गंगापुर रोडच्या चौकात चारचौघं गाड्या स्टॅंडवर लाऊन गप्पा मारत असतात. गप्पांचा विषय असतो कि शहरात जी फ्रि वायफाय झोनची घोषणा झाली त्यात कोणते कोणते ठिकाणं प्रामुख्याने यावे. तितक्यात समोर गळक्या पाण्याच्या टॅंकरमुळे जे पाणी पसरलंय त्यावरुन दोन बाईकस्वार घसरतात.घसरु देत पण वाईट हे वाटतं कि फुकट वायफायची घोषणा होणा-या शहरात अजुनही पिण्यासाठी टॅंकर फिरताय हा प्रश्न कोणालाच पडत नाही.……..इतकं सगळं सवयीचं झालंय.
कॅनडा कॉर्नरजवळच्या कुठल्याशा कट्ट्यावर चर्चेचा विषय असतो दिल्लीत ‘त्या’ मुलीसोबत जे झालं ते वाईट झालं. चर्चा क्रांतीकारी होते अाणि निष्कर्ष निघतो कि ‘अशा’ लोकांना भर चौकात फाशी द्यायला पाहिजे. तितक्यात कोणाचा तरी ‘व्हॉट्सएप' वाजतो. मेसेज वाचाणारा सवयीने मेसेज मध्ये अालेल्या बत्तीस सेकंदाच्या एका मादक विडीअोवर हसतो अाणि म्हणतो ये देखो कमाल. ‘भरचौकात फाशी द्यायला पहिजे’ असं म्हणा-यांचा एक ‘बॉयज् अोन्ली व्हाॅट्सएप ग्रुप’ असतो. तिथे तो मादक विडीअो पाठवला जातो. पुढे बत्तीस सेकंद सगळे मौनीबाबा त्या ग्रुपवरच गप्पा मारतात.मारु देत पण वाईट हे वाटतं कि ‘महिलांचा अादर सन्मान अाणि इच्छा’ ह्यावर दोन तास धगधगणारी ज्वाळा बत्तीस सेकंदात विझुन जाते……..इतकं सगळं सवयीचं झालंय.
खुप दिवस सोशल साईटला एकत्र फोटो टाकता अाला नाही म्हणुन खुप दिवसांनी सगळे एकत्र जमतात. गळाभेट होते. जागासेट होते. फक्त मेसेज विंडो मधुन भेटणा-यांच्या प्रत्यक्षात बदलल्या लुकची चर्चा होते. सालाबादाप्रमाणे 'सेल्फी' होतो. सेल्फी काढायच्या नादात सेल्फमध्ये डोकावणं हळुहळु कमी होतंय.होऊ द्या पण वाईट हे वाटतं कि ह्या सेल्फी लाईफस्टाईलच्या रोजनिशीत पुर्वी काहीतरी घडायचं म्हणुन सोशल नेटवर्किंगवर टाकलं जायचं. अाता काहीतरी टाकायचंय म्हणुन घडवलं जातं.……..इतकं सगळं सवयीचं झालंय.
अाताशा अशीच चिड अाली कि काय होतं? चर्चा होते. खुप चिड अाली कि मेसेजेस धाडले जातात. त्याहुन जास्त चिड अाली कि कोणीतरी सोशलसाईटला स्टेटस टाकतो. चिड वाढली कि हॅशटॅग होतो अाणि ट्रेण्ड होतो. अजुन पराकोटीची चिड वाढली कि सगळ्यांच्या हातात मेणबत्त्या येतात. पाऊस असो उन असो सगळे मेणबत्या घेऊन चालायला लागतात एखादया स्तंभाकडे. दहा लोकांना टॅग करुन पोस्ट पडते FEELING ANGRY AT क्रांतीकारी चौक. नंतर वितळलेल्या मेणबत्तीच्या मेणावरुन पाऊसाचे अोघळ जितके अलिप्तपणे घसरतात तितके दुस-या दिवशी मेणबत्तीधारी वेगळे राहतात अाणि वाट पहातात कि परत कधी पराकोटीची चिड येईल. अशी ही चिड. ह्यात संताप किती ? अाणि ह्या संतापात रक्त खवळतं का ? कारण खवळलेल्या रक्ताने क्रांती घडते चिडचिडीने नाही.नसु देत पण वाईट ह्याचं वाटतं कि.. अाता अामचे खवळत नाही रुधिर बिधीर इत्यादी । अामच्या धमन्यांतुन वाहत अाहे गटार गढुळ इत्यादी ।। …..इतकं सगळं सवयीचं झालंय.
- प्राजक्त
मटा २८ मार्च २०१५