Monday, March 9, 2015

अरे ब्बाप ! मी नसतं ऎकुन घेतलं.



….मग बाप्पा म्हणाला कि जा, दिल्या शब्दाला जाग अाणि मन सांगेल तसंच वाग.सगळ्यांशी नीट वाग बरं? अाणि हो, दिसेल तेच खरं.
 तुला जितकं दिसेल फक्त तितकं नाही जग , काही अडचण अाली कि माझ्याकडे ‘वर' बघ ! जा !
मग मग मी खाली अवतरलो. पांढरा कोट म्हणाला “अावाज नाही” कुजबूज झाली “ अावाज नाही - अावाज नाही”. दोन-चार फटके देत सगळे म्हणाले कि रड. मी म्हणालो "कशाला बरंय कि मन म्हणतंय जरा शांत रहावं." तरी अाग्रह झाला “रडावंच लागेल”.त्याने जोरदार फटका दिला. मी कळवळलो अाणि 'वर' पाहिलं. बाप्पा म्हणाला "अरे ब्बाप ! मी नसतं ऎकुन घेतलं” मी नेम धरुन त्याच्या तोंडावर धार मारली अाणि ट्यॅह्यॅ फोडला. त्याचा पांढरा कोट पिवळा झाला. गर्दी म्हणाली “अोहोहो ! अावाज अाला अावाज अाला.” मी म्हणालो पण मला शांत रहायचं होतं. ते म्हणाले “असं नसते रे”.
मग परत असं झालं कि ते म्हणाले “ पड , पड पालथा पड”. मी म्हणालो "बरंय कि अाभाळ दिसतं, चंद्र दिसतो, पतंग दिसते. झालंच तर पक्षी दिसतात. ते म्हणाले “असं नसतं रे”. मग कधी  डावीकडुन, कधी उजवीकडुन मला ढुसण्या दिल्या. पडलो पालथा पडलो.
मग परत असं झालं कि ते म्हणाले “ रांग, रांग. असं पोटावर जास्त झोपलं कि पोट ढप्प होतं”. मी म्हटलं “असु द्या कि बरं वाटतं जमीनीशी जोडलेलं. मातीचा गंध ही छान अाहे. ते म्हणाले “असं नसतं रे”. मग रांगु लागलो तर ते म्हणाले “किती दिवस असं हि फरफट रे जीवाची ? प्राणी चारपायांनी चालतात तसा चाल.” मग मी तसा चालु लागलो. बरं चाल्लं होतं थोडे दिवस तर परत सगळे म्हणाले “ ऊठ कि किती दिवस असं प्राण्यासारखं? “ मी म्हणालो “रमलोय हो अाता. अाणि गर्भात कुणी तरी कानात कुजबुजलं होतं एकदा “ जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणिजात." तर ते म्हणाले “असं नसतं रे”. मग मी अचानक चालु लागलो. सगळ्यांनी टाळ्या पिटल्या. तरी कुणीतरी म्हणालंच ह्याला ‘तरी ह्याला खरं पायावर उभं राहणं नाही म्हणत,बच्चू” .

मग खुळखुळा काढुन हातात पाटी अाली. मी म्हणालो “त तलवारीचा नको तराजूचा बरा वाटतो.  जर अ अननसाचा असेल, ई ईडलिंबुचा असेल तर ळ कमळाचा ,ण बाणाचा कसा ?अाणि मला अात्ताच्या अात्त ईडलिंबू प्रत्यक्ष दाखवा.” ते म्हणाले “ बाssई !!!! किती पटापटा बोलता यायला लागलय छोन्याला ! “ मी बोल्लो “ते ठिक अाहे पण उत्तर ? “ ते म्हणाले “असंच अाहे अाणि असतं अाणि असणार. ळ कमळाचा अाणि ईडलिंबु तुझा तू शोध. अाणि मुख्य म्हणजे असं नसते रे”

मग पाटी गेली. रंग अाले . मी म्हणालो “हे बघा मला ‘ह्याला’ पिवळा म्हणु द्या अाणि 'त्याला’ जांभळा. ते म्हणाले "रंगांची गल्लत करु नकोस कधीही. एका एका रंगावर , एका एका धर्माचा दावा दाखल अाहे. कुठलातरी एक रंग असु द्यावा पाठीशी” मी म्हणालो “ रंगांच्या मक्तेदारीचा दस्ताऎवज दाखवा” ते म्हणाले “असं नसतं रे”
मग पाटी गेली. बुकं अाली. मी म्हणालो “ काल मी माझा पडलो. मी माझा परिने गुरुत्वशक्तीचा शोध लावला . ते म्हणालो “ नाही ! , तू फक्त न्युटन घोक.” मी म्हणालो “ अापल्या चुकांतुन शिकावं, दुस-यांचा चुकांमधुन का ?” ते म्हणाले “असं नसतं रे”.
मग बाप्पाच्या ‘मन सांगेल तसंच वाग’ ह्याला छेद देत ते जे जे म्हणाले ते ते मला मान्य करावं लागलं. करावंच लागलं. हा समज चांगला, हा चुकीचा. हे खेळ मुलांचे , तो खेळ मुलींचा. मांजर अाडवी -मागे जा. सायन्स छान-घोकत रहा !. कवितेने पोट चारोळी इतकं भरेल-सरकारी नोकरीत अायुष्य तरेल. प्रेमबिम विषय कट-जमिनजुमला लग्नाची अट, नोकरी लागताच लग्न कधी? माप अोलांडताच पाळणा कधी ?. संवाद बोलुनच घडला पाहिजे अाणि पाळण्यात पहिला पेढाच पाहिले. जात चालू घरघर- पीठ पडतं भरभर. सगळ सरत तरी काही तरी बाकी- केसांवर चढते पांढरी चकाकी.
मग मी म्हणतो “ बिना बोलण्याचाही होता हो संवाद, गेली अाडवी-उभी मांजर कशाला उगा वाद?” ते सगळे म्हणाला "असं नसतं रे”
मग  इतक्या त्रासाने , वयाच्या थकव्याने , मर्जीने मी थांबवला श्वास तर ते म्हणाले नाही “जग जग घे श्वास. लावा वेंटीलेटर लावा” मी चिडलो अाणि ‘वर’ पाहिलं. बाप्पा म्हणाला “इतका त्रास ?अरे ब्बाप ! मी नसतं ऎकुन घेतलं.”इथली कळ बाप्पाला पोचली
मी रात्रीच वेंटीलेटरची वायर खेचली.
मी बाप्पाला म्हणालो “ बाप्पा, अाता? “
….मग बाप्पा म्हणाला कि जा, दिल्या शब्दाला जाग अाणि मन सांगेल तसंच वाग.सगळ्यांशी...…...
-प्राजक्त
२० फेब्रुवारी २०१५

मटा मैफल


No comments:

Post a Comment

अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...