Friday, April 24, 2015

ब्रॅंड व्हॅल्यू ( मटा २५ एप्रिल १५)

अाजच्या लाईफस्टाईलमध्ये शिक्का खुप महत्वाचा मानला जातो. शिक्का म्हणजे ? तेच ते ज्याला शुद्ध मराठीत ‘ब्रॅंड’ म्हणतात. म्हणजे कसंय कि बुटापासुन केसाच्या टोकापर्यंत तुम्ही कोणता शिक्का वापरताय हे महत्वाचं मानायला लागतलेत. मग तुम्ही एखाद्या वस्तुच्या पाहिल्या पाहिल्या प्रेमात जरी पडला तरी मनाप्रमाणे शिक्का नसल्याने तुम्ही ती वस्तु नाकारता. पण प्रत्येक गोष्टीचं मुल्य शिक्क्यात कसं मोजाल ? 
जी मोटारसायकल घ्यायची त्याचा शिक्का महत्वाचा, जो बुट घालुन मोटरसायकलला किक माराल त्या बुटाचा शिक्का महत्वाचा, निघण्यापुर्वी जो सेंट माराल त्या सेंटचा शिक्का महत्वाचा. सगळीकडे शिक्क्याचं महत्व अनन्यसाधारण अाहे. पण खरा अानंद हा मानण्यात असतो. अाणि ख-या समाधानाला कुठल्याच शिक्क्यांचं मिंधेपण नसतं.
अाज विरंगुळा म्हणुन उंचीच्या चित्रपटगृहात,ठराविक शिक्क्याचे चित्रपट बघतात. ठराविक शिक्क्याचे थंडपेय पितांना, ठराविक शिक्क्याचे पोपकोर्न चघळतात. अाणि समाधान मानतात.लहान मुलं टिव्ही लॅपटॉपवर प्ले-स्टेशनवर ठराविक शिक्क्याचे  खेळ खेळतात अाणि अानंदाने दंगुन जातात. पण पुर्वी लिंगोरच्या खेळायचो. कपच्यांवर कपच्या रचल्या अाणि जुने सॉक्स एकत्र करुन जो चेंडु बनवला त्या चेंडुवर कोणता शिक्का होता?  नीट अाठवुन सांगा कि घशाची निळी टपटपीत शीर ताणुन लि लि लिगोंरच्या s s !  अोरडतांना डोक्यात कोणता शिक्का होता ?
गेल्याच महिन्यात पाडव्याला जी गुढी उभारली त्याची काठी कोणत्या शिक्कयाची होती ? सणाला घरी ताई अाली होती. तिच्या गोंडस छकुलीने अायुष्यातला पहिली कोकिळकुहू ऎकली. त्या बाहुलीच्या विस्फारलेल्या बाहुल्या पाहुन कोणत्याच यू-ट्युब विडीअोने होणार नाही इतकं मनोरंजन झालं. मग गंमत म्हणुन तुम्ही तिला कडेवर घेऊन खिडकी-बाल्कनीतुन डोकावत कोकीळा दाखवण्याचा चंग बांधला. सांगा ती कोकिळेवर कोणता शिक्का होता? तीला कडेवर धरुन हाताला लागलेल्या कळेचं समाधानला कोणता शिक्का माराल. बोला ! दुपारी काळ्या अामटीत बुडवलेल्या पुरणपोळीचा शिक्का बोला ? अाज लोकांची नावं वाचतांना अाधी अडनावाकडं लक्ष का गेलं ? तुमच्या लहानपणी शाळेत मित्राच फक्त पहिलं नाव माहित असायचं ते पण अर्धवट. म्हणजे शेख्या हा मित्र शेखर अाहे कि चंद्रशेखर कि शेख हे सुद्धा माहित नसायचं. मधल्या सुट्टीतला त्याचा प्लास्टिकचा डब्बा तुमच्याकडे, तुमचा स्टिलचा टिफीन त्याच्याकडे. एकाच वाॅटरबॅग मधलं पाणी तुम्ही अर्धा वर्गाला द्यायचे अाणि ते तोंड लावुन प्यायचे. अाजही चिंचेच झाड दिसलं कि लहानपणीचा प्रसंग अाठवतो जेव्हा चिंचा तोडायला तो खाली वाकलेला अाणि तुम्ही पाठीवर पाय देऊन अोंजळभर चिंच्या तोडल्या. त्याच्या पाठीवर धुळीचे दोन पाय उमटले होते. सांगा , त्या धुळीवरचा शिक्का कोणता ? गरगर फिरवणा-या लाकडी भव-्यावर फक्त रंग शोधायचो. त्यावर कंपनीचे शिक्के कधी शोधल्याचं अाठवतं ? तेव्हा गोळ्या फक्त लिमलेटच्या होत्या तमुक कंपनीची लिमलेटची गोळी किराणा दुकानात मागायला कधी गेल्याच अाठवत नाही.
तुमच्या -अामच्या सारख्या शिक्कयांची थेरं जर परमेश्वराला असती तर विठ्ठलाने वीट सिमेंटची मागितली असती, येशु ख्रिस्ताने  क्रुसासाठी चंदनाचं झाडं शोधलं असतं, पैगंबराला वेलवेटची चादर लागली असती अाणि कृष्णाने फक्त जातिवंत मोराचं मोरपीस खोवलं असतं.
अहो कळस दिसला कि डोक्याकडुन छातीकडे हात अाणि किंचीत कमरेत लवण्याचे संस्कार अापले अात गाभा-यात कोणता देव अाहे हा प्रश्न कधी पासुन पडायला लागला ?  

- प्राजक्त 
मटा २५ एप्रिल १५

Friday, April 17, 2015

आत खळबळ शून्य (मटा १८ एप्रिल १५)

अाजकालच्या धक्काधकीच्या लाईफस्टाईलमध्ये ….. हो हो ! 'धक्का’धकी म्हणायचंय मला ‘प्रिंटींगमिस्टेक' किंवा माझं अशुद्धलेखन नाही ते . म्हणजे कसंय दर दुस-या दिवशी कसलीतरी ब्रेकिंग न्युज, कुठेतरी धक्कादायक बातमीचा 'अाखों देखा हाल’ अापल्या फोनवर चित्रासकट येतो. तर अाजकालच्या ह्या धक्काधकीच्या लाईफस्टाईलमध्ये अापली अभिव्यक्ती अाणि संवेदनांची तिव्रता कमी झालीय का? असा प्रश्न पडु लागलाय. शुद्ध मराठीत म्हणायचं झालं तर 'अापल्या इमोशन्स अाणि फिलींग्जची इंटेंसीटी कमी झालीय का ?’ म्हणजे काहीही घडो, कितीही तीव्र असो पण अात खळबळ शून्य.

श्वास अाणि उच्छवासाप्रमाणे नियमित अंतरावर मोबाईलचा मेसेज बॉक्स शुकशुक करुन बोलवत राहतो. एखादा किरकोळ विनोद असो किंवा एखादी ‘पुलं लेवल’ची कोटी असो, वाचणारा गंभीर मुद्रेने, शुन्य नजरेने रिप्लाय देतो LOL. LOL म्हणजे असं सांगायचं असतं कि मी इकडे खळखळुन हसलो. किंवा असाही रिप्लाय जातो ROFL. ROFL म्हणजे अरे तुझ्या विनोदामुळे मी इकडे जमिनीवर गडाबडा लोळुन हसतोय. परंतु प्रत्यक्ष परिस्थिती अशी कि चेह-याचे भाव शून्य, नजरेतला अानंद शून्य अाणि महत्वाचं म्हणजे अात खळबळ शून्य.

रस्त्यांने चालणारे दिसतील. चालतांना पावलांचे अावाज कमी अाता किपॅडचे अावाज जास्त येतात.सगळेच ‘अंगठेबहाद्दर'.कधी कुणाला अानंद किंवा काळीज पिळवटणारं दु:ख झालंच तर अाधी 'स्टेटस अपटेड’ होतो मग ग्रुप मेसेज मध्ये बातमी जाते. नंतर प्रत्यक्ष घरात बातमी सांगितली जाते. अशा प्रकारे मानसिक अाधार पण अाता व्हर्च्युअल झालाय.जेवण महत्वाचं कि टिव्ही ह्या संभ्रमात जेवत जेवत टिव्ही बघतांना किंवा टिव्ही बघत बघत जेवतांना ‘अाणखी दोन शेतक-यांची अात्महत्या’ ही बातमी चालु असतांना दुसरा घास कालवलाच कसा जाऊ शकतो हे माझ्यासाठी कोडंच अाहे. अशा वेळेस चॅनेल बदलाल पण डोक्यातला विचार खरकट्या हातासारखे धुवू नाही शकत. नंतर हात धुतांना बेसिनच्या नळाचीही खळबळ होते पण अापल्या अात खळबळ शून्य.

लहानपणी गिरकी गिरकी खेळायचो. वर आभाळाकडे बघत, मागे मान टाकुन गर गर गिरकी घ्यायची. मग थांबलो कि समोरचे सगळे जग एकमेकांत मिसळून जायचे. पांढ-यांत लाल, लालमध्ये पिवळा, बिल्डिंगमधे रस्ता, रस्तामधुन ढग, ढगामधुन पिंपळाच्या पारंब्या सगळं जग उलट पालट होऊन जायचं. अंगणात चाफ्याचं झाडं होतं. गरगरत जात आधार म्हणुन त्याला धरलं कि परत हळूहळू सगळं जागेवर यायचं. अाता अाधाराला अंगण नाही, अंगणामध्ये चाफा नाही. चाफा अाणि मोबाईल दोन्ही सायलेंट मोडवर. अाणि सायलेंट मोड असल्याने अात खळबळ शून्य

कुणी म्हणेल तंत्रशिक्षण पुढारलं अाहे वगैरे वगैरे. हो पुढालंय ना. सगळं जग पुढे जातंय वगैरे वगैरे.हो जातंय ना. मग जर तेच अापण अंगिकारलं तर चुकलं कुठे वगैरे वगैरे?नाहीच चुकलं पण गुलॹार म्हणतात तसं पानं उलटवतांना जीभेवर जी पुस्तकपानांची चव रेंगाळते ती मजा ह्या क्लिकमध्ये कुठे हो? तंत्र नको सोडुया पण छोट्या गोष्टींमधली मजा तशीच अनुभवुन पाहु. इतकंच कि मित्राकडे गेल्यावर नेहमीसारखं घराखालुन मिस् कॉल देण्याऎवजी त्याला पुर्वीसारखा एकदा तार स्वरात अावाज देऊन पाहु. टिव्हीवरच्या कॉमेडी नाईटसोबत कधीतरी तळहातावर भवरा फिरवल्यावरची हुळहुळसुद्धा अनुभवुन पाहु. एसी जिममध्ये ट्रेडमीलवर घाम घाळतोच पण एखाद्या सकाळी जिमखान्याच्या रस्त्यावरचा गुलमोहर तुडवुन पाहु. चालतांना शेवटचा घाम कधी अाला होता ? पळतांना पायात शेवटचा गोळा कधी अाला होता? हसतांना पोटात शेवटचा मुरडा कधी अाला होता ? मिश्किलपणे मित्राच्या डोळ्यात संत्र्याचे साल शेवटचं कधी पिळलं होतं ? पिंपळाची सळसळ शेवटची कधी ऎकली होती ? ह्या प्रश्नांचा मागेमागे गेलं कि सापडेल खरं उत्तर. कोणत्या प्रश्नाचं उत्तर ? हाच प्रश्न कि 'अात शेवटची खळबळ कधी झाली होती ?'

- प्राजक्त ( मटा १८ एप्रिल १५)

http://epaperbeta.timesofindia.com/Article.aspx?eid=31833&articlexml=18042015004023

Friday, April 10, 2015

ट्राफीकनामा ( मटा ११ मार्च १५)

उफराट्या स्टाईलने लाईफ जगणं वेगळं अाणि अस्सल जगण्याला स्टाईल म्हणुन जगत राहिलं कि होते ती लाईफस्टाईल वेगळी. पण हा साधा रस्ता शहराच्या घाई गदारोळात अाणि चमचमत्या मॉल्सच्या थाटात हरवत चाल्लंय.
कसंय शहरात उद्यानं नाही अाणि असलीच तर भकास. ती उद्यानं कचराकुंडीवरच्या पावसासारखी दिसतात. गोदाघाटावर कोणाकोणाच्या वाट्याचं धुणं धुत बसलेली नदी नंतर ह्याच पावसाने वाहत राहते. ह्या नदीच्या एकदम मध्याभागी एखादी शिळा बांधता अाली पाहिजे. जिथे फक्त एकाला उभं राहायची जागा असावी अाणि त्या जागेवर उभं राहायला महानगरपालिकेकडुन अागाऊ बुकींग करावं लागावं. मग खळखळत्या पाण्यात सुर्यडुबीला एकांतात अशा शिळेवर जाऊन उभं राहल्यावर कळतील शहराला वेड लागण्याची कारणं.
सिग्नल पाळणे म्हणजे तर भित्रेपणाचं लक्षण झालंय. तुम्ही शहाण्या बाळासारखे सिग्नलवर उभे राहतात अाणि मागची घायकुतीला अालेली जमात तुम्हाल हैराण करुन सोडते. अाणि जाता जाता ऎकु जाईल अशा अावाजात ‘हरिश्चंद्राची अौलाद…!’ अशी शिवी ही हासडतील. ह्या अशा घायकुतीच्या जमाती असो कि सिग्नलवरची निराश झालेली हरिश्चंद्रांच्या अौलादी असो हे सगळेजण सिग्नलवर फुगेवाल्यांसारखेच सैरभैर दिसतीलच. अाजकाल ह्याच सिग्नलवर एकवेळ तृतियपंथीयांची फरशीवर फरशी अापटावी अशी स्पष्ट टाळी ऎकु येईल पण ट्राफिक पोलीसाची शिट्टी कुठेच ऎकु येणार नाही. अशात ही बेबंद ट्रॅफिक सिग्नल्स वेडी नाही तर काय होणार?
सिग्नलवरच्या बेबंद रांगेत उभं राहणं म्हणजे भिक्षेपात्र घेऊन उभं राहणं अाहे कि काय इतका कमीपणा वाटु लागलाय. पुर्वी 'अाज सुट्टी अाहे' म्हणुन बाहेर पडाणारे अधिक असायचे. अाता 'अाज सुट्टी अाहे गर्दी,गजबज जास्त असेल' म्हणुन घरात टिव्ही समोर ध्यान लाऊन बसलेले अधिक असतात. एखाद्याच्या मागे जाऊन उभं राहणं हे ना अापणाला मान्य असतं , ना कुणी अापल्या पोरांना हे शिकवतं. अाधीपासुनच मुलांना हेच शिकवलं जातं कि नेहमी रांगेच्या पहिल्या टोकाला तुम्ही कसे असले पाहिजे. मग त्यासाठी त्यांना लावा कराटे क्लास, लावा वैदिक मॅथ्स, लावा डान्स क्लास, लावा गायनाचा ध्यास. अरे काय चाल्लंय काय? मग अशाने शहरातली मुलं वेडी नाही तर काय होणार ?
नाक्यावरचं कचराकुंडीच्या ठिकाणी ‘ कचरा कचराकुंडीतच टाका’ ही पाटी ‘ कचरा कचराकुंडीच्या अासपास टाकला तरी चालेल’ अशी वाचुन तिथल्या वासाच्या घाणीने चार फुटावरुन कचरा भिरकवुन दिला जातो. मग त्या कच-यामधले कागदाचे बोळे, कांद्याचे टरकलं सैरभैर होतात अाणि फेर धरुन ट्रॅफिक तुंबलेल्या शहराच्या भटकंतीला निघतात. अाणि शहराच्या अाडोशाला जिथे अाधीच पाऊस तुंबलेला असतो तिथे जाऊन विसावतात. अाधीच तुंबलेलं, ही नवी विटंबना, अशाने पावसाला वेड नाही तर काय लागेल? 
अाताशा कोणाला कुठे पोहोचायचं असेल तर वेळेत निघायची जबाबदारी वेळ देणा-याची असते. कारण वेळ देणा-याने अर्धा तास अगाऊची सांगायला पाहिजे हे गृहितक जवळ जवळ ठरलेलं असतं.  चार वाजता भेटायची वेळं ठरली कि माणसं चारला भांग पाडतात. मग उशीराने चिडचिडत घर सोडुन सगळे निघतात. अाणि दिसेल त्याच्यावर डाफरत रस्त्याने प्रवास करत राहतात. खरतरं शहरात चेहरे कमी अारसे जास्त फिरतात. तुमची चिडचिड,तुमची शिवी, तुमचं स्मित, तुमचा खळखळाट फिरुन परत तुमच्याकडेच येतो. अाता अायुष्यभर 'अाजकाल पुर्वीसारखे अारसे मिळत नाही बाजारात' अशी तक्रार करत राहिले तर अारशांना वेड नाही तर काय लागेलं?
गंमत अशी अाहे कि ह्या शहरात घाई सगळ्यांना अाहे पण पोहोचायचं कुठंच नाही. अशाने शहराला वेड नाही लागेल तर काय?

- प्राजक्त ( मटा ११/०४/१५)


Friday, April 3, 2015

वेगवेगळी उन्हं ( मटा ४ एप्रिल१५)


उन्हाळा लागला कि दुपारच्या ठराविक वेळी शहरात कर्फ्यू लागल्यागत शांतता होते. ऋतु बदलाची पहिली माणसाळलेली खुण लोकांच्या डोक्यावर दिसते. तापमान शुन्याकडे धाव घ्यायला लागला कि डोक्यावर कानटोपी येते. ढग काळवंडुन अोसंडायला लागले कि डोक्यावर छत्री येते. तापमानला चाळीशीचे वेध लागले कि डोक्यावर उन्हाची टोपी येते. म्हणजे बदल कोणताही असतो पहिली चाहुल दिसु लागते ती गर्दीच्या डोक्यावर. मग अाधीच मुखवटे चढवलेल्या मुखवट्यांवर काळे गॉगल येतात. त्यात ज्यांना चष्मा असेल त्यांचे दु:ख अवर्णनीय असतं. ह्या लोकांचं दु:ख पावसाळ्यात तर महाअवर्णनीय असतं. जमिनीतुन उगवावे तसे नारळपाणीवाले, ऊसाच्या रसवाले, लिंबु सरबतवाले, टरबूजवाले, अाईस गोळेवाले ईत्यादीवाले रस्त्याच्या कडे कडेला उगवतात. कुठलतरी सावलीचा अाडोसा धरुन बसलेले हे लोकं म्हणजे टळटळीत उन्हाळ्यात रस्त्याच्याकडेला असलेले अमृताचे घडेच अाहे. अमृताचे घडे एवढ्यासाठी कारण दैवदुर्विलासाने जर तुम्हाला ह्या अघोरी उन्हात बाहेर पडावं लागलंच तर तुम्हाला पाठीवरती हात ठेऊन लढ म्हणणारे हि एकमेव जमात अापल्याला रस्त्यावर दिसेल. ठरल्याप्रमाणे उन्हं पसरावी अाणि ठरल्याप्रमाणे सावल्या पांगाव्या इतकं ठरल्याप्रमाणे सगळ्याची लाईफस्टाईल बुद्धीबळाच्या पटाप्रमाणे मांडलेली असते.
पण उन्हं वाढली कि सावल्या पांगतातच असं नाही.जेव्हा सुर्य डोक्याच्या अगदीवर नव्वद अंशात असतो असा ‘झिरो शेडो दिवस’ पण कधीतरी येतो. अशा वेळेस जाणीव होते कि जगाचा भार माथ्यावर अाला कि कधीकधी सोबतीला सावलीसुद्धा नसते. ब-यादचा असंही होतं कि बाहेरच्या शहरातुन एखादा पाहुणा शनिवार-रविवार बघुन त्रंबकराजाच्या निमित्ताने किंवा साईनाथांवरच्या श्रध्देने नाशकात सबुरीने तंबु ठोकतो. कारण एकच कि त्यामानाने नाशिकची उन्हं ही कमी तापदायक. पण जाळायचं म्हटलं कि थोडं जाळु जास्त,जाळु असं काही होतं नाही. उगा अापल्या मनाची समजुत दुसरं काय. खरी धमाल स्टाईल असते ती तरुणांची.त्यांच्या टोप्यांच्या त-हा, गाॅगल्सच्या त-हा, स्कार्फच्या त-हा सगळंच त-हेवाईक. अशा उन्हात दिंडी आणि पालख्यांचे भोई दिसतात तसे नोकरी शोधणारे सुटबूटधारी पण दिसतात.  दोघांचा शोध शाश्वत. मग ह्या चालणा-यांना नेमका कोणता विचार अखंड चालवत ठेवतो? असा विचार मी नेहमी करतो. मग ह्या निष्कर्षावर येतो की सकाळी मागे असणारी सावली दुपार कलंडता कलंडता आपल्या समोर पसरते. अशावेळी चालताना एक सुख असं ही असेल की आज नाही कोणाला पण सुर्याला तर मागे टाकलं आपण.
गावाकडे छतावर धारं असायची. म्हणजे बंद छता ऐवजी जाळी असायची. उन्हाळी सुटीत दुपारी पडल्या पडल्या त्या घरात ढगांमुळे उन सावलीचे गालिचांची नक्षी तयार व्हायची. तशी नक्षीदार उन्हं आता दुर्मिळच.
भर उन्हात सगळीकडे रुक्षपणा, डोळे किलकिले करायला लावणारा भक्क उजेड असतो तेव्हा एखाद्या नाक्यावरचा गुलमोहराचा लाल केशरी रंग डोळ्यात भरुन राहतो. असं वाटत राहतं कि जागोजागी पसरलेली ही अाग ह्या गुलमोहरानेच पसरवली अाहे. एखादं झाड पेटवुन द्यावं तसा हा गुलमोहर पेटुन पिवळसर केशरीलाल रंगी ज्वाळांसारखा लपलपतांना दिसतो. पण कधी ह्याच दाहात त्या झाडाखाली सावलीला गारवा अनुभवत उभं राहिल्यावर अापल्याला कळतं कि कदाचित असं ही असु शकेल कि जसं महादेवाने विष प्राशन करुन सृष्टीचा दाह कमी केला होता , जसा येशूने जगाचे घाव अापल्या अंगावर सोसले अाणि क्रुसाच्या अाधीन झाला अगदी तसंच ही अाजुबाजुला जी अाग पसरलीय ती गुलमोहराने अंगावर झेलुन घेतली अाहे. अाता जो दाह अाहे तो त्यामानाने जरा कमीच अाहे ह्याला कारण अाहे तो हा गुलमोहरच. गैरसमज गैरसमज म्हणतात तो हाच का ?


- प्राजक्त 
http://epaperbeta.timesofindia.com/Article.aspx?eid=31833&articlexml=04042015005005
मटा ४/४/१५

Friday, March 27, 2015

सेल्फी (मटा २८ मार्च २०१५)

देशाच्या कुठल्याशा कोप-यात काहीतरी अघटीत घडतं अाणि बातमी पसरते, चुकचुक पसरते, हळहळ पसरते. अाजकाल पोळीभाजी सोबत ताटात लोणचं नसलं तरी चालतं पण तोंडी लावायला टिव्ही पाहिजेच. अाणि ह्यात नवे म्हणु नका,जुने म्हणु नका प्रत्येकाचीच तशी लाईफस्टाईल झाली अाहे. होऊ देत पण वाईट ह्याचं वाटतं कि त्या बातम्यांमध्ये कोणाचा खुन पडो, इज्जतीचे धिंडवडे निघो कि निरागस डोळ्यांचा टाहो असो पण जेवतांना कोणालाच ठसका लागत नाही. गिळल्या घशात कोरड पडुन पाण्याचे दोन घोट कोणाला घ्यावेसे वाटतं नाही……..इतकं सगळं सवयीचं झालंय. 
गंगापुर रोडच्या चौकात चारचौघं गाड्या स्टॅंडवर लाऊन गप्पा मारत असतात. गप्पांचा विषय असतो कि शहरात जी फ्रि वायफाय झोनची घोषणा झाली त्यात कोणते कोणते ठिकाणं प्रामुख्याने यावे. तितक्यात समोर गळक्या पाण्याच्या टॅंकरमुळे जे पाणी पसरलंय त्यावरुन दोन बाईकस्वार घसरतात.घसरु देत पण वाईट हे वाटतं कि फुकट वायफायची घोषणा होणा-या शहरात अजुनही पिण्यासाठी टॅंकर फिरताय हा प्रश्न कोणालाच पडत नाही.……..इतकं सगळं सवयीचं झालंय. 
कॅनडा कॉर्नरजवळच्या कुठल्याशा कट्ट्यावर चर्चेचा विषय असतो दिल्लीत ‘त्या’ मुलीसोबत जे झालं ते वाईट झालं. चर्चा क्रांतीकारी होते अाणि निष्कर्ष निघतो कि ‘अशा’ लोकांना भर चौकात फाशी द्यायला पाहिजे. तितक्यात कोणाचा तरी ‘व्हॉट्सएप' वाजतो. मेसेज वाचाणारा सवयीने मेसेज मध्ये अालेल्या बत्तीस सेकंदाच्या एका मादक विडीअोवर हसतो अाणि म्हणतो ये देखो कमाल. ‘भरचौकात फाशी द्यायला पहिजे’ असं म्हणा-यांचा एक ‘बॉयज् अोन्ली व्हाॅट्सएप ग्रुप’ असतो. तिथे तो मादक विडीअो पाठवला जातो. पुढे बत्तीस सेकंद सगळे मौनीबाबा त्या ग्रुपवरच गप्पा मारतात.मारु देत पण वाईट हे वाटतं कि ‘महिलांचा अादर सन्मान अाणि इच्छा’ ह्यावर दोन तास धगधगणारी ज्वाळा बत्तीस सेकंदात विझुन जाते……..इतकं सगळं सवयीचं झालंय.
खुप दिवस सोशल साईटला एकत्र फोटो टाकता अाला नाही म्हणुन खुप दिवसांनी सगळे एकत्र जमतात. गळाभेट होते. जागासेट होते. फक्त मेसेज विंडो मधुन भेटणा-यांच्या प्रत्यक्षात बदलल्या लुकची चर्चा होते. सालाबादाप्रमाणे 'सेल्फी' होतो. सेल्फी काढायच्या नादात सेल्फमध्ये डोकावणं हळुहळु कमी होतंय.होऊ द्या पण वाईट हे वाटतं कि ह्या सेल्फी लाईफस्टाईलच्या रोजनिशीत पुर्वी काहीतरी घडायचं म्हणुन सोशल नेटवर्किंगवर टाकलं जायचं. अाता काहीतरी टाकायचंय म्हणुन घडवलं जातं.……..इतकं सगळं सवयीचं झालंय.
अाताशा अशीच चिड अाली कि काय होतं? चर्चा होते. खुप चिड अाली कि मेसेजेस धाडले जातात. त्याहुन जास्त  चिड अाली कि कोणीतरी सोशलसाईटला स्टेटस टाकतो. चिड वाढली कि हॅशटॅग होतो अाणि ट्रेण्ड होतो. अजुन पराकोटीची चिड वाढली कि सगळ्यांच्या हातात मेणबत्त्या येतात. पाऊस असो उन असो सगळे मेणबत्या घेऊन चालायला लागतात एखादया स्तंभाकडे. दहा लोकांना टॅग करुन पोस्ट पडते FEELING ANGRY AT क्रांतीकारी चौक. नंतर वितळलेल्या मेणबत्तीच्या मेणावरुन पाऊसाचे अोघळ जितके अलिप्तपणे घसरतात तितके दुस-या दिवशी मेणबत्तीधारी वेगळे राहतात अाणि वाट पहातात कि परत कधी पराकोटीची चिड येईल. अशी ही चिड. ह्यात संताप किती ? अाणि ह्या संतापात रक्त खवळतं का ? कारण खवळलेल्या रक्ताने क्रांती घडते चिडचिडीने नाही.नसु देत पण वाईट ह्याचं वाटतं कि.. अाता अामचे खवळत नाही रुधिर बिधीर इत्यादी । अामच्या धमन्यांतुन वाहत अाहे गटार गढुळ इत्यादी ।। …..इतकं सगळं सवयीचं झालंय.

- प्राजक्त
मटा २८ मार्च २०१५


Monday, March 9, 2015

वि वा शिरवाडकर

तात्यासाहेब , माफ करा ! तुम्ही म्हणाल कशासाठी ? तर  तुम्हाला अशा अवेळी उठवलं म्हणुन माफ करा. काल संध्याकाळी तुमच्या जयंती निमित्त..तुमच्या काही कविता सादर केल्या.  तुमच्या जन्मदिवसाला इतर लोकांसारखाच मी ही ‘जयंती’ म्हणालो ह्याबद्दल माझी दुसरी माफी ,तात्यासाहेब. जयंतीमयंती प्रकार, असे सोहळे तुम्हाला कधी अावडले नाही हे तुमच्या कवितेतुन, वागण्यातुन तुम्ही वेळोवेळी दाखवुन दिलं. तरी ‘जयंती’ म्हटल्याशिवाय त्या व्यक्तीमधला ‘मोठेपणा' जाणवत नाही अशी खुळी समजुत भिंतीच्या कॅलेंडरने कदाचित घालुन दिली असेल. ह्या ही कारणासाठी तात्यासाहेब , माफ करा !

तुम्ही ज्या गोदेच्या काठावर रमायचे, पाय सोडुन बसायचे त्या काठावर... अाता बेबंद चालणा-या रिक्षा, 'सिग्नल अाणि समाधान फक्त मानण्यात असतो’ अशा समजुतीच्या मोटारसायकली पापक्षालन करतात. तुम्ही ज्या होळकर पुलावरुन तुम्ही फेरफटका मारत असाल अाणि पूलाच्या कठड्यावर हात टेकवुन ,रेलुन तुम्ही सुर्योदय पहात रमला असाल, कदाचित तिथेच तुम्हाला सुर्य म्हणजे काळोखावर तेजाची लेणी खोदित बसलेला देवदूत भासला असेल त्या पूलावर, तात्यासाहेब.. अाता कोणी निर्माल्य पिशव्या फेकु नये म्हणुन संरक्षक जाळ्या लावल्या अाहे. गोदामाईला गोदेकाठच्याच लोकांकडुन संरक्षणार्थ जाळ्या बसवाव्या लागाल्या म्हणुनसुद्धा तात्यासाहेब , माफ करा !

तात्यासाहेब, तुम्हाला पेच पडलेल्या ‘एकल्या जांभळ्या’ नभाचे रहस्य अाता कधीच कोणाला कळणार नाही. कारण अाताशा दिवसरात्र अाकाशात करडे-काळे ढग जमुन असतात अाणि ह्या ढगांचा अाणि पावसाचा दूर दूरपर्यंत संबंध नाही. त्या ढगांमुळे श्वासाचा त्रास होऊ लागलाय हळुहळु. तुम्ही भाईंना भेटायला पुण्याला निघणार असाल तर सीबीएस जवळ अाणि द्वारकेजवळ असा एकुण पाऊण तास बाजुला काढुन ठेवा. कदाचित तरीही पुढे बिटको चौकात तुमचा थोडा खोळंबा होईलच…. त्यासाठी तात्यासाहेब , माफ करा ! 

तात्यासाहेब, एका गोष्टीसाठी मात्र तुम्हाला अामचे कौतुक करावे लागेल कि अाम्ही तुमच्या नावाचा चौक उभारुन तुम्हाला काकादिक विष्ठांचा धनी केलं नाही. हो पण चुकून तुमच्या नावे असलेल्या ‘काव्य उद्यानाकडे’ तुमचे पाऊले वळत असतील तर थांबा,तात्यासाहेब. तिथे छंदोमयी कापलेले झाडं,वेली सापडणार नाही. हो पण करमणुकीची गटारगंगा तिथे मुक्तायन करतांना सापडेल. मुक्तछंदात सुद्धा लय असते हे काहीसं विसरलेत लोकं अाता. मुक्त अाणि बेबंद मधला फरक कळनेसा झालाय अाता तुमच्या शहराला तात्यासाहेब म्हणुन माफ करा ! 

तात्यासाहेब, गेली कित्येक दिवस मी तरणतलावामागच्या तुमच्या घरासमोरच्या फुटपाथीवर येऊन नुसता उभा राहतोय. काही बोलायाचे अाहे पण बोलणार नाही म्हणत मी माझ्या गळ्याशी दाटलेली संध्याकाळ रोज गिळुन घ्यायचो. तुम्ही म्हणाल किंवा अन्य कोणी मला म्हणेल कि ह्या सगळ्यांचा तात्यासाहेबांशी संबंध काय? पण ज्यांनी पूराने पछाडल्यावर कसं वागावं अाणि कुंभाच्या महापूरात कसं वागु नये हे शहराला सांगितलं त्याच्याकडे त्याच शहराचा लेखाजोखा गेला पाहिजे असं मनापासुन वाटलं. सगळा जीव एकवटुन अाज तुमचं लोखंडी गेट लोटलं. अात सांगितलं कि तात्यासाहेबांची खोली पहायची अाहे. त्यांनी विचारलं कुठून अालात ?  म्हणजे हा माणुस अापल्याच शहरातला नसणार ह्यावर ते ठाम होते,तात्या. मी अात अालो अाणि काचेच्या खिडकीतुन तुमचा पलंग,तुम्ही अात्ताच अात पाणी प्यायला गेला असाल असं खोटखोटं सांगणारी पलंगावरची चुरगळ, तुमची पुस्तकं, तुमचा एॅशट्रे, टिपॉयवरचा तुमचा चष्मा, तुमचा चष्मा पहिल्यावर न दिसणा-या तुमच्या नाकाजवळचे दोन खोल निशाण पण दिसले. तुमचं कॅलेंडर, तुमच्या अाधीच भिंतीवर जाऊन बसलेली अाणि तुम्ही स्वत:च्या कवितेत गुंतला तर नाही ना ह्याची  मिश्किलपणे परिक्षा घेत रद्दीवाल्याकडे कविता देऊ का? विचारणारी तुमच्या ‘ती’चा फोटा. अात स्वैपाकघरात  खुप डोकावुन पाहिलं पण चमचाचं स्टॅंड काही दिसलं नाही. खिशातला रुमाल काढुन ज्ञानपीठवरची धुळ पुसली. अंत:करणातुन हात जोडले अाणि अात पाणी प्यायला गेलेले तुम्ही इतक्यात परत बाहेर याल तेव्हा तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना माझ्याकडे उत्तरं नसतील म्हणुन लगबगीनं जायचं ठरवतोय. पण तरीही लांबुनच तुमच्या कोप-यात ठेवलेल्या काठीकडे पाहुन अाज म्हणवंस वाटलं कि तात्यासाहेब .....तात्यासाहेब , खरंच माफ करा !

- एक नाशिककर प्राजक्त 
२७ मार्च २०१५ 

अरे ब्बाप ! मी नसतं ऎकुन घेतलं.



….मग बाप्पा म्हणाला कि जा, दिल्या शब्दाला जाग अाणि मन सांगेल तसंच वाग.सगळ्यांशी नीट वाग बरं? अाणि हो, दिसेल तेच खरं.
 तुला जितकं दिसेल फक्त तितकं नाही जग , काही अडचण अाली कि माझ्याकडे ‘वर' बघ ! जा !
मग मग मी खाली अवतरलो. पांढरा कोट म्हणाला “अावाज नाही” कुजबूज झाली “ अावाज नाही - अावाज नाही”. दोन-चार फटके देत सगळे म्हणाले कि रड. मी म्हणालो "कशाला बरंय कि मन म्हणतंय जरा शांत रहावं." तरी अाग्रह झाला “रडावंच लागेल”.त्याने जोरदार फटका दिला. मी कळवळलो अाणि 'वर' पाहिलं. बाप्पा म्हणाला "अरे ब्बाप ! मी नसतं ऎकुन घेतलं” मी नेम धरुन त्याच्या तोंडावर धार मारली अाणि ट्यॅह्यॅ फोडला. त्याचा पांढरा कोट पिवळा झाला. गर्दी म्हणाली “अोहोहो ! अावाज अाला अावाज अाला.” मी म्हणालो पण मला शांत रहायचं होतं. ते म्हणाले “असं नसते रे”.
मग परत असं झालं कि ते म्हणाले “ पड , पड पालथा पड”. मी म्हणालो "बरंय कि अाभाळ दिसतं, चंद्र दिसतो, पतंग दिसते. झालंच तर पक्षी दिसतात. ते म्हणाले “असं नसतं रे”. मग कधी  डावीकडुन, कधी उजवीकडुन मला ढुसण्या दिल्या. पडलो पालथा पडलो.
मग परत असं झालं कि ते म्हणाले “ रांग, रांग. असं पोटावर जास्त झोपलं कि पोट ढप्प होतं”. मी म्हटलं “असु द्या कि बरं वाटतं जमीनीशी जोडलेलं. मातीचा गंध ही छान अाहे. ते म्हणाले “असं नसतं रे”. मग रांगु लागलो तर ते म्हणाले “किती दिवस असं हि फरफट रे जीवाची ? प्राणी चारपायांनी चालतात तसा चाल.” मग मी तसा चालु लागलो. बरं चाल्लं होतं थोडे दिवस तर परत सगळे म्हणाले “ ऊठ कि किती दिवस असं प्राण्यासारखं? “ मी म्हणालो “रमलोय हो अाता. अाणि गर्भात कुणी तरी कानात कुजबुजलं होतं एकदा “ जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणिजात." तर ते म्हणाले “असं नसतं रे”. मग मी अचानक चालु लागलो. सगळ्यांनी टाळ्या पिटल्या. तरी कुणीतरी म्हणालंच ह्याला ‘तरी ह्याला खरं पायावर उभं राहणं नाही म्हणत,बच्चू” .

मग खुळखुळा काढुन हातात पाटी अाली. मी म्हणालो “त तलवारीचा नको तराजूचा बरा वाटतो.  जर अ अननसाचा असेल, ई ईडलिंबुचा असेल तर ळ कमळाचा ,ण बाणाचा कसा ?अाणि मला अात्ताच्या अात्त ईडलिंबू प्रत्यक्ष दाखवा.” ते म्हणाले “ बाssई !!!! किती पटापटा बोलता यायला लागलय छोन्याला ! “ मी बोल्लो “ते ठिक अाहे पण उत्तर ? “ ते म्हणाले “असंच अाहे अाणि असतं अाणि असणार. ळ कमळाचा अाणि ईडलिंबु तुझा तू शोध. अाणि मुख्य म्हणजे असं नसते रे”

मग पाटी गेली. रंग अाले . मी म्हणालो “हे बघा मला ‘ह्याला’ पिवळा म्हणु द्या अाणि 'त्याला’ जांभळा. ते म्हणाले "रंगांची गल्लत करु नकोस कधीही. एका एका रंगावर , एका एका धर्माचा दावा दाखल अाहे. कुठलातरी एक रंग असु द्यावा पाठीशी” मी म्हणालो “ रंगांच्या मक्तेदारीचा दस्ताऎवज दाखवा” ते म्हणाले “असं नसतं रे”
मग पाटी गेली. बुकं अाली. मी म्हणालो “ काल मी माझा पडलो. मी माझा परिने गुरुत्वशक्तीचा शोध लावला . ते म्हणालो “ नाही ! , तू फक्त न्युटन घोक.” मी म्हणालो “ अापल्या चुकांतुन शिकावं, दुस-यांचा चुकांमधुन का ?” ते म्हणाले “असं नसतं रे”.
मग बाप्पाच्या ‘मन सांगेल तसंच वाग’ ह्याला छेद देत ते जे जे म्हणाले ते ते मला मान्य करावं लागलं. करावंच लागलं. हा समज चांगला, हा चुकीचा. हे खेळ मुलांचे , तो खेळ मुलींचा. मांजर अाडवी -मागे जा. सायन्स छान-घोकत रहा !. कवितेने पोट चारोळी इतकं भरेल-सरकारी नोकरीत अायुष्य तरेल. प्रेमबिम विषय कट-जमिनजुमला लग्नाची अट, नोकरी लागताच लग्न कधी? माप अोलांडताच पाळणा कधी ?. संवाद बोलुनच घडला पाहिजे अाणि पाळण्यात पहिला पेढाच पाहिले. जात चालू घरघर- पीठ पडतं भरभर. सगळ सरत तरी काही तरी बाकी- केसांवर चढते पांढरी चकाकी.
मग मी म्हणतो “ बिना बोलण्याचाही होता हो संवाद, गेली अाडवी-उभी मांजर कशाला उगा वाद?” ते सगळे म्हणाला "असं नसतं रे”
मग  इतक्या त्रासाने , वयाच्या थकव्याने , मर्जीने मी थांबवला श्वास तर ते म्हणाले नाही “जग जग घे श्वास. लावा वेंटीलेटर लावा” मी चिडलो अाणि ‘वर’ पाहिलं. बाप्पा म्हणाला “इतका त्रास ?अरे ब्बाप ! मी नसतं ऎकुन घेतलं.”इथली कळ बाप्पाला पोचली
मी रात्रीच वेंटीलेटरची वायर खेचली.
मी बाप्पाला म्हणालो “ बाप्पा, अाता? “
….मग बाप्पा म्हणाला कि जा, दिल्या शब्दाला जाग अाणि मन सांगेल तसंच वाग.सगळ्यांशी...…...
-प्राजक्त
२० फेब्रुवारी २०१५

मटा मैफल


अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...