……. अाणि सर्व पेंद्या अाणि त्याच्या मित्रांचे रुपांतर कॉलेजरोडवर येताच कृष्णात झाले. खिशामध्ये, हाततामध्ये , गाडीच्या स्पिडोमीटरच्या खाच्यात खोचुन ठेवलेल असे अनेक रंगांच्या पिशव्या घेऊन समस्त कान्हे मंडळी तयार झाली.
एक जोरदार ब्रेक ऎकु अाला. "अ ते ज्ञ यापैकी कुठल्याही अक्षरांनी लिहुन दाखवता न येणारा असला आवाज झाला.” असं म्हणणारे पुलं अाठवत अाजुबाजुला लक्ष गेलं तर उगाच सहज चार-चौघाचं लक्ष जावं अाणि कधी अाभाळाला हात लावता यावा इतक्या उंच टाचांच्या तरुणी दचकाव्या म्हणुन असा ब्रेकचा अावाज कुणी तरी कुबड काढलेल्या बाईकस्वाराने केला असं कळालं. मग तिथुनच पायी जाणारे काका त्यांच्या भेदरलेल्या काकूंना सांगत होते कि हे असं करणं म्हणे अाजकाल तरुणांचा ट्रेण्ड अाहे. मग मी स्वत:शीच म्हणालो हे असं असेल तर मी एकतर तरुण तरी नाही किंवा हा ट्रेण्ड नाही. मी तिथे अाणखी थोडवेळ होतो . तेव्हा वीस मिनीटाने हेच ‘सळसळतं तारुण्य’ फर्लांगभर माझ्यासमोरुन घसरत गेलं. अाजकालच्या सणांचा जल्लोष पाहिला कि असं वाटत रहातं कि गाभा-यातुन देव उठुन निघुन गेलाय अाणि रिकाम्या अारत्या, घंटानादात सगळे दंग अाहेत. त्यांना ह्याचं भान पण नाही कि गाभारा रिकामा अाहे. हे एकदा बोलुन दाखवलं तर मला कुणी म्हणालं फार म्हातारी बडबड करतो तू. इतका विचार करायचा नाही. ते ही खरंच अाहे म्हणा अाजकाल जास्त विचार कुणी करत नाही. कारण जास्त विचार केला कि मग प्रश्न पडतात अाणि त्या प्रश्नांची उत्तरं देणं परवडत नाही.
अापादमस्तक चंदेरी रंगात चोपडले गेलेले अाणि डोळ्यांवर कट्टकाळा गॉगल चढवलेला एक कान्हा सुसाट गेला अाणि जाता जाता रस्त्याच्या कडेने जाणा-या मुलींवर रंग उधळुन कुत्र्याच्या वाकड्या शेपटा सारखा वळसा घेत निघुन गेला. मुलींनीही तो प्रकार एन्जॉय केला. मुळात दिवसच रंगांचा अाणि एकमेकांना चिडवण्याचा असल्याने कुणाला काही वाटण्याचं तसं कारणं नव्हतं पण मग हसण्याच्या गलका शांत झाला तेव्हा त्यांच्यातली एक मुलगी जीव गोळा करुन खाली बसली कारण डोळ्यात रंगांची फोडणी गेली होती. पुढे काय झालं देवाकृष्णास ठाऊक पण तिची नजर कृष्णापिसा सारखी अंखंड शाबुत असावी हीच इच्छा.
रंगाची खरी गंमत कोणाला खरंच कळाली अाहे का नेहमी वाटत रहातं. रंगांची मुक्त उधळण हाच खरा हेतु असला तरी. मुक्त म्हणजे लय सोडणं किंवा मुक्त म्हणजे बेबंद नाही.
ह्याच गंमतीजंमती बघत ,अर्धे कच्चे भिजलेले अाणि अर्धे कच्चे रंगलेलो अाम्ही अाणि मी डोक्यात विचारांचं दळण दळत अाम्ही कट्ट्यावर उभे होतो. मग कट्ट्यावर विषय निघाला. एकजण मला चिडवत म्हणाला “ अरे सोक्रेटीसा ! एक सांग अाता , कि रंग म्हणटलं कि अोघाने कृष्णाचा विषय निघतो अाणि कृष्ण तर काळा ? अाता बोल ! झाला कि नाही चेकमेट?
मग मी म्हणटलो अरे वत्सा , प्रकाश म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर अापले सात रंग. अाणि अापल्याला एखादा रंग दिसतो म्हणजे काय? तर फक्त तो रंग डोळ्यातुन परावर्तित होतो अाणि बाकीचे रंग शोषुन घेतले जातात. उदाहरणार्थ जेव्हा लाल फुल दिसेल तेव्हा लाल इतर सर्व रंग शोषुन फक्त लाल दिसेल अशी क्रिया घडते. पण जेव्हा काळा रंग दिसतो तेव्हा कोणतातच प्रकाश परावर्तित होत नाही.मग सगळ्यांना सामावुन घेणारा रंग अाणि सगळे रंग शोषुन घेतले जाण्यामुळे उरणारा रंग ?? काळा !!! अाणि सगळै एका सुरात म्हणाले
।। इतिश्री कट्ट्यावरची धुळवडगाथा संपुर्णम् ।।
- प्राजक्त
महाराष्ट्र टाईम्स ७ मार्च २०१५
http://epapermt.timesofindia.com/Article.aspx?eid=31833&articlexml=07032015004012
No comments:
Post a Comment