Sunday, November 20, 2016

पाखरथवा ( मटा मोहर २ जानेवारी २०१७)

मागे एक चुकलेला पाखरथवा परतीची वाट विचारत, परतीच्या खाणाखुणा सांगत माझ्याकडे अाला. मी उंचावर बसलेलो होतो. माझ्या अवतीभवती गोलाकार गलका मांडत माझ्या अंगावर, कधी खांद्यावरुन ते त्यांच्या परतीच्या ठिकाणाची अोळख सांगत होते. अाणि त्यांच्या विसाव्याच्या ठिकाणाचा पत्ता विचारत होता तो चुकलेला पाखरथवा.

“…ते नाही का ? कारखान्यांच्या चिमण्यांएेवजी गर्द वडाच्या सांदीअाडुन सुर्य उगवतो, प्रार्थनाबिर्थनास्थळां एेवजी बसक्या टेकाडामागे जिथे सुर्य विझतो
अाणि ते नाही का, जिथल्या फांदीच्या  नितळसर पिवळकांत पाकळ्यांअाडुन कुणाचेही, कोणतेही क्लेश केशरक्लांत अाणि मोहक वाटतात, पानगळीला तिथल्या झाडाचं एखाद पानं जेव्हा भिरभिरत खाली पडतं तेव्हा पाण्यात असंख्य शुभेच्छुक तरंग उमटतात.”

अाणखी खाणाखुणा सांगत काही म्हणाले कि, “…अाणि ते नाही का ? तिथे गच्च रान अाहे, अाणि जवळच पानथळीसुद्धा. गुरांच्या रोजच्या पानथळीवरच्या ये-जा मुळे तिथल्या गर्द रानात एक पायवट तयार झालीय, अाणि त्याच्या दुतर्फा असलेल्या केशरीकिरमिजी फुलांच्या सड्यामुळे लांबुन ती वाट एखाद्या सलज्ज नवविवाहितेच्या भरलेल्या भांगेसारखी दिसते.”

पंख हवेत उंचावत चोचीनं पंखाच्या अातल्या बाजुला चोचवणारं एक पाखरु अचानक थांबलं. “….हां ! हां ! अाणि ते नाही का तेढाक्याचं झाडं. त्या झाडाच्या पानाचं द्रोण करुन तिथल्या नदीचं पाणी प्यायलो तर तो थंडावा अगदी पोटापर्यंत डुचमळेलेला जाणवतो. तिथली समजंस नदी अलिकडे, उंचावर वांड धबधबा अाहे. अाणि कमंडलुसारख्या घनघुमटदार डोंगराच्या घळईतुन अर्घ्य दिल्यागत खाली येते. अाणि सुर्य विझणा-या टेकाडाच्या पोटात एक कातळभोर मंदीर कोरलं अाहे. सुर्य विझल्यानंतर अंधारुन यायच्या अात तिथल्या गाभा-यात कुणीतरी दिवा लावतं. अाणि हे सगळं दुरुन पाहतांना तो सुर्य तिथे मंदीरात निजायला गेल्यासारखं वाटत राहतं.”
दुडक्याचालीचे दोन पाखरं दोन-दोन उड्या मारत पुढे अाले. “ …तिथे नाही का ? दुपारी रानातच थांबलं तर सांदीतुन अारपारणा-या सुर्यकिरणांमुळे खाली उजेडसावल्यांचे किनखाबी गालीचे अंथरल्यासारखे वाटतात. अाणि जिथे फुलचुख्या फुलपाखरांच्या रंगांवर पैजा लागतातच पण फुलपाखरु फुलावरुन निसटल्यानंतर ते फूल किती उसासेयुक्त झोके घेत राहिलं ह्यावरही पैजा लागतात.”

एक पाखरु बळे बळे पाय अोढत समोर अालं अन् दिर्घ श्वासानंतर कंपावलेले बुब्बूळ स्थिरावत म्हणालं , “…ते नाही …” , पाखरु अर्ध्यातच थांबलं. निबिड झालेल्या अावाजातला कंप थोपवत परत धिरवटल्या अावाज ते म्हणालं ,” ….ते नाही कातिथे चाफाच्या एका झाडावर एक खोपा अाहे. सगळे म्हणायचे कि उंच आणि घुमटदार झाडावरच खोपे रचावे. तरीहि एका क्षीणपंखी पक्षिणीची झेप पोचणार नाही वर म्हणुन एका खुळप्या पाखरानं खाली चाफ्यावर बांधला होता खोपा. त्या पंखामधली क्षीणता पसरत गेली नंतर पक्षिणीच्या अंगभर आणि त्या खोप्याच्या वाट्याला गुलाबी कुजबुज शहारे आलेच नाही कधी. म्हणुन 'उंचावरच खोपे असावे' ह्या बुजूर्गी फांट्यांच्या म्हणण्याला बळ आलंय आताशा. तो एकटा खोपा फक्त हेलकावे घेतो आता.....वारा असो नसो. आणि त्या खोप्याचा मालकपाखरु आणखी खाली चाफ्याच्या पायाशी बसुन बघत राहतो वर फक्त."

पाचेक गुंड घोळक्यांचे पाखरं, एक पत्ता धड विचारता येत नाही अशा अविर्भावात पुढं आले, " .... अरे ते नाही का पिवळ्या सोनसळीसारखं फुलं येतात तिथं वळणावरच्या वेलीला. आणि त्याच्या फुलांचा फक्त गंध हुंगायला बहात्तर कस्तुरीयुक्त हरणांचे तांडे येतात. आताशा त्यांना कस्तुरीची जागाही माहीत झालीय,आता मुर्खासारखे रानभैरी हिणवत नाही कुणी त्यांना."

" ... आणि रात्री नाही का आभाळ कुठून सुरु होतं ?आणि जमिन कुठे ? हे कळण्याइतपत गच्च तारकांच्या जत्थ्याचं प्रतिबिंब तलावात पडलेलं असतं. खरंच एकटक पाहीलं तर रात्र आणि पहाटेच्या उंबरठ्याच्यावेळी, खुरट्या कवीनं सांगितलंय तसं निळंबिळं नाही तर जांभळंमिट्टं दिसतं आभाळं. जिथल्या चंद्राची कोर पाहुन कुण्या मंजुळेचं कपाळ आठवावं आणि निरखून पहात राहील तर कोरी खालीच आत्ता ती डोळे उघडेलंसं वाटतं राहतं. जिथल्या पावसाला पानाफुलांतुन गाळून येत असल्याने सगळे 'सुगंधअर्क' म्हणतात, हिवाळ्याला 'दुलईधुकं' आणि उन्हाळ्याला 'चिडकाबिब्बा' म्हणतात.

पाखरांना खुणा आठवत गेल्या. गलका वाढत गेला.

तुम्ही सगळे काल हसत होते ना ? वरती थव्याकडे पहात,थव्यातुन मागे पडलेल्या, थव्याचा वेगाशी वेग राखत धडपडणा-या एका नवख्या पाखराकडे पहात तुम्ही सगळे काल हसत होते ना

तो मीच होतो. त्यांच्या विसाव्याच्या खाणाखुणा ऐकुन रहावलंच नाही मला. मग स्वत:ला झोकुन दिलं आणि त्यांच्यात सामिल झालो होतो मी

- प्राजक्त १९ नोव्हेंबर २०१६





No comments:

Post a Comment

अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...