मरिनड्राइव्ह. सुर्य धुवुन पिळुन दोरीवर वाळत घालावा , त्याच्यातुन थेंब थेंब केशरी रंग पसरत रहावा , अाजुबाजुला सबंध पिवळसर केसरी रंग अशी रात्र अाणि संध्याकाळच्या उंबठ्यावरची वेळ होती. घरात साचलेलं लोटा-लोटा पाणी कितीही वेळ बाहेर फेकत रहावं तरी पावसामुळे घरात पाणी कमी होत नाही तसं समुद्राची भरती काठावर लोटा-लोटा पाणी फेकत होती. संध्याकाळ सरली, रात्र सुरु झाली अाणि सगळी कडे गर्द दाट पिवळसर केसरी रंग पसरु लागला. रस्त्याच्या कडेचे स्ट्रिटलाईट सुरु झाले होते. प्रत्येक पाच फुटावर एक मुठभर सुर्यगोळा उगवावा तसे प्रत्येक पाच फुटावर स्ट्रिटलाईट सुरु झाले होते. तुम्ही लोकलच्या दाराशी उभे असतांना अचानक समोरुन दुसरी लोकल भरधावावी तसा वारा बेफाट वहात होता. समुद्र , वारा अाणि वळणदार रस्त्यावरुन डोकावणारा स्ट्रिटलाईटचा तरंगणारं प्रतिबिंब जणु काही स्ट्रिटलाईटचा अोला पिवळसर रंग वितळुन पाण्यापर्यंत अोघळलाय. मरिनड्राइव्ह.
हेच मरिनड्राइव्ह अनेकांचं एसी बेडरुम अाहे. मी अाणि सच्या कितेकदा तिथे रात्रभर गप्पा मारत बसतो अाणि अामच्या साथीला हातातल्या काळ्या गंड्यासारखी रात्र सोबत झुलत राहते. दिवसभर राबुन काही लोकं तिथे कठड्यावर पाठ टेकवुन देतात अाणि उठतात ते सकाळी सायकलवर चहावाला चहा द्यायला येतो तेव्हाच. लंबगोलाकार सिमेंटच्या दगडांचा कृत्रिम काठ तिथे तयार केलाय. तो तिथल्या सौदर्यात भर घालतो. उसळुन अालेलं पाणी त्या दगडांच्या खाच खळग्यात जाऊन बसतं. अाता रात्र उलटुन गडदरात्र सुरु झाली होती. समुद्राची गाज अाणि एक्कादुक्का गाड्यांचे अावाज इतकंच एेकु येत होतं. मी तिथेच कठड्यावर रेलुन तितक्यात एक न्युज चॅनलची ‘अोबी वॅन’ अाली अाणि एक वार्ताहर माईक घेऊन माझ्याकडे येतोय असं वाटत असतांना त्याने माझ्या शेजारी बसुन खाली सिमेंटच्या खडकामध्ये असलेल्या एका खळग्यातल्या गढुळ साचलेल्या लाटेला प्रश्न विचारायला सुरवात केली.
“अथांगतेचा घटक , परंतु असले जगणे , कसे वाटते? सखोलतेशी नाते , किन्तु चुळ असावी , असले जगणे , कसे वाटते? ,अगाधतेचे अंग, तरिही द्रोण पुरावा , असले जगणे , कसे वाटते? "
शेंगा,टरकल,थुंकी,चिंगम अशा बरबटलेल्या त्या गढुळ पाण्याला तो प्रश्न विचारत होता. मला अाश्चर्य वाटले . पण नंतर विचार केला कि प्रश्नही तसा चुक नाही. तिकडे अथांग, सखोल, अगाध अशा समुद्राचा भाग असलेल्या लाटेने असे कोप-यात घाणीत जगणे कंठावे हे जरा दुर्दैवीच नाही का ?
घनगंभीर थरथरता अावजात डुचमळती लाट बोलु लागली “ प्रायश्चित्त अाहे हे. केलेल्या कर्माचं परिमार्जन अाहे हे. “ वार्ताहर म्हणाला ,” जरा उलगडुन सांगा, तुमचं दु:ख जगा समोर येऊ द्या”
दूरुन मोठी भरती अाली. लाट जागीच डुचमळली. अात मधल्या गढुळतेमध्ये नवी गढुळता विसळली. पोटात ढवळल्यासारखं झालं. लाट पुढे सांगु लागली , “ लोकांचे बोल,टोमणे एेकवेनासे झाले. दुस-यांचे टोमणे एकवेळ सहन करु अापण पण अापल्या लोकांचा अबोला नाही सहन होत अाता. अनेक हजारो वर्षांपुर्वीची गोष्ट अाहे हि. मी अवखळ होते ,लहान होते. त्यावेळी समुद्र नव्हते. त्यावेळी मी ‘शरयू’ होते.
अवधची शरयू. सकाळी सकाळी भरत, लक्ष्मण, शत्रु अाणि राम माझ्या काठाशी येऊन उंच बाण मारायचे अाणि कुणाचा बाण सगळ्यात लांब जातो अशी शर्यत लागायची. अात नदीमध्ये त्यांचा निषाद कुळातील मित्र गुहा एक नाव घेऊन तरंगत असायचा. तो लांबुन अचुक सांगायचा कि कोणाचा बाण किती लांब गेलाय. अनेकदा भरतच जिंकायचा. लक्ष्मण नेहमीप्रमाणे चिडचिड करायचा. राम भरतला शाबाशी द्यायचा. अनेकदा असं वाटायचं राम मुद्दाम भरतला जिंकु देतोय.
राम….रघुवीर …अगाध मस्तक, भव्य ललाट, ललाटावर भुरभुरणारे केश, टपोरे डोळे, मध्यम उंचीचा, सर्व देहावर अवर्णनीय कांती असलेला, विद्यपारंगत, राजनीतिज्ञ, सज्जनांचा संग्रह आणि दुर्जनांचा निग्रह करणारा, धर्म-अर्थ व काम या तिन्ही पुरूषार्थाचे योग्य पद्धतीने सेवन करणारा, प्रजाहितदक्ष व प्रजाजनांना अत्यंत प्रिय, देवासुरांना ज्ञात असलेली सर्व अस्त्रे जाणणारा व संग्रमात अजिंक्य, असा रघुवीर.मी लांबुन पहायचे अनेकदा एकटाच माझ्या तीरावर येऊन पाय सोडुन बसायचा. कमळासारखे ते मऊशार पाय मी अोंजळीत घ्यायचा अनेकदा प्रयत्न करायचे पण मी लहान लाट होते म्हणुन सगळे मला मागेच ठेवायचे. मग अनेक दिवस मला कुणीच दिसलं नाही. अनेक वर्ष. सालाबादाने पाऊस यायचा तेव्हा समुद्रातुन वाफ झालेल्या सरी नदीत बातम्या घेऊन कोसळायच्या कि ‘अाज रघुवीर पश्चिमेला दिसले ,अाज दक्षिणेला दिसले’ मग तिकडे लांब युद्ध कि काय झालं म्हणे अाणि सगळं अालबेल होऊन रघुवीर अाणि जानकी परतले. राजपुरोहितांनी विजयी रघुवीराच्या पाद्यपुजेसाठी शरयूतुन कमंडलु भरला . मी तेव्हा पण घाई करुन त्या कमंडलुत जायचा प्रयत्न केला पण मला इतर मोठ्या लाटांनी मागे सारलं. काठावरुन गुलाल,फुलं उधळंत रघुवीराचे अागमन झाले. मी नदीतुन सगळं पहात होते. असं समजा कि करोडोंच्या गर्दीतली मी एक डोकावुन डोकावुन काठावरुन अायोध्येत नाचत जाणारा सोहळा पहात होते.
काही दिवसमास अाणखी उलटले. मी रोज काठावर येऊन परतायचे कि एकदा तरी रघुवीराचा स्पर्श होईल. मला सगळे हसायचे. एकदा मला झोपी लावतांना मी मोठ्या, पुढे समुद्रात जाणा-या लाटेला थांबवलं अाणि विचारलं,”मी म्हटलं “मी अात्ताच का नाही चंद्राला हात लाऊ शकत ?” त्या खळखळ हसल्या म्हणाल्या “असं वेड्यागत करु नये बये. थोडी मोठी झाली कि तुला पुढे जाऊन दर्या व्हायचंय. मग हवं ते कर. अाणि रघुवीर जाऊ दे तुला ना चंद्राला हात लावता येईल. कारण रघुवीर पण तसाच शितल अाहे. बघ तो चंद्र दिसतोय का? तो वर पांढरा शुभ्र गरगरीत चंद्र? दर्या झाली ना कि मोठ्यापणी तुला अाभाळा इतकी उंच झेप घेऊन त्याला हात लावता येईल. भरतीवेळा असतात त्या.पण त्यासाठी शहाणं हो! सांगेल ते एेक हां ? असं उठसुठ कुठेही पळु नको रघुवीर रामाला हात लावायला जाऊ नकोस. अादराने वाग त्यांच्याशी. युगपुरुष अाहे ते अाणि तू अजुन अवखळ अाहेस.” मला डुलकी लागली अाणि मी तिथेच तरंगत राहिले . वर निळंशार चांदणं पडलं. माझ्या डोक्याखालुन अलगद हात काढुन मोठ्या लाटा प्रवाहाला निघाल्या. पुढे जाऊन त्यांना गंगार्पण व्हायचं होतं. गंगार्पण झालं कि जन्ममरणाचा फेरा सुटतो अाणि अाम्ही नद्यांना दर्याचं अथांग अमरत्व प्राप्त होतं. हे तितकं सोपं नाही त्याला मोठी तपश्चर्या लागते."
"किर्रर्र रात्र होती. वातावरण जरा उदास उदास होतं. मला पावलांचा अावाज अाला. मी हळुच उचंबळुन पाहिलं. सगळे सवयीने, मिटल्या डोळ्याने प्रवाहत होते. अवचित भुरभरु पावसाला सुरवात झाली. मी कुस बदलली. दूर पाहते तर काय ? एक तेज:पुंज अाकृती चालत येत होती. खांद्यावर रुळणारे केस , खांद्यावरुन खाली तरंगणारं उत्तरीय, नदीच्या प्रवाहात एकएक पाऊल उचलुन ती अाकृती धीरगंभीर चालत होती. जोर लाऊन चालावं लागत असल्याने खांदे मागेपुढे होत होते. मी संमोहित होऊन पहात राहिले. ती अाकृती चालत येत होती पण जशी पुढे येत होती तितकी ती खोल जात नव्हती. कदाचित शरयूमधील इतर सख्या अादराने बाजु होत किंवा जमिनीचा भर वाढवत नदीची खोली जाणवु देत नसेल. पावसाचा जोर वाढला मी पुढे पुढे जाऊ लागले. संमोहन कि काय असेल ते होत होतं. हळुहळु अाजुबाजुला गलका सुरु झाला अाता मला अडवणं शक्य नसल्याने सगळ्याजणी अोरडु लागल्या. ‘फिर मागे तू . अगं हा जो दिसतो, तो चंद्रासम, दिसतो केवळ, नसे चंद्र तो, फिर मागे तू.’ मी अापले दर्या होण्याच्या अाधीच चंद्राला हात लावायया कल्पनेने शहारले. अाता तो अाणि मी समोरासमोर होते. कुजबुज एेकु अाली. रघुवीर!! एका शब्दाने माझ्यातला थेंबन्थेंब शहारला. रघुवीर !
मी अावेगाने पुढे गेले अाणि त्या अाकृतीला कवेत घेतले. सगळी कडे हल्लकल्लोळ झाला. दर्या प्रवाहाला निघालेल्या नद्यांचा प्रवाह मागे फिरला मला थांबवायला. पावसाने जोर धरला. क्षितीज थरथरलं. अाभाळात गडगड झाली. मी स्वत:ला विसरुन गेले. भानावर अाले तेव्हा सकाळी सगळे जण माझ्याकडे पहात होते. काठावर कुजबुज होती. ‘रघुवीराने देहत्याग केला’
मग शरयू नदीतल्या सगळ्या जेष्ठांनी निर्णय घेतला अाणि मला शिक्षा म्हणुन पुढे पाठवायचं ठरवलं. मी जिथे जिथे प्रवाहत पुढे गेले तिथे तिथे सगळ्यांच्या खोचक नजरा माझ्यावरच असायच्या. “ हिच ती ! ह्याच लाटेने सुरवात केली,हिनेच रघुवीराला बुडवलं.” मी मुकाट खाली मान घालत प्रवाहत राहिले .युगानुयुगे.
अाता मला नको झाल्यात सगळ्याच्या नजरा म्हणुन प्रायश्चित्त म्हणुन मी इथे कोप-यात येऊन अोंजळभर जागेत डुचमळते. मला वाफ व्हायचं अाहे. पण नव्याने एक लाट येते थोडी भर घालुन जाते अाणि मी अाहे तशीच राहते.” अाणि ती पुटपुटत राहिली श्रीरामजयराम जयजयराम!
सकाळी सकाळी एक मोठ्ठा पाण्याच्या बंबाची गाडी भरधावत मरिन ड्राईव्ह च्या रस्त्यावरुन गेली अाणि माझी झोप मोडली. शेजारी सायकलच्या कॅरिअयवर चहावाला हसत माझ्याकडे पहात होता. मला विचारलं “साब चाय लोगे ?” मी चहा घेतला. मी पैसे द्यायला लागलो तर म्हणाला “नही साब दिन कि शुरवात कि प्याली मै दिल से किसी दिलवाले को देता हुं, पैसे नही लेता” मी हसलो अाणि सहज म्हणुन विचारलं “ किधरसे अाए हो दोस्त ? क्या नाम ?”
तो म्हणाला “ युप्पीसे हुं ,अायोध्या. रघ्घु नाम है. चलो निकलता हुं. जय रामजीकी!”
- प्राजक्त
१२ एप्रिल २०१६
No comments:
Post a Comment