सोबत दोन बॅग,दोन्ही हातात एक वितभर हिरव्या बांगड्या अाणि दोन वितभर मेहंदी.कपाळावर अाठ्या,मोठ्या प्रयासाने थांबवलेल्या हुंदक्यामुळे थरथरणारी हनुवटी.अशी ती एकटी.तिचा पती अाधीच नव्या घरी गेला होता अाणि नविन कंपनी असल्यामुळे अाणि नविन घराच्या कागदपत्रांच्या तजविज करायला तो जरा लौकरच गेला होता.अाणि अाता ती अाठवड्याच्या अंतराने चालली होती
.विमानतळाच्या चेक-इन काऊंटरवर तिला विचारलं "लगेज अाणि हॅंडबॅग्ज् किती?" तीने फक्त हाताने दाखवलं.तिथेच सुचना म्हणुन हॅंडबॅगमध्ये कोणत्या गोष्टी वर्ज्य अाहे ते लिहलं होतं.काही रोजच्या वापरातल्या वस्तु पण त्यासुद्धा स्फोटक ठरु शकतात म्हणुन त्या न्यायला मनाई होती.तीला जुने दिवस अाठवले,'तो' म्हणायचा "डोकं शांत ठेव नाहीतर एअरपोर्टवर जातांना "content can be explosive" असा शिक्का मारुन नेऊ देणार नाही. पहाट अाणि सकाळच्या मधला जो न सांगता येणारा प्रहर असतो तसंच न सांगता येणार नातं होतं त्या दोघांमध्ये. मग नंतर दोघांनी एकाच अाभाळाखाली वेगवेगळी गावं वसवली. काही दिवसांपुर्वी तीला जेव्हा सांगण्यात अालं कि तीला तिचा नव्यानेच सुरु केलेला संसार (काळजातल्या धाकधुकीसहित) दुरदेशी करायचाय तेव्हा तिच्या श्वासांची थरथर वाढली.तिचं असं व्हायचं.....कधी कधी अपरिचीत अानंदाच्या किंवा अपरिचीत चिंतेच्या अाधी थरथर व्हायची. तिला जेव्हा हे कळालं तेव्हा ती अंगणात बसुन कागदाच्या होड्या सोडत होती.पावसाने नुकतेच डोळे मिटावे तसा पाऊस अोसरला होता पण बोचरी भूरभूर चालु होती. मग तिने शेवटची होडी बनवली अाणि डोळे मिटले.डोळे मिटल्यामुळे डोळ्यातुन पाझरणा-या धारेचा अोघ तुटला अाणि एक थेंब बनुन होडीत पडला. किती तरी वेळ ती त्या जाणा-या होडीकडे बघत बसली. मध्ये होडी थांबली,कलंडली कि अधीर राधेसारखी धावत जाऊन ती सरळ करायची.तिच्या मैत्रीणीने ते पाहिलं अाणि म्हणाली "निरोप दिल्यानंतर प्रवासाभर सोबत करशील तर निरोपाला काय अर्थ राहतो ग" अाता पर्यंत रोखुन धरलेला डोळ्याचा बांध,मोठी लाट यावा तसा फुटला अाणि ती अाल्या पावली धावत माघारी पळाली. ती पळतांना पावसाचे थेंब पैंजणासारखा अावाज करताय कि पैंजणातले घुंगरु पाऊसथेंबासारखे निथळताय इतकी गल्लत व्हायला झाली तिच्या धावणा-या पायांकडे बघतांना. "प्रवासात एखादं गाव जर अावडलं तर अापण कायमचं मुक्कामी राहतो का ? म्हणुन तुला इथलं सगळं इथेच विसरावं लागेल" तीची मैत्रीण तिला म्हणाली. त्यावर ती म्हणाली " प्रवासात गाव अावडला म्हणुन माझ्याकडंच सगळं बोचकं तिथेच ठेउन प्रवास सुरु करायचा ठरवलाय मी.कधी माहित नाही पण परतायचं ठरलं तर हक्काचं अाभाळ हवं म्हणुन.पुर्णत्वाला पोचल्यावर तसाही नंतरचा प्रवास , हा प्रवास नाही अौपचारिकता उरते." ह्या विचारांचे चक्र अविरत चालु असतांना एव्हाना विमानतळावरच्या सुरक्षेच्या अाणि सामानाच्या सगळ्या अौपचारिकता पुर्ण करुन ती अाता विमान येण्याची वाट बघत वेटिंग रुम मध्ये बसली होती. परत अनाउंसमेट झाली कि विमान गेट नं अाय-२ वरुन अाय-१ ला येणार अाहे तरी प्रवाशांनी तशी नोंद घ्यावी. तिने परत विचार केला कि तेच तर झालंय दोनातून एक अाणि पुन्हा एकाचे दोन. तिचा प्रवास सुरु झाला.अाणि सुसाट वा-यामुळे पिंपळपानाने हवेत गिरकी घ्यावी अाणि अाता प्रवास कोणत्याही पैलतीराशी संपेल ह्या समर्पण भावनेत तीचा प्रवास सुरु झाला. नवीन घरात पोचल्यावर सगळंच को-या को-या वहीसारखं वाटायला लागलं. तिकडच्या पावसाने परत इकडे तिच्या अंगणात हजेरी लावली तेव्हा उगाच कुणीतरी अोळखीच भेटल्याचा अानंद तिला झाला. तिची मैत्रीण , म्हणजेच तीचं प्रतिबिंब जे कधी पावसाच्या साचलेल्या पाण्यातुन तिच्याशी बोलायचं ,कधी अारशामधुन बोलायचं ,कधी खिडकिच्या काचेतुन बोलायचं , ती मैत्रीणीने तिला विचारलं "अाल्या अाल्या सगळ्यात अाधी काय थाटणार ? स्वैपाकघर कि अंगण? " ही म्हणाली "देवघर" तीने विचारलं "पण देव-देव्हारा तर अाणलाच नाहीस तू.ठेवणार काय?" ती म्हणाली "मोरपीस" अाणि तीने एक मोरपीस दाखवलं. तीची मैत्रीण म्हणाली "सगळ्या जुन्या गाठ्योड्याला गाठ मारुन यायाला लावलं होतं ना मी ? " तितक्यात पलीकडच्या गल्लीत पावसात खेळणा-या मुलांनी सोडलेली एक कागदी होडी तिच्या पायाशी येउन थांबली. ती उचलतांना ही म्हणाली "दुसरी गाठ मारतांना कितीही बोट ठेवलं तरी पहिली गाठ जराशी सैल होतेच ना?"
- प्राजक्त
दै सामना २८ जून १४
( http://216.15.199.42/dainiksaamana/Details.aspx?id=50698&boxid=221742187 )