"हि मागची पोरं म्हणजे निव्वळ भटकी जिप्सी ,अभ्यास नको यांना " हा नेहमीचा अपमान नंतर अाम्हाला हळुहळु अपमान वाटेनासा झाला.
शाळा नेमकी कधी सुरु झाली ह्याचा मागोवा घेतला तर प्रत्येकाचं कागदी विमान एका गाण्याच्या झाडावर येऊन अडकेल किंवा विसावेल ते गाणं म्हणजे "सांग सांग भोलानाथ , पाऊस पडेल का ?" शनिवारची संध्याकाळ असो , गणिताच्या पेपरच्या अादला दिवस असो , उन्हाळ्याच्या /दिवाळीच्या सुट्टीचा शेवटचा दिवस असो ..ह्या दिवसांत राष्ट्रगीत म्हणावं तसं शाळेत असतांना काहीतरी जादू व्हावी अाणि उद्या शाळा नसावी हि इच्छा व्यक्त करायला अाम्ही मुलं कर्कश अावाजात ढगातल्या देवाला एेकु जावं अशा अार्ततेने "सांग सांग भोलानाथ , पाऊस पडेल का ?' गायचो.
" बरंका, भाषेच्या चर्हाटाला , कधीही अंत नसतो | सारखी बडबड करणारा , चुकूनही संत नसतो || " असं अामचे मास्तर वर्गातल्या मागच्या रांगेकडे डोळे वटारुन म्हणायचे. पण हि बडबड 'चिऊताई चिऊताई दार उघड कविता शिकवतांना एकदम शांत होती हे अावर्जुन अाठवतं. त्या दिवशी घरी गेलो तेव्हा दार वाजवतांना 'अाई अालोय ग' असं सवयीने बोंबलण्याच्याएेवजी 'चिऊताई चिऊताई दार उघड' असं घशाची निळसर शीर टपटपेपर्यत अोरडल्याचंही अाठवतं.
लहान असतांना मी रुसुन बसल्यावर माझी समजुत काढतांना हळुहळु अावाजात अाणि नंतर वेग अाणि स्वर वाढवत ,दबक्या पावलांनी येत वडिल 'टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले' म्हणत गुदगुल्या करायचे. त्यात 'प्राजक्ताची फुssssले' याच्यावर त्यांचा विशेष जोर असायचा.
मागच्या बाकासहित सगऴयाच बुडत्यांना चाचणी निकालच्या नंतर ' मोर धुंद नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं? । कोकीळ सुंदर गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं ? । तुलना करित बसायचं नसतं , प्रत्येकाचं वेगळेपण असतं !' असं सांगणा-या मास्तरिण बाईंच्या चेह-याच रेष न रेष दिसते. सकाळी सकाळी जेव्हा अंगावरचं पांघरुण काढुन 'चला शाळेची वेळ होईल घाई करा , उठा ! ' असा हुकूम व्हायचा तेव्हा शेवटचे पाच मिनीटाची अधाशी झोप उपभोगतांना ' हो उठलेलोच अाहे' अाणि 'प्रत्यक्ष उठणे' ह्या दोघांच्या मधल्यावेळेत हाॅलमधुन रेडिअोतुन "दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचुन झुलायचेsss " हे एेकु यायचं तेव्हा वाटायचं उजाडलंय' कधी रविवारी दुपारीची झोप रेडिअोच्याच ' डोळ्यात सांजवेळी, आणू नकोस पाणी । त्या दूरच्या दिव्यांना, सांगू नको कहाणी ' ह्या स्वरांनी चळावायची.
शाळेतल्या हाफ चड्डया फुल झाल्या अाणि 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं' ह्या अोळींनी भाबड्या जिवाला अाजुबाजुची हिरवळ बघायची हिम्मत अाली. हिम्मत फळाला नाही लागली तेव्हा 'भातुकलीच्या खेळामधले राजा अाणिक राणी' ने अाधार दिला.
मरण्यावरही शतदा प्रेम करायला लावणारा हा 'अानंदयात्री' जो नकळत्या वयापासुन नेहमीच जवळ होता तो 'गेला' तेव्हा अचानक मागच्या बाकावरची माझ्या शेजारची जागा कायमची अोकीबोकी झाल्या सारखं वाटलं. अाम्हा जिप्सीच्या टोळक्यातुन एक जिप्सी उठुन निघुन गेला.
- प्राजक्त
No comments:
Post a Comment