Friday, June 27, 2014

पैलतीर

सोबत दोन बॅग,दोन्ही हातात एक वितभर हिरव्या बांगड्या अाणि दोन वितभर मेहंदी.कपाळावर अाठ्या,मोठ्या प्रयासाने थांबवलेल्या हुंदक्यामुळे थरथरणारी हनुवटी.अशी ती एकटी.तिचा पती अाधीच नव्या घरी गेला होता अाणि नविन कंपनी असल्यामुळे अाणि नविन घराच्या कागदपत्रांच्या तजविज करायला तो जरा लौकरच गेला होता.अाणि अाता ती अाठवड्याच्या अंतराने चालली होती
.विमानतळाच्या चेक-इन काऊंटरवर तिला विचारलं "लगेज अाणि हॅंडबॅग्ज् किती?" तीने फक्त हाताने दाखवलं.तिथेच सुचना म्हणुन हॅंडबॅगमध्ये कोणत्या गोष्टी वर्ज्य अाहे ते लिहलं होतं.काही रोजच्या वापरातल्या वस्तु पण त्यासुद्धा स्फोटक ठरु शकतात म्हणुन त्या न्यायला मनाई होती.तीला जुने दिवस अाठवले,'तो' म्हणायचा "डोकं शांत ठेव नाहीतर एअरपोर्टवर जातांना "content can be explosive" असा शिक्का मारुन नेऊ देणार नाही. पहाट अाणि सकाळच्या मधला जो न सांगता येणारा प्रहर असतो तसंच न सांगता येणार नातं होतं त्या दोघांमध्ये. मग नंतर दोघांनी एकाच अाभाळाखाली वेगवेगळी गावं वसवली. काही दिवसांपुर्वी तीला जेव्हा सांगण्यात अालं कि तीला तिचा नव्यानेच सुरु केलेला संसार (काळजातल्या धाकधुकीसहित) दुरदेशी करायचाय तेव्हा तिच्या श्वासांची थरथर वाढली.तिचं असं व्हायचं.....कधी कधी अपरिचीत अानंदाच्या किंवा अपरिचीत चिंतेच्या अाधी थरथर व्हायची. तिला जेव्हा हे कळालं तेव्हा ती अंगणात बसुन कागदाच्या होड्या सोडत होती.पावसाने नुकतेच डोळे मिटावे तसा पाऊस अोसरला होता पण बोचरी भूरभूर चालु होती. मग तिने शेवटची होडी बनवली अाणि डोळे मिटले.डोळे मिटल्यामुळे डोळ्यातुन पाझरणा-या धारेचा अोघ तुटला अाणि एक थेंब बनुन होडीत पडला. किती तरी वेळ ती त्या जाणा-या होडीकडे बघत बसली. मध्ये होडी थांबली,कलंडली कि अधीर राधेसारखी धावत जाऊन ती सरळ करायची.तिच्या मैत्रीणीने ते पाहिलं अाणि म्हणाली "निरोप दिल्यानंतर प्रवासाभर सोबत करशील तर निरोपाला काय अर्थ राहतो ग" अाता पर्यंत रोखुन धरलेला डोळ्याचा बांध,मोठी लाट यावा तसा फुटला अाणि ती अाल्या पावली धावत माघारी पळाली. ती पळतांना पावसाचे थेंब पैंजणासारखा अावाज करताय कि पैंजणातले घुंगरु पाऊसथेंबासारखे निथळताय इतकी गल्लत व्हायला झाली तिच्या धावणा-या पायांकडे बघतांना. "प्रवासात एखादं गाव जर अावडलं तर अापण कायमचं मुक्कामी राहतो का ? म्हणुन तुला इथलं सगळं इथेच विसरावं लागेल" तीची मैत्रीण तिला म्हणाली. त्यावर ती म्हणाली " प्रवासात गाव अावडला म्हणुन माझ्याकडंच सगळं बोचकं तिथेच ठेउन प्रवास सुरु करायचा ठरवलाय मी.कधी माहित नाही पण परतायचं ठरलं तर हक्काचं अाभाळ हवं म्हणुन.पुर्णत्वाला पोचल्यावर तसाही नंतरचा प्रवास , हा प्रवास नाही अौपचारिकता उरते." ह्या विचारांचे चक्र अविरत चालु असतांना एव्हाना विमानतळावरच्या सुरक्षेच्या अाणि सामानाच्या सगळ्या अौपचारिकता पुर्ण करुन ती अाता विमान येण्याची वाट बघत वेटिंग रुम मध्ये बसली होती. परत अनाउंसमेट झाली कि विमान गेट नं अाय-२ वरुन अाय-१ ला येणार अाहे तरी प्रवाशांनी तशी नोंद घ्यावी. तिने परत विचार केला कि तेच तर झालंय दोनातून एक अाणि पुन्हा एकाचे दोन. तिचा प्रवास सुरु झाला.अाणि सुसाट वा-यामुळे पिंपळपानाने हवेत गिरकी घ्यावी अाणि अाता प्रवास कोणत्याही पैलतीराशी संपेल ह्या समर्पण भावनेत तीचा प्रवास सुरु झाला. नवीन घरात पोचल्यावर सगळंच को-या को-या वहीसारखं वाटायला लागलं. तिकडच्या पावसाने परत इकडे तिच्या अंगणात हजेरी लावली तेव्हा उगाच कुणीतरी अोळखीच भेटल्याचा अानंद तिला झाला. तिची मैत्रीण , म्हणजेच तीचं प्रतिबिंब जे कधी पावसाच्या साचलेल्या पाण्यातुन तिच्याशी बोलायचं ,कधी अारशामधुन बोलायचं ,कधी खिडकिच्या काचेतुन बोलायचं , ती मैत्रीणीने तिला विचारलं "अाल्या अाल्या सगळ्यात अाधी काय थाटणार ? स्वैपाकघर कि अंगण? " ही म्हणाली "देवघर" तीने विचारलं "पण देव-देव्हारा तर अाणलाच नाहीस तू.ठेवणार काय?" ती म्हणाली "मोरपीस" अाणि तीने एक मोरपीस दाखवलं. तीची मैत्रीण म्हणाली "सगळ्या जुन्या गाठ्योड्याला गाठ मारुन यायाला लावलं होतं ना मी ? " तितक्यात पलीकडच्या गल्लीत पावसात खेळणा-या मुलांनी सोडलेली एक कागदी होडी तिच्या पायाशी येउन थांबली. ती उचलतांना ही म्हणाली "दुसरी गाठ मारतांना कितीही बोट ठेवलं तरी पहिली गाठ जराशी सैल होतेच ना?"

- प्राजक्त
दै सामना २८ जून १४
http://216.15.199.42/dainiksaamana/Details.aspx?id=50698&boxid=221742187 )



Friday, June 20, 2014

पाऊसवेळा

त्याने नोकरी शोधतांना सोयीच्या शहरांची जेव्हा यादी केली तेव्हा त्या यादीमध्ये पुढे कंसात सरासरी पावसाचे प्रमाण पण लिहलं होतं. इतका त्याला पाऊस जवळचा होता. जन्मत:च त्याच्या तब्येतीमुळे त्याला काही दिवस काचेच्या पेटीत ठेवलं होतं तेव्हा अाजुबाजुला कापसाची गादी केली होती. कदाचित त्यामुळे त्याला ढगांची इतकी अोढ असावी ,असा माझा अापला अंदाज. पाऊस अाला कि हातातलं काम सोडुन पाहुणा अाल्यागत त्याचा पाहुणचार करायचा. म्हणे "पाऊस चालु असतांना जर भिजलं नाही किंवा खिडकीत बसुन पाऊस पाहिला नाही तर पावसाचा अनादर होतो" . मी म्हणालो "राया, मग थंडीत स्वेटर नको घालु, उन्हाळ्यात दुपारच्याला टळटळीत ऊन खा. ह्यांना अनादर नाही होय ?" मग तो म्हणायचा "कर मस्करी पण माझ्या अायुष्यातल्या महत्वाच्या गोष्टी पावसातच झाल्याय म्हणुन .... " त्याचं वाक्य अर्धवट राहिलं किंवा त्याने तसं ठेवलं. मग थोड्या वेळात तो परत बोलायला लागला " कुठल्याशा वैदुच्या नादी लागुन अाप्पांनी घरातल्या बाळंतपणं घरीच केली. बाळाच जन्म नैसर्गिकचं व्हायला हवा असा त्यांचा हट्ट.तसंही अामच्या खेड्यामध्ये फार सुविधा नव्हत्या. शहरात जायला अाधी कच्ची पायवाट मग बैलगाडी अाणि नंतर दोन बस अासा प्रवास करावा लागे. अाधीच दोनदा मेलेले थंड गोळे जन्माला घातले म्हणुन अामच्या अाईला शंभर बोल ऎकावे लागायचे. माझ्यावेळी तसं झालं नाही. थडथडत्या उडत्या टाळु ने मी जन्म-मृत्यु मधला तोल सांभाळला. अाणि अंगावर हिरव्या टपो-या नसा मोजत अाई झोपी गेली. परत माझे रडणे थांबेना म्हणुन विरोध पत्करुन मला जगवायला अाईने शहराचा रस्ता धरला. तेव्हा वाटेत पाऊस होता. नंतर मोठा होत गेलो. उनाड होतोच पण अभ्यास कधी चुकवला नाही. पण एकदा शाळेची पिशवी अाणि पुस्तकं अोली केली म्हणुन शिक्षकाने अंगठे धरुन शाळेच्या पटांगणात उभं केलं.अाणि पहिल्यांदा शिक्षा झाली. तेव्हा पाऊस होता. डॉक्टर जसे दिवसातुन दोन-तीन वेळा अौषध देतो तसा अौषधाला अामच्या गावात तीन वेळा वीज यायची. त्यातही रात्री नसायचीच. तेव्हा दुर खिडकीत 'ती' पहिल्यांदा दिसली अाणि कंदिलाची ज्योत वर-खाली करुन अामचे सावल्यांचे संवाद रंगले. तेव्हा पाऊस होता. दुरुन बघण्या-लाजण्या पलिकडे काही झालं नाही.ती वेळ-वय-काळ तसाच होता. मी पुढच्या शिक्षणासाठी शहरी अालो. तीच्याही दारात मंडप सजला. मी लग्नाला जाऊ शकलो नाही पण सुमीने पत्रात तिच्या लग्नाबद्दल कळवलं होतं.अाणि हे ही कळवलं होतं कि तिच्या निरोपाच्या वेळी पाऊस होता. नोकरीही शोधली मनासारखी , मनासारख्या शहरात शोधली. मुलाखतीच्या पहिल्या दिवशी सगळ्या टापटिप गर्दीमध्ये मीच एकटा मार्तंडबा दिसत होतो. कारण त्या दिवशीही पाऊस होता. अाताशा दहा वर्ष झाली नोकरीला. काम-पगार-जबाबदा-या वाढत गेल्या. फक्त त्यांचा क्रम उलट-पालट झाला इतकंच. मग अाई-अाप्पानी स्थळं शोधलं अाणि एक चंद्र माझ्या अाभाळात चिकटवुन दिला. अाई-बाप म्हणाले बस झालं अाता जवळपासच्या शहरात नोकरी शोध. दुरच्या शहरात वेगळी भाषा, वेगळे वळण , वेगळ्या पद्धती ह्या भोळीला मानवतील नाही मानवतील देव जाणे. पण अामच्या गावी म्हणावा तसा पाऊस नाही पण हे कारण देणंही शक्य तर नव्हतं.माझाही चंग नव्हता पण प्रयत्न करायला काय जातंय म्हणुन तिला विचारुन पाहिलं. ती तशी शिकली सवरलेली पण खुप नोकरी वैगेरेचा तिचा अट्टहास नव्हता.अगदी साधारण चारचौघाचं असतं तसं अामचं जोडपं. तिच्या अाणि घरच्या संमतीने अाहे त्याच पावसात ...अ ! अाय मीन अाहे त्याच शहरात अाम्ही राहु लागलो. तीला हवं तसं हवं तितकं घर सजवु दिलं. संगीताची अावड म्हणुन तशी शिकवणी सुरु केली. पण अगदीच गावाकडुन नव्या शहरात ते ही तिस-याच भाषेत त्या मुळे हळुहळु तिची छुपी नाराजी दिसु लागली. तशी तीने कधी बोलुनही दाखवली नाही.पण मलाच ती गोष्ट कधी कधी खटकायची. सवय झालं की सगळं सुरळीत होईल ह्या अाशेवर अाम्ही दोघेही होतो. ती जिव
तोडुन सवय लाऊ पहात होती अाणि तिचा हा असा जिव तोडणं मला अावडत नव्हतं. मग शेवटी निर्णय घेतला माझं अावडतं शहर जिथे मी म्हातारा होण्याचे स्वप्न पाहिले होते ते सोडायचा अाणि तिला विचारलं " राणी, हे शहर सोडुया का? अापण अापल्या गावाजवळच्या शहरात जाऊया ? हे बघ अाजच पेपरला एक जाहिरात अालीय. मोठ्या कंपनीत ,माझ्याच हुद्दयाचे अाणि इतक्या किंवा देवाच्या कृपेने जास्त पगारात मिळु शकेल नोकरी. पुढच्या अाठवड्यात मुलाखत अाहे. तू म्हणत असशील तर जाऊया का? " ती जास्त काही बोल्ली नाही पण तीच्या डोळ्यात पाऊस होता.
 - प्राजक्त
दै सामना-२१/जून'१४


http://epaper.saamana.com/Details.aspx?id=50478&boxid=235445234 )



Friday, June 13, 2014

लपाछपी

जर्मनीला चक्कर झाला की मी नेहमी 'त्या' जागेला भेट देतो ज्या जागेमुळे जर्मनीला मला नेहमी यावंस वाटतं. अाताशा त्या ठिकाणी फक्त बर्फ अाहे अाणि 'तो' बाकडा बर्फात अऱ्धवट झाकला गेलाय. पण तो दिवस लख्ख होता.अाभाळालाही तांबड्या रंगाचा हेवा वाटेल इतक्या गडद गुलमोहराच्या झाडाखालची गर्दी पांगली. गर्दी अाता पलिकडे जेवणावळींच्या टेबलाकडे जमा होत होती. अाणि हिरव्याकंच हिरवळीवरची गर्दी कमी झाली तेव्हा एका लाकडी बाकड्यावर तळ्याजवळ एक शुभ्र केसांचा एक वृद्ध माणुस ढग तरंगावा तसा अलगद बसला होता.
मी तळ्याच्या कडेने जाता जाता त्याने मला अावाज देऊन जवळ बोलावलं. मग बाकड्यावर थाप मारत म्हणाला 'बैस,बैस कुठे जायची घाई अाहे का ? ' मी हो-नाही म्हणायचा अात तो परत म्हणाला 'तरी बैस तू'
मग तळ्यातल्या बदकांकडे बोट दाखवुन म्हणाला ' अापले विचार असे पाहिजे, म्हणजे वरती अगदी संथपणे पुढे-पुढे जात राहायचं पण खाली पाण्यामधे विचारांचे 'पॅडलिंग' अविरत चालु.कळ्ळं का ? ' मी नाही म्हणुन कुठे जाणार होतो. तीसेक सेकंदाची विचित्र शांतता गेल्यावर मी निघायच्या तयारीचे हावभाव केले. तो म्हणाला ' बैस अजुन थोडावेळ, माझ्या ९९व्या वाढदिवसाचं गिफ्ट समजुन दे पण बैस'. मग कळालं कि थोड्यावेळापुर्वी जी गर्दी दिसली ती त्याच्या वाढदिवसाची पार्टीची होती. कुठेशा दुस-या देशात राहणारी त्याची मुलं-नातवंड येतात अाणि ह्याचा वाढदिवस साजरा करतात. सगळ्यांच्या सुट्ट्यांच निमित्त झालेला तो काही म्हणत नाही. अाला दिवस वारा वाहुन जावा तसा निघुन जातो.तसंहीपरदेशात भारतासारखी एकत्र कुटूंब पद्धती नाही. शाळा-कॉलेजात गेले की मुलं वेगळ्या घरात राहायला निघुन जातात. म्युनिक मध्ये १९७२ मध्ये झालेल्या अॉलंपिक दरम्यानच्या अातंकी हल्ल्यामध्ये अनेक लोकांमध्ये जर्मनीचा एक पोलीस मारला गेला. जो मारला गेला तो ह्या वृद्धाचा जवळचा मित्र अाणि त्याच्या बायकोचा भाऊ होता. ह्याच धक्क्यात त्याची बायको हे जग सोडुन गेली. तेव्हा पासुन हा एकटाच राहतो. अापल्या गरजा अाणि सोयी बघत अाजुबाजूचे लोक-नातेवाईक एकेक करत निघुन गेले. तो त्याच्या बायकोच्या अाठवणी सांगायचा. " ....मी कधी वैतागुन घरी अालो तर ती म्हणायची कि कशाला वैतागतो तू ? तुझ्या कपाळाच्या अाठीला तळहाताच्या रेषा बनवते, अाधी सांग तरी काय झालं " तो सांगायचा " मी ह्या तळ्याजवळ येऊन का बसतो माहिती अाहे ? माझ्या बायकोला इथे एक तळं अाहे 'दर बोदेनसी' नावाचं ते खूप अावडायचं. अतिअानंदाच्या डोंगरावर असली तरी किंवा नैराश्याच्या दरीत असली तरी एखादी संध्याकाळ तिला त्या तळ्याकाठी घालवलेली अावडायची. जेव्हा बायको तिच्या भावाच्या अाठवणीने व्याकुळ होऊन पडुन रहायची. मग डाव्या कुशीवर वळुन तशीच झोपी जायची तेव्हा तिच्या उजव्या नाकाजवळ वाहिलेल्या अश्रुंच छोटंस तळं साचायचं. आह ! दॅट वॉज माय दर बोदेनसी " अजुनही तो क्षण अाठवला कि लहानपणी पावसाळ्यात सापडलेला रांगणारा पैसा हातावर घेतल्यावर जसा काटा यायचा तसा काटा येतो. त्याने सांगितलं होतं " माझी लहान मुलं अाणि अाम्ही तिकडे तळ्याच्या काठावर झाडाच्या अाडोशाला लपाछपी खेळायचो. बायको म्हणायची निट शंभर मोजा मग या. मी दहा-वीस न म्हणता फक्त शंभर अोरडायचो अाणि पळायचो तर बायको-मुलं मला चिडका-चिडका म्हणत मारायला धावायची अाणि अामचा लपाछपीचा डाव पकडा-पकडीमध्ये कधी बदलायचा कळायचं नाही. मग ती मला नीट मोजुन दाखवायची हे बघा असं असतं म्हणायचं - 'दहा,वीस....., नव्वद, शंभर. येऊ क्का ???' असं निट मोजुन विचारायचं असतं कि येऊ का ? "
त्यादिवशी जेव्हा त्याचा वाढदिवस होता अाणि त्याने मला शेजारी बसवलं होतं , त्या दिवशी त्याने शेवटंच वाक्य जे मला सांगितलं त्या गोष्टीमुळे तयार झालेला पोटातला खड्डा अाजतागायत भरला नाहीए.
तो म्हणाला होता " अाता एकट्याने देवासोबत लपाछपी खेळतोय.राज्य माझ्यावरच अाहे. " मग वरती पहात तो म्हणाला " पंच्याण्णव ,शहाण्णव, सत्तयाण्णव ,अठ्ठ्याण्णव ,नव्व्याण्णव, शंभर...... येऊ क्का ??? "
कदाचित परत रडीचा डाव खेळुन त्याला देवाला फसवुन वर जायचं असेल किंवा कुणीतरी चिडका-चिडका म्हणत त्याला मारायला येईल असं त्याला वाटतं असेल. - प्राजक्त
(दै सामना १४ जुन २०१४ )
( http://epaper.saamana.com/Details.aspx?id=50259&boxid=14020 )

Saturday, June 7, 2014

कार्डिफ नोबडी

त्या छोट्याशा समुद्रकाठच्या गावात जितक्या दूर नजर जाईल तिथे उंच नारळाची झाडं, कौलारु घरं अाणि चर्च इतकंच दिसायचं. तिथेच एक तिरपांगड्या स्वभावाचा माणुस रहात होता. त्याचा जन्म मुळ इंग्लंडजवळ असलेल्या बेटावर.देशाचं नाव वेल्स.त्या वेल्स देशाच्या कार्डिफ ह्या राजधानीत रहायचा म्हणे म्हणुन त्याला सगळे कार्डिफ म्हणायचे अाणि नाव विचारलं तर नोबडी म्हणायचा.म्हणुन त्याचं नाव पडलं कार्डिफ नोबडी. मुलं त्याकडे इंग्लीश शिकायला यायची.अाणि हा बहाद्दरच्या एका हातात वाईन अाणि दुस-या हातात शेक्सपिअर. एक वेळ सुर्याच्या तोंडात थर्मामीटर ठेऊन त्याचा ताप मोजणं शक्य होतं पण कार्डिफ इतक्या लांबच्या देशातुन इकडे भारतात का अाला? ह्याच छोट्या खेड्यात का स्थिरावला? एकटाच का? ह्या प्रश्नांची उत्तरं केवळं अशक्य. मुलांना पण त्याची मजा यायची. कुणी उशीरा अालं कि हा अोरडायचा "बघा कोण अालंय?प्रिंन्स अॉफ वेल्स. गुड इविनिंग माय लॉर्ड! उठा रे रांडिच्यांन्नो सलाम ठोका. बो डाऊन टु द प्रिंन्स " असं म्हणुन तो अक्षरश: सर्वांना राजेशाही सलाम ठोकायला लावायचा. लाजिरवाणा होतं पुन्हा तो विद्यार्थी उशीरा यायचा टाळायचाच. एकदा शेजारच्या विठु कामत ने जास्तीच दुध त्याच्या मांजरीला दिलं तर चवताळलाच. म्हणे "हाऊ डेअर यु टु फिड माय एन्जल? तू पाजलं म्हणुन ती काय तुझ्या घरचे पिशाच्च नाही पळवणार ! शी इज माइन अाणि अाय एम पजेसिव अबाऊट हर". तर असा नोबडि कार्डिफ. अस्खलित मराठी बोलणारा. भांडणावर अाला की मुळ वेल्श भाषेत दानपट्टा सुरू. त्याचा त्याच्या मांजरेवर भारी लळा.एकदा काय जाणवलं कुणास ठाऊक? सगळ्यांना म्हणाला अाज अभ्यास बंद. मग खिशातुन बोचकाभर नोटा देत एका पोराला त्याने फेनीच्या बाटल्या अाणायला लावल्या अाणि दुस-या खिशातुन नोटा देत पेस्ट्री.अाणि म्हणाला " लेट्स हॅव पार्टी !" अाठवड्यानंतर कळालं कि त्याच्या प्रेगनंट एन्जलने अाभाळाच्या पुंजक्यांसारख्या पाच लुशलुशीत पिलांना जन्म दिला म्हणुन अानंदोत्सव. पाच मधली दोन जन्मताच मेली.एक तीने स्वत: खाल्लं. उरली दोन पिल्लं. वा-यामुळे एखादा कापसाचा बोळा घरभर लवंडत राहतो तशी ती पिल्लं घरभर फिरत राहायची.कधी एखादं पिल्लु हरवलं तर मांजर दिवस भर म्याव म्याव करत घर डोक्यावर घेतसे. कधीतरी कार्डीफ मुद्दाम एखादं पिल्लु लपवुन एन्जलची थोडी मजा करत असे.कधी कार्डिफ एखाद्या पिल्ला हाताशी खेळवत शिकवायचा." घ्या अाजचा शब्द घ्या. हायराएथ.H-I-R-E-T-H. "
"Hiraeth (n.) Homesickness for a home to which you cannot return, the grief for the lost places of your past.The Nostalgia for a place which may be never exist. म्हणजे अशी जागा जिथे तुम्ही कधी परतुन जाऊ शकत नाही. किंवा अशा गोष्टीचं दुख: जे कदाचित अस्तित्वातही नसावं. " हा शब्द देतांना त्याचा कंठ उगाच दाटुन अाल्या सारखा झाला अाणि त्या मांजरीच्या पिल्लाखाली सोडुन शेजारच्या टेबलावरचा वाईनचा ग्लास घशात उपडा केला. पहिला कडवट घटस्फोट.अाणि नंतर स्वत:च्या मुलीशी भेटायला पोलिस परवाना.नंतर मैत्रिणीने दिलेला धोका .मग धंद्यात मोठा तोटा.
कार्डिफ लग्नासाठी मागे लागेल म्हणुन पोटातलं बाळं कार्डिफला न सांगता पाडलं. ह्या धक्कयामुळे कार्डिफ कधीच सावरला नाही. शेवटी तो वाट फुटेल तिकडे निघाला अाणि शेवटी इथे स्थिरावला.एका संध्याकाळी एक पिल्लु अाजारी पडलं म्हणुन कार्डिफने शिकवणी थांबवली एक मुलाला त्याच्या फियाटची चावी देत म्हणाला "जा पटकन वेटरनरीचे डॉक्टर शहा ला घेउन ये" तो निघाला तितक्यात चाकाखाली ठिसुळ विट फुटल्याचा अावाज अाला.बाहेर येउन पाहिलं तर चाकाखाली झोपलेलं दुसरं पिल्लु लाल थारोळ्यात पडलं होतं.कार्डिफने घाई केली पण उशीर झाला होता. कार्डिफने सगळं साफ करुन शिकवणीला सुट्टी दिली.अाणि संध्याकाळी दारामध्ये हताश बसला. एन्जल घरभर म्याव करत डोकावुन हरवलेलं पिल्लु शोधत थकुन कार्डिफ शेजारीच दारात म्याव म्याव करत हाका मारात बसली. तितक्यात एक मुलगा धावत अाला,म्हणाला , " सॉरी सर अाज जमलं नाही शिकवणीला.पाहुणे अाले होते.अाजचा शब्द सांगता का प्लीज?" एन्जलच्या म्याव म्याव मधुन वाट काढत कार्डिफचा शुन्यपणे म्हणाला "हायराएथ.H-I-R-E-T-H. म्हणजे अशी जागा जिथे तुम्ही कधी परतुन जाऊ शकत नाही. किंवा अशा गोष्टीचं दुख: जे कदाचित अस्तित्वातही नसावं."

- प्राजक्त 
(दै सामना ०७/०६/१४)
http://epaper.saamana.com/Details.aspx?id=50038&boxid=2111562 )

अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...