Friday, January 22, 2016

सणवार

पुर्वी कसं होतं जानेवारीच्या दुस-या तिस-या दिवशी कॅलेंडर घरी यायचं . मग नंतरचा अर्धापाऊण तास लाल तारखा शोधण्यात जायचा. त्यात रविवारला जोडुन आलेल्या लाल तारखा किती ह्याची मोजदाद वेगळी .लाल तारखांसोबत सणावारांची मनातल्या मनात उजळणी व्हायची. जानेवारीत प्रजासत्ताकाच्या वक्तृत्व स्पर्धेत यंदा कोणत्या महापुरुषावर बोलायचं ? मग कोणालाच माहीत नाही असे महापुरुषांचा शोध सुरु व्हायचा. फेब्रुवारी मध्ये हसु यायचं कि लोक परत कार्य विसरुन ह्या प्रश्नात पडतील कि महाराजांचा जन्म तारखेनुसार कि तिथीनुसार ? मार्चमध्ये होळीला कोणाच्या नावे बोंबामारायच्या? रंगपंचमीला कोणता रंग शोंधायचा जो दहा दा अंग घासुन जाणार नाही आणि गेला तरी कानात दडुन राहील. एप्रिलचं पान आलं कि पाडव्यात पलिकडे गोदाक्काचा अंगणातला अांबा मनात तरळून जायचा.... आंबेतोरणासाठी. मग अाज जसे मेच्या पहिल्याच दिवशी टिव्हीवर मराठी भाषामागे का ह्याविषयी ‘टॉक शो’ लागतात तसे त्यावेळी शाळेत याच विषयी वादविवाद स्पर्धा व्हायच्या. स्वातंत्र्य अाणि प्रजासत्ताक दिनी वक्तृत्व स्पर्धा अाणि महाराष्ट्र दिनी ‘वादविवाद’ स्पर्धा ही परंपरा सगळ्याच शाळांनी जोपासली होती. ७ जुन हि तारीख कधीच लाल नसायची पण नेहमी लाल दिसायची ती भूगोलातल्या धड्यातमधल्या एका अोळीमुळे ‘भारतात मान्सुनची सुरवात ७ जुन तारखेला होते’. कॅलेंडरवरजुलैचं पान अालं कि शाळेतले मित्र जुम्म्या, ममद्या कडे रमजानाची ईदी ठरलेली. अाणि अाषाढवारीला वाटेत अामचं घर येतं म्हणुन अाजोबांचा एकदिवस मुक्काम पडायचा.अाजोबा झोपतांना अांथरुणाची वळकटी पसरवुन झोपायचे तेव्हा डोक्याजवळ विठ्ठलाची काळीभोर मुर्ती ठेवायची. लहानचे मोठे झालो , नंतर पंढरपुरी कितेक चक्रा झाल्या पण पांडुरंग नावाचा उल्लेख जरी झाला तरी अजुनही डोळ्यासमोर अाकृती येते ती ‘तीच'
अॉगस्ट अाला कि नेहमी कला मास्तरांनी एकदा सांगितलेल्या रोमन कथेतला अॉगस्टस राजाचा पुसट उल्लेख अाठवतो. रक्षाबंधनच्या लालखुणेत राखीच्या सोनेरी कागदाखालचा लाल स्पंज दिसायचा.सप्टेंबरात , पोळ्याला यंदा तरी अाईला मातीचे मोठ्ठाले बैल घ्यायला मनवु असा चंग बांधायचो. गणपतीचे दहा दिवस त्यात जेष्ठा-कनिष्ठासोबत संपुर्ण घराण्याचा गोतावळा यायचा ती जणू दुसरी दिवाळीच.
अॉक्टोबर-नोव्हेंबर महीन्याचं पान आलं कि दिवाळीत यंदा कोणता किल्ला ? नेहमीपैकी एखादा कि नवीन आपल्याच सुपीक डोक्यातुन घडवावा एखादा किल्ला ? डिसेंबरात पलिकडच्या दत्त देवळातली पहाटेची लगबग दिसायची अाणि नाताळाच्या लाल टोप्या दिसायच्या त्या लाल खुणेत. अाणि ह्या सगळ्याची यादी अाम्ही वहिच्या शेवटच्या पुठ्ठ्यावर शेवटच्या बाकावर बसुन करायचो. 
पुर्वी सणांसाठी सुट्ट्या यायच्या . अाताशा सुट्टी येते फक्त. 

- प्राजक्त


Thursday, January 7, 2016

बॅकबेंचर्स २५ जिप्सी ( दै सामना ९ जानेवारी १६)

"हि मागची पोरं म्हणजे निव्वळ भटकी जिप्सी ,अभ्यास नको यांना " हा नेहमीचा अपमान नंतर अाम्हाला हळुहळु अपमान वाटेनासा झाला.
शाळा नेमकी कधी सुरु झाली ह्याचा मागोवा घेतला तर प्रत्येकाचं कागदी विमान एका गाण्याच्या झाडावर येऊन अडकेल किंवा विसावेल ते गाणं म्हणजे "सांग सांग भोलानाथ , पाऊस पडेल का ?" शनिवारची संध्याकाळ असो , गणिताच्या पेपरच्या अादला दिवस असो , उन्हाळ्याच्या /दिवाळीच्या सुट्टीचा शेवटचा दिवस असो ..ह्या दिवसांत राष्ट्रगीत म्हणावं तसं शाळेत असतांना काहीतरी जादू व्हावी अाणि उद्या शाळा नसावी हि इच्छा व्यक्त करायला अाम्ही मुलं कर्कश अावाजात ढगातल्या देवाला एेकु जावं अशा अार्ततेने "सांग सांग भोलानाथ , पाऊस पडेल का ?' गायचो.

 " बरंका, भाषेच्या चर्‍हाटाला , कधीही अंत नसतो  | सारखी बडबड करणारा , चुकूनही संत नसतो || " असं अामचे मास्तर वर्गातल्या मागच्या रांगेकडे डोळे वटारुन म्हणायचे. पण हि बडबड 'चिऊताई चिऊताई दार उघड कविता शिकवतांना एकदम शांत होती हे अावर्जुन अाठवतं. त्या दिवशी घरी गेलो तेव्हा दार वाजवतांना 'अाई अालोय ग' असं सवयीने बोंबलण्याच्याएेवजी 'चिऊताई चिऊताई दार उघड' असं घशाची निळसर शीर टपटपेपर्यत अोरडल्याचंही अाठवतं. 
लहान असतांना मी रुसुन बसल्यावर माझी समजुत काढतांना हळुहळु अावाजात अाणि नंतर वेग अाणि स्वर वाढवत ,दबक्या पावलांनी येत वडिल 'टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले' म्हणत गुदगुल्या करायचे. त्यात 'प्राजक्ताची फुssssले' याच्यावर त्यांचा विशेष जोर असायचा.
 मागच्या बाकासहित सगऴयाच बुडत्यांना चाचणी निकालच्या नंतर ' मोर धुंद नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं?  । कोकीळ सुंदर गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं ? । तुलना करित बसायचं नसतं  , प्रत्येकाचं वेगळेपण असतं !' असं सांगणा-या मास्तरिण बाईंच्या चेह-याच रेष न रेष दिसते.  सकाळी सकाळी जेव्हा  अंगावरचं पांघरुण काढुन 'चला शाळेची वेळ होईल घाई करा , उठा ! ' असा हुकूम व्हायचा तेव्हा शेवटचे पाच मिनीटाची अधाशी झोप उपभोगतांना ' हो उठलेलोच अाहे' अाणि 'प्रत्यक्ष उठणे' ह्या दोघांच्या मधल्यावेळेत हाॅलमधुन रेडिअोतुन "दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचुन झुलायचेsss " हे एेकु यायचं तेव्हा वाटायचं उजाडलंय' कधी रविवारी दुपारीची झोप रेडिअोच्याच ' डोळ्यात सांजवेळी, आणू नकोस पाणी । त्या दूरच्या दिव्यांना, सांगू नको कहाणी ' ह्या स्वरांनी चळावायची.
शाळेतल्या हाफ चड्डया फुल झाल्या अाणि 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं' ह्या अोळींनी भाबड्या जिवाला अाजुबाजुची हिरवळ बघायची हिम्मत अाली. हिम्मत फळाला नाही लागली तेव्हा 'भातुकलीच्या खेळामधले राजा अाणिक राणी' ने अाधार दिला.
मरण्यावरही शतदा प्रेम करायला लावणारा हा 'अानंदयात्री' जो नकळत्या वयापासुन नेहमीच जवळ होता तो 'गेला' तेव्हा अचानक मागच्या बाकावरची माझ्या शेजारची जागा कायमची अोकीबोकी झाल्या सारखं वाटलं. अाम्हा जिप्सीच्या टोळक्यातुन एक जिप्सी उठुन निघुन गेला.

- प्राजक्त 

Friday, January 1, 2016

रुक्माईच्या सावलीत : मटा मैफल २ जानेवारी १६

" किती ही काम येऊ , माझ्याच्यानं उरकतं नीट व्यवस्थित. आषाढाला तर केवढी लेकरं येतात! , एकपण जेवल्या बिगर जात नाही. तसंही रायांना पण आवडणार नाई कुणी उपाशी पोटी माघारी गेलं तर" अठ्ठावीस युगांच्या अनुभवामुळे जरास्सं रापलेलं विस्तिर्ण कपाळ, कपाळी रुपया शिक्क्या इतकं भलं मोठं कुंकू , त्यावर ठसठशीत तीन रेषा. पांढ-या केसांवर विसावलेला पदर, ठराविक वेळेनंतर डोक्यावरचं पदर सारखा करण्याची लकब अाणि पदर सारखा करतांना येणा-या बांगड्यांची किण्किण सावरत रूक्माई बोलत होती.

झालं असं कि पंढरीत गेलो तेव्हा नेहमीची वाट मोडुन आधी रुख्मायकडे गेलो. दिंडीरवनातुन रुक्मीणी रुसुन आली आणि लखुबाई झाली. मग लखुबाईला कुणी रुख्माई म्हणेल, कुणी रखुमाई, कुणी रुक्मीणीच. शांत बसुन राहीलो. वेळ कसा गेला कळालं नाही. भान आलं तेव्हा दर्शन वेळ संपुन  मंदिर दरवाजे बंद झाले होते. मी डावीकडच्या कोप-यातल्या मिठीभर मोठ्या दगडी खांबा पल्याड असल्याने कोणाला दिसलो नाही. थोडं इकडे तिकडे वाट शोधून शेवटी मी गाभा-यात शिरलो. तिथे जास्त आश्वस्थ ,शांत वाटायला लागलं मग विचार आला इथेच पडी टाकु आणि पहाटे काकडा आटोपून परतीला निघु. 

झोपण्याआधी परवानगी घ्यावी म्हणुन म्हटलं " रखुमाई , आज रात्रीपुरती विठ्ठल होती का? म्हणजे झोपायला आजचा आसरा देती का ?" माई म्हणाली ," वा रे लेका ! आसरा देणार मी आणि तरी 'विठ्ठल होता का?' विचारुन शेवटी सगळं पुण्य त्यांच्या खात्यात ना ? लई शाहजोग झालाय हो तू " मी  म्हणालो " तसं नाही आई , आपली एक पद्धत म्हणुन बोललो ग " मग ती 'गम्मत केली रे' अशा अर्थाने डोळे मिचकावत डोकीपदर सारखा करत हसली. तिथेच कोप-यात घोंगडी आंथरुन देत म्हणाली " हां , तू पड इथं. संकोचु नको .तो वर मी काहीतरी खायचं पाहते तुझं" मला भूक लागलीय हे तिला कसं कळालं वगैरे असले फालतू प्रश्न मला पडले नाही. पण जे प्रश्न पडले होते ते तिच्या नजरेतून सुटले नाही. ती पीठ मळत म्हणाली 'हां बोल बोल ...कशाला अडखळलाय? " 
मी विचारलं "माई, फोटो,ग्रंथ-गाथा,आख्यायिका-भजनात सगळीकडे विठ्ठल-रुख्माई असंच ऐकलं - वाचलंय पण पंढरीत तुम्ही वेगळाले का? "

" बाईईई..., एवढ्याशा जीवाला पेच किती रे ?  डोक्यात इतक्या बाभळी ठेऊ नये. चल ,आधी जेवून घे" असं म्हणत रुख्माई चुलीत निखारे फुंकत आणि पुनव-अवस,पुनव-अवस करत भाक-या आलथ्या पालथ्या करत बोलायला लागली . " इतक्या वेळ डोक्यात बाभळ ठेउ नये. पिकेस्तोवर काटा पायात ठेउ नये. बघं कसंय थोडं चिडले होते त्यांच्या वर एकदा उगा. म्हणुन तडक रुसुन मागे जाऊन बसले. खरं सांगु का हे रुसणं-बिसणं निमित्त होतं .खरं माझ्या डोक्यात होतं कि कृष्ण जन्माच्या वेळी मी रुक्मीणी होते पण जगात नाव त्या राधीचंच झालं. मनात सुप्त इच्छा होती कि असं प्राकृतपेक्षा नावारुपाने युगानुयुगं राया सोबत नाव जोडुन पहावं.भले मग लांब राहु पण जसं राधाकृष्ण आहे तसं विठ्ठोबा-रखुमाई पाहु. मग तसं झालंही . पण तुला सांगते आपल्याला चांदण्यांचं अप्रुप पण त्यासाठी आभाळाला अंधार भोगावा लागतो तसंय हे. माझ्या वाटेला नावासकट जगणं अालं पण ती राधी काय भोगत असेल तिची तिच जाणो. मी मागे बसुन सगळं बघत असते. हेऽऽ गर्दीचे लोट पंढरीरायांच्या मागच्या दरवाजातुन माझ्या दारी येतात . त्याच्या चेह-यावरचं भारावलंपण लपत नाही. माझ्यासमोर येऊनही त्यांचं रुप पाहिल्याचा आनंद त्यांच्या चेह-यांवर दिसतो मला. 'तिथं' गेलं कि भारावणं अालंच मग तो निळसर कान्हा असो कि काळा विठू. कधी कधी हेच वैष्णव लोक भजनात दंग होऊन तल्लीन होतात अाणि नाचु लागतात तेव्हा त्या गर्दीत कोणाच्या तरी मागे येऊन विठुराया डोकावुन गेल्याचा भास होतो . नाचता नाचता कंबरेवर हात ठेऊन उंच उड्या मारत 'ठ्ठला ईठ्ठला' ह्या तालावर नाचणारे बालगोपाल पाहिले कि डोळ्यासमोर सहस्त्र पांडुरंग असल्याचा भास होतो. भास ? " मी म्हणालो " पण माई , देवाला राग,लोभ नसतो ना मग तू तरी चिडली कशी ?" " रुख्माई हसली म्हणाली , दैवबिव वलंय सारुन बरं का चिडता येतं , अंतर असलं तरच अावेगाने भिडता येतं. दोन बोटांमध्ये अंतर अाहे म्हणुन सख्याची बोटं त्यात मावतात अाणि एकवेळ सांधता येते हे द्वापारयुगात शिकवलंय यांनीच मला . आणि तेव्हा शिकले ही बरंच . वारक-यांची भरल्या डोळ्यांची गर्दी माझ्या समोर येते.तेव्हा त्याच्या भारावल्या डोळ्यात त्यांनी अात्ताच पाहुन अालेला पांडुरंग तरळत राहतो. मग मी बुचकाळ्यात पडते. कारण त्यांच्या डोळ्यात जर पांडुरंग दिसतो तर मी म्हणजे पांडुरंग कि पांडुरंग म्हणजे मी? मग मी उभ्या उभ्या पायच्या अंगठ्याने खाली वीट चपापते. वीट असली तर ? पण इतक्या वर्षात ठिसुळ झालेली वीट आता असेल नसेल ?   मग वैष्णवांनी टेकवलेलं डोकं उचलंल कि मी त्याच्या डोळ्यातले सावळे ढग पाहुन मनोमन त्याच्या पाया पडते.हे  असं सगळं समाधान लाभतं आणि  असा सगळा त्रासही..." 

जेवणखान आटोपत हात धुवून निवांत बसतांना मी म्हटलं " आई ? जर द्वापारवेळी इतका त्रास झाला होता तर आता पुन्हा त्यालाच का निवडावं ग तू  ? " 

रुख्माई म्हणाली " पुन्हा ? पुन्हा वगैरे असं काही नसतं रे. पारिजातकाच्या खाली बसल्यावर हि ओंजळीत फुलं पडणार आणि झाडाखाली बसलेला नसाल तरी वा-याचा झुळूकेने ते ओंजळीत येणारंच. एकदा झोकुन द्यायचं म्हटलं कि तीर काय आणि तळ काय. 
मुकामार 'निळा'शार निबर होत 'काळा' होतो. "
 इतकंच.

-प्राजक्त देशमुख




बॅकबेंचर्स : २४ कोलाज ( सामना २/०१/१६)

रात्री मोकळ्या अाकाशाखाली पहुडलो अमावस्या होती.दुख:अाणि अमावस्या जास्त काळ टिकत नाही मास्तर म्हणायचे. टिकत वरुन अाठवलं , त्याच्या अारशाला टिकली लावलेली अाहे ती त्याने काढली नाही कधीच तिची अाठवण म्हणुन राहु दिली अाहे. अारशावरुन अाठवलं, अाताशा बाजारात पुर्वी सारखे हसतमुख अारसे मिळत नाही म्हणे ? बाजारावरुन अाठवलं , सगळ्याचाच बाजार मांडलाय अाजकाल ...मैत्रीचा,भावनेचा, नात्यांचा सगळाच. नात्यांवरुन अाठवलं, परवा जाॅगिंग ट्रॅकवर एक भणंग माणुस दिसला शुन्यात नजर लावुन बसला होता. कुणीतरी म्हणे तो जिच्यासाठी इथे अाला ती कधीच त्याची नव्हतीच. जॉगिंग ट्रॅक वरुन अाठवलं , अाजकाल सगळेच पळताय कशाचा तरी मागे ,काही तरी शोधायला ,काही तरी पकडायला , कोणापासुन तरी लांब जायला पण पळताय फक्त. कुठे जायचं माहित नाही पण डोक्यात एकच मंत्र घुमत असावा त्यांच्या कि पळत रहा. मंत्रावरुन अाठवलं अामचे एक सर होते त्यांनी एक मंत्र दिला होता " हा हि काळ निघुन जाईल" हा मंत्र लिहुन ठेवा असं म्हणायचे ते अाणि अति दु:खात असला किंवा अति अानंदाच्या माजात असला कि हा मंत्र एकदा वाचा असं ते सांगायचे. मी त्याला महामृत्यंजय मंत्र म्हणायचो. दु:खावरुन अाठवलं. राधेचं पुढे काय झालं हे शोधता येईल , कृष्णाचं काय झालं हे माहितीच अाहे पण अनय पुढे काय झालं हे कुणी शोधलंय का ? त्याचं दु:ख मोठ कि त्याचं सुख? कृष्णावरुन अाठवलं , काल मुर्तीवाल्याची एक हातगाडी रस्त्यावरुन जात होती सगळ्या मुर्त्यांवर कपडा टाकुन ठेवला होता , कदाचित गोडवुन मधुन दुकानात नेत असावा तो. त्यात नाक्यावरल्या कृष्णाच्या देवळासमोरुन जातांना त्याला एक दगड दिसला नाही अाणि हातगाडी किंचीत वरखाली झाली तेव्हा मीरेच्या मुर्तीच्या हातातली एकतारी खाली पडली.ती त्याला दिसली नाही मला दिसली. अंगावर काटा अाला ती एकतारी मी कृष्णाच्या देवळात नेउन ठेवली तेव्हा कृष्णाच्या डोक्यावरचं जास्वंदीच फुल वारा वाहत नसतांना खाली पडलं. जास्वंदीवरुन अाठवलं एका मित्राचा घराबाहेर खुप जास्वंद लावलेले होते ,त्याला जास्वंद खुप अावडायचा .इतका त्याच्या त्या घराचं नाव पण जास्वंदच होतं. पण जेव्हा मला कळालं कि जास्वंद लावायला त्याने तिथला खुप अाधीपासुनचा बहरलेला गुलमोहर तोडला तेव्हापासुन मी त्याच्या घरी जाणं कमी केलं.गुलमोहर वरुन अाठवलं यंदा ऊन जास्त होतं त्यामुळे गुलमोहराची सावली जास्त थंड जाणवायची त्या झाडाखाली. भगभगत्या उन्हामुळे अचानक झाडाने पेट घेतल्यासारखा दिसतो मला गुलमोहर नेहमी. भगभगण्या वरुन अाठवलं, राणी पद्मिनीने चित्तोडगडात सोळा हजार रजपुत सख्यांसोबत जौहर केला होता तेव्हा त्या तडतडत्या अग्निशिखांमध्ये भगभगतांना कुणी चित्कारही काढला नव्हता. राणी पद्मिनीवरुन अाठवलं अाता प्रत्येकीने जौहर पेटावावा पण त्यांना त्रास देणा-याला त्यात ढकलण्यासाठी स्वत: जळुन जाण्यासाठी नाही. ढकलण्यावरुन अाठवलं मला अाठवी मधुन नववीत ढकलं होतं तेव्हा मास्तरीण बाई म्हणाल्या होत्या अाता तरी अाभ्यास करशील ना रे ? मी तुझ्याघरी नाही सांगणार हं . त्यांचा मुलाने मागच्याच महिन्यात नापास व्हायच्या भितीने अात्महत्या केली हे मला नंतर कळालं. नापास वरुन अाठवलं  पुढच्या अाणि मधल्या बेंचवरचे अभ्यासात पुढे असतात म्हणुन अायुष्यात पण पुढे असतात पण मागच्या बेंचवरचे अभ्यासात जरी मागे असले तरी अायुष्यात मागे कधीच नसतात.



अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...