Friday, April 3, 2015

वेगवेगळी उन्हं ( मटा ४ एप्रिल१५)


उन्हाळा लागला कि दुपारच्या ठराविक वेळी शहरात कर्फ्यू लागल्यागत शांतता होते. ऋतु बदलाची पहिली माणसाळलेली खुण लोकांच्या डोक्यावर दिसते. तापमान शुन्याकडे धाव घ्यायला लागला कि डोक्यावर कानटोपी येते. ढग काळवंडुन अोसंडायला लागले कि डोक्यावर छत्री येते. तापमानला चाळीशीचे वेध लागले कि डोक्यावर उन्हाची टोपी येते. म्हणजे बदल कोणताही असतो पहिली चाहुल दिसु लागते ती गर्दीच्या डोक्यावर. मग अाधीच मुखवटे चढवलेल्या मुखवट्यांवर काळे गॉगल येतात. त्यात ज्यांना चष्मा असेल त्यांचे दु:ख अवर्णनीय असतं. ह्या लोकांचं दु:ख पावसाळ्यात तर महाअवर्णनीय असतं. जमिनीतुन उगवावे तसे नारळपाणीवाले, ऊसाच्या रसवाले, लिंबु सरबतवाले, टरबूजवाले, अाईस गोळेवाले ईत्यादीवाले रस्त्याच्या कडे कडेला उगवतात. कुठलतरी सावलीचा अाडोसा धरुन बसलेले हे लोकं म्हणजे टळटळीत उन्हाळ्यात रस्त्याच्याकडेला असलेले अमृताचे घडेच अाहे. अमृताचे घडे एवढ्यासाठी कारण दैवदुर्विलासाने जर तुम्हाला ह्या अघोरी उन्हात बाहेर पडावं लागलंच तर तुम्हाला पाठीवरती हात ठेऊन लढ म्हणणारे हि एकमेव जमात अापल्याला रस्त्यावर दिसेल. ठरल्याप्रमाणे उन्हं पसरावी अाणि ठरल्याप्रमाणे सावल्या पांगाव्या इतकं ठरल्याप्रमाणे सगळ्याची लाईफस्टाईल बुद्धीबळाच्या पटाप्रमाणे मांडलेली असते.
पण उन्हं वाढली कि सावल्या पांगतातच असं नाही.जेव्हा सुर्य डोक्याच्या अगदीवर नव्वद अंशात असतो असा ‘झिरो शेडो दिवस’ पण कधीतरी येतो. अशा वेळेस जाणीव होते कि जगाचा भार माथ्यावर अाला कि कधीकधी सोबतीला सावलीसुद्धा नसते. ब-यादचा असंही होतं कि बाहेरच्या शहरातुन एखादा पाहुणा शनिवार-रविवार बघुन त्रंबकराजाच्या निमित्ताने किंवा साईनाथांवरच्या श्रध्देने नाशकात सबुरीने तंबु ठोकतो. कारण एकच कि त्यामानाने नाशिकची उन्हं ही कमी तापदायक. पण जाळायचं म्हटलं कि थोडं जाळु जास्त,जाळु असं काही होतं नाही. उगा अापल्या मनाची समजुत दुसरं काय. खरी धमाल स्टाईल असते ती तरुणांची.त्यांच्या टोप्यांच्या त-हा, गाॅगल्सच्या त-हा, स्कार्फच्या त-हा सगळंच त-हेवाईक. अशा उन्हात दिंडी आणि पालख्यांचे भोई दिसतात तसे नोकरी शोधणारे सुटबूटधारी पण दिसतात.  दोघांचा शोध शाश्वत. मग ह्या चालणा-यांना नेमका कोणता विचार अखंड चालवत ठेवतो? असा विचार मी नेहमी करतो. मग ह्या निष्कर्षावर येतो की सकाळी मागे असणारी सावली दुपार कलंडता कलंडता आपल्या समोर पसरते. अशावेळी चालताना एक सुख असं ही असेल की आज नाही कोणाला पण सुर्याला तर मागे टाकलं आपण.
गावाकडे छतावर धारं असायची. म्हणजे बंद छता ऐवजी जाळी असायची. उन्हाळी सुटीत दुपारी पडल्या पडल्या त्या घरात ढगांमुळे उन सावलीचे गालिचांची नक्षी तयार व्हायची. तशी नक्षीदार उन्हं आता दुर्मिळच.
भर उन्हात सगळीकडे रुक्षपणा, डोळे किलकिले करायला लावणारा भक्क उजेड असतो तेव्हा एखाद्या नाक्यावरचा गुलमोहराचा लाल केशरी रंग डोळ्यात भरुन राहतो. असं वाटत राहतं कि जागोजागी पसरलेली ही अाग ह्या गुलमोहरानेच पसरवली अाहे. एखादं झाड पेटवुन द्यावं तसा हा गुलमोहर पेटुन पिवळसर केशरीलाल रंगी ज्वाळांसारखा लपलपतांना दिसतो. पण कधी ह्याच दाहात त्या झाडाखाली सावलीला गारवा अनुभवत उभं राहिल्यावर अापल्याला कळतं कि कदाचित असं ही असु शकेल कि जसं महादेवाने विष प्राशन करुन सृष्टीचा दाह कमी केला होता , जसा येशूने जगाचे घाव अापल्या अंगावर सोसले अाणि क्रुसाच्या अाधीन झाला अगदी तसंच ही अाजुबाजुला जी अाग पसरलीय ती गुलमोहराने अंगावर झेलुन घेतली अाहे. अाता जो दाह अाहे तो त्यामानाने जरा कमीच अाहे ह्याला कारण अाहे तो हा गुलमोहरच. गैरसमज गैरसमज म्हणतात तो हाच का ?


- प्राजक्त 
http://epaperbeta.timesofindia.com/Article.aspx?eid=31833&articlexml=04042015005005
मटा ४/४/१५

No comments:

Post a Comment

अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...