Friday, July 4, 2014

सावली

निसर्गाने झोपडपलं अाणि राजाने दुर लोटलं तर कुठं जायचं ? हा प्रश्न त्यावेळेस प्रजेला नव्हता. तात्यासाहेब ह्यांचा शब्द प्रमाण होता. कोणत्याही सरकारी पदावर नसतांना केवळ कर्ण म्हणुन पदरचं देत देत त्यांचा अादरयुक्त दरारा सगळीकडे झाला होता. एखाद्याचं काम करुन दिल्यानंतर जर त्याने अाग्रहाने काही देऊ केलं तर तात्यासाहेब नाकारात अाणि म्हणायचे " उपकार नाही केले मी , ह्याचा मोबदलाही मी घेईन. योग्यवेळी , तुला झेपेल इतका मोबदला मागेल तेव्हा वेळेवर फिरु नकोस इतकंच." मग एखाद्या दुस-या गरजुला परस्पर ह्याचा पत्ता देउन त्याची गरज भागेल असं काम करवुन घेतलं कि साटंलोटं होऊन जायचं.
एकदा डोळ्यादेखत एक गाडी बस स्थानकावर जाऊन अादळली तेव्हा तिथे फक्त बाहेरगावाहुन उदरनिर्वाह करायला अालेलं एक कुटूंब होतं.दत्ता अाणि त्याची बायको अाणि त्यांचा कमरेइतका पोरगा अाणि दोन बोचके बस्स इतकाच संसार. तेव्हा तात्यासाहेबांनी त्या कुटूंबाचा ब्रम्हासारखा सांभाळ केला. अाणि दत्ताने त्याचे सगळे अायुष्य तात्यासाहेबांची सावली म्हणुन जगायला सुरुवात केली. उन्हापावसात नको नको म्हणत असतांना छत्री , पाण्याची बाटली अाणि अगदी जंग जंग पछाडुन,लायसन मिळवुन तात्यांसाहेबांच्या सुरक्षेसाठी मागे खोचलेली पिस्तुल. असा लवाजमा जवळ बाळगत, प्रसंगी तात्यासाहेबांच्या तापट स्वभावाच्या

लाखोल्या खाल्या पण दत्ताने कधी तात्यांची सावली होणं थांबवलं नाही. कधी धुळीमुळे त्यांना खोकला अाला , कधी चुकून ठेच लागली तरी दत्ताला अपराध्यासारखं वाटायचं. त्याच्या मते हवेने जरी तात्यांचा भांग विस्कटला तरी त्याची जबाबदारी त्याची होती. एक नक्की की तात्यांचा भार डोक्यावरुन खांद्यावर अाला होता. छोट्या छोट्या गोष्टी अाता दत्ताच बघुन घेतसे. दत्ता अाला कि सगळ्यांना ठाऊक होतं कि अाता दहाव्या मिनीटाला तात्यासाहेब येणार. तात्यांना नेहमी दत्ताची मस्करी करायची लहर असायची. ते म्हणायचे " तुझं नाव दत्ता नाही सांब पाहिजे होतं. इतकं कुणी सरळ असतं का रे ?" ते त्याला कधी दत्ता नावाने हाक मारत नसे. कधी गुरुदेव तर कधी गुरुजी . कोणत्याही देवाचे नाव असलेल्या व्यक्तीला त्यांनी एकेरी हाक मारली नव्हती. त्यांच्या मते मुळात देवाची नावं मुलांना ठेउच नये. उगाच चिडचिड झाली तर मुलांसोबत देवाचाही उद्धार होतो. म्हणुन द्न्यानेश्वर नाव असेल तर माऊली , विठ्ठल असेल तर देवा , गजानन असेल तर पितांबर , लक्ष्मी असेल तर अाई , अशी टोपणनावं ठरलेली होती. तात्यांकडे येणार माणुस त्याचं शिक्षण, हुशारी ,जात, अोळख सगळं बाजुला ठेऊन येतसे. गरजवंताला तात्यांनी कधी मोकळ्या हाताने माघारी पाठवल्याच दत्ताने पाहिलं नाही. सगळ्यांना पंखाखाली घेणार अाभाळ काही काळाने जरा थकलं अाणि भुरकट भुरकट झालं. केसात अाता चांदी चमकु लागली अाणि दत्ताच्या खिशात तातडीला लागतील अशा अौषधांचा भार वाढला. एकदा भर उन्हात छत्री खाली बसलेल्या तात्यांनी दत्ताला सांगितलं " जा पलीकडुन एक ग्लास लिंबु सरबत घेउन ये" दत्ता दुस-या क्षणाला रस्त्याच्या पलिकडे अाणि चौथ्या क्षणाला ग्लास घेऊन हजर झाला. तात्या म्हणाले "हां अाता पिऊन घे. बराच वेळ झालाय तुला उन्हात उभ्या उभ्याने." असे अजब रसायन असलेले तात्या अाता अंथरुणाला खिळले तेव्हा जत्रेसारखी गर्दी त्यांच्या घराबाहेर उभी रहात. दररोजचा नित्यक्रम म्हणुन तात्या पुर्वी जसे बाल्कनीमधुन सगळ्यांना अभिवादन करत तो नित्यक्रम अाता बंद झाला. तात्यासाहेब नसलेला दत्ता अाणि दत्ताशिवाय तात्यासाहेब हे गेले कितेक दिवसात दिसलं नव्हतं अाणि कुणाच्या डोक्यात तसा विचारही नव्हता. अाता तात्यांसाहेब हेच जग असलेली भोवतीची अवघी दुनिया श्वास रोखुन ,देव पाण्यात ठेउन बसली होती. घराला इस्पितळाचं रुप अालं होतं अाणि घराबाहेर छावणीचं. शेवटी निसर्ग नियमाप्रमाणे तात्यांसाहेबांनी निरोप घेतला. अाणि सगळ्यांना पंखाखाली घेणारे पंख अाभाळात नाहिसे झाले.
दत्ताने खिडकीतुन बाहेर पाहिलं तर वरुन रस्ता दिसतच नव्हता जिथे नजर जाईल तिथे फक्त डोकीच डोकी. तोबा गर्दी. अंत्ययात्रा निघाली. सवयी प्रमाणे दत्ता छत्री घेऊन त्यांच्या डोक्याशीच होता. दोन दिवस अंत्यदर्शन चाललं. सामाजिक,राजकिय अाणि सांस्कृतिक दबदबा असलेले तात्यासाहेब ह्या लोकांसाठी देव होते.
तात्यांसाहेबांना जेव्हा अंत्यविधीसाठी सरणावर ठेवलं तेव्हा तात्यासाहेबांपेक्षा दत्ता जास्त मृत वाटत होता. अखेरीस जेव्हा तडतडत्या अावाजात सरणाने पेट घेतला त्यानंतर गर्दीतुन दत्ता कायमचा नाहीसा झाला. दुस-या दिवशी काही लोकांनी शोध सुरु केला तेव्हा घरामागच्या पटांगणावर तात्यासाहेबांच्या नेहमीच्या बसायच्या ठिकाणी जिथे लोक भेटायला यायचे तिथे एक उपडी छत्री पडलेली सापडली. ऎन मध्यान्ह होती अाणि सुर्य अगदी माथ्यावरच असल्याने तिथे शोधत येणा-यांची सुद्धा अाणि पडलेल्या छत्रीचीसुद्धा सावली कुठेच नव्हती.    - प्राजक्त दै सामना ५ जुलै १४
http://216.15.199.42/dainiksaamana/Details.aspx?id=50918&boxid=233320250 )

No comments:

Post a Comment

अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...