरेक वेळा ही गोष्ट ऎकली असेल पण दरवेळी नवे प्रश्न पडायचे अाणि नेहमी त्याची मजेशीर उत्तरं मिळायची. गोष्टीच्या शेवटी एक वाक्य ठरलेलं असायचं ‘… अाणि ‘शेवटी' सगळं ठिक झालं.’ मी म्हणायचो ‘ पण एखादा दुसरा राजपुत्र असता अाणि शेवटी ठिक नसतं झालं तर?’. उत्तर यायचं ‘कधी कधी सुरवात-मध्य बिघडु शकतो पण शेवट ठिक नसेल तर तो शेवट नसतो.'

-प्राजक्त ९ अॉगस्ट २०१५


Saturday, August 1, 2015

बॅकबेंचर्स : ३ डोपलर इफेक्ट

"कल्पना करा तुम्ही रस्त्याच्याकडेला ऊभे आहात लांबुन येणा-या गाडीकडे एकटक बघताय. गाडी समोरुन भरधाव जाते. वेगाकडे लक्ष दिलं तर कळेल की पलीकडून येणारी गाडी समोरुन जातांना वेगाच्या मानाने भुर्रकन निघुन जाते. हेच आता रस्त्यापासुन फर्लाँगभर दुर उभं रहा. आता तो वेग कमी असेल. तीच गाडी आता अम्ब्युलंस आहे अस समजा, आता आवाजातुन अंतराची गंमत कळेल. ह्याला डोपलर इफेक्ट म्हणतात. बाकीचं उद्या बघु" विज्ञानाचा तास संपला. तेव्हापासुन मला खिडकीतून येत्या जात्या गाड्यांना बघायचा छंद लागला. रविवारीची दुपार अर्ध्यावर सोडुन दिलेल्या लिंगोरचाच्या खेळासारखी निपचीत वाटायची. अशावेळी आमचा जादा तास असायचा. त्यावेळी लांबुन येणा-या बैलगाडीच्या डोपलर इफेक्टमध्ये रमुन जायला व्हायचं.
लास्टबेंचवर बसायचे हे काही फायदे. म्हणजे खिडकीच्या बाहेर रमता येतं, भुक लागेल तेव्हा डबा खाता येतो, सुचेल तेव्हा कविता लिहता येते, वहीच्या मागल्या पानावर फुल्या-गोलचा खेळ खेळता येतो. आणि इतकं करुन परत समोर काय शिकवताय त्याकडे लक्षही देता येतं. किंवा तसं निदान दाखवता तरी येतं. हा शेवटचा फायदा खरंच फायदा आहे की तोटा हा वेगळा भाग आहे.
पण दुरुन जर कोणाला तो तोटा वाटत असला तरी जवळून पाहीलं तर कळेल की तो फायदा आहे. ती थियरी तर हे प्रॅक्टिकल. आपलं ते डोपलर इफेक्ट ? हां बरोबर.
ठरवुन खुप लक्ष दिलं ना कि डोक्याला झिणझण्या येतात आणि डोक्यात काही घुसेनासं होतं. दर्यावरची रेती कशी जितकी घट्ट पकडाल तितकी निसटते ना तशी. एकदा जीव धोक्यात घालुन पहिल्या बेंचवर बसायचा योग आला होता. त्यात इतिहासाचा तास. अरेरेरे महाराज आणि मावळे दिल्लीतून निसटले तेव्हा काय ती धुळदाण..., काय तो टापांचा आवाज...  त्यात अगदी पुढे रस्त्याच्याकडेला असल्यासारखं पुढच्या बेंचवर बसलेलो त्यामुळे समोरुन ते कधी भर्रकन् गेले ते कळालंच नाही इतकं अंगावर आलं सगळं. तेव्हा वाटलं हेच मागे बसलो असतो तर लांबुन येणारी, लांब जाणारी घौडदौड दिसली असती.
अजुन अाठवतं....तो विज्ञानाच्या मास्तरांचा शेवटचा तास होता. मास्तर निवृत्त होणार होते. टोपीखाली कानशीलाची पांढरी चांदी लपवत, पाणावल्या डोळ्यांनी , थरथरत्या हाताने फळ्यावर मास्तरांनी लिहले 'निरोप'. मग पुढे चाळीसेक मिनीटं मास्तर भुतकाळ-भविष्यकाळाबद्दल बोलत होते. जाता जाता म्हणाले " ते करायचं राहीलं आणि हे करणार ह्या दोन विचारांमध्ये जे भुर्रकन निघुन जात ना मुलांनो ते म्हणजे ...? " " आयुष्य ! " सगळी मुलं एकसुरात ओरडली.
" अहं.... चूक . ते करायचं राहीलं आणि हे करणार ह्या दोन विचारांमध्ये जो भुर्रकन निघुन जातो तो म्हणजे ... डोपलर इफेक्ट."
घंटा झाली. मास्तर काठी टेकवत निघुन गेले. काठी टेकवायचा टक्कंटक्कं आवाज जवळुन दुरदुर जात राहिला.

 - प्राजक्त / ०१ / ०८ /१५



Thursday, July 23, 2015

बॅकबेंचर्स : २. ज्याचा त्याचा विठ्ठल

प्रिय तुक्या ,

  सनविवि  अरे हो नव्हत लिहायचं ना. काय म्हणतंय शहर लेका ? माझं कॉलेज अजुन सुरु नाही झालं. म्हणजे कागदोपत्री झालंही असेल पण इकडे पंचायतीच्या निवडणुकीच्या धामधुमीत अापल्या शाळा कॉलेजांच्या बिल्डींगी दिल्या अाहे. त्यामुळे इथे सध्या फक्त राजकीय वर्ग भरताय. माझ्या चांगल्या अक्षरामुळे मला याद्या करायला बसवतात कधीकधी. मी अापल्या वर्गाच्याच शेवटच्या बेंचवर बसुन ते काम करतोय सध्या. खिडकीमधुन टोळक्यांच्या गप्पा अाणि सुध्या चहावाल्याच्या टपरीच्या रेडिअोमधले रफी-मेंहदी हसनचे अमृतगाणी ऎकु येतात. तुला सांगतो मला जाम डाऊट अाहे कि रफीची गाणी गुणगुणत हा चहा बनवतो म्हणुन याचा चहाला वेगळी चव अाहे, लय अाहे. तो सांगतो ते अालं-इलायची सब झुट ! लास्टबेंच वर बसुन याद्या लिहता लिहता टोळक्यांच्या गप्पा ऎकुन एक नक्की कि काही लोक बिनबुडाचे तांबे अाहेत. 
परवा अापल्या शाळेच्या पटांगणात एका दिंडीचा थांबा होता. किर्तन-हरिपाठाच्या तालावर मी नकळत अाठ पानं लिहली बोल. जरा वेळाने अचानक पाऊस अाला सगळी लोकं झाडाच्या अाडोशाला किंवा तंबुत घुसली. ह्या गदारोळात पांडुरंगाची तीनेक फुटी पितळी मुर्ती तशीच पाऊसात कटीवर हात ठेऊन मनसोक्त भिजत होती. मी भरपावसात जाऊन सुध्याच्या टपरीवरुन एक चहा अाणि येता येता विठ्ठलाची मुर्ती उचलुन अाणली. अाता लास्ट बेंचच्या खिडकीतुन मी अाणि पांडुरंग निथळत बाहेर बाहेरचा पाऊस डोळ्यात साठवत होतो अाणि सोबत चहाची वाफ. तुका म्हणे आम्ही बैसलों शेजारीं । करील तें हरी पाहों आतां । तंबूत टाळगाथा सुरु केली होती कुणीतरी. काय योग !
अापल्या लास्टबेंच वर विठ्ठलाला बसवलं,लेका. अाहेस कुठे ? त्याच्या शेजारुन खिडकीत पाहतांना 'तो वरतुन बघतांना' कसा बघत असेल याचा फिल अाला. पाऊस, तंबु, पलिकडे टपरीवर चहाचा ढग, छत्रीत डोकं लपल्यामुळे पाय असलेल्या छत्र्या झपझप चालतांना दिसत होत्या. अाहे कि नाही जादु ? तू विचारतो ना अनूभुती म्हणजे काय हेच ते. तेच हे. मग काय गणिताचा तास संपावा तसा जरावेळाने पाऊस संपला. अाणि मी निमूटपणे ज्याचा विठ्ठल त्यांना सुपूर्द करुन अालो.तिथे अाजीबाईं त्यांच्या नातवाचं डोकं पदराने पुसत होत्या. मी विठ्ठल दिल्यावर नातवाला सारुन त्यांनी ह्या माऊलीला पुसायला घेतलं.शेवटी ज्याचा त्याचा विठ्ठल. काय !


तुझा 
माऊल्या

Wednesday, July 15, 2015

बॅकबेंचर्स - १ टॅंजंट

प्रस्तावना : दोन गावाकडचे घनिष्ठ मित्र. त्यातला एक शहराकडे शिकायला गेला अाहे. एक गावातच. त्याच्यातला ह्या पत्रव्यवहाराची मालिका. अाणि मागल्या बेचंवरुन उलगडणारे त्याचे भावविश्व 


प्रिय माऊल्या , 

सनविवि लिहायचा नियम शाळेत मारोती मास्तरांनी सांगितला असला तरी मला तो अापल्यात पाळायची गरज नाही वाटत. पण बरका तुझी पत्राची कल्पना भन्नाट अाहे. अापण एकमेकांना नेहमी पत्रच लिहित जाऊ. अाज कॉलेजाचा पहिला दिवस संपल्या संपल्या खोलीवर येऊन तुला पत्र लिहायला घेतलं. तू इथं पाहिजे होता. इथं शहरात पोरंसुद्धा जंटलमंटल दिसतात म्हणुन मी अापला गुमान मागल्या बेंचावर जाऊन बसलो. दिवसभर फक्त सर लोकांनी अोळखीपाळखी करुन घेतल्या. इथं खिडकीतुन काहीच दिसत नाही. अापल्या शाळेतल्या प्रत्येक खिडकीतुन गुलमोहर, सावळ्या अाईचं देऊळ, शिवाईची टेकडी ह्यापैकी काहीतरी दिसायचंच. इथंल्या खिडक्यांमधुन पलिकडच्या इमारतीची खिडकी, गिरणीची चिमणी अाणि जास्त डोकावुन पाहिलं तर फुंकर मारल्यावर पळुन जाणा-या मुंग्यासारख्या सिग्नलवरच्या गाडया दिसतात. पहिल्या दिवस होता म्हणुन जरा टरकलीच होती. इथले वर्ग खुप मोठे अाहे. एखाद्या मास्तराने लक्ष नाही म्हणुन खडु मारला तर पोहचेल कि नाही हि शंकाच वाटते. तुला पाठवलेलं पत्र घरी पोहोयच्या अात पोस्टातुन घेऊन टाकत जाशील का ? नाही म्हणजे इथल्या पोरींबद्दल सांगायचं होतं. तू इंग्लिश शिकवायचा त्यामुळे फिजिक्स,केमेस्ट्री समजायला सोप्प जातंय. तुझं कॉलेज सुरु झालं का ? तू सोबतीला नसल्यामुळे कोणताच वर्ग बुडवायचा नाही ठरवलंय. तू इथं पाहिजे होता. सोबत असता तर जोडीने 'टॅंजंट' मारला असता. खोलीवर पार्टनर म्हणुन एक 'जेजे'चा पोरगा अाहे. जादु अाहे जादू. कसली चित्र काढतो. पण कमी बोलतो. जे बोलतो ते तुझ्यासारखं.माझ्या तर साला एकदम टॅंजंट जातं कधी कधी. म्हणजे निर्वात, क्षितीज, अाणीबाणी, सुर्यडुबी, लॅंपपोस्ट असं सगळं बोलतो तो. काल शेवटल्या बेंचावर माझ्या शेजारी एक पोरगा होता त्याने चालु वर्गात तंबाखु मळली. मला ही म्हणाला 'डबल मळू का?' खरं सांगतो टरकली माझी त्यात पलिकडची दोन वेण्याची.... नाही ते नंतर सांगतो. गोदीला वासरु झालं का? उत्तराची वाट पाहतोय. पुढल्या अाठवड्यापर्यंत लिही. सोप्पं लिही.
इथं सगळं ठिक अाहे. वर्ग तसेच पण थोडे मोठे, गोंधळ तोच पण अनोळखी, अाणि शेवटचा बेंच तोच पण शेजारी तू नाही.

तुझा दोस्त
तुक्या

ताक : सोबत जेजेवाल्या मित्राचं एक छोटं स्केच पाठवतोय. जादू रे साला जादू.


- प्राजक्त १५ जुलै १५

(दै सामना २५ जुलै फुलोरा )

Friday, May 22, 2015

निबंध ( १६ मे मटा मैफल)

कोसा कोसावर जशी भाषा बदलते तशी लाईफस्टाईल पण बदलते.त्यात लहान मुलांचं विश्व वेगळंच. लहान मुलांचं खरं अंतरंग पहायचं असेल तर त्यांचे निबंध वाचायला पाहिजे. ते निबंध वाचल्यावर कळतं कि त्यांच्या मनातलं जग कसं असु शकेल अाणि त्या जगातली त्यांची लाईफस्टाईल कशी असते.
एक मित्र शाळेत शिक्षक अाहे. तो ब-याचदा शाळेचे पेपर तपासायला घरी अाणतो. त्यात एकदा दोन निबंध वाचले. एक मुलगा इथलाच तर दुसरा नुकताच विदर्भाचा जो शिकायला इकडे मामाकडे अालेला.
इथला मुलाच्या निबंधात पाऊस होता, मोर होता, पाण्याचं डबकं होतं,आईच्या पदराने घासलेलं डोकं होतं, कागदाची होडी होती, छत्री होती, रेनकोट होता, अळुच्या पानावरचा मोत्याचा थेंब होता, चिखलाचे पाय होते,सुसाट चालवलेली सायकल होती. पण त्या दुस-या मुलाचा निबंध अनुभवणं जास्त महत्वाचं आहे. त्याच सबंध वेगळं जग होतं. त्याचा पेपर मध्ये सगळ्यात वर मध्यभागी लिहलं होतं...
"माझा अावडता ऋतू"
शाळेत शिकवत जरी असले तरी जन्माला अाल्यापासुन मी कधी तीन ऋतू पाहिले नाही. अामच्या गावाकडं फक्त उन्हाळा असतो. अाणि हिवाळ्यात रात्रीपुरता गारवा असतो. बाकी भुगोलात शिकवलेलं खरं असंल तर पावसाळा हा माझा सगळ्यात अावडता ऋतू असु शकतो. पावसात उभं राहिलं कि म्हणे अंगावरुन थेंब निथळतात. अाम्ही मित्र पकडा-पकडी खेळुन दमलो की घामाच्या धारा लागतात अाणि अंगावरुन जमीनीवर थेंब निथळतात तेव्हा अाम्ही "पाउस अाला,पाउस अाला" असं म्हणतो.तेव्हा खुप मजा येते म्हणुन मला पावसाळा अावडतं असावा. माझ्यामध्ये कधी कधी जादु अाहे असं वाटतं,कारण माझ्या घामाचा थेंब जमिनीवर पडल्यावर तसाच वाफ होऊन गायब होतो जसा अाईचा गरम तव्यावरचा पाण्याचा शिपकारा गायब होतो. पावसात म्हणे सगळीकडे हिरवं हिरवं होतं. मी एकदा चित्रकलेच्या तासाला तसं चित्र पण काढुन पाहिलं. अामच्या कडे जे तेलकट खडु अाहे त्यात पांढरा अाणि हिरवा खडु कशाला अाहे हे मला अाज पर्यंत कळालंच नाहीए. म्हणुन मी मित्रांचे पण हिरवे खडु घेऊन सगळीकडे हिरवळ दाखवली.पण पोरं खुप हसले म्हणाले 'असं हिरवं कधी असतं का?' म्हणुन मी ते चित्र माझ्या उशीच्या खोळात लपवुन ठेवलं अाहे.मला ते चित्र अावडतं, म्हणुन मला पावसाळा अावडतं असावा. अामच्या इथं एक किराणा दुकानदार दर जून मधे रंगीत छत्र्या विकायला अाणतो. त्या दुकानदाराला अाम्ही नेहमी "सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का?" असं चिडवतो. तो खुप चिडतो अाणि दगडं घेऊन अामच्या मागे लागतो. तेव्हा दुसरा मित्र हळुच बरणीतुन चार-पाच खोब-या गोळ्या काढतो. फुकटच्या खोब-या गोळ्या जास्त गोड का लागतात माहित नाही पण अाम्हाला त्या खुप अावडतात. हे फक्त ह्याच ऋतुत घडतं म्हणुन मला पावसाळा अावडत असावा. 
अाप्पा म्हणतात त्यांच्या लहानपणी पाऊस यायचा तेव्हा ते खालच्या मळ्यात सायकलीवरुन रपेट मारायचे अाणि गार वारा अंगाला झोंबायचा. मी पण कधीकधी गुपचूप थोडं पाणी डोक्यावर अोतुन सायकलीची रपेट मारतो. मग नुकत्याच अोसरलेल्या पावसातुन फिरल्यासारखं वाटतं अाणि लहानपणीचा अाप्पा झाल्याचा भास होतो. मला अाप्पा अावडतात,म्हणुन कदाचित मला पावसाळा अावडत असावा.जून मध्ये पाऊसाची सुरवात होते असं पुस्तकात लिहलं अाहे. पण अामच्याकडे जून मध्ये साथीचा रोग येतो.त्या रोगाला काय म्हणतात माहित नाही पण लोक इकडे तिकडे फोन करुन "अाला का?" "कुठवर अाला?" "ह्या वेळेला जोरात असावा हो ना?" , "थोडथिडका का होईना पण अाहेच " असं बरळायला लागतात. काही लोक तर मुर्खासारखा पैसा खर्च करुन कौलाच्या अाणि घराच्या फटी पक्क्या सिमेंटने बुजवतात. ह्या पावसाळ्यात कदाचीत साथीचा रोग पसरतो म्हणुन दर दोन दिवसा अाड झाडावर लटकुन काही लोक मरतात. साथीच्या रोगामुळे दरवर्षी ह्याच ऋतुत खुप लोकं मरतात. सुरेखाचा बाबा असाच साथीच्या रोगामुळे मेला. इतकं अाजारी असतांना झाडावर जाऊच नये असं मला तरी वाटतं. ह्या साथीचं रोगाचं एक सोडलं तर बाकी नावं ठेवण्यासारखं काही नाही.म्हणुन मला असं वाटतं कि मला बहुतेक पावसाळा हा ऋतु अावडतं असावा.जय भारत.

इयत्ता तीच,विषय तोच,ऋतु तोच, निबंधही तोच.फक्त ‘परिक्षा’ वेगळी.

- प्राजक्त २३ मे १५

मटा मैफल 



Friday, May 8, 2015

'तो' उन्हाळा कुठे गेला (मटा ९मे १५)

अापण लहानपणी दोन कारणांसाठी उन्हाळ्याची वाट पहात रहायचो. एक म्हणजे अांबा अाणि दुसरं म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या. विकत घेण्यापेक्षा गरम झळा खात ,कानशीलामागुन एक गारट घामाची धार अनुभवत अांब्याच्या झाडाखाली उभं राहुन अर्जुन होण्यातली मजा बाजारात जाऊन नुसता वास घेत ‘कशी दिली पेटी?’ ह्यात नाही. अाताशा लाईफस्टाईलमध्ये सुट्ट्या त्याच ज्या शनिवार-रविवारला जोडुन येतात. बाकी कामाच्या गु-हाळ्यात जुंपलेलं अायुष्याला सिनेमा किंवा मॉलच्या घुंगरांची तेवढी करमणुक. पण तरी अशा उन्हाळात अॉफिसमधल्या एखादया तुम्हा अाम्हाला एक प्रश्न दरवेळी पडतो कि ‘तो' उन्हाळा कुठे गेला ?
उन्हाळा अाला कि सुट्टी अाणि सुट्टी असलं कि गाव हे समीकरण पक्कं होतं. मग शेण सारवलेल्या अंगणात उन्हाळ्याची वाळवणं दिसायची. पावसात डबकी चुकवत चालवं तसं ऎन उन्हाळ्या वाळवण चुकवत उड्या मारत शेवटी दाराला अाधार घ्यावा लागायचा. दारावरची साखळीकडी खडडखट्ट करत लाकडी दारावर वाजायची. मग अातल्या अंधा-या कोप-यात माळ जपत बसलेली म्हातारी घोंगडी अोरडणार ‘कोण खेळतय रे कडी-कोयड्याशी? अशी खटखट नाही करु,कटकट होते मग” तितक्यात तसाचसा खटखट अावाज अॉफिसच्या तुमच्या दारावर होतो तंद्री तुटते. प्रश्न उरतो ‘तो' उन्हाळा कुठे गेला ?
मग लंच टाईम होतो तुम्ही डबा उघडता खालच्या पोळीत लोणच्याची पोळीची गुंडाळी असते. हळदमसाल्याच्या घमघमत्या वासांनी परत तुमचं मन अंगणात रमतं. जात्याचा भरारा, कै-याच्या चार खापा करतांना धारदार विळ्यावर अाईचा बांगडी मिश्रीत दणका. त्या कच्च्या कै-यामधे एखादा पिकलेला अांबा असायचा मग तो अापल्या झोळीत यायचा. घसा कोरडा झाल्यावर कोणीतरी  पाणी अाणायला लावायचं. काळ्या कुट्ट मडक्यामध्ये पितळी तांब्या चुबकन बुडवायचा. एकदा त्याच तांब्यामध्ये उंदीर सापडला म्हणुन सगळ घर डोक्यावर घेतलं होतं. नंतर पोटातली कळ लपवत लपवत प्रत्येक जण सांगत होता कि तो उंदीर नाही वाळा अाहे. अॉफिसात थंड ठणका बसेल इतकं गारपाणी घशाखाली घरंगळतांना वाळ्याच्या निथळत्या चवीची अाठवण विचारत राहते कि 'तो' उन्हाळा कुठे गेला ?
हात धुवून रुमाल अोला करुन तोंडावरुन फिरवल्यावर भर उन्हात कामाची भगभग जरा कमी होईल असं वाटत राहतं तेव्हा नदीवर तासभर डुंबून सुस्तावलेले अापण स्मरत राहतो. अापल्याच घरातल्या अाया-बायका धुणी पिळुन खांद्यावर घेऊन निघतात. तेव्हा धुतलेल्या पिळ्यातुन चुकून एखादं खाली पडलेलं उपरणं नदीच बुचकाळुन अाणायची हुकूम दिला जातो अाणि अापण उपरणं घेऊन नदीच्या प्रवाहात उतरतात. वडाखाली वाट पहात असलेल्या अापल्या अायाबायका कपाळी पालथा हात लाऊन किलकिल्या डोळ्यानी अावाज दिल्यावर अापण भानावर येतो अाणि उपरणं पिळुन गऴयाभोवती लपेटुन उन्हाच्या झळा कापत झपाझपा चालु लागतो. अोल्या उपरण्याची पिळ अाणि अोल्या रुमालाची अाणि मानेभोवतीची अोली रेष विचारत राहते कि ‘तो' उन्हाळा कुठे गेला. 
अॉफिसचा पंखा लावतो,भरभरु लागतो, कागदं फडफडतात. त्यांना शांत ठेवण्यासाठी काचेचे गारट ‘पेपरवेट’ तुम्हीअाम्ही कागदावर टेकवतो.तेव्हा अाठवतो कोतुळेश्वराच्या टेकडीखाली पिंडीखालचा जिवंत झरा अाणि अाठवतो शिवाईच्या पाणथळीजवळ खोलेश्वरच्या पन्नास फुटी खोल गाभा-यातला पिंडीवरचा गारवा. तेव्हा अंगावर शहारा उभारत तो गारवा विचारत राहतो कि 'तो' उन्हाळा कुठे गेला.
त्याच उन्हाळ्यात अांब्याच्या झाडावर काठी मारल्यानंतर सुकलेल्या बुंध्यावरुन एक पोपडा खाली पडतो अाणि त्यामागुन सैरावैरा पळणा-या मुंग्या दिसतात. अगदी तसं सुटतं मग अॉफीस. ‘त्या’ सुट्ट्यांमध्ये घडत असं खुप काही नसतं पण तरी काहीतरी अविरत चालु असतं. 
तरी अापण परत परत वाट पहात राहतो उन्हाळ्याची. परत परत अाठवतं कि अापण लहानपणी दोन कारणांसाठी उन्हाळ्याची वाट पहात रहायचो. त्या उन्हाळ्याच्या शोधातलं उतारावरचं पाणी एका उत्तरावर येऊन थांबत कि नंतर हळुहळु उन्हाळा भीषण होत गेला.
नंतर हळुहळु अापण मोठे होत गेलो,अांबे महाग होत गेले अाणि सुट्ट्या कमीकमी होत गेल्या इतकंच.

- प्राजक्त 
मटा ९।मे।१५


अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...