Friday, April 25, 2014

गोंदी

त्यावेळी असं होतं की सगळे ऋतु जागच्या जागी होते. म्हणजे अाता सारखं पावसाळ्यात भक्कं ऊन पडायचं नाही. हिवाळ्यात पाऊसाची सर यायची नाही.उन्हाळ्यात अाता सारख्या गारा पडत नव्हत्या.( गारांवरुन बिचा-या मराठवाड्यासारख्या ठिकाणचं वाईट वाटतं. देवही काय अवलिया म्हणावा तो तिकडे एकतर गारा देतो किंवा दुष्काळ. साला पाऊस काही देत नाही.)
तर पलंगाची गादी उचलुन खालच्या कप्प्यातुन स्वेटरचे गाठोडे निघायचे. मग दुस-या दिवशी ते सगळे स्वेटर धुतलेले असायचे. अाणि दोरीवर हिवाळ्याची चाहुल वाळत घातलेली असायची. मोजुन ७ जुनला पाऊसराया हजर व्हायचा. अाणि परिक्षेची सट्टी गावाकडचे वेध उन्हाळा घेउन यायचा.त्यावेळी सगळं सुरळीत होतं.पोस्ट्या पत्र वाटायचा. खाकी पत्रात माणसं दिसायची. कोणत्याही लाल डब्ब्याच्या बसमध्ये बसलं की ती अाजोळी ,गावाकडे नेऊन घालेल असं वाटायचं. तार अाली की धडकी भरायची. अाता सारखे मिस वैगेरे कॉल्स नसायचे. असायचे तर फक्त ट्रंककॉल. मग अाजोळी गेलं की शेत हिरवंगार असायचं. कोळशाच्या बंबातुन पाणी तापायचं. पांढरीशुभ्र टुथपेस्ट अाणली असेल तरी गंमत म्हणुन अाजीची काळी दंतमंजन वापरायची. मग गोठ्यात शेळ्या-बैलं-गाई अाणि मोत्या सोबत उरलेला सबंध दिवस मावळायचा.
अशाच एका सुट्टीतली गोष्ट. जेव्हा गावी पोचलो तेव्हा वेशी वरच्या मारुतीच्या कपाळी अाठ्या असल्यागत सगळ्या लोकांच्या घोळक्यातल्या चर्चा तंग वाटल्या. अाणि घरी पोचलो तर गोठ्यातल्या शेळ्यासुद्धा कमी दिसल्या. मग जसा जसा दिवस जात गेला तसं कळालं की रात्रीचा म्हणे 'जनावर येतं'  गावात (म्हणजेच वाघं येतो) अाणि शेळ्या-बक-यांना मानगुटीला धरुन रक्त पितो. मग लोक हताशपणे दुस-या दिवशी ते मृत -अर्धवट फाडलेल्या शेळ्यांचे देह फेकुन द्यायचे अाणि नंतर रात्रीतुन ते तिथुन सुद्धा नाहीसे व्हायचे. अशी चर्चा होती की जवळच्याच जंगलातुन दोन वाघ येतात म्हणे. हे तेव्हा कळालं जेव्हा वनविभागाने एकच वाघ पकडला अाणि थोडे दिवस सर्व सुरळीत असल्याचा भास झाला अाणि पुन्हा एका अाठवड्यानंतर परत तोच खेळ सुरु झाला. रात्री सबंध घरदार अंगणात जेवतांना चर्चा रंगली की अाता काय ? उरले होते दोन शेळ्या . त्यात एक होती माझी गोंदी . म्हणजे जन्मापासुन त्या कोकराच्या कपाळावर तीन ठिपके होते.  अाजीच्या सुरकुतल्या हनुवटीवर होते तसे ठिपके. माडीवर एकदा जुने फोटो काढुन चाळत बसलो तेव्हा तरुणपणीच्या अाजीच्या हनुवटीवर दिसले . तेव्हानंतर निरखुन पाहिल्या वर एकदा सुरकुत्यांमध्ये दडलेले दिसले होते. अाणकी एक गावातलाच दोस्त होता नुकता नुकता दहावीत गेला असेल तेव्हा एकदा त्याची अावडतीची मुलगी दाखवत म्हणाला होता " ती लाल रिबीनीची पाहिली दिसतेय का ? तीच अाहे 'माझीवाली' . मी सहज विचारलं " तुझीवाली म्हणजे सगळं दोन्हीबाजुंनी पक्कं झालंय तर". तर तो म्हणतो कसा "फक्त इकडेच लागलीय रे अाग . पोचेल तिकडे पण पोचेल. तुला सांगतो तिच्या हनुवटीवरचे ते तीन गोंदलेले ठिपके म्हणजे अाकाशातला 'समर ट्रॅंगल' अाहे रे गड्या.( नंतर अंगणात झोपल्यावर त्या खगोलशास्त्री विभुतीने अकिला ,सायग्नस अाणि लायरा असे तिन तारे दाखवुन समर ट्रेंगल कशाला म्हणतात ते सांगितलं.) " 
तर ते ठिपके पण ह्या माऊलीने कसे पाहिले तर त्याचा मित्राची गिरणी होती पिठाची. तिथे मित्राच्या जागी हा उभा राहिला 'पांढरा विठ्ठल' बनुन अाणि मग ह्याने तो ट्रेंगल पाहिला.
तर असा हा गोंदलेल्या ठिपक्यांचा प्रवास मला त्या कोकराच्या कपाळी दिसला म्हणुन मी तिला नाव दिलं 'गोंदी'. पुढची रात्र गेली अाणि शेकोटी,अाग , मशालींचे प्रयत्न वाया घालवंत एक शेळी परत फस्त करुन उरली फक्त माझी गोंदी. वनविभागाचे लोक यायला एक दिवस अजुन होता अाणि अाणखी एक रात्र कशीही करुन गोंदीला कसं जगवायचं हा खल पुन्हा सुरू झाला. 
शेवटी असं ठरलं की घरासभोती खड्डा करुन सापळा राचायचा अाणि गोंदी च्या सभोती सर्व पुरुष मंडळींनी लाठ्या-काठ्या अाणि मशाली पेटवतं गोलाकारात झोपायचं म्हणजे वाघ लांबुनच निघुन जाईल. 
अाता मध्यभागी गोंदीला बांधुन ठरल्याप्रमाणे सगळे अाजुबाजुला झोपले. मी ही जरावेळ गप्पांमध्ये लहान श्रोता म्हणुन सहभागी होतो. मग अाजोबाने तीच वाघासाठीची काठी माझ्यावर उगारल्याने माझा बाहेर झोपण्यात खोडा पडला.
त्या दिवशी मला लौकरच जाग अाली अाणि अगदी सकाळी मी पहिले धावत अंगणात गेलो. दुरुन सर्व झोपलेले दिसत होते अाणि मध्ये गोंदी सुद्धा झोपलेली दिसली तेव्हा मनात हायसं वाटलं. मी घाईने सगळ्यांना उठवलं.

जवळ गेल्यावर पाहिलं तर गोंदीच्या गळ्याजवळ दात रोवलेलं नवे दोन गोंदण होतं अाणि इतक्या सराईतपणे माणसांच्या गर्दीतुन नरडीचा घोट कोणी कसा घेऊ शकतो हा अाजपर्यंतचा अामचा चर्चेचा विषय अाहे.गोंदी कायमची झोपलेली होती. - प्राजक्त (२६/४/१४ दै.सामना )    

Friday, April 18, 2014

इलियास

असं म्हणतात सरकारी कार्यालयात जास्त काही मिळत नाही .मिळालं तर रिकाम्या खुर्च्या किंवा बफाम सुदर्शनी पंखे किंवा फायलींचे गठ्ठे किंवा तुमच्या-अामच्यासारख्या अडलेल्या लोकांकडुन सहज गप्पांमधुन कालची मॅच हरल्याचे विच्छेदन किंवा ८ रू. चहा अाणि अगदीच एखादा 'कामाचा' माणुस सापडलाच (इथे कामाचा ह्या शब्दाचं महत्व अनन्यसाधारण अाहे ) तर पुढची तारीख. पण मला एकदा जिवंत अनुभव भेटला. म्हणजे अगदी गेल्या वर्षी शोले परत ३D मधे रिलिज केला होता तेव्हा माऊथ अॉर्गन ऎकत ऎकत जया भादुरी कसा एक एक कंदिल मालवते ? हे मोठ्या पडद्यावर पहाणं जिवंत अनुभव असतो किंवा चार-पाच वर्षापुर्वी मुगले अाझम अाला होता रंगीत तो तर पहिल्या सेकंदा पासुन अनुभव होता. तर हे असे जिवंत अनुभव फक्त 'अाठवण' ह्या प्रकारात मोडतात.म्हणजे ते अाठवलं की एक वातावरण अपोअाप तयार होउन जातं तसंच.
मला इलियास चच्चा भेटला. इलियास चच्चा. एका तालुक्याच्या ठिकाणी कुठल्याशा कागदपत्रासाठी गेलो तेव्हा एका बाकड्यावर पाठ टेकवुन बिडीचा सैल झालेला धागा घट्ट करत बसला होता. थोडी विचारपूस , इकडंच-तिकडंच झाल्यावर कळालं इलियास चच्चा तिथेच चपरासी म्हणुन कामाला होता. पण मग सरकारी कामं कशी बेजबाबदार अाहे ,कसे लोक पैसे खातात ,अमुक एक अधिकारीच फक्त कसा प्रामाणिक अाहे ह्या पढडीतल्या गप्पा न मारता अामचा वेगळाच प्रवास सुरू झाला. तो दिवस इलियासचा शेवटचा दिवस होता.मग तो निवृत्त होणार होता. 
इलियास चच्चा.साधीशी खाकी विजार , अातुन कोपरी अाणि बाहेरुन गर्मी मुळे अर्धा उघडा केलेला खाकी शर्ट. दाढी वैगेरे नावाला तुरळक. पायातल्या बुटाचा सोल चच्चाचं वय , अनुभव अाणि केसातल्या चांदीचं कारण सांगत होता. मला बघुन म्हणाला , " काय काम अाहे ? साहेब येतीलच बसा,विझीट ला गेलेय". इतकी अदब मी फक्त खाजगी कंपनीत पाहिली होती.मग जरा वेळाने म्हणाला , ' बेटा तुझ्या इतका एक नातु अाहे मला. म्हणजे तसे सगळे मोजले तर सगळ्या बेट्या-बेटींचे मिळुन १८ नातवंड अाहेत. रोज घरी गेलो की ' क्या लाया क्या लाया ?' चालु होतं .मग वाटतं की अल्लाह ने हफ्ता ७ दिन का क्युं बनाया अठ्ठाराह दिन का बना देता तो क्या जाता ? सब खुश होते क्युं ! " मी हसलो अाणि विचारलं कि किती दिवस झाले अाता कामावर अाहात तर म्हणाले " अब तो याद भी नही की पहले दिन कैसा लग रहा था. अाब्बा थे यहा वो गुजर गए तो त्यांचा बुट मी घालुन घेतला अाणि झालो रुजू. तिसरी पिढी अाहे अामची... तिसरी. मला अाधी वाटलंच नव्हतं की मला काम जमेल . मी अापला मटरगश्ती करणारा पोरगा. पण दंगलीत घर गेलं अाणि अम्मी-अब्बाला एकदा रडतांना पाहुन ठरवलं  की काही झालं तरी ये अांसु शेवटचे परत नाही येऊ द्यायचे. विश्वास ठेवला अाणि विश्वास ठेवणं म्हणजे काय जिना दिसत नसला तरी पहिल्या पायरी वरुन दुस-या पाय पुढे टाकणे .पुर्ण विश्वासाने. 
अंग्रेजोंके जमाने से दादा के परदादा थे चपरासी. तेव्हा असं असायचं की तहसीलदार साहेबांच्या पाच मिनीटं अाधी चालायला लागायचं. माझे परदादा दिसले की सगळे लोक रस्ता सोडायचे अाणि वाट करुन द्यायचे कारण त्यांना माहित असायचं मागुन तहसीलसाहेब येताय. " लोक वाट करुन द्यायचे म्हणतांना इलियासचा चेह-यावर उगाच अभिमानाची झलक दिसली. तितका मान अाता नाही ही खंत ही त्यात कुठेतरी असावी. 
मग म्हणाला , "पण चांगलं अाहे लोक अोळख ठेवतात. एखादा गरिब अाला की अाम्ही अामच्या परीने मदत करुन देतो.तितकंच पुण्य गाठीशी .मग पाणी प्यायला उठतांना गुढघ्यावर एका हाताने जोत देत उठतांना पुटपुटला "विठ्ठला !!!! " इलियास चच्चा अाणि "विठ्ठला !!!! " काय अजब रसायन असावं नाही !
मग परत येऊन बसता बसत म्हणाला ," हे अाताचे तहसील साहेब माझे ४९ वे साहेब अाहे. सब अच्छे ही थे. ये वाले ज्यादा अच्छे है इमानदार है. पगार लेट झाला की खिशातले देतात काढुन.खिशातुन भरलेला हात बाहेर येत नाही इथे सहसा. अाणि अाठवणीने विचारपुस करतात घरची . "
मग म्हणाला " अाज मेरा शेवटचा दिवस अाहे इथला. मग अाहेच ते १८ अाणि मी. दिनभर मस्ती" मी विचारलं , " का ? चाची कुठे ? " मग हसत म्हणाला , " है वो भी है. दिवार पर टंगी है . हंसती है मुझपर कहती है चच्चा देखो ये अाया तिनसौंवा चांदीका तार तेरे सिर पे. बहुत बुढे हो गए हो जनाब. " मग त्याने खिशातुन पाकीट काढलं अाणि त्याच्या बेगमचा फोटो दाखवला म्हणाला " ये देख ये तेरी चाची. खुदा कसम इतनी खुबसुरत अौरत मैंने कभी नही देखी थी .शायद खुदा ने भी ना देखी हो सो बुला लिया उसे . शाळेपासुनच हिच्या मागे मागे फिरायचो मी . अगदी पायाला भेगा येई पर्यंत फिरायलो तेव्हा कुठे हो म्हणाली मला. फोटो बघत म्हणाला चाची ला म्हणाला " तू थी तब पांव में थे अब तू नहीं तो.. 
यादों पे आते है छाले , बेगम"
हा सगळा अामचा संवाद चालु असतांना कुणी ना कुणी इलियासला अावाज द्यायचा अाणि इलियास कपाळावरची एकही अाठी य़ेउ न देता पटकन जाउन काम अाटोपून परतायचा अाणि अामची गाडी पुढे सरकायची.
साहेब त्या दिवशी परत अालेच नाही . शेवटी मी निघायच्या तयारीत इलियास ला म्हणालो " चलो चच्चा निघतो. कागद मिळाला असता तर चांगलं कॉलेज मिळालं असतं.जाउ द्या समजु नशिबात नव्हती ही संधी"
तेव्हा इलियास म्हणाला "संधी तेव्हाच हुकते जेव्हा तुम्ही ती घेण्याचं टाळतात."
दुस-या दिवशी गेलो.इलियास नव्हता.कागद मिळाला.अाणि संधीही.
- प्राजक्त

(सामना १९/४/१४ 
http://epaper.saamana.com/Details.aspx?id=48513&boxid=123458578 )

मिरवणुक

मिरवणुक 
......मग गजबजल्या चौकाच्या मध्यभागी एखाद्या प्रशस्त बारला लाज येईल अशी असा एक मोठ्ठा खांब थाटात उभा राहिला. मग त्या खांबावर सप्तरंगी इंद्रधनुष्याला (अाणि झालंच तर त्या इंद्राच्या बाणांना) लाज वाटेल अशा टेच्यात असंख्य रंग उधळत ते हेलॉजन दिवे लुकलुकु (किंवा झापझुप) लागले. शंभर अासुडचा मिळुन एक अावाज होईल असा विजेचा कडकडाटसुद्धा भेदरुन लपुन बसेल अशा अावाज कुठून तरी तुतारीचा अावाज अाला अाणि संपुर्ण रस्त्यावर ढाय ढाय अावाजात "मानवंदना" कम मिरवणुक सुरु झाली.  
"अरे या या , भोसले सर" डिपीला समोरुन एक गृहस्थ येतांना दिसले . चेक्सचा हाफबाही शर्ट , ढगळ पायजमा, किंचितशी दाढी, हातात छोटीशी पिशवी अाणि चेह-यावर प्रचंड अनुभवाची लकाकी. 
झापझूप करणा-या दिव्यांचा डिपीला त्रास होत होता.पण अाज संध्याकाळ पासुनच त्याला 'बंदोबस्ताच्या' नावाखाली सर्व बाड-बिस्तर अावरायला सांगितलं होतं. म्हणुन डीपी अाणि सॉक्रेटिस तिथेच लाकडी फळकुट्यावर " मिरवणुक कम मानवंदना" बघत बसले होते. सॉक्रेटिस पेंगाळला होता. परत डिपीच्या डोळ्यावरुन एक तिव्र दिव्याचा झोत झापझुप करुन गेला.अाणि भोसले सर , डिपीच्या शेजारी बसत म्हणाले " काय लेका ? कसं काय चालु ?" 
"बस सर ! चालुय अापलं .सॉरी सर अाज चहा नाही. लौकर अावरावं लागलं" डीपी वरमला.
"बरोबर अाहे , गोंधळ करण-यां रिकाम्यांमध्ये एखादा कामाशी काम ठेवणारा दिसला की त्यांना अॉव्कवर्ड होईल ना रे ! " भोसले सर खळखळुन हसत म्हणाले.
डिपी हसला नाही . मग बराच वेळ दोघांमध्ये फक्त शांतता वाहत राहिली अाणि त्या गच्च अंधारात झापझुप दिवे त्यां दोघांवरुन शांततेसोबत वाहात राहिली .
डीपी काहीतरी बोलणार तितक्यात भोसले सर म्हणाले ," कळतंय मला कळतंय. तुला काय म्हणायचंय अाणि का म्हणायचंय कळतंय. पण अाता खरंच कठिण होऊन बसलंय. प्रत्येक दिवसात अशी काहीतरी गोष्ट कळते की मी अाश्चर्यचकित होऊन जातो. अाणि दररोज बरका , द-र-रो-ज. "
पिशवी ठेऊन सरांनी दोन्ही हातांनी पायाला अाधार देऊन मांडीच घातली अाणि सांगु लागले " अाता मी शिक्षक होतो तेव्हा लोक मानायचे मला खूप. म्हणजे अाता पण रस्तायाने जातांना दहामधले सात माणसं "राम राम सर" म्हणतात नाही असं नाही. पण कसंय कि मी शिकवलेलं किती जणांनी अात्मसात केलं अाणि त्यातले किती जण वर वर राम-राम घालणारे अाहे ह्यात खुप अंतर अाहे . खरंतर माझ्या तालमीतले लोक 'चांगला माणुस बनुया' अशी खुणगाठ पक्की करुन निघतातही पण भारत शोधायला निघालेला कोलंबस अमेरिकेत पोचुन रमुन जातो तसं काहीसं होतं बघं. नाही म्हणजे भारत म्हणजे चांगला माणुस अाणि अमेरिका म्हणजे वाईट वैगेरे असं काही नाही . पण नकाशावर भारत पाहिला होता ना ? भारत डोक्यावर ठेऊन निघाला होता ना बाबा तू ? मग ? गंमत असते रे सगळी . कसंय रे शिकवण ,अात्मसात , चांगला माणुस इत्यादी इत्यादी हे अाम्हा "अोल्ड स्कूल"वाल्या शिक्षकांचे चोचले बरका. अामच्याकाळी दगडी गार भिंती गडकिल्ल्यांसारख्या शाळा अाणि चांगला मित्र घडवायचो अाम्ही बस्स. हे एकदा झाले की त्यात  'चांगला मुलगा /चांगला नागरिक/चांगला विद्यार्थी' इत्यादी सगळे कॉमन डिनोमीनॅटर अालेच . पण अाता बघुन असं वाटतं हा नंगा नाच कोणी शिकवला ? कुठून शिकले हे लोकं ? हे जे बेफामपणे नाचताय ह्यांना माहिती तरी अाहे का की कित्येकांच्या घरी दर्या रडणारी लोकं अाहे. कदाचित ह्याच नाचणा-या लोकांच्या घरातले कोणी असतील. अाम्ही घाम गाळायला शिकवला अाणि अाभाळ प्यायला शिकवलं. कदाचित अाम्ही चुकलो काहीतरी शिकवण्यात अाम्हीच. " भोसले सरांनी सुस्कारा सोडला. पुढच्याच क्षणी सरांना रस्त्याच्या पलिकडे गर्दीत कडेला हाताची घडी घालुन उभे असलेले गृहस्थ दिसले अाणि सर म्हणाले "डीपी ते बघ अामच्यासारखेच एक सर , नेकस्ट बॅच अाहे पण अोल्ड स्कुलवालेच.  डॉक्टर म्हणायचो अाम्ही त्यांना"  सरांना डॉक्टरांना अावाज देऊन शेजारी बसवायचं होतं पण गोंगाटामुळे शक्य नव्हतं. 
"अाम्ही लपल्या गेलोय त्याच जुन्या उजळणीच्या पुस्तकात.अाता कुणी बघत नाही कारण सगळ्यांना वाटतं ' हे येतं अाम्हाला'  अाणि देश छापल्या गेलाय रक्तरंजित ,निगरगट्ट वर्तमानपत्राच्या बातम्यांमध्ये. तो चुकला की नियम अाणि मी चुकलो की अपवाद हा स्वभाव झालाय. अरे गंमत म्हणजे अाजकाल 'भोसलेसरांचा विद्यार्थी अाहे' असं सांगुन कामं काढुन घेतात म्हणे लोक . गंमत म्हणजे बरेचसे लोक माझे विद्यार्थी नाही सुद्धा. उगाचच ढोंग. "
सरांचा पहाडी अावाज जरासा घोगरा झाला डिपीने त्यांना पाणी दिलं .तोंडावर पाणी मारता मारता सर म्हणाले " वाद होऊ द्या पण अाधी अापला अापल्याशीच.मग बाहेर. अाधीच बाहेर ह्याच्या-त्याच्या गच्च्यांड्या पकडुन उत्तरं कसे मिळतील."
क्षणभरासाठी गाणं संपलं . सर म्हणाले " डिपी , ते बघ त्या डॉक्टरांची परिस्थीती वेगळी नाहीए त्यांना पण तेच वाटतं जे मला .म्हणुन माझ्या सारखेच तेही ह्या गर्दीत स्वत:च्या चुकीची कारणं शोधताय" 
अाणि भोसले सरांनी अावाज दिला "डॉक्टर !! या इकडे" डॉक्टर फक्त हसले खिन्नपणे श्वास सोडुन फक्त हातानेच 'ठिक अाहे इथेच' अशी खुण करुन हाताची घडी घालुन शुन्य नजरेने सावळागोंधळ बघत राहिले. 


परत एक मोठ्ठा झोत डिपीच्या डोळ्यावरुन चमकला अाणि सॉक्रेटिसच्या हलवण्याने डिपीची तंद्री तुटली.पहाट होत अाली अाली होती अाणि समोरच सगळं नाहीसं झालेलं होतं .....मिरवणुक , ढोल-ताशे, 'नाच्चो'च्या अारोळ्या, झिंगलेले जयजयकार , पलिकडचे डॉक्टर अाणि शेजारचे भोसले सर. 
डिपीने सॉक्रेटिसला विचारलं " ते गेले ? "
"ते? कोण?" सॉक्रेटिस चमकला
"कुणी नाही.चल." डिपी  -प्राजक्त

२९ मार्च २०१४ दै.सामना  

अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...