Sunday, August 23, 2015

बॅक बेंचर्स : ६ अायझॅक

वस्तुमान असलेल्या कोणत्याही दोन वस्तूंच्या एकमेकांकडे आकर्षिल्या जाण्याच्या प्रवृत्तीला गुरुत्वाकर्षण असे म्हणतात. उदाहरणार्थ हे डस्टर जर मी एक विशिष्ट बल लावुन फेकलं तर एका सरळ रेषेत जाऊन जसे जसे ते बल कमी होईल तसे तसे ते खाली अोढले जाईल अाणि शेवटी खाली पडेल. धाssssड ! " शेवटच्या बेंचवरच्या अायझॅकच्या डोक्यात डस्टर जाऊन पडलं. त्याचं नाव अायझॅक नव्हतं . पण ते नाव ह्याच प्रसंगामुळे पडलं. समस्त भुतलावरच्या गणित अाणि विज्ञानाचे मास्तर जर मास्तर नसते तर थाळीफेक, भालाफेक,नेमबाजीमध्ये तरबेज असते असा शालेय कालापासुनचा माझा समज दहावीत येता येता तेव्हा दुढ झाला जेव्हा मी एका मास्तराच्या डस्टरपासुन लपायला दप्तराची ढाल केली होती अाणि मास्तरांनी शेजारच्या भितीवरुन डस्टर अादळवुन तो मला बाजुनं खांद्यावर मारला. नंतर हीच क्लृप्ती मी कॅरममध्ये बापरु लागलो.  अशा प्रकारे 'क्लृप्ती' हा शब्द वापरण्याचा माझा या जन्मीचा प्रथम अाणि अंतिम अट्टहास मी इथे केलेला अाहे. जसा गाणितातला साईन,थिटा दैनंदिन जीवनात नेमके कुठे येतात हा माझा कळीचा प्रश्न अाहे तसाच काही मराठीच्या शब्दांबद्दलसुद्धा 'क्लृप्ती' हा त्यातलाच एक शब्द.असो. हा शब्द अाता इथे मी माझ्या बालभारतीच्या मास्तरांना दिलेली अादरांजली समजा. तर असे हे विज्ञान मास्तर एखाद्या कलावंतासारखे विक्षिप्त अाणि लहरी वाटतात. कधी पुर्ण वर्गाची मंडई होते पण यांना फरक पडत नाही. अाणि कधी यांना टाचणीचा अावाज पाहिजे असतो.मुळात अती हुशार , अती कलासक्त लोक हे थोडे लहरीच असतात. अाईनस्टाईनने त्याच्या मांजरीला येजा करायला त्याच्या लॅबच्या दाराला एक मोठं भोक केलं होतं. कलांतरांनं त्या मांजरीला पिल्लु झालं. मग अाईनस्टाईनने त्या भोकाशेजारी छोटं भोक केलं अशी अाख्यायिका अाहे. अाता हे पाहुन जर त्याला कोणी 'तू येडा अाहे का रे' म्हटंल असेलच. तेव्हा पासुन 'तू येडा अाहे का रे?' असं मला कुणी म्हटलं तर राग न येता अभिमान येऊ लागला. तर विषय असा कि गुरुत्वाकर्षणचा धडा शिकवुन झाल्यावर मास्तरांनी शेवटी विचारलं " या प्रकरणाबद्दल कोणाला काही प्रश्न? तर अायझॅकने शेवटच्या बेंचवरुन हातवर केला अाणि म्हणाला "मास्तर, सफरचंद पडल्यामुळे गुरुत्वशक्तीबद्दलचा प्रश्न न्युटनला पडला तर इतके वर्ष त्याची लघवी काय वर उडत होती का? "  पुढे काय झालं हे सांगणे नलगे. त्या दिवसापासुन त्याला अामचं अखिल गाव अयझॅक नावाने अोळखु लागलं


-प्राजक्त २४/०८/२०१५ 



Sunday, August 16, 2015

बॅक बेंचर्स : ५ Whats in the Bench ?


रेल्वेमध्ये बसायला जागा न मिळणं हा काळाने तुमच्यावर हलगर्जीपणा केल्याचा उगवलेला सुड असतो. हो म्हणजे एक लोकल चा विषय सोडुन देऊ कारण तिथे मुळातच गर्दी असते. चाळीसेक हजार लोकांसाठी ती केलेली सुविधा होती अाता चाळीसेक लाख लोक 'सुविधा' उपभोगल्यावर अाणखी काय होणार. तर अशा उगवलेल्या सुडामुळे तुम्हाला रेल्वेच्या दाराशी उभं राहुन करावा लागलेला प्रवास हाही बॅक बाकावर बसल्याचा प्रकार. त्यापेक्षा मास्तरांनी शिक्षा म्हणुन मागल्या बाकावर उभं रहायची शिक्षा दिल्यासारखा प्रकार.
असाच दारात बसुन एक प्रवास सुरु झाला. मध्ये एका ठिकाणी एकजण चालत्या गाडीत सराईतपणे लटकुन मला 'थोडं अडजस्ट' खुणावत बसुन राहिला. मग तो म्हणाला 'घरातलं शेंडेफळ अाणि शाळा कॉलेजातला शेवटच्या बाकावरचा दिसतो'.पांढरे केस,पांढरी दाढी, बाह्या वळलेला चेक्सचा शर्ट, अाता फॅशन नसलेलं ससपेंडर, पट्टीने अाखाव्या तशा ठसठशीत कपाळावर चार रेषा अाणि तंबो-याला चुकून हात लागल्यावर कितीतरी वेळ घुमत राहावा तसा घनगंभीर 'बेस'चा अावाज. असा माणुस मी पहिल्यादा पहात होतो. मी म्हणालो 'हो,कसं अोळखलं?'
" शाळेत अाणि घरात शेवटी असलेले जरा शेफारलेले असतात. म्हणुन निघायला उशीर होतो.अाणि दारात बसावं लागतं.पण याची चिडचिड कमी असते अापल्याला. हो अापल्यालाच म्हणालो मी. कारण दारात बसता येतं.मिळाली जागा तर ठिक नाही तर हवेचा प्रवास.दोन्ही बाजुने जिंकल्याची भावना नाही का?  तुझं नाव सांगु नको,माझं विचारु नको. शेक्सपिअर म्हणतो,नावात काय अाहे? हाच नियम बाकाला पण लागु होतो बरका. बाकात काय अाहे? पहिला-शेवटचा. तुम्ही काय शिकला ते महत्वाचं.बरं पेपर वाचतो का ? मागच्या महिन्यात भारत-पाक युद्ध संपलं. काय वाटतं ? सोड,अाता कोणाला वाटुन काय फायदा म्हणा. "
मी बोलायच्या अात तो बोलत होता जणू त्याला फक्त कुणीतरी ऎकणारं पाहिजे होतं. मी फक्त ऎकायचं ठरवलं. " See, Wars are not won on Field , my son. (हृदयाकडे हात नेत) Real war is here" अातला लढा जिंकला तरच जिंकला तू. अाणि मारायला काय लागतं? सांग, बंदुक?रायफलं? नाही. कोणाला मारायला लागतात फक्त "steady hands".अाणि जेव्हा तू चारीबाजुने घेरला जातो तेव्हा देश,प्रदेश,मान,सन्मान हे सगळं सारुन तू लढतो फक्त स्वत:साठी.जगण्याची लढाई. War is old man talking & young ones dying.मग सगळं जिंकल्यावर हाताशी येतात पडलेल्या इमारती,लाल जमिनी वगैरे. मग वाटतं हे जिंकायला लढलो अापण? मग शोध सुरु होतो काय जिंकल्याचा. पण शोधल्यावर हरवलेलं मिळतं बदलेलं नाही. एनी वे, टू मच फिलॉसोफी इन वन जर्नी. हे सगळं तुला का सांगतोय मी? कारण यू अार अ बॅकबेंचर."
बाहेर धुकं,पाऊस अाणि मधेच घाटात इमरजंसी गाडी थांबली.. तो उतरुन सिगारेट पिऊ लागला. गाडी सुरु झाली. मी त्याला अावाज दिला. त्याने बेफिकीरपणे मला टाटा केलं.मी त्याला नाव विचारलं. त्याने उत्तर दिलं. Nobody, बाकात काय अाहे?  
 
-प्राजक्त १७/०८/१५

Monday, August 10, 2015

बॅकबेंचर : ४ शेवटची खिडकी

बसमध्ये सहसा शेवटी कोणी बसतं नाही. कंडक्टरने मागे जाऊन बसा असा इशारा केला कि ‘शेवटची सीट ? नको रे देवा’ असे यांत्रिक शब्द नेहमीच कानावर पडतात. पण मी बसमध्ये सुद्धा ‘लास्ट बेंचर’च. बसमध्ये पुढे बसलं कि जरावेळाने मागुन कुणीतरी अातला राग दाबत उसन्या-खोट्या अादरयुक्त अवसानात अापल्याला म्हणतं ‘ अहो जरा खिडकी लावता का प्लिज’.  झालं ! संपला कि हो विषय. बंद खिडकीचा प्रवास म्हणजे छळ अाहे. त्यात पावसाळा असेल तर ते पाप ही असु शकतं. नाही ते चित्रपटात वगैरे दाखवतात तसं  अर्ध अंग बाहेर काढुन , तळहातावर अाणि चेह-यावर पावसाचे थेंब झेलत “ अहा अहा रम्य निसर्ग “ असा फालतु थिल्लर दिखाऊपणा नाही म्हणत मी. पण नुसती उघडी खिडकी , मागे जाणारं जग अाणि अापलाच अापल्याशी चालेल्ला ‘ ते बघ , हे बघ,  हे काय असेल ? तिकडे एकदा जाऊया ‘ असा संवाद. हे मजेशीर असतं.
बाहेर डोकावत असतांना मध्येच एखादं लहानसं गावं , पडकी भिंत, गर्द पारंब्यांच झाडं लागतं हे सगळं अगदी हिरवंशार. शेवाळाच्या नावाखाली का होईना पावसात पडक्या दुर्लक्षित भिंतींना पालवीचा मोह होतो. हे पाहुन कधीही विस्मरणात न जाणारा ताजेपणा मनामध्ये भरुन राहतो. कधी कधी निराश व्हायला झालं कि हे क्षण अाठवल्या बरोबर परत रिचार्ज मिळतो. अाणि हे चालु असतांना अापल्यामागे कुणीच नसतं कारण अापणच सर्वात शेवटचे असतो. अाणि त्यामुळे खिडकीतुन येणारा पाऊस, वारा यांचावर फक्त अापलाच निर्विवाद हक्क असतो. ह्या शेवटाबद्दलच्या अोढीचं मुळ खुप जुन्या लहानपणीपासुनच्या प्रसंगांमध्ये अाहे.

वडिल लहानपणी गोष्ट सांगायचे राजपुत्राची. तो तलवार घेऊन निघतो वाटेत त्याला कोण कोण भेटतं त्यांना तो सवयीने मदत करतो अाणि ते लोक अानंदी होऊन राजपुत्राला अशी एकएक जादुई वस्तु देतात ज्याचा फायदा राजपुत्राला पुढे राक्षसासोबत लढतांना होणार असतो. कमीत कमी शंभरेक वेळा ही गोष्ट ऎकली असेल पण दरवेळी नवे प्रश्न पडायचे अाणि नेहमी त्याची मजेशीर उत्तरं मिळायची. गोष्टीच्या शेवटी एक वाक्य ठरलेलं असायचं ‘… अाणि ‘शेवटी' सगळं ठिक झालं.’ मी म्हणायचो ‘ पण एखादा दुसरा राजपुत्र असता अाणि शेवटी ठिक नसतं झालं तर?’. उत्तर यायचं ‘कधी कधी सुरवात-मध्य बिघडु शकतो पण शेवट ठिक नसेल तर तो शेवट नसतो.'

-प्राजक्त ९ अॉगस्ट २०१५


Saturday, August 1, 2015

बॅकबेंचर्स : ३ डोपलर इफेक्ट

"कल्पना करा तुम्ही रस्त्याच्याकडेला ऊभे आहात लांबुन येणा-या गाडीकडे एकटक बघताय. गाडी समोरुन भरधाव जाते. वेगाकडे लक्ष दिलं तर कळेल की पलीकडून येणारी गाडी समोरुन जातांना वेगाच्या मानाने भुर्रकन निघुन जाते. हेच आता रस्त्यापासुन फर्लाँगभर दुर उभं रहा. आता तो वेग कमी असेल. तीच गाडी आता अम्ब्युलंस आहे अस समजा, आता आवाजातुन अंतराची गंमत कळेल. ह्याला डोपलर इफेक्ट म्हणतात. बाकीचं उद्या बघु" विज्ञानाचा तास संपला. तेव्हापासुन मला खिडकीतून येत्या जात्या गाड्यांना बघायचा छंद लागला. रविवारीची दुपार अर्ध्यावर सोडुन दिलेल्या लिंगोरचाच्या खेळासारखी निपचीत वाटायची. अशावेळी आमचा जादा तास असायचा. त्यावेळी लांबुन येणा-या बैलगाडीच्या डोपलर इफेक्टमध्ये रमुन जायला व्हायचं.
लास्टबेंचवर बसायचे हे काही फायदे. म्हणजे खिडकीच्या बाहेर रमता येतं, भुक लागेल तेव्हा डबा खाता येतो, सुचेल तेव्हा कविता लिहता येते, वहीच्या मागल्या पानावर फुल्या-गोलचा खेळ खेळता येतो. आणि इतकं करुन परत समोर काय शिकवताय त्याकडे लक्षही देता येतं. किंवा तसं निदान दाखवता तरी येतं. हा शेवटचा फायदा खरंच फायदा आहे की तोटा हा वेगळा भाग आहे.
पण दुरुन जर कोणाला तो तोटा वाटत असला तरी जवळून पाहीलं तर कळेल की तो फायदा आहे. ती थियरी तर हे प्रॅक्टिकल. आपलं ते डोपलर इफेक्ट ? हां बरोबर.
ठरवुन खुप लक्ष दिलं ना कि डोक्याला झिणझण्या येतात आणि डोक्यात काही घुसेनासं होतं. दर्यावरची रेती कशी जितकी घट्ट पकडाल तितकी निसटते ना तशी. एकदा जीव धोक्यात घालुन पहिल्या बेंचवर बसायचा योग आला होता. त्यात इतिहासाचा तास. अरेरेरे महाराज आणि मावळे दिल्लीतून निसटले तेव्हा काय ती धुळदाण..., काय तो टापांचा आवाज...  त्यात अगदी पुढे रस्त्याच्याकडेला असल्यासारखं पुढच्या बेंचवर बसलेलो त्यामुळे समोरुन ते कधी भर्रकन् गेले ते कळालंच नाही इतकं अंगावर आलं सगळं. तेव्हा वाटलं हेच मागे बसलो असतो तर लांबुन येणारी, लांब जाणारी घौडदौड दिसली असती.
अजुन अाठवतं....तो विज्ञानाच्या मास्तरांचा शेवटचा तास होता. मास्तर निवृत्त होणार होते. टोपीखाली कानशीलाची पांढरी चांदी लपवत, पाणावल्या डोळ्यांनी , थरथरत्या हाताने फळ्यावर मास्तरांनी लिहले 'निरोप'. मग पुढे चाळीसेक मिनीटं मास्तर भुतकाळ-भविष्यकाळाबद्दल बोलत होते. जाता जाता म्हणाले " ते करायचं राहीलं आणि हे करणार ह्या दोन विचारांमध्ये जे भुर्रकन निघुन जात ना मुलांनो ते म्हणजे ...? " " आयुष्य ! " सगळी मुलं एकसुरात ओरडली.
" अहं.... चूक . ते करायचं राहीलं आणि हे करणार ह्या दोन विचारांमध्ये जो भुर्रकन निघुन जातो तो म्हणजे ... डोपलर इफेक्ट."
घंटा झाली. मास्तर काठी टेकवत निघुन गेले. काठी टेकवायचा टक्कंटक्कं आवाज जवळुन दुरदुर जात राहिला.

 - प्राजक्त / ०१ / ०८ /१५



अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...