Friday, July 18, 2014

पावसाची फॅण्टसी

दुरदुरवर फक्त कौलारु घरं , स्वत:ची सावली अापल्याच पायाशी सावलीला यावी असं माथ्यावरचं टळटळीत ऊन, अाणि ह्या राखाडी रुक्ष गराड्यात एक टंच लालकेशरी गुलमोहराचं झाडं. मागच्या जुलै-अॉगस्ट मधली गोष्ट. एका डॉक्युमेंट्रीच्या चित्रीकरणासाठी बुलढाण्याजवळच्या एका गावात गेलो होतो.रात्रीच्या विजेच्या लपंडावात निम्मी शिम्मी चार्ज झालेली बॅटरी परत चार्जींग करण्यासाठी अाम्ही ब्रेक घेतला. त्यावेळी गुलमोहराच्या झाडाखाली अाम्ही थकुन अक्षरश: मेल्यासारखे झोपलो. जरावेळाने शाळेच्या घंटेच्या अावाजाने मित्रांनी फक्त कुस बदलली पण मी डोळे किलकिले करत उठलो. मुलांचा फसफसणारा विजयोत्सव सांगत होता कि ती मधली सुट्टी होती. अगदी साध्या बसक्या चारअाठ खोल्याची शाळा, भिंतींवर भारतमाता, महाराष्ट्राचा नकाशा,पठडीतले सुविचार, बोसबाबु, गांधीबापु, डॉ अांबेडकर, शिवाजी महाराज, गाडगेबाबा इ. ठरलेली भित्तीचित्रं, मध्यभागी झेंडावंदनाची सोय,त्या भोवती गोलगोल खेळणारी मुलं, असं सगळं दृष्य. काही मुलं डबे खातं होती ,काही खेळत होती , काही मुलांची हचाबचा डबे खात कधी उँडारायला जातो अशी घाई दिसत होती. एका ठिकाणी अाभाळाला खोड अाणि पानं फुटावे असे पिंपळाचे झाड होते. त्या खाली दोन-तीन मुलं मला चक्क अभ्यास करतांना दिसली. मधल्यासुट्टीत अभ्यास करणारी मुलं अाणि गर्द झाडाखालची गच्च सावलीचा अानंद घेण्यासाठी मी तिथे गेलो. तिथं कळालं कि मास्तरांनी गृहपाठ म्हणुन निबंध लिहुन अाणायला लावला होता अाणि ह्या तीन बहाद्दरांनी काल शाळेला सुट्टी मारली होती म्हणुन अंगठे धरण्यापेक्षा ही मुलं मधलीसुट्टी सत्कार्णी लावतं होती. त्यातल्या एकाने वहीत पेन्सील टाकुन टपकन उडी मारली अाणि " झाsssलं ! म्हणत तो खेळण्यासाठी धावत सुटला अाणि जातांना बोंबलत गेला. "पंक्या, माझ्या वहीकडं लक्ष ठेव बेsss !  अालोच एक लिंगोरच्या हाणुन!" मी हळुच वही उघडुन त्याचा निबंध वाचायला सुरवात केली.
"माझा अावडता ऋतू"
शाळेत शिकवत जरी असले तरी जन्माला अाल्यापासुन मी कधी तीन ऋतू पाहिले नाही. अामच्या विदर्भाकडं फक्त उन्हाळा असतो. अाणि हिवाळ्यात रात्रीपुरता गारवा असतो. बाकी भुगोलात शिकवलेलं खरं असंल तर पावसाळा हा माझा सगळ्यात अावडता ऋतू असु शकतो. पावसात उभं राहिलं कि म्हणे अंगावरुन थेंब निथळतात. दिन्या,पंक्या अाम्ही पकडा-पकडी खेळुन दमलो की घामाच्या धारा लागतात अाणि अंगावरुन जमीनीवर थेंब निथळतात तेव्हा अाम्ही "पाउस अाला,पाउस अाला" असं म्हणतो. तेव्हा खुप मजा येते म्हणुन मला पावसाळा अावडतं असावा. माझ्यामध्ये कधी कधी जादु अाहे असं वाटतं,कारण माझ्या घामाचा थेंब जमिनीवर पडल्यावर तसाच वाफ होऊन गायब होतो जसा अाईचा गरम तव्यावरचा पाण्याचा शिपकारा गायब होतो. पावसात म्हणे सगळीकडे हिरवं हिरवं होतं. मी एकदा चित्रकलेच्या तासाला तसं चित्र पण काढुन पाहिलं. अामच्या कडे जे तेलकट खडु अाहे त्यात पांढरा अाणि हिरवा खडु कशाला अाहे हे मला अाज पर्यंत कळालंच नाहीए. म्हणुन मी मित्रांचे पण हिरवे खडु घेऊन सगळीकडे हिरवळ दाखवली.पण पोरं खुप हसले म्हणाले 'असं हिरवं कधी असतं का?' म्हणुन मी ते चित्र माझ्या उशीच्या खोळात लपवुन ठेवलं अाहे.मला ते चित्र अावडतं, म्हणुन मला पावसाळा अावडतं असावा. अामच्या इथं एक किराणा दुकानदार दर जून मधे रंगीत छत्र्या विकायला अाणतो. त्या दुकानदाराला अाम्ही नेहमी "सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का?" असं चिडवतो. तो खुप चिडतो अाणि दगडं घेऊन  अामच्या मागे लागतो. तेव्हा पंक्या हळुच बरणीतुन चार-पाच खोब-या गोळ्या काढतो. फुकटच्या खोब-या गोळ्या जास्त गोड का लागतात माहित नाही पण अाम्हाला त्या खुप अावडतात. हे फक्त ह्याच ऋतुत घडतं म्हणुन मला पावसाळा अावडत असावा. 
अाप्पा म्हणतात त्यांच्या लहानपणी पाऊस यायचा तेव्हा ते खालच्या मळ्यात सायकलीवरुन रपेट मारायचे अाणि गार वारा अंगाला झोंबायचा. मी पण कधीकधी गुपचूप थोडं पाणी डोक्यावर अोतुन सायकलीची रपेट मारतो. मग नुकत्याच अोसरलेल्या पावसातुन फिरल्यासारखं वाटतं अाणि लहानपणीचा अाप्पा झाल्याचा भास होतो. मला अाप्पा अावडतात,म्हणुन कदाचित मला पावसाळा अावडत असावा.
जून मध्ये पाऊसाची सुरवात होते असं पुस्तकात लिहलं अाहे. पण अामच्याकडे जून मध्ये साथीचा रोग येतो.त्या रोगाला काय म्हणतात माहित नाही पण लोक इकडे तिकडे फोन करुन "अाला का?" "कुठवर अाला?" "ह्या वेळेला असावा हो ना?" , "थोडथिडका का होईना पण अाहेच " असं बरळायला लागतात. काही लोक तर मुर्खासारखा पैसा खर्च करुन कौलाच्या अाणि घराच्या फटी पक्क्या सिमेंटने बुजवतात. ह्या साथीच्या रोगामुळे दरवर्षी ह्याच ऋतुत खुप लोकं मरतात. सुरेखाचा बाबा असाच साथीच्या रोगामुळे मेला. पण सकाळी त्याला म्हणे झाडावरुन खाली उतरवला असं कळालं. इतकं अाजारी असतांना झाडावर जाऊच नये असं मला तरी वाटतं. ह्या साथीचं रोगाच एक सोडलं तर बाकी नावं ठेवण्यासारखं काही नाही.म्हणुन मला असं वाटतं कि मला बहुतेक पावसाळा हा ऋतु अावडत असावा.
                                                                     जय हिंद. 

- प्राजक्त 












Friday, July 11, 2014

दोष

“सगळाच दोष कृष्णावर कसा टाकायचा ना ? काही गोष्टी घडायच्या थोडीच टळतात. अाणि खरंतर सगळे म्हणतात कि तो देव अाहे म्हणजे कृष्णाला म्हणे सगळं जमतं त्याला दरी ही होता येतं अाणि उंच टोकावरचं अाभाळ सुद्धा , त्याला परकाया प्रवेश ही जमतो अाणि अदृश्य होणंही जमतं. , त्याला सातासमुद्रापलीकडंच जिथल्या तिथं बसुन कळतं , त्याला भविष्यही दिसतं , विश्व व्यापुनही श्रीशिल्लक उरणारा असा अाहे तो. पण असं असतं तर त्या दिवशी यमुनेवर सोबत जातांना त्याला लागलेली ठेच कशी चुकवता नाही अाली ? तो दगड कसा नाही दिसला ? सातासमुद्रापलीकडंच दिसणा-याला सातव्या वळणावरच दिसु नये ? मी त्याची बासरी गुलमोहराच्या उत्तरेकडच्या वडाच्या ढोलीत लपवली अाहे हे कळायला त्याला शोधाशोध का करावी लागली ? कसंय कि एखाद्याला सगळ्यांनीच धीट म्हटल्यावर थोडासा निधडं व्हावं लागतं तसं झालं असेल त्याचं.
कारण स्वत:च स्वत:ला विचारुन-विचारुन थकलेल्या कृष्णाला मी अगतिक होऊन कुशीत रडतांना पाहिलंय. तो खेळिया असेलही पण डबडबत त्याच्या गालांवरुन अोघळणा-या पाण्याची चव मला खेळवु नाही शकत.कारण कुणी रोपटं जमीनीत लावुन 'इथं पुर्वीपासुन कशी हिरवळ अाहे' असं सांगुन फसवु शकतं पण त्याच्याच खोलात गेलं तर सगळं खरं-खोटं कळेल, कारण तुम्ही वरचेवर रोपटं लावु शकतात पण रोपट्याची मुळं कुणी खोलवर पसरवु नाही शकतं.म्हणुनच कान्हा जगाला फसवु शकतो मला नाही. देव केल्यावर देवागत वागावं लागतं म्हणुन त्याला मला सोडुन जावं लागलं असेल.
तो मला एकदा म्हणालाही होता "लोक मला असामान्य म्हणतात. मी आज तुला सांगतो मी आहे असामान्य. म्हणजे अतिसामान्य आहे मी.
रंगांमधला फक्त मुळ रंग मला माहित अाहे.लाल किंवा पिवळ. मला तितकंच होता येतं. अधला मधला नारिंगी रंग मला कळत नाही. मनुष्याच्या स्वभावगुणाचे सर्वात शुद्ध स्वरुप माझ्याठायी आहे. म्हणजे थोडा आनंदी, काहीसा ख़ुश होणं नाही असे मिश्रण मला कळत नाही. मी होतो फक्त आनंदी ज़रा वाईट वाटणं काय असतं मला ठाऊक नाही मी होतो फक्त दु:खी. सगळ्यात शुद्ध स्वरुप असलेला स्वभाव. एखादी व्यक्ती चांगली वाटणं म्हणजे माझ्यालेखी फक्त प्रेम.निखालस प्रेम. " ज्यांना दिवस सोबत नेत नाही आणि रात्र  सोबत देत नाही अशांची संध्याकाळ होतो कृष्ण.मग संध्येकडे कुणी वेळचं बंधन घालतं का?
प्रत्येक येणा-या लाटेचं परतणं येण्याआधीच ठरलेलं असतं पण म्हणुन किना-यावरच्या  रेतीनं भिजणं थांबवावं का? मग सगळाच दोष कृष्णावर कसा टाकायचा ना ?

परकाया प्रवेश जमणा-या कृष्णाची प्रत्येक रात्र अशी 'राधा होऊन' स्वत:ची समजुन घातल्यागत खिडकीशी वितळत रहायची अाणि सकाळी रुक्मीणी कृष्णाला म्हणायची "हल्ली झोप वाढलीय तुझी , डोळे बघ किती लाल झालेत"

- प्राजक्त
दै सामना १२ जुलै २०१४




http://216.15.199.42/dainiksaamana/Details.aspx?id=51137&boxid=23019625 )

Friday, July 4, 2014

सावली

निसर्गाने झोपडपलं अाणि राजाने दुर लोटलं तर कुठं जायचं ? हा प्रश्न त्यावेळेस प्रजेला नव्हता. तात्यासाहेब ह्यांचा शब्द प्रमाण होता. कोणत्याही सरकारी पदावर नसतांना केवळ कर्ण म्हणुन पदरचं देत देत त्यांचा अादरयुक्त दरारा सगळीकडे झाला होता. एखाद्याचं काम करुन दिल्यानंतर जर त्याने अाग्रहाने काही देऊ केलं तर तात्यासाहेब नाकारात अाणि म्हणायचे " उपकार नाही केले मी , ह्याचा मोबदलाही मी घेईन. योग्यवेळी , तुला झेपेल इतका मोबदला मागेल तेव्हा वेळेवर फिरु नकोस इतकंच." मग एखाद्या दुस-या गरजुला परस्पर ह्याचा पत्ता देउन त्याची गरज भागेल असं काम करवुन घेतलं कि साटंलोटं होऊन जायचं.
एकदा डोळ्यादेखत एक गाडी बस स्थानकावर जाऊन अादळली तेव्हा तिथे फक्त बाहेरगावाहुन उदरनिर्वाह करायला अालेलं एक कुटूंब होतं.दत्ता अाणि त्याची बायको अाणि त्यांचा कमरेइतका पोरगा अाणि दोन बोचके बस्स इतकाच संसार. तेव्हा तात्यासाहेबांनी त्या कुटूंबाचा ब्रम्हासारखा सांभाळ केला. अाणि दत्ताने त्याचे सगळे अायुष्य तात्यासाहेबांची सावली म्हणुन जगायला सुरुवात केली. उन्हापावसात नको नको म्हणत असतांना छत्री , पाण्याची बाटली अाणि अगदी जंग जंग पछाडुन,लायसन मिळवुन तात्यांसाहेबांच्या सुरक्षेसाठी मागे खोचलेली पिस्तुल. असा लवाजमा जवळ बाळगत, प्रसंगी तात्यासाहेबांच्या तापट स्वभावाच्या

लाखोल्या खाल्या पण दत्ताने कधी तात्यांची सावली होणं थांबवलं नाही. कधी धुळीमुळे त्यांना खोकला अाला , कधी चुकून ठेच लागली तरी दत्ताला अपराध्यासारखं वाटायचं. त्याच्या मते हवेने जरी तात्यांचा भांग विस्कटला तरी त्याची जबाबदारी त्याची होती. एक नक्की की तात्यांचा भार डोक्यावरुन खांद्यावर अाला होता. छोट्या छोट्या गोष्टी अाता दत्ताच बघुन घेतसे. दत्ता अाला कि सगळ्यांना ठाऊक होतं कि अाता दहाव्या मिनीटाला तात्यासाहेब येणार. तात्यांना नेहमी दत्ताची मस्करी करायची लहर असायची. ते म्हणायचे " तुझं नाव दत्ता नाही सांब पाहिजे होतं. इतकं कुणी सरळ असतं का रे ?" ते त्याला कधी दत्ता नावाने हाक मारत नसे. कधी गुरुदेव तर कधी गुरुजी . कोणत्याही देवाचे नाव असलेल्या व्यक्तीला त्यांनी एकेरी हाक मारली नव्हती. त्यांच्या मते मुळात देवाची नावं मुलांना ठेउच नये. उगाच चिडचिड झाली तर मुलांसोबत देवाचाही उद्धार होतो. म्हणुन द्न्यानेश्वर नाव असेल तर माऊली , विठ्ठल असेल तर देवा , गजानन असेल तर पितांबर , लक्ष्मी असेल तर अाई , अशी टोपणनावं ठरलेली होती. तात्यांकडे येणार माणुस त्याचं शिक्षण, हुशारी ,जात, अोळख सगळं बाजुला ठेऊन येतसे. गरजवंताला तात्यांनी कधी मोकळ्या हाताने माघारी पाठवल्याच दत्ताने पाहिलं नाही. सगळ्यांना पंखाखाली घेणार अाभाळ काही काळाने जरा थकलं अाणि भुरकट भुरकट झालं. केसात अाता चांदी चमकु लागली अाणि दत्ताच्या खिशात तातडीला लागतील अशा अौषधांचा भार वाढला. एकदा भर उन्हात छत्री खाली बसलेल्या तात्यांनी दत्ताला सांगितलं " जा पलीकडुन एक ग्लास लिंबु सरबत घेउन ये" दत्ता दुस-या क्षणाला रस्त्याच्या पलिकडे अाणि चौथ्या क्षणाला ग्लास घेऊन हजर झाला. तात्या म्हणाले "हां अाता पिऊन घे. बराच वेळ झालाय तुला उन्हात उभ्या उभ्याने." असे अजब रसायन असलेले तात्या अाता अंथरुणाला खिळले तेव्हा जत्रेसारखी गर्दी त्यांच्या घराबाहेर उभी रहात. दररोजचा नित्यक्रम म्हणुन तात्या पुर्वी जसे बाल्कनीमधुन सगळ्यांना अभिवादन करत तो नित्यक्रम अाता बंद झाला. तात्यासाहेब नसलेला दत्ता अाणि दत्ताशिवाय तात्यासाहेब हे गेले कितेक दिवसात दिसलं नव्हतं अाणि कुणाच्या डोक्यात तसा विचारही नव्हता. अाता तात्यांसाहेब हेच जग असलेली भोवतीची अवघी दुनिया श्वास रोखुन ,देव पाण्यात ठेउन बसली होती. घराला इस्पितळाचं रुप अालं होतं अाणि घराबाहेर छावणीचं. शेवटी निसर्ग नियमाप्रमाणे तात्यांसाहेबांनी निरोप घेतला. अाणि सगळ्यांना पंखाखाली घेणारे पंख अाभाळात नाहिसे झाले.
दत्ताने खिडकीतुन बाहेर पाहिलं तर वरुन रस्ता दिसतच नव्हता जिथे नजर जाईल तिथे फक्त डोकीच डोकी. तोबा गर्दी. अंत्ययात्रा निघाली. सवयी प्रमाणे दत्ता छत्री घेऊन त्यांच्या डोक्याशीच होता. दोन दिवस अंत्यदर्शन चाललं. सामाजिक,राजकिय अाणि सांस्कृतिक दबदबा असलेले तात्यासाहेब ह्या लोकांसाठी देव होते.
तात्यांसाहेबांना जेव्हा अंत्यविधीसाठी सरणावर ठेवलं तेव्हा तात्यासाहेबांपेक्षा दत्ता जास्त मृत वाटत होता. अखेरीस जेव्हा तडतडत्या अावाजात सरणाने पेट घेतला त्यानंतर गर्दीतुन दत्ता कायमचा नाहीसा झाला. दुस-या दिवशी काही लोकांनी शोध सुरु केला तेव्हा घरामागच्या पटांगणावर तात्यासाहेबांच्या नेहमीच्या बसायच्या ठिकाणी जिथे लोक भेटायला यायचे तिथे एक उपडी छत्री पडलेली सापडली. ऎन मध्यान्ह होती अाणि सुर्य अगदी माथ्यावरच असल्याने तिथे शोधत येणा-यांची सुद्धा अाणि पडलेल्या छत्रीचीसुद्धा सावली कुठेच नव्हती.    - प्राजक्त दै सामना ५ जुलै १४
http://216.15.199.42/dainiksaamana/Details.aspx?id=50918&boxid=233320250 )

अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...