Friday, March 27, 2015

सेल्फी (मटा २८ मार्च २०१५)

देशाच्या कुठल्याशा कोप-यात काहीतरी अघटीत घडतं अाणि बातमी पसरते, चुकचुक पसरते, हळहळ पसरते. अाजकाल पोळीभाजी सोबत ताटात लोणचं नसलं तरी चालतं पण तोंडी लावायला टिव्ही पाहिजेच. अाणि ह्यात नवे म्हणु नका,जुने म्हणु नका प्रत्येकाचीच तशी लाईफस्टाईल झाली अाहे. होऊ देत पण वाईट ह्याचं वाटतं कि त्या बातम्यांमध्ये कोणाचा खुन पडो, इज्जतीचे धिंडवडे निघो कि निरागस डोळ्यांचा टाहो असो पण जेवतांना कोणालाच ठसका लागत नाही. गिळल्या घशात कोरड पडुन पाण्याचे दोन घोट कोणाला घ्यावेसे वाटतं नाही……..इतकं सगळं सवयीचं झालंय. 
गंगापुर रोडच्या चौकात चारचौघं गाड्या स्टॅंडवर लाऊन गप्पा मारत असतात. गप्पांचा विषय असतो कि शहरात जी फ्रि वायफाय झोनची घोषणा झाली त्यात कोणते कोणते ठिकाणं प्रामुख्याने यावे. तितक्यात समोर गळक्या पाण्याच्या टॅंकरमुळे जे पाणी पसरलंय त्यावरुन दोन बाईकस्वार घसरतात.घसरु देत पण वाईट हे वाटतं कि फुकट वायफायची घोषणा होणा-या शहरात अजुनही पिण्यासाठी टॅंकर फिरताय हा प्रश्न कोणालाच पडत नाही.……..इतकं सगळं सवयीचं झालंय. 
कॅनडा कॉर्नरजवळच्या कुठल्याशा कट्ट्यावर चर्चेचा विषय असतो दिल्लीत ‘त्या’ मुलीसोबत जे झालं ते वाईट झालं. चर्चा क्रांतीकारी होते अाणि निष्कर्ष निघतो कि ‘अशा’ लोकांना भर चौकात फाशी द्यायला पाहिजे. तितक्यात कोणाचा तरी ‘व्हॉट्सएप' वाजतो. मेसेज वाचाणारा सवयीने मेसेज मध्ये अालेल्या बत्तीस सेकंदाच्या एका मादक विडीअोवर हसतो अाणि म्हणतो ये देखो कमाल. ‘भरचौकात फाशी द्यायला पहिजे’ असं म्हणा-यांचा एक ‘बॉयज् अोन्ली व्हाॅट्सएप ग्रुप’ असतो. तिथे तो मादक विडीअो पाठवला जातो. पुढे बत्तीस सेकंद सगळे मौनीबाबा त्या ग्रुपवरच गप्पा मारतात.मारु देत पण वाईट हे वाटतं कि ‘महिलांचा अादर सन्मान अाणि इच्छा’ ह्यावर दोन तास धगधगणारी ज्वाळा बत्तीस सेकंदात विझुन जाते……..इतकं सगळं सवयीचं झालंय.
खुप दिवस सोशल साईटला एकत्र फोटो टाकता अाला नाही म्हणुन खुप दिवसांनी सगळे एकत्र जमतात. गळाभेट होते. जागासेट होते. फक्त मेसेज विंडो मधुन भेटणा-यांच्या प्रत्यक्षात बदलल्या लुकची चर्चा होते. सालाबादाप्रमाणे 'सेल्फी' होतो. सेल्फी काढायच्या नादात सेल्फमध्ये डोकावणं हळुहळु कमी होतंय.होऊ द्या पण वाईट हे वाटतं कि ह्या सेल्फी लाईफस्टाईलच्या रोजनिशीत पुर्वी काहीतरी घडायचं म्हणुन सोशल नेटवर्किंगवर टाकलं जायचं. अाता काहीतरी टाकायचंय म्हणुन घडवलं जातं.……..इतकं सगळं सवयीचं झालंय.
अाताशा अशीच चिड अाली कि काय होतं? चर्चा होते. खुप चिड अाली कि मेसेजेस धाडले जातात. त्याहुन जास्त  चिड अाली कि कोणीतरी सोशलसाईटला स्टेटस टाकतो. चिड वाढली कि हॅशटॅग होतो अाणि ट्रेण्ड होतो. अजुन पराकोटीची चिड वाढली कि सगळ्यांच्या हातात मेणबत्त्या येतात. पाऊस असो उन असो सगळे मेणबत्या घेऊन चालायला लागतात एखादया स्तंभाकडे. दहा लोकांना टॅग करुन पोस्ट पडते FEELING ANGRY AT क्रांतीकारी चौक. नंतर वितळलेल्या मेणबत्तीच्या मेणावरुन पाऊसाचे अोघळ जितके अलिप्तपणे घसरतात तितके दुस-या दिवशी मेणबत्तीधारी वेगळे राहतात अाणि वाट पहातात कि परत कधी पराकोटीची चिड येईल. अशी ही चिड. ह्यात संताप किती ? अाणि ह्या संतापात रक्त खवळतं का ? कारण खवळलेल्या रक्ताने क्रांती घडते चिडचिडीने नाही.नसु देत पण वाईट ह्याचं वाटतं कि.. अाता अामचे खवळत नाही रुधिर बिधीर इत्यादी । अामच्या धमन्यांतुन वाहत अाहे गटार गढुळ इत्यादी ।। …..इतकं सगळं सवयीचं झालंय.

- प्राजक्त
मटा २८ मार्च २०१५


Monday, March 9, 2015

वि वा शिरवाडकर

तात्यासाहेब , माफ करा ! तुम्ही म्हणाल कशासाठी ? तर  तुम्हाला अशा अवेळी उठवलं म्हणुन माफ करा. काल संध्याकाळी तुमच्या जयंती निमित्त..तुमच्या काही कविता सादर केल्या.  तुमच्या जन्मदिवसाला इतर लोकांसारखाच मी ही ‘जयंती’ म्हणालो ह्याबद्दल माझी दुसरी माफी ,तात्यासाहेब. जयंतीमयंती प्रकार, असे सोहळे तुम्हाला कधी अावडले नाही हे तुमच्या कवितेतुन, वागण्यातुन तुम्ही वेळोवेळी दाखवुन दिलं. तरी ‘जयंती’ म्हटल्याशिवाय त्या व्यक्तीमधला ‘मोठेपणा' जाणवत नाही अशी खुळी समजुत भिंतीच्या कॅलेंडरने कदाचित घालुन दिली असेल. ह्या ही कारणासाठी तात्यासाहेब , माफ करा !

तुम्ही ज्या गोदेच्या काठावर रमायचे, पाय सोडुन बसायचे त्या काठावर... अाता बेबंद चालणा-या रिक्षा, 'सिग्नल अाणि समाधान फक्त मानण्यात असतो’ अशा समजुतीच्या मोटारसायकली पापक्षालन करतात. तुम्ही ज्या होळकर पुलावरुन तुम्ही फेरफटका मारत असाल अाणि पूलाच्या कठड्यावर हात टेकवुन ,रेलुन तुम्ही सुर्योदय पहात रमला असाल, कदाचित तिथेच तुम्हाला सुर्य म्हणजे काळोखावर तेजाची लेणी खोदित बसलेला देवदूत भासला असेल त्या पूलावर, तात्यासाहेब.. अाता कोणी निर्माल्य पिशव्या फेकु नये म्हणुन संरक्षक जाळ्या लावल्या अाहे. गोदामाईला गोदेकाठच्याच लोकांकडुन संरक्षणार्थ जाळ्या बसवाव्या लागाल्या म्हणुनसुद्धा तात्यासाहेब , माफ करा !

तात्यासाहेब, तुम्हाला पेच पडलेल्या ‘एकल्या जांभळ्या’ नभाचे रहस्य अाता कधीच कोणाला कळणार नाही. कारण अाताशा दिवसरात्र अाकाशात करडे-काळे ढग जमुन असतात अाणि ह्या ढगांचा अाणि पावसाचा दूर दूरपर्यंत संबंध नाही. त्या ढगांमुळे श्वासाचा त्रास होऊ लागलाय हळुहळु. तुम्ही भाईंना भेटायला पुण्याला निघणार असाल तर सीबीएस जवळ अाणि द्वारकेजवळ असा एकुण पाऊण तास बाजुला काढुन ठेवा. कदाचित तरीही पुढे बिटको चौकात तुमचा थोडा खोळंबा होईलच…. त्यासाठी तात्यासाहेब , माफ करा ! 

तात्यासाहेब, एका गोष्टीसाठी मात्र तुम्हाला अामचे कौतुक करावे लागेल कि अाम्ही तुमच्या नावाचा चौक उभारुन तुम्हाला काकादिक विष्ठांचा धनी केलं नाही. हो पण चुकून तुमच्या नावे असलेल्या ‘काव्य उद्यानाकडे’ तुमचे पाऊले वळत असतील तर थांबा,तात्यासाहेब. तिथे छंदोमयी कापलेले झाडं,वेली सापडणार नाही. हो पण करमणुकीची गटारगंगा तिथे मुक्तायन करतांना सापडेल. मुक्तछंदात सुद्धा लय असते हे काहीसं विसरलेत लोकं अाता. मुक्त अाणि बेबंद मधला फरक कळनेसा झालाय अाता तुमच्या शहराला तात्यासाहेब म्हणुन माफ करा ! 

तात्यासाहेब, गेली कित्येक दिवस मी तरणतलावामागच्या तुमच्या घरासमोरच्या फुटपाथीवर येऊन नुसता उभा राहतोय. काही बोलायाचे अाहे पण बोलणार नाही म्हणत मी माझ्या गळ्याशी दाटलेली संध्याकाळ रोज गिळुन घ्यायचो. तुम्ही म्हणाल किंवा अन्य कोणी मला म्हणेल कि ह्या सगळ्यांचा तात्यासाहेबांशी संबंध काय? पण ज्यांनी पूराने पछाडल्यावर कसं वागावं अाणि कुंभाच्या महापूरात कसं वागु नये हे शहराला सांगितलं त्याच्याकडे त्याच शहराचा लेखाजोखा गेला पाहिजे असं मनापासुन वाटलं. सगळा जीव एकवटुन अाज तुमचं लोखंडी गेट लोटलं. अात सांगितलं कि तात्यासाहेबांची खोली पहायची अाहे. त्यांनी विचारलं कुठून अालात ?  म्हणजे हा माणुस अापल्याच शहरातला नसणार ह्यावर ते ठाम होते,तात्या. मी अात अालो अाणि काचेच्या खिडकीतुन तुमचा पलंग,तुम्ही अात्ताच अात पाणी प्यायला गेला असाल असं खोटखोटं सांगणारी पलंगावरची चुरगळ, तुमची पुस्तकं, तुमचा एॅशट्रे, टिपॉयवरचा तुमचा चष्मा, तुमचा चष्मा पहिल्यावर न दिसणा-या तुमच्या नाकाजवळचे दोन खोल निशाण पण दिसले. तुमचं कॅलेंडर, तुमच्या अाधीच भिंतीवर जाऊन बसलेली अाणि तुम्ही स्वत:च्या कवितेत गुंतला तर नाही ना ह्याची  मिश्किलपणे परिक्षा घेत रद्दीवाल्याकडे कविता देऊ का? विचारणारी तुमच्या ‘ती’चा फोटा. अात स्वैपाकघरात  खुप डोकावुन पाहिलं पण चमचाचं स्टॅंड काही दिसलं नाही. खिशातला रुमाल काढुन ज्ञानपीठवरची धुळ पुसली. अंत:करणातुन हात जोडले अाणि अात पाणी प्यायला गेलेले तुम्ही इतक्यात परत बाहेर याल तेव्हा तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना माझ्याकडे उत्तरं नसतील म्हणुन लगबगीनं जायचं ठरवतोय. पण तरीही लांबुनच तुमच्या कोप-यात ठेवलेल्या काठीकडे पाहुन अाज म्हणवंस वाटलं कि तात्यासाहेब .....तात्यासाहेब , खरंच माफ करा !

- एक नाशिककर प्राजक्त 
२७ मार्च २०१५ 

अरे ब्बाप ! मी नसतं ऎकुन घेतलं.



….मग बाप्पा म्हणाला कि जा, दिल्या शब्दाला जाग अाणि मन सांगेल तसंच वाग.सगळ्यांशी नीट वाग बरं? अाणि हो, दिसेल तेच खरं.
 तुला जितकं दिसेल फक्त तितकं नाही जग , काही अडचण अाली कि माझ्याकडे ‘वर' बघ ! जा !
मग मग मी खाली अवतरलो. पांढरा कोट म्हणाला “अावाज नाही” कुजबूज झाली “ अावाज नाही - अावाज नाही”. दोन-चार फटके देत सगळे म्हणाले कि रड. मी म्हणालो "कशाला बरंय कि मन म्हणतंय जरा शांत रहावं." तरी अाग्रह झाला “रडावंच लागेल”.त्याने जोरदार फटका दिला. मी कळवळलो अाणि 'वर' पाहिलं. बाप्पा म्हणाला "अरे ब्बाप ! मी नसतं ऎकुन घेतलं” मी नेम धरुन त्याच्या तोंडावर धार मारली अाणि ट्यॅह्यॅ फोडला. त्याचा पांढरा कोट पिवळा झाला. गर्दी म्हणाली “अोहोहो ! अावाज अाला अावाज अाला.” मी म्हणालो पण मला शांत रहायचं होतं. ते म्हणाले “असं नसते रे”.
मग परत असं झालं कि ते म्हणाले “ पड , पड पालथा पड”. मी म्हणालो "बरंय कि अाभाळ दिसतं, चंद्र दिसतो, पतंग दिसते. झालंच तर पक्षी दिसतात. ते म्हणाले “असं नसतं रे”. मग कधी  डावीकडुन, कधी उजवीकडुन मला ढुसण्या दिल्या. पडलो पालथा पडलो.
मग परत असं झालं कि ते म्हणाले “ रांग, रांग. असं पोटावर जास्त झोपलं कि पोट ढप्प होतं”. मी म्हटलं “असु द्या कि बरं वाटतं जमीनीशी जोडलेलं. मातीचा गंध ही छान अाहे. ते म्हणाले “असं नसतं रे”. मग रांगु लागलो तर ते म्हणाले “किती दिवस असं हि फरफट रे जीवाची ? प्राणी चारपायांनी चालतात तसा चाल.” मग मी तसा चालु लागलो. बरं चाल्लं होतं थोडे दिवस तर परत सगळे म्हणाले “ ऊठ कि किती दिवस असं प्राण्यासारखं? “ मी म्हणालो “रमलोय हो अाता. अाणि गर्भात कुणी तरी कानात कुजबुजलं होतं एकदा “ जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणिजात." तर ते म्हणाले “असं नसतं रे”. मग मी अचानक चालु लागलो. सगळ्यांनी टाळ्या पिटल्या. तरी कुणीतरी म्हणालंच ह्याला ‘तरी ह्याला खरं पायावर उभं राहणं नाही म्हणत,बच्चू” .

मग खुळखुळा काढुन हातात पाटी अाली. मी म्हणालो “त तलवारीचा नको तराजूचा बरा वाटतो.  जर अ अननसाचा असेल, ई ईडलिंबुचा असेल तर ळ कमळाचा ,ण बाणाचा कसा ?अाणि मला अात्ताच्या अात्त ईडलिंबू प्रत्यक्ष दाखवा.” ते म्हणाले “ बाssई !!!! किती पटापटा बोलता यायला लागलय छोन्याला ! “ मी बोल्लो “ते ठिक अाहे पण उत्तर ? “ ते म्हणाले “असंच अाहे अाणि असतं अाणि असणार. ळ कमळाचा अाणि ईडलिंबु तुझा तू शोध. अाणि मुख्य म्हणजे असं नसते रे”

मग पाटी गेली. रंग अाले . मी म्हणालो “हे बघा मला ‘ह्याला’ पिवळा म्हणु द्या अाणि 'त्याला’ जांभळा. ते म्हणाले "रंगांची गल्लत करु नकोस कधीही. एका एका रंगावर , एका एका धर्माचा दावा दाखल अाहे. कुठलातरी एक रंग असु द्यावा पाठीशी” मी म्हणालो “ रंगांच्या मक्तेदारीचा दस्ताऎवज दाखवा” ते म्हणाले “असं नसतं रे”
मग पाटी गेली. बुकं अाली. मी म्हणालो “ काल मी माझा पडलो. मी माझा परिने गुरुत्वशक्तीचा शोध लावला . ते म्हणालो “ नाही ! , तू फक्त न्युटन घोक.” मी म्हणालो “ अापल्या चुकांतुन शिकावं, दुस-यांचा चुकांमधुन का ?” ते म्हणाले “असं नसतं रे”.
मग बाप्पाच्या ‘मन सांगेल तसंच वाग’ ह्याला छेद देत ते जे जे म्हणाले ते ते मला मान्य करावं लागलं. करावंच लागलं. हा समज चांगला, हा चुकीचा. हे खेळ मुलांचे , तो खेळ मुलींचा. मांजर अाडवी -मागे जा. सायन्स छान-घोकत रहा !. कवितेने पोट चारोळी इतकं भरेल-सरकारी नोकरीत अायुष्य तरेल. प्रेमबिम विषय कट-जमिनजुमला लग्नाची अट, नोकरी लागताच लग्न कधी? माप अोलांडताच पाळणा कधी ?. संवाद बोलुनच घडला पाहिजे अाणि पाळण्यात पहिला पेढाच पाहिले. जात चालू घरघर- पीठ पडतं भरभर. सगळ सरत तरी काही तरी बाकी- केसांवर चढते पांढरी चकाकी.
मग मी म्हणतो “ बिना बोलण्याचाही होता हो संवाद, गेली अाडवी-उभी मांजर कशाला उगा वाद?” ते सगळे म्हणाला "असं नसतं रे”
मग  इतक्या त्रासाने , वयाच्या थकव्याने , मर्जीने मी थांबवला श्वास तर ते म्हणाले नाही “जग जग घे श्वास. लावा वेंटीलेटर लावा” मी चिडलो अाणि ‘वर’ पाहिलं. बाप्पा म्हणाला “इतका त्रास ?अरे ब्बाप ! मी नसतं ऎकुन घेतलं.”इथली कळ बाप्पाला पोचली
मी रात्रीच वेंटीलेटरची वायर खेचली.
मी बाप्पाला म्हणालो “ बाप्पा, अाता? “
….मग बाप्पा म्हणाला कि जा, दिल्या शब्दाला जाग अाणि मन सांगेल तसंच वाग.सगळ्यांशी...…...
-प्राजक्त
२० फेब्रुवारी २०१५

मटा मैफल


धुळवडगाथा ( मटा ७ मार्च १५)

……. अाणि सर्व पेंद्या अाणि त्याच्या मित्रांचे रुपांतर कॉलेजरोडवर येताच कृष्णात झाले. खिशामध्ये, हाततामध्ये , गाडीच्या स्पिडोमीटरच्या खाच्यात खोचुन ठेवलेल असे अनेक रंगांच्या पिशव्या घेऊन समस्त कान्हे मंडळी तयार झाली.
 एक जोरदार ब्रेक ऎकु अाला. "अ ते ज्ञ यापैकी कुठल्याही अक्षरांनी लिहुन दाखवता न येणारा असला आवाज झाला.” असं म्हणणारे पुलं अाठवत अाजुबाजुला लक्ष गेलं तर उगाच सहज चार-चौघाचं लक्ष जावं अाणि कधी अाभाळाला हात लावता यावा इतक्या उंच टाचांच्या तरुणी दचकाव्या म्हणुन असा ब्रेकचा अावाज कुणी तरी कुबड काढलेल्या बाईकस्वाराने केला असं कळालं. मग तिथुनच पायी जाणारे काका त्यांच्या भेदरलेल्या काकूंना सांगत होते कि हे असं करणं म्हणे अाजकाल तरुणांचा ट्रेण्ड अाहे. मग मी स्वत:शीच म्हणालो हे असं असेल तर मी एकतर तरुण तरी नाही किंवा हा ट्रेण्ड नाही. मी तिथे अाणखी थोडवेळ होतो . तेव्हा वीस मिनीटाने हेच ‘सळसळतं तारुण्य’ फर्लांगभर माझ्यासमोरुन घसरत गेलं.  अाजकालच्या सणांचा जल्लोष पाहिला कि असं वाटत रहातं कि गाभा-यातुन देव उठुन निघुन गेलाय अाणि रिकाम्या अारत्या, घंटानादात सगळे दंग अाहेत. त्यांना ह्याचं भान पण नाही कि गाभारा रिकामा अाहे. हे एकदा बोलुन दाखवलं तर मला कुणी म्हणालं फार म्हातारी बडबड करतो तू. इतका विचार करायचा नाही. ते ही खरंच अाहे म्हणा अाजकाल जास्त विचार कुणी करत नाही. कारण जास्त विचार केला कि मग प्रश्न पडतात अाणि त्या प्रश्नांची उत्तरं देणं परवडत नाही. 
अापादमस्तक चंदेरी रंगात चोपडले गेलेले अाणि डोळ्यांवर कट्टकाळा गॉगल चढवलेला एक कान्हा सुसाट गेला अाणि जाता जाता रस्त्याच्या कडेने जाणा-या मुलींवर रंग उधळुन कुत्र्याच्या वाकड्या शेपटा सारखा वळसा घेत निघुन गेला. मुलींनीही तो प्रकार एन्जॉय केला. मुळात दिवसच रंगांचा अाणि एकमेकांना चिडवण्याचा असल्याने कुणाला काही वाटण्याचं तसं कारणं नव्हतं पण मग हसण्याच्या गलका शांत झाला तेव्हा त्यांच्यातली एक मुलगी जीव गोळा करुन खाली बसली कारण डोळ्यात रंगांची फोडणी गेली होती. पुढे काय झालं देवाकृष्णास ठाऊक पण तिची नजर कृष्णापिसा सारखी अंखंड शाबुत असावी हीच इच्छा.
रंगाची खरी गंमत कोणाला खरंच कळाली अाहे का नेहमी वाटत रहातं. रंगांची मुक्त उधळण हाच खरा हेतु असला तरी.  मुक्त म्हणजे लय सोडणं किंवा मुक्त म्हणजे बेबंद नाही. 
ह्याच गंमतीजंमती बघत ,अर्धे कच्चे भिजलेले अाणि अर्धे कच्चे रंगलेलो अाम्ही अाणि मी डोक्यात विचारांचं दळण दळत अाम्ही कट्ट्यावर उभे होतो. मग कट्ट्यावर विषय निघाला. एकजण मला चिडवत म्हणाला “ अरे सोक्रेटीसा ! एक सांग अाता , कि रंग म्हणटलं कि अोघाने कृष्णाचा विषय निघतो अाणि कृष्ण तर काळा ? अाता बोल ! झाला कि नाही चेकमेट? 

मग मी म्हणटलो अरे वत्सा , प्रकाश म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर अापले सात रंग. अाणि अापल्याला एखादा रंग दिसतो म्हणजे काय? तर फक्त तो रंग डोळ्यातुन परावर्तित होतो अाणि बाकीचे रंग शोषुन घेतले जातात. उदाहरणार्थ जेव्हा लाल फुल दिसेल तेव्हा लाल इतर सर्व रंग शोषुन फक्त लाल दिसेल अशी क्रिया घडते. पण जेव्हा काळा रंग दिसतो तेव्हा कोणतातच प्रकाश परावर्तित होत नाही.मग सगळ्यांना सामावुन घेणारा रंग अाणि सगळे रंग शोषुन घेतले जाण्यामुळे उरणारा रंग ??  काळा !!!  अाणि सगळै एका सुरात म्हणाले
 ।। इतिश्री कट्ट्यावरची धुळवडगाथा संपुर्णम् ।।

- प्राजक्त 
महाराष्ट्र टाईम्स ७ मार्च २०१५
http://epapermt.timesofindia.com/Article.aspx?eid=31833&articlexml=07032015004012


अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...