Friday, February 20, 2015

लेटर जर्नी - बॅकबेंचर्स (सामना २१/०२/१५)

प्रिय बंक्या ,
शेवटी मी शहराच्या कॉलेजात पोचलो. तू पाहिजे होतास,गड्या. तुझी पत्र लिहायची डॉकेलीटी भन्नाट अाहे. अाज पहिला दिवस होता म्हणुन लगेच हॉस्टेलवर अाल्या अाल्या पत्राला बसलो. शप्पथ सांगतो इथल्या बिल्डींगी लै भैताड उंच अाहे. अाज एक दोन मित्र झाले. त्यातला एक शिग्रेट पीतो. अाठवतं का एकदा अापण मुंजोबाच्या मागे लपून अोढली होती. तुझ्या रावण बापाने अापल्या दोघांच्या कानाखाली अोढली होती. तू पाहिजे होतास,ल्येका. अाज काहीच झालं नाही कॉलेजात फक्त अोळखी करुन घेतल्या. एक मुलगी म्हणाली तू समशेर बुद्रूक चा अाहेस ? माझ्या शेजारच्या काकूंच माहेर अाहे ते. मला काहीच कळालं नाही ती काय म्हणाली नेमकं. छातीत अापण वडाच्या झाडाला जसे झोके घेतो तशी धडधड होत होती. अापण गावाकडच्या पोरींना काहीबाही बोलतो. इकडं भीती वाटली . पण सोबतचा मित्राने सांगितलं कि ती काय म्हणाली. माझा  हॉस्टेल रुमपार्टनर एकदम भारी अाहे. त्याच्याकडे गाडी पण अाहे . अाम्ही दोघं त्याच्या गाडीवरुन रात्री पिक्चरला गेलो होतो. जत्रेत दाखवतात तसा मोठा पडदा होता.त्यात एक गाडीला अाग लागली तेव्हा पळुन जाणार होतो इतकी खरा वाटला मला तो पडदा. रात्री परत अालो तर सगळै सिनीअर लोकं जमले होते. त्यांना अोळख करुन घ्यायची होती नवीन पोरांसोबत. मग कुणीतरी म्हणालं अोळख बिळख काही नाही ह्याला रॅगिंग म्हणतात. एका मुलाला काडेपेटीच्या काडीने पुर्ण खोलीचं माप काढायला सांगितलं. एकाला भिंतीला टेकुन उभं केलं अाणि भिंतीपासुन लांब न होता पाय धरायला सांगितले. तो सारखा पडायचा अाणि सगळे हसायचे. सिगारेटमुळे खोलीत इतका धुर झाला होता कि थोडावेळ मी अापल्या परसा खालच्या शेतात पहाटे पहाटे अालोय असंच वाटलं. मला एक गाणं म्हणायला लावलं. मी मामा ने शिकवलेलं वसंत देशपांडेचं 'घेई छंद मकरंद' म्हणटलं. तर ते बोर झाले लगेच पुढच्या मुलाकडे वळाले. मामा ने वाचवलं बघ.
तुझं कॉलेज चालु झालं का? उत्तर लिही. तू पाहिजे होता भैताड मजा केली असती.


तुझा दोस्त
माऊली


दै सामना बॅकबेंचर्स २१/०२/१५ 

Thursday, February 19, 2015

अापसातील ( मटा २० फेब १५)


.......
“……पण मी काय म्हणते ? मुलं नोकरीधंद्याला लागली कि अाईवडिलांनी अापले निर्णय लादु नये ना? देवाने अक्कल दिली अाहे ना? काय वाटतं तुला ?" माझ बसमधला प्रवास चालु होता तेव्हा शेजारी बसलेल्या एका टापटाप मुलीशी जुजबी अोळख निघाली “अोह यां यां ! तुमच्या मागच्या वी-चारच्या प्रयोगाला अाले होते मी,मस्तच झाला होता शो” नंतर अोळख अजुन वाढली कारण “अरेच्या तुम्ही तमक्याचे-अमुकांचे-फलाण्याचे-ढिकणे अाहात ? धिस इज अमेझिंग ! सच्च अ स्मॉल वर्ल्ड ! ” मग मला जेव्हा तिने अापणचा,तुम्हीचा,तू केला त्यानंतर तिने तिच्या चिडचिडीची रद्दीच बाहेर काढली. (मनात म्हटली ही असेल ‘हां भैय्या तोलो इसको अौर बतावो कितना दिया. इंग्लीश पेपर हय हां निटसे बतावो ) तिच्या बापुड्या अाईला म्हणे मागल्या मंगळवारी स्वप्न पडलं होतं कि मुलीची तब्येत ठिक नाही. मग अाईने हिच्याकडे धोशा लावला कि 'एकदा येऊन जा.नजरे खालुन गेली म्हणजे बरं असतं.’ असं उगाच काहीही कारण काढुन बोलवलं म्हणुन ह्या देवीचा त्रागा चालु होता. नंतर हिने तिच्या आणि आईमधलं आपसातील झालेली भांडणं ती कशी जिंकली हे सांगत माझ्या १७ डुलक्या वाया घालवल्या. नशिबाने देवी पुढ्च्या स्थानकावर अंतर्धान पावल्या. परत मला डुलकी लागली. प्रवासातली माझी झोप ही इतकी शिघ्र अाहे कि ‘पुढे गतीरोधक अाहे’ ह्या पाटीनंतर जेव्हा खराखु-या गतिरोधकावर गाडी अादळते तेव्हा माझी झोप मोडलेली असु शकते. असो. तर मुद्दा असा कि माझा बस मधला कंटाळवाणा प्रवास चालुच होता. नंतर एक उभा असलेला गृहस्थ माझ्या शेजारी बसला. तो शेतकरी होता हे त्याने ‘व्यापा-याकडुन पैसे अाणयला गेलो होतो मुंबईला. पण भूंड्या पावसामुळे खप नाही पाहिजे तसा. म्हणुन नाही मिळाले पैसे…’ हे सांगितल्यावर कळालं. मध्ये-मध्ये थोडा कंटाळा अाला कि मी मोबाईल वरुन फेसबुक चाळत होतो. अाताशा कोणी कधी कसं वागावं ह्याला ताळमेळच राहिला नाही. म्हणजे बघा हिवाळ्यात पाऊस पडतोय , पावसाळ्यात ठिक्कं ऊन होतं , हां उन्हाळ्यात सुर्य जरा दहा-तेरा हजार किमी अलीकडे सरकलाय कि काय इतकं ऊन होतं. मग अशातच अगदी नको तेव्हा ,नको तितका पाऊस अाला कि कुणीतरी बरळतं फेसबुकवरुन “wow its pakoda time….Feeling चिंब-बिंब वगैरे” .पुर्वी लोक काही घडले कि लोकांना सांगायचे. अाता ह्या सोशल नेटवर्किंगमुळे लोकांना सांगायला काहीतरी घडवतात. प्रवास चालुच होता.मला प्रवासात खिडकी व्यतिरिक्त कोणाशी बोलायला अावडत नाही. मी शेजारच्या काकांकडुन पेपर घेतला अाणि वाचत बसलो.  “यंदा राज्यात सरासरी पेक्षा जास्तच आठ्या पडल्या”.सगळीकडे किचकीच वगैरे….कुणी कडमडलं...कुणी बडबडलं…..काहींचं तोंड वाकडं झालं. सालाबादाप्रमाणे विठ्ठलाला साकडं झालं. मग सरकारने स्थापलेल्या बारा सदस्यीय समितीने बॅंकॉक अाणि पट्टायाला अभ्यास दौरा काढला.  बारा सदस्यांनी बारा महिन्यांतुन वेळ टोलवत कसाबसा डिसेंबरात दौरा अाटोपला. डिसेंबरअखेर अहवाल अालासुद्धा. निष्कर्ष पुढिलप्रमाणे : 
'हवामानाचा पॅटर्न बदललाय त्याला कोण काय करणार ? 'बिटी चिंतांच्या' बी-बियाणांची पैदास तणमाजोरी झालीय. अतीवापरामुळे मातीचा पोत अाणि पत खाली आलीय. अाताशा ‘मुठी’ उगवण्यागत मातीची पत राहिली नाही. 'अाता कोणती पिके घ्यावी?’ ह्यावर अनेक राष्ट्रांकडुन स्वयंस्पष्ट मतं मागावलीय. तोवर बारा सदस्यीय समितीला परत सिंगापुर,इंडोनेशिया अाणि बॅंकॉकचा अर्धवट सोडुन यावा लागलेला दौरा करावा लागेल. परवानगी मिळावी. संबंधित दस्ताऎवज जोडलेला. अभ्यास दौरा करतांना काही नागरिकांचे मत नोंदवले अाहे त्यातील एका नागरिकाचे मत पुढीलप्रमाणे. एक जख्खड वृद्ध ज्याच्याकडे जमीन जुमला म्हणुन एक चिमटीतली आणि एक कानशिलामागची बिड़ी होती. त्या वृद्धाने सांगितलंय कि
जिथे प्रश्न रुजतात तो मातीच्या ‘टोपोसाईलचा’ थर, जिथे सर्वाधिक उपयुक्त पोषक घटक असतात तो उघडा पडलाय.
नव्याने कोणताही अादर्श ह्या मातीत रुजवला गेला नसल्याने अाणि मातीमध्ये उपजत असलेल्या पोषक घटकाची प्रमाणापेक्षा जास्त शोषण झाल्याने Nutrient Defeciency तयार झाली अाहे. अाणि ह्या अपुर्ण पोषित किंवा कुपोषित मातीमधुन निघणा-या वाफेतुन जे काही ढग तयार झाले अाहेत त्या ढगांमुळेच यंदा राज्यात सरासरीपेक्षा जास्त अाठ्या पडल्या अाहे. नव्या अादर्शांचा अतिरिक्त पुरवठा करणे क्रमप्राप्त अाहे परंतु त्याचाही अनुषेश इतक्यात भरुन निघेल अशी शक्यता कमीच." 
गाडीने एकदम ब्रेक मारला. आणि मी  क्रांतीकारी झोपेतून जागा झालो. पेपर तसाच हातात होता. सरासरीपेक्षा जास्त पावसाची बातमी आणि बाहेरचं वातावरण एकमेकांना पुरक होतं. मुंबई महामार्ग स्थानक जवळ येत होतं. मी शेजारच्या काकांना विचारलं 'तुम्ही दरवर्षी वारीला जातात पण दर वर्षी काहीतरी तक्रार असतेच. कधी घशाला कोरड पडावी इतका दुष्काळ तर कधी भरल्या ताटात धक्का लागुन चूकुन पाण्याचा ग्लास कलंडुन झालेला विचका. तरी का वाट पाहता दर वर्षी आषाढीवारीची ?  एव्हाना महामार्ग बस स्थानक आलं. पाऊस चालुच होता. मी पावसाचा जोर ओसरावा म्हणुन थांबुन राहीलो. काका पावसाची पर्वा न करत एका हाताने धोतर धरुन झपाझप पावलं टाकत दिसेनासे झाले. जाता जाता त्यांनी उत्तर दिलं "ते आमचं आपसातलं आहे" त्याच्या त्या उत्तरामध्ये मला आधी भेटलेली मुलगी आणि आता भेटलेले काका दोघं दिसले आणि काही ओळी मनात उमटल्या. 
पाऊस आला न आला , हे आमचे आम्ही पाहु.
ते विठ्ठल आणि माझे , आपसातील भांडण आहे. 
 ....लोकांच्या 'अापसातील'च्या व्याख्या किती बदलतात नाही ?

- प्राजक्त
( महाराष्ट्र टाईम्स २० फेब्रुबारी २०१५ )
http://epapermt.timesofindia.com/Article.aspx?eid=31833&articlexml=20022015004008

Friday, February 13, 2015

ज्याचा त्याचा वेलेंटाईन (मटा १४ फेब १५)


‘ती' कुठे असेल तिथे अानंदात असो. अाजच्या दिवशी मोटरसायकल काढुन एकट्याने ‘किशोर’ ऎकत अापल्याच तंद्रीत रपेट मारायला जायची.  कुठे तरी असलेल्या ‘त्या’चा वेलेंटाईन.

'माझ्यासाठी उन्हात उभं राहुन स्कीनचा टोन चार शेड ने डार्क केलाय ग त्याने. सांग ना ह्यावेळेस ‘हो’ म्हणुन का पिंट्याला ?’ असं काकुळतीला येऊन झिंपीने पिंकीला विचारलं. खरंतर स्किन, टोन, शेड अाणि डार्क असे चार इंग्लीश शब्द एकाच मराठी वाक्यात वापरणा-या झिंपीला प्रेमाबद्दल काही तत्वज्ञान सांगावं अाणि ते तिला कळेल अशी भोळी अाशा ठेवणा-यातली पिंकी नव्हतीच. तरीही डोळे लपलप लपलप करत कधी एकदा तो विचारेल अाणि झिंपी हो म्हणेल ह्या पवित्र्यात बसलेली झिंपी. हा झिंपीचा वेलेंटाईन.

‘गप ग तू, असं लगेच हो नसतं म्हणायचं. एकदा ‘होकार’ अाला कि अापण ‘टुकार’ होतो.’ असं पिंकीचं जगावेगळं तत्वज्ञान. पर्सच्या पुढच्या कप्प्यात एक , गाडीच्या डिक्कीत दोन अाणि सॉक्समधे लपवुन ठेवलेला तिसरा. छुप्या युद्धाला जायची तयारी करावी तशा तीन 'पेपर स्प्रे’ निशी तयारीत असलेली अाणि मनातल्या मनात “ अाज कोणी अडवुच द्या, नाही त्याच्या डोळ्याला फोडणी घातली तर नाव नाही सांगणार” असा जप करणारी पिंकी. हा पिंकीचा वेलेंटाईन.

'काहीही झालं तरी यंदा पिंकीला गुलाब द्यायचाच’ असा चंग बांधलेला चंगेज पिंट्या. कितीतरी दिवस, दिवस? दिवस कसले महिने, महिने? महिने कसले वर्ष उन्हा-तान्हात उभं राहुन पिंकीच्या मैत्रीणीकडे, झिंपीकडे पिंकीसाठी पत्र द्यावं असं मनात ठरवुन असलेला पिंट्या. अाता सरळ सरळ मुद्दयातच हात घालायचा अशा अविर्भावात श्वास रोखुन बसलेला पिंट्या. हा पिंट्याचा वेलेंटाईन.

तो’ जिथे असेल तिथे खुषीत असो. अाज किशोरच्या तंद्रीत जास्त लांब न जाअो. अापण मात्र अाजच्या दिवशी खिडकीशी बसुन एकट्याने ‘रफी’ ऎकत बसायचं. कुठेतरी असलेल्या ‘ती’चा वेलेंटाईन.

सोसायटीच्या पार्किंगमध्ये झिंपी नेहमीच्या ठिकाणी गाडी लावायला अाली कि एकच गाठ मारलेली दोरी अोढायची अाणि वरुन गुलाबाच्या पाकळ्यांचा पाऊसच पाऊस पाडायचा असा अत्यंत फिल्मी प्लान. पण वाढत्या धडधडीमुळे एकाच्या ऎवजी गोंधळात दोन गच्च गाठी मारुन दबा धरुन बसलेला मंग्या. हा मंग्याचा वेलेंटाईन.

“ह्ये काय नाष्ट्याला पुरणपोळी? टकुरं ठिकाणावर अाहे का ? अानी हे बघ मोठ्या साहेबांनी मोठ्या इश्वासाने वेलेंटाईनविरोधी पथकाचा प्रमुख केला हाये. सोत्ता:ला कृष्ण समजणा-या पोरांस्नी बासरीशिवाय अजुन येगळे पोकळ बांबु असत्यात हे दावुन देतो कि नाय पाय तू अाज.” मारक्या बैलासारखा दिसेल त्याला उडवणाच्या तयारीत असलेला मंग्याचा बाप. हा मंग्याच्या बापाचा वेलेंटाईन.

“ ‘हे' सकाळी लौकर जाणार म्हणत होते. म्हणुन पहाटेच उठुन पुरणपोळीच सारण लाटायला घेतलं”. हा मंग्याच्या अाईचा वेलेंटाईन.

वेलेंटाईनच्या दिवशी शहरात नसती गडबड असते. रिक्षास्टॅंडवर रिक्षा उभी न करता चहा टपरीजवळ उभी करु. शंभर-शंभर रुपये जास्त अाकारुन कोणालाच माहित नाही अशा ठिकाणी कस्टमरला घेऊन जाऊ. जे जास्त पैसे येतील त्यातुन पिंट्याच्या अाईला यंदा दिवाळी व्यतिरिक्त अाणखी एक साडी किंवा चांदीची मुरणी घेऊन देऊ. अशा अाशेत दुकानाबाहेर काचेतुन हाताचा खोपा करुन साडीचा काठपदर अाणि काठापदराला लटकलेलं किमतीच लेबल बघत बसणारा पिंट्याचा बाप. हा पिंट्याच्या बापाचा वेलेंटाईन.

“अाज तरी माझ्यावर एखादी प्रेमकविता जमणार अाहे का? निदान पुर्वी कोणासाठी केली असेल ती ऎकवली तरी चालेल. येऊ द्या चला.” माझ्या ‘ती’चा वेलेंटाईन.

चुकलंच सालं , प्रेमावरती कविता केली नाही । विशाल बुंधी झाडावरती 'बदाम' कोरले नाही । चुकलंच सालं. हा माझा वेलेंटाईन


 -प्राजक्त 
दै महाराष्ट्र टाईम्स् १४ फेब्रुवारी १५

http://epapermt.timesofindia.com/Article.aspx?eid=31833&articlexml=14022015004014 )

Thursday, February 5, 2015

पोस्टबॉक्स ( मटा ६ फेब १५)

नेहमी प्रमाणे सरकारी कामासाठी ठरवलेली वेळ देऊन अगदी ठरवल्याप्रमाणे मला एका अधिका-याने ताटकळत ठेवलं. अाता तासभर अंधुक खोली,पिवळसर भिंती,अंगात देवी अाल्यागत घुमणारा धुळकट पंखा अाणि लाल पट्ट्याच्या फाईलींचे ढिगारे बघत बसण्यापेक्षा मी बाहेर टपरीवर चहा मारायचा ठरवलं. बाहेर जिल्हा परिषद ,पोस्ट अॉफिस अाणि सीबीएस अगदी जवळ जवळ असल्याने नेहमीची यांत्रिक वर्दळ. कार पार्किंगला पोस्ट अॉफिससमोर कशीबशी जागा मिळाली होती.मग पोस्टअॉफीस समोरच गाडीजवळ टेकुन मी उसताद राशीद खानची ठुमरी मंद स्वरात लावुन मी घोट घेत बसलो. तिथेच पोस्टाजवळ एक गर्द झाडं अाहे तिथे सावलीमध्ये लाल पोस्टबॉक्स शेजारी  एका बाकड्यावर  एक मुलगा अाणि मुलगी बोलत बसले होते. चोरुन ऎकण्याचा विषयच नाही पण त्यांच्या गप्पाच इतक्या मोठ्या अावाजात होत्या कि ठुमरीवरुन माझं लक्ष उडालं. त्याच्या हातात दोन वह्या , खिशाला पेन अाणि शंकराच्या गळ्यात नाग लटकावा तसा हेडफोन लटकवलेला.अाणि तीच्या हातात कॉलेजबॅग वजा पर्स वजा हॅंडबॅग वजा असं बरंच काही. ते नेमकं काय हे मला कधीच कळालं नाही. तर तिचं म्हणणं असं होतं कि हिने त्याला सकाळी मेसेज केला अाणि 'दोन निळे टिक’ दिसले तरी ह्याने रिप्लाय का केला नाही. अाणि ह्याचं म्हणणं कि मी वाचलेच नाही. तिला इतकं रागवायचं कारणचं नाही कारण तो सुद्धा काही दिवसांपुर्वी रात्री चॅटींगला तिच्या रिप्ल्याची वाट बघत बसला तेव्हा बराच वेळ ‘…… is typing’  असं अर्धातास अालं. नंतर सकाळचा पेपरवाला अाला पण हिचा रिप्लाय अालाच नाही.
अाता माझ्यासमोर दोन ऎतिहासिक गोष्टी होत्या . एक म्हणजे अर्थातच हे माझ्या ठुमरीसाधनेत व्यत्यय अाणणारं ठुमरीद्वेषी 

जोडपं अाणि दुसरी म्हणजे पोस्ट बॉक्स. मला मजा वाटली. पुर्वी जेव्हा 'मेसेज पाठविणे’ म्हणजे फक्त खाकी कार्ड किंवा निळं अांतरदेशिय पत्र इतकंच होतं तेव्हा कल्पनाशक्तीला वाव होता. अाणि मुळात कमालीचा संयम होता. म्हणजे व्हायचं कसं पुर्वी मी अौरंगाबादेला बहिणीला पत्र लिहलं कि मनातल्या मनात मीच पत्र होऊन जायचो. अाज टाकलं म्हणजे उद्या प्रवास सुरु झाला. मग लाल गाडीतुन सिन्नर,येवला,वैजापूर करत चौथ्या दिवशी अौरंगाबादेच्या लालडब्यात. मग त्यात किती मुलींनी लाल पोस्टगाडी दिसली म्हणुन बोटांची अाढी घालुन मनाच्या इच्छा व्यक्त केल्या असतील ह्याचा हिशोब. पुर्वी मुलींचे खेळही किती खुळे अाणि लोभस होते (त्यावर नंतर कधीतरी बोलुच) मग अाता तिथल्या ‘पोस्ट्या’ने त्याच्या खाकी झोळीत अापलं पत्र घेतलं असेल अाणि सायकलवर टांग टाकली असेल. टांग टाकतांना पत्र पडणार तर नाही ना? खाकी झोळीला भोक तर नाही ना ? अशा शंका यायच्या. झाले पाच दिवस. झालं म्हणजे अाता हातात पडलं असेल. अाता ते साताठ वेळा वाचुन शनिवारी-रविवारी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तिकडुन उत्तर लिहलं जाईल. मग एकनाथ रंगमंदिराजवळ गुलमोहराच्या झाडाला लावलेल्या लालपेटीत पडेल. मग परत उलटा प्रवास सुरु. मग सगळे अंदाज बांधुन रविवारी येणार पत्र जर उशीराने मंगळवारी अालं. तर वेळ नसेल मिळाला,अाजारी असेल, अभ्यास असेल, टाकायला उशीर झाला असेल असे अंदाज बांधुन अापण सगळ्यात अाधी ‘अापल्या’ माणसाला दोषमुक्त करायचो. पण अाता? अाता सेकंदभराच्या विलंबासाठी अापण अापल्या माणसाला वेठीस धरतो. वेळप्रसंगी एकदा मी पोस्टमनशी भांडल्याचं अाठवतंय. तो पण भला होता हसुनहसुन समजुन घातली त्याने माझी. मग पत्र यायचं अाणि हे प्रश्नउत्तराचं एक वर्तुळ पुर्ण झालं कि हायसं वाटायचं अाणि दोन अाठवड्याची हुरहुर , नविन काही सांगण्यासारखं घडेपर्यंत शांत व्हायची. हा संयम , हा अापल्या लोकांना सगळ्यात अखेरीस दोषी ठरवण्याचा , हा अनोळखी माणसाशी लाडीक रागालोभाचा काळ सरला. जातांना ती त्याला काहीतरी म्हणाली . अाणि ह्याने जरा समजुत घालुन कसंबसं तिला शांत केलं. तीने सुद्धा "अाता ठिक अाहे परत केलंस तर याद राख’ अशा अविर्भावात स्कार्फ गुंडाळुन डावीकडे जाण्याचा इंडिकेटर न देत डावीकडे निघुन गेली.अाणि तो सुद्धा कानात हेडफोन घालुन सिग्नलला घरातल्या लोकांसारखं नावाला मान देत अर्धवट बोलण्यातुन निघुन जावा तसा हिरवा लागायला १२-११-१०-९ सेकंद होते हे पाहुन निघुन गेला. अशी लोक हेडफोनचे L अाणि R जितके सिरीअसली घेतात तितके जर त्यांना नात्यांना सिरीअसली घेता अालं असतं तर किती बरं झालं असतं.नाही?

- प्राजक्त

म.टा. ६ फेब्रुवारी १५

http://epapermt.timesofindia.com/Article.aspx?eid=31833&articlexml=06022015004017#

अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...