Friday, July 11, 2014

दोष

“सगळाच दोष कृष्णावर कसा टाकायचा ना ? काही गोष्टी घडायच्या थोडीच टळतात. अाणि खरंतर सगळे म्हणतात कि तो देव अाहे म्हणजे कृष्णाला म्हणे सगळं जमतं त्याला दरी ही होता येतं अाणि उंच टोकावरचं अाभाळ सुद्धा , त्याला परकाया प्रवेश ही जमतो अाणि अदृश्य होणंही जमतं. , त्याला सातासमुद्रापलीकडंच जिथल्या तिथं बसुन कळतं , त्याला भविष्यही दिसतं , विश्व व्यापुनही श्रीशिल्लक उरणारा असा अाहे तो. पण असं असतं तर त्या दिवशी यमुनेवर सोबत जातांना त्याला लागलेली ठेच कशी चुकवता नाही अाली ? तो दगड कसा नाही दिसला ? सातासमुद्रापलीकडंच दिसणा-याला सातव्या वळणावरच दिसु नये ? मी त्याची बासरी गुलमोहराच्या उत्तरेकडच्या वडाच्या ढोलीत लपवली अाहे हे कळायला त्याला शोधाशोध का करावी लागली ? कसंय कि एखाद्याला सगळ्यांनीच धीट म्हटल्यावर थोडासा निधडं व्हावं लागतं तसं झालं असेल त्याचं.
कारण स्वत:च स्वत:ला विचारुन-विचारुन थकलेल्या कृष्णाला मी अगतिक होऊन कुशीत रडतांना पाहिलंय. तो खेळिया असेलही पण डबडबत त्याच्या गालांवरुन अोघळणा-या पाण्याची चव मला खेळवु नाही शकत.कारण कुणी रोपटं जमीनीत लावुन 'इथं पुर्वीपासुन कशी हिरवळ अाहे' असं सांगुन फसवु शकतं पण त्याच्याच खोलात गेलं तर सगळं खरं-खोटं कळेल, कारण तुम्ही वरचेवर रोपटं लावु शकतात पण रोपट्याची मुळं कुणी खोलवर पसरवु नाही शकतं.म्हणुनच कान्हा जगाला फसवु शकतो मला नाही. देव केल्यावर देवागत वागावं लागतं म्हणुन त्याला मला सोडुन जावं लागलं असेल.
तो मला एकदा म्हणालाही होता "लोक मला असामान्य म्हणतात. मी आज तुला सांगतो मी आहे असामान्य. म्हणजे अतिसामान्य आहे मी.
रंगांमधला फक्त मुळ रंग मला माहित अाहे.लाल किंवा पिवळ. मला तितकंच होता येतं. अधला मधला नारिंगी रंग मला कळत नाही. मनुष्याच्या स्वभावगुणाचे सर्वात शुद्ध स्वरुप माझ्याठायी आहे. म्हणजे थोडा आनंदी, काहीसा ख़ुश होणं नाही असे मिश्रण मला कळत नाही. मी होतो फक्त आनंदी ज़रा वाईट वाटणं काय असतं मला ठाऊक नाही मी होतो फक्त दु:खी. सगळ्यात शुद्ध स्वरुप असलेला स्वभाव. एखादी व्यक्ती चांगली वाटणं म्हणजे माझ्यालेखी फक्त प्रेम.निखालस प्रेम. " ज्यांना दिवस सोबत नेत नाही आणि रात्र  सोबत देत नाही अशांची संध्याकाळ होतो कृष्ण.मग संध्येकडे कुणी वेळचं बंधन घालतं का?
प्रत्येक येणा-या लाटेचं परतणं येण्याआधीच ठरलेलं असतं पण म्हणुन किना-यावरच्या  रेतीनं भिजणं थांबवावं का? मग सगळाच दोष कृष्णावर कसा टाकायचा ना ?

परकाया प्रवेश जमणा-या कृष्णाची प्रत्येक रात्र अशी 'राधा होऊन' स्वत:ची समजुन घातल्यागत खिडकीशी वितळत रहायची अाणि सकाळी रुक्मीणी कृष्णाला म्हणायची "हल्ली झोप वाढलीय तुझी , डोळे बघ किती लाल झालेत"

- प्राजक्त
दै सामना १२ जुलै २०१४




http://216.15.199.42/dainiksaamana/Details.aspx?id=51137&boxid=23019625 )

1 comment:

अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...