ज्यावेळी धर्मवीर भारतींचं कनुप्रिया माझ्या हातात अालं तेव्हा तळाशी गेलेल्या ‘काहीतरी’ ह्या अनामिक भावनेने परत उचल खाऊन सगळं गूढगढूळ केलं होतं.
‘तुम मेरे हो कौन कनु?’ अापण सगळ्यांनीच किंवा अापल्या मधल्या एखाद्या तुकड्याने स्वत:ला कधीतरी कळत नकळत त्या कृष्णाला विचारलेला प्रश्न. कृष्ण ह्या गुंत्यात प्रत्येकजण ह्या ना त्या प्रकारे कधीतरी गुरफटला जातो अाणि तो गुंता उकलत असतांना कुणीतरी अापली चाललेली फरफट पाहुन विचारतो “ ये कनू अाखिर तेरा है कौन?” किंवा सरतेशेवटी अापणच थकुन स्वत:ला कधी थकुन,कधी चिडुन,कधी लाडीकपणे विचारतो कि ‘तुम मेरे हो कौन कनु?’
चंडीदासांची राधा, सुरदासाची राधा ,जयदेवची राधा , अरुणा ढेरेंची राधा ह्या सगळ्यांची राधा वेगळ्या अाणि धर्मवीर भारतीची राधा एकीकडे. खिडकीशी वाट पाहणारी , नदी किनारी गत स्मृतींना उजाळा देणा-या राधेच्या पलिकडे जाऊन कनुप्रियामधली भारतींची राधा कृष्णाच्या समोर उभी ठाकते अाणि रोखठोक उत्तरं मागते, त्याला झाल्या प्रकारांबद्दल बोल लावते. कनुप्रिया मधे राधेच्या नजरेनं कृष्ण चितारला अाहे.
वाट पाहणारी राधेच्या पलिकडे वाट पाहणारा कृष्ण इथे दिसतो. वाट पाहणारा कृष्णही असा चितारलाय जणु राधा त्याला लपुन पहात असावी अाणि हटकुन भेटीची वेळ टाळते. ती म्हणते, ‘शेवटी तू उठलास अाणि वरुन झुकलेल्या फांदीचा मोहोर चुरगळुन हळुहळु पायवाटेने चालु लागला, पण मी अाले नाही’ , ‘मावळत्या सुर्याचे उदास किरणं नाईलाजास्तव तुझ्या माथ्यावरच्या मोरपिसांकडे निरोप मागत होते , पण मी नाही अाले’, ‘परतीला निघालेल्या गाईंनी त्यांच्या लोभस-भोळ्या डोळ्यांनी वर तुझ्याकडे पाहिलं अाणि हळुहळु परतपावली तुझ्याशिवायच परतु लागल्या, पण मी नाही अाले’
फक्त एकमेकांच्या सहवासाबद्दल बोलणारी राधा इथे कृष्णासोबत महाभारताच्या युद्धाबद्दलही बोलते.कृष्णाच्या जीवनातुन राधेचा धडा वगळला तर फक्त रक्तपातच उरतो हे सांगण्याचं धाडस ती करते.
कृष्ण अर्जुनाला गीता सांगतोय तेव्हा अर्जुनाच्या जागी ती स्वत:ला ठेऊ पाहते. अाणि समोर अाता राधा असल्यामुळे कर्म,स्वधर्म,निर्णय,जबाबदा-या अशा सा-या गीतासाराचे अर्थ तीच्या पर्यंत पोहचता पोहचता बदलुन गेले अाहे. कारण कृष्णाकडे अनेक शब्द असले तरी त्यांचा उगम अाणि अर्थ एकच अाहे . राधा. मग त्याच शब्दांनी कृष्ण त्याच राधेला इतिहास कसा समजावणार ?
मंत्राने प्राणप्रतिष्ठीत केलेला बाणासारखा कृष्ण निघुन गेल्यावर धनुष्यावर थरथरणा-या प्रत्यंचासारखे जे उरती -ती राधा. त्याच्या डोळ्यात डोळे रोखुन विचारावं तशी ती त्याला जाब विचारते कि ‘कनु, मी तुझ़यासाठी फक्त लीलाभुमी अाणि युद्धक्षेत्र जोडणारा पूल होते का?”
हिच कनुप्रिया रंगभुमी पाहण्याचा योग अाला. तो रंगभुमीवर इतक्या ताकदीने पाहणे एक सोहळा होता. भारतींचा दर्जेदार हिंदी कवितेला नाट्य-नृत्याची जोड देऊन जो काय अविष्कार सादर करायचं कृष्णधनुष्य दिग्दर्शिका जोशी यांनी अदभुत अभिनेत्रींसोबत पेललंय ते अफाट अाहे. राधेचं मिथक सगळ्यांनाच भुलवणारं अाणि जो तो त्याच्यापरीने त्यातुन मार्ग काढत असतो. मिताली जोशी अाणि टिम ने ते ज्या पद्धतीने मांडलंय ते कृष्णासारखंच शब्दातीत अाहे. अापल्या अाजच्या जगण्यातले काही क्षण गुंफून अाजच्या अाणि कनुप्रियामधल्या राधेचा एक मिलाफ ह्या नाट्याविष्कारात पहायला मिळाला. एक सबंध कृष्ण नावाचा अारसा खळ्ळ् कन फुटावा अाणि त्याच्या सहस्त्र वेगवेगळ्या तुकड्यांमधुन नेहा जोशी ,विभावरी देशपांडे, नम्रता कदम , विभावरी देशपांडे, कोमल गुजराथी,रुचा अापटे राधारुपाने प्रतिबिंबीत होत राहाव्या तशी कनुप्रिया हा रंगभुमीवर उलगडत रहातो.
‘तुम मेरे हो कौन कनु’ हा गुंता अापण यशस्वीपणे उकलत रहातो ,कृष्णधागे सोडवत मागे मागे टाकत राहतो. सगळं झाल्यावर मागे टाकलेल्या धाग्यांच्या एक नवा गुंता तयार होतो. अाणि अापण पुन्हा तो गुंता पुढ्यात घेऊन पुटपुटत रहातो ‘अाखिर तुम मेरे हो कौन कनु’
प्रयोगानंतर राधेच्या ह्या वेगळ्या रुपाकडे पाहुन मला भास झाला होता कि फार काही अवघड नसेलही कनु अाणि तिच्या प्रियाला समजावुन घेणं. असं असेल कि ती जेव्हा कृष्ण नसते तेव्हा राधा असते.इतकंच.
No comments:
Post a Comment