“धुक्यात गोठलेलं गाव. टेकडी चढुन पलीकडे उतरलं कि पोस्टअॉफिस लागायचं. कौलारु पोस्टअॉफिस. लाकडी कुंपण ,मातीमधे गचके खात खात उघडबंद होणारं लाकडी बसकं गेट, गर्द वडाच्या सावलीत कुशीवर रेलुन बसलेलं पोस्ट अॉफिस. टेकडीवरचं ते वडाचं झाड पण फकिरासारखं… टेकडीच्या टोकाशी पाय सोडुन बसलेलं. अाठवड्यातुन एकदा भल्या पहाटे कुणीतरी येऊन पोस्ट अॉफिसचं अंगण शेणाने सारवुन घ्यायचं. अाताशा फोन मेलच्या जमान्यात कोण कशाला पोस्टाकडे वळतो. पण डोंगरद-यात , गर्द जंगलाच्या वस्तीत अजुन सुर्य न पाहिलेली माती अाहे तिथे फोनमेलीच्या गोष्टी कशाला करतो,बाप्पा?“ हे एेकुन असं वाटलं हातातली सगळी कामं सोडावी अाणि बाबांना घेऊन थेट त्यांचं ते ‘धुक्यात गोठलेलं गाव’ गाठावं.
बाबा बोलत होता “पुर्वी प्रत्येक पोस्टाबाहेर एक माणुस चारअाठ अाण्याला पत्र वाचुन पण द्यायचे अाणि अापण सांगु ते उत्तर लिहुन पण द्यायचे. अाता सगळं गेलं. मला एवढं पत्र लिहुन देतो का ? अाणि एवढं वाचुन पण दाखव ” बॅंकेत ‘पेन अाहे का’ विचारणारे भेटतात तसे पोस्टात ‘पत्र लिहुन देता का’ भेटतील याची मला कल्पना नव्हती. पण हा मात्र अपवाद होता हे मला नंतर नंतर जशी वेळ कलंडायला लागली तसं कळायला लागलं.
मी विचारलं “ पत्र ?”
बाबा म्हणाला “बायकोचं अाहे. खाजगी काही नसतं ह्या वयात वाचा. वाचा. ”
तिथेच अावारात निंबाच्या झाडाखाली अाम्ही दोघं सावलीला कठड्यावर बसलो. मध्येमध्ये पिवळी सुकलेली निंबाची पानं फेर धरुन गरगरत खाली पडत होती. अाजुबाजुला तुरळक ये-जा करणा-यांची गर्दी होती. अजुनही इतके लोक पोस्टात येतात हेच माझ्यासाठी नवल होतं. मी कसलंस कुरिअर अालं म्हणुन मी तिथे गेलो होतो. बाबांनी चुरगळलेलं पत्र माझ्या पुढ्यात ठेवलं. कदाचित येऊन चारदोन दिवस झाले असतील पण वाचुन दिलं नसेल. किंवा असं म्हणुन बाबांचीच हिम्मत नसेल झाली पत्र लिहुन घ्यायची.(दुस-याला दोष देणं सोपं असतं) पत्राची सुरवातच वेगळी होती.
“
अहो, काय ? चमकलात ना ? मी पण काय वेंधळी अाहे ना. हां सनविवि, पत्रास कारण कि... हां अाता सांगा चमकलात ना ? मी कसं लिहलं पत्र? ते सांगेन सावकाश. अाधी महत्वाचं सगळं बोलुन घेऊ दे,नाहीतर विसरायला होतं. पुढच्या महिन्यात गावात वीज येणार अाहे म्हणे. तशी ती तुम्ही गेल्यापासुनच येणार होती पण अाता खरंच येते कि काय अशा चर्चा चालु झाल्यात. येऊ दे बाप्पा,मला भुरकीला काय? गडप अंधार भुरकट दिसलं इतकंच. परवा वेंधळेपणातुन धक्का लागला अाणि काच फुटली खिडकीची.. यंदा किराणवाल्याची चिंता करु नका. तुम्ही येऊस्तोवर काही पैसे मागायचा नाही. कारण मागच्या अाठवड्यात थोडे दिलेत मी पैसे. ते कसला कार्यक्रम होता काय कि म्हणुन काही लोकांनी टोपल्या बनवुन नेल्या. कसला तरी सरकारी कार्यक्रम होता म्हणे म्हणुन जरा जास्तच टोपल्या बनवाव्या लागल्या. त्याचे अाले थोडे पैसे काळजी करु नका . तेवढ्या वेताच्या काड्या होत्या घरात अाधीपासुन....अाप्पा बिचारा देतो गुमान सगळं अाणुन . कधी कंटाळा करत नाही. माझं मेलीच लक्षच नसतं परवा वेंधळेपणातुन धक्का लागला अाणि काच फुटली खिडकीची. पुर्वी रेडिअोतले गाणे पुढे असायचे अाणि खरखर मागे चालु असायची. अाता खरखर पुढं अाणि मागं अंधुक गाणं चालु असतं. इकडे अाले कि तेवढं पाहुन घ्या त्याला. अापलं लेकरु सापडलं का ? दरवेळेस हा प्रश्न विचारणार नाही ,विचारणार नाही असं मनाला बजबजावुन ठेवते. पण माया ,इच्छेसाठी टक लावुन बसलेल्या ता-यासारखी तुटता तुटत नाही बघा. इतक्या मोठ्या शहरात कसा सापडेल, कधी सापडेल? पण सापडेल. होऊ दे नऊ वर्ष झाली तर दहाव्यात सापडेल. तुम्ही यायची घाई करु नका. मी अगदी बरी अाहे इथे. फक्त परवा वेंधळेपणातुन धक्का लागला अाणि काच फुटली खिडकीची. ते तुमच्या सोबत असतं ते टिल्लं लेकरु कसंय ? त्याच्यावर फार माया लावु नका बरं !पण काळजी घ्या त्याची. अापल्या सारखंच त्याचे अाईवडील एकदिवस त्याला घेऊन जातील मग काय कराल? अाणि नेतील त्याला शोधत असत बिचारे. इथं समोरच्या खोलीत एक नवीन भाडेकरु पोरगी अालीय. एकटीच अाहे. फार गुणी पोरगी अाहे. हे पत्र तिनेच लिहुन दिलंय. पडला जीव भांड्यात ? फारच लाघवी पोर अाहे.येता जाता चौकशी करत राहते. अाणि बरंका माझ्या वेंधळेपणातुन धक्का लागला अाणि काच फुटली खिडकीची. बाहेर बर्फ पडायला सुरुवात झालीय. वारा झोंबायचा रात्रीचा. अाणि कसंय ना सबंध उघड्या खिडकीतुन थंडी जितकी त्रास देते त्यापेक्षा जास्त फटीतुन येणारी टोचणी त्रास देते.. म्हणुन म्हणते शोधत रहा अापल्या लेकराला एकदाचा मिळु तरी दे किंवा मेलाय हे तरी कळु दे.येईल कधीतरी,येईल कधीतरी. बोचरी थंडी जास्त झोंबते. अाणि हो तुटक्या खिडकीचं निमित्त काढुन लगेच येऊ नका. त्या नविन भाडेकरु पोरीनं तिचं पावसाचं जाकेट लावलंय तिथं व्यवस्थित. ती म्हणते तशीही ती पाऊसात बाहेर नाही पडत कधी. तुम्ही ठरल्याप्रमाणे नेहमी सारखे दिवाळीतच या..... दोन दिवसासाठी. मनीअॉर्डरा बिर्डरा काही नको इतक्यात. पहिलंच पत्र अाहे . माझ्या स्वभावपेक्षा वेगळं काही वाचायला मिळालं तर समजुन घ्या कि पत्र लिहणा-या पोरीने खोड काढली. तशी बदमाश अाहे ती. कळावे. लव यू . तुमची.
“
बाबा वरमला अाणि म्हणला “ते शेवटचं इंग्रजी त्या पोरीचंच असेलं..अामच्या मंडळीला कसलं येतंय इंग्रजी”
मी म्हटलं “ अाजींचा स्वभाव फार छान अाहे हो”
बाबाची छाती फुगली “मग ! दिसायला पण फार सुंदर अाहे ती. ती खुप नाजुक अाहे, चहात टाकायला दुधाची साय बोटाने बाजुला करायला जाते तर तिचा गुलाबी रंग उतरतो दुधात, नासतं मग दुध. झाडावरची फुलं तोडतांना बोट खरचटतं म्हणुन म्हटलं तोडायच्या भानगडीत पडु नको , खाली पडलेला प्राजक्त वेचत जा तर एक दिवस फुलांवर पाय पडुन मुरगळला ना बाईचा पाय, इतकी नाजुक. एकदा पहाटे कुस बदलली तर खरचटलं डाव्या खांद्याला .”
मी डोळे विस्फारुन बघतचं राहिलो. मग बाबांनी ‘गंमत केली रे” अशा अर्थी डोळे मिचकावले अाणि खोखो हसले. मग अाम्ही उत्तर लिहु लागलो.
“तुझं पत्र मिळालं. वाचुन अानंद झाला. अौषधांबद्दल काहीच का लिहलं नाही? संपले असतील तर मागवुन घे. मनीअॉर्डर पाठवतो लौकरच. माझ्याबद्दलची तुझी नेहमीची जागरणाची तक्रार मिटल्यात जमा अाहे. गेल्यावेळी तू बोहारणीला साड्या देऊन भांडे घेण़्यासाठी ज्या दोन साड्या दिल्या होत्या त्याचे उशांचे खोळ शिवुन घेतले मी. म्हणुन अाता लवकर झोपी जातो. नाही वाटले बोहारणीला द्यावेसे. भांड्यांची व्यवस्था केली मी माझ्या हिशोबाने…..”मी बाबांना मध्येच थांबवलं अाणि विचारलं “ त्यांना दिसत नाही ?ती मुलगी अात्ता अाली. मग पुर्वी का पत्र लिहायचे तुम्ही? कोण वाचुन दाखवायचं ? “
“मीच” बाबा म्हणाले. मी न कळाल्याची मुद्रा केली. बाबा सविस्तर सांगतो अशा पद्धतीने बसले अाणि म्हणाले “अरे नीट दिसत नाही माझ्या बायकोला. चिडवायचो तिला ‘चंद्रासारखे डोळे’. मग एकदिवस एका डोळ्यात खरोखर पोर्णिमेचा शुभ्र चंद्र उतरला. काहीतरी पडद्याचा अाजार. अॉपरेशन खर्च फार. एकदा घेऊन गेलो होतो. अौषधांची जंत्री पाहुन म्हातारी गावी पळुन गेली. तिला म्हटलं तिकडे तरी जा सरकारी दवाखान्यात. पण म्हातारी काय जात नाही घाबरते कि काय. अाणि इकडं ये म्हटलं सोबत तर तेही नाही. अाणि मला ही तिकडे थांबु देत नाही. इकडे म्हटलं तर इकडे हि येत नाही. इथे जमिनीचा कोर्टकटला चालु अाहे. महिनाभरात मिटेल असं वकिल लोकं दोन वर्षापासुन सांगताय. बापाने मरतांना सांगितलं होतं तेवढी मोकळी कर जमीन. त्याच्या शेवटच्या इच्छेत मला बांधुन गेला. त्यात माझ्या म्हातारीचा हट्ट त्यांचा शब्द खाली पडु नका देऊ... अाता हळुहळु दोन चंद्र झाले. अाता अजुन भुरकट भुरकट दिसतं तिला. महिनाभर थांबेल अाणि जाईल निघुन कायमचा. अाता नाही थांबवत. ती तर अाता म्हणते ‘गरज काय अापरेशनची?’ . अंधार अोळखीचा झालाय. अंदाज जवळचा झालाय. अौषधाला पैसाच इतका लागतो तर अॉपरेशनला किती लागेल. मी पण नीच मला माहितीय ती नाहीच म्हणेल म्हणुन तिला दरवेळेस अाग्रह करतो. ती पण समंजस माझा पोकळ अाग्रह कळतो तिला म्हणुन दरडावुन,अादळ अापट करुन नाही म्हणते. मोठी बनेल अाहे म्हातारी. तिच्याच्याने घर काही सुटत नाही.पैसा वाचवुन मग सहाएक महिन्यातुन एकदा जातो घरी तिला भेटायला. पत्र लिहुन पाठवायचो. ती जपुन ठेवायची. मग अाम्ही अामच्या घरामागे हे ss अस्सा ! अाभाळा इतका जुनाट पिंपळ अाहे. त्याच्या खोडात एक सिंहासनासारखा खोपा तयार झालाय. झाडाची ढोली. मी तिकडे गेलो कि तिथे बसवतो महाराणी साहेबांना. अाणि मी पाठवलेले अाणि तिने जपुन ठेवलेले पत्र वाचुन दाखवतो. मला ही सोपं पडतं अाताशा अाठवायला जड जातं अाणि वर्षभरातलं काय काय लक्षात ठेवणार ना. अाणि तिला पण पत्र येताय म्हणजे मी इकडे सुखरुप असल्याची मुक पावती . हे तिचं पत्र अालं म्हणुन म्हटलं उत्तर द्यावं. “
बाबा अजुन बोलतंच होते “अाम्हाल सवय अाहे ह्या अशा चिठ्ठ्यांची. अामच्या काळी पत्र किंवा चिट्ठ्या असायच्या. प्रेमात होतो तेव्हा पण लिहुन घ्यायचो छोटंसं चिटूरं. “जय दशभुजा माता कि जय” , “ त्रिशूलशंखधारिणी दशभुजा माता प्रसन् , अाणि देवीचं चित्र काढायचो. ”
मी “हे असं चिठ्ठीत? लवलेटर मध्ये?”
बाबा हसले “दशभुजा माता म्हणजे अाज देवी मंदिरा मागे भेट. त्रिशूलशंखधारिणी दशभुजा म्हणजे देवीच्या दहा हात असतात ना ? इकडे पाच तिकडे पाच. मग शंख ‘ह्या’ हातात होतं ‘ह्या’. अाणि त्रिशूल हा ‘असा’ हात म्हणजे किती ? किती? अहो घड्याळातले ‘चार’! . म्हणजे ‘देवी मंदीरामागे चार वाजता भेट अाणि देवीचं चित्र. म्हणजे कोणाला शंका पण नाही यायची “
मी म्हणालो “अच्छा ! अशी सुरवात झाली होती तर तुमच्या ह्या प्रेमकथेला !” बाबा म्हणाले “नाही नाही , ती चिठ्ठीवाली वेगळी होती. माझी अवस्था तीच जी अाता तुमची अाहे. मुद्दा असा अाहे अाहे कि ,चिठ्ठीची गंमत काही संपत नाही कधीच. ते प्रेम जे अपुर्ण राहिलं. तुम्हाला काय वाटतं तुम्हीच प्रेमवीर अाहात? पण तेव्हा सुद्धा कसं होतं, ती चिट्ठी ज्याच्याकडे द्यायचो त्याच्यानुसार अामच्या मनातला प्रवास सुरु व्हायचा . अाता इथे गेली असेल चिट्टी, अाता तिथे गेली असेल चिट्ठी , अाता चौकात पर्यंत , अाता नाक्यापयंत , अाता घराजवळ , अाता तिच्या हातात अाली असेल. अाता तीने भरभर वाचुन कुणी पाहुन नये म्हणुन पटकन काळजाशी ठेवली असेल . मग असं सगळं उलटं गणित मांडुन अाम्ही मंदिरापाशी ताटकळत बसायचो. पण ती काही यायचीच नाही. नंतर दुस-या दिवशी कळायचं चिठ्ठी मिळालीच नाही . पण अाली नाही अाम्ही वाट पहात बसलो म्हणुन शक्य तितके पॉझिटीव रहायचो. मिळाली असेल पण बाप अाडवा अाला असेल, मिळाली असेल पण अाईने स्वैपाकाला लावलं असेल. म्हणजे थोडक्यात काय तर ‘ती’ का अाली नाही ह्याच्या शक्यातांची जेव्हा अाम्ही यादी करायचो तेव्हा सगळ्या शक्यतांमध्ये अाधी तिला वाचवायचो. तीची बापुडीची काही चुक नाही. हे अमुक अमुक तमुक तमुक झालं असेल, हाच काय तो अामचा कयास. दोष तीचा नाही अाजुबाजुचा असायचा. ती अाली नाही , तुमच्या भाषेत’ टप्पा दिला’ म्हणुन तिचा ‘राग-राग’ नाही केला कधी . मग चोरुन चोरुन बघायचो. अाणि हौस भागवुन घ्यायचो. त्या काळची चोरुन बघायची मजा अाजच्या मिठीलासुद्धा नाही बघा.
अाणि तुम्ही म्हणजे असं कि “ दोन ब्लु टिक दिसले तरी रिप्लाय का देत नाही “ , “अॉनलाईन दिसते पण माझ़याशी का बोलत नाही” अाजच्या शक्यतांमध्ये तुम्ही लोकं सगळ्यात अाधी दोष देता तो जोडीदाराला. “ मी बाबांचं मोबाईल ॹान पाहुन मनातच हसलो अाणि म्हटलं “बरं मग तिचं काय झालं? दशभुजा मातेचं ?”
बाबा म्हणाले “पुढे काय तीच घिसीपिटी कहानी. ती होती ‘महालक्ष्मी बंपर करोडपती सोडत’ अाणि अाम्ही अापले ‘दिवाळीची सोरट’ कुठून मेळ लागेल हो? पोरीचं मिशीवाल्या बापासमोर चालायचं नाही. नंतर एकदिवस मी भरपावसात अोथंबलेल्या अंगाने , वेशीवरच्या गढीत लपुन बसुन मग गाव सोडणारं अाख्खं व-हाडं पाहिलं. तिला पाहुन घरच्यांना वाटत असेल त्यांची पोरगी घरापासुन लांब चाल्ली म्हणुन रडतेय. पण मला कळायची ना तिच्या अश्रुंची भाषा. ‘मी चाल्ले , तुझं कसं होणार अाता?’ हे अश्रु होते ते . देवा शप्पथ खोटं नाही. तेच होते ते . मग शिक्षण सोडलं ,घर सोडलं, गाव सोडलं, तिच्या गावी भटकलो. ती अाधी दिसायची अधे मधे. अाता नंतर तिने पण सोडलं असावं. बिचारी काय करणार नव-यासमोर चालत नसेल काही . “
मी चकित , “अजुनही तीची चुक नसावी म्हणताय ? तुम्ही रस्त्यावर अालात . अायुष्य फुकट गेलं तुमचं तिच्यापायी. तरी तीची चुक नाही ?”
बाबा परत तसाच हसला “जोडीदाराच्या चुका पदरात घालायचं वचन देतो ना अापण? चुक-बरोबर माणसं नसतात हो . हि साली हरामी वेळ चुकीची असते. समोरुन कुणी घाव घातला तर अापल्या माणसाला पुढे करायचं कि अापण तो घाव अापल्या छातीवर झेलायचा ? हे अापण अापलं ठेवायचं. तसंच अाहे हे समोरुन निरोप नाही अाला तर अापण अाधी अापल्या माणसाला दोष द्यायचा कि त्याला सांभाळायचं ? “
बाबाने मी लिहलेलं पत्र पेटीत टाकलं. माझ़या डोक्यावरुन हात फिरवुन कडाकड माया मोडली अणि निघुन गेला. थोड्यावेळात एका पोस्टमन ने त्या पेटीतले सगळे पत्र पोचवण़यासाठी बाहेर काढले. मी बघतच होतो. अाता माझ्या मनातला प्रवास त्या खाकी पिशवीत बसुन सुरु झाला.बाबाच्या गावाच्या पोस्टअॉफिसचं धुकं माझˇया भोवती जमल्यासारखा भास झाला. मी पिवळसर निंबाच्या पानांच्या पावसात कितीतरी वेळ नुसता बसुन होतो.
Friday, March 25, 2016
निंबाच्या पानांच्या पावसात
Subscribe to:
Post Comments (Atom)
अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)
मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...
-
1) Shripad Deshpande : काही-काही गोष्टी लहानपणापासून माझी तंद्री लावणाऱ्या. म्हणजे गरम गरम कातळावर तांब्याच्या पेल्यातून पाणी सोडलं त...
-
जिंदगीभर कोइ गम तो ढो ता नही जख्म धो भी लेगा की दर्द धोता नही खुदको कोस कर कहा मैने अपने अापसे इसकदर कोइ अपनी जान खोता नही ...
No comments:
Post a Comment