Friday, January 1, 2016
बॅकबेंचर्स : २४ कोलाज ( सामना २/०१/१६)
रात्री मोकळ्या अाकाशाखाली पहुडलो अमावस्या होती.दुख:अाणि अमावस्या जास्त काळ टिकत नाही मास्तर म्हणायचे. टिकत वरुन अाठवलं , त्याच्या अारशाला टिकली लावलेली अाहे ती त्याने काढली नाही कधीच तिची अाठवण म्हणुन राहु दिली अाहे. अारशावरुन अाठवलं, अाताशा बाजारात पुर्वी सारखे हसतमुख अारसे मिळत नाही म्हणे ? बाजारावरुन अाठवलं , सगळ्याचाच बाजार मांडलाय अाजकाल ...मैत्रीचा,भावनेचा, नात्यांचा सगळाच. नात्यांवरुन अाठवलं, परवा जाॅगिंग ट्रॅकवर एक भणंग माणुस दिसला शुन्यात नजर लावुन बसला होता. कुणीतरी म्हणे तो जिच्यासाठी इथे अाला ती कधीच त्याची नव्हतीच. जॉगिंग ट्रॅक वरुन अाठवलं , अाजकाल सगळेच पळताय कशाचा तरी मागे ,काही तरी शोधायला ,काही तरी पकडायला , कोणापासुन तरी लांब जायला पण पळताय फक्त. कुठे जायचं माहित नाही पण डोक्यात एकच मंत्र घुमत असावा त्यांच्या कि पळत रहा. मंत्रावरुन अाठवलं अामचे एक सर होते त्यांनी एक मंत्र दिला होता " हा हि काळ निघुन जाईल" हा मंत्र लिहुन ठेवा असं म्हणायचे ते अाणि अति दु:खात असला किंवा अति अानंदाच्या माजात असला कि हा मंत्र एकदा वाचा असं ते सांगायचे. मी त्याला महामृत्यंजय मंत्र म्हणायचो. दु:खावरुन अाठवलं. राधेचं पुढे काय झालं हे शोधता येईल , कृष्णाचं काय झालं हे माहितीच अाहे पण अनय पुढे काय झालं हे कुणी शोधलंय का ? त्याचं दु:ख मोठ कि त्याचं सुख? कृष्णावरुन अाठवलं , काल मुर्तीवाल्याची एक हातगाडी रस्त्यावरुन जात होती सगळ्या मुर्त्यांवर कपडा टाकुन ठेवला होता , कदाचित गोडवुन मधुन दुकानात नेत असावा तो. त्यात नाक्यावरल्या कृष्णाच्या देवळासमोरुन जातांना त्याला एक दगड दिसला नाही अाणि हातगाडी किंचीत वरखाली झाली तेव्हा मीरेच्या मुर्तीच्या हातातली एकतारी खाली पडली.ती त्याला दिसली नाही मला दिसली. अंगावर काटा अाला ती एकतारी मी कृष्णाच्या देवळात नेउन ठेवली तेव्हा कृष्णाच्या डोक्यावरचं जास्वंदीच फुल वारा वाहत नसतांना खाली पडलं. जास्वंदीवरुन अाठवलं एका मित्राचा घराबाहेर खुप जास्वंद लावलेले होते ,त्याला जास्वंद खुप अावडायचा .इतका त्याच्या त्या घराचं नाव पण जास्वंदच होतं. पण जेव्हा मला कळालं कि जास्वंद लावायला त्याने तिथला खुप अाधीपासुनचा बहरलेला गुलमोहर तोडला तेव्हापासुन मी त्याच्या घरी जाणं कमी केलं.गुलमोहर वरुन अाठवलं यंदा ऊन जास्त होतं त्यामुळे गुलमोहराची सावली जास्त थंड जाणवायची त्या झाडाखाली. भगभगत्या उन्हामुळे अचानक झाडाने पेट घेतल्यासारखा दिसतो मला गुलमोहर नेहमी. भगभगण्या वरुन अाठवलं, राणी पद्मिनीने चित्तोडगडात सोळा हजार रजपुत सख्यांसोबत जौहर केला होता तेव्हा त्या तडतडत्या अग्निशिखांमध्ये भगभगतांना कुणी चित्कारही काढला नव्हता. राणी पद्मिनीवरुन अाठवलं अाता प्रत्येकीने जौहर पेटावावा पण त्यांना त्रास देणा-याला त्यात ढकलण्यासाठी स्वत: जळुन जाण्यासाठी नाही. ढकलण्यावरुन अाठवलं मला अाठवी मधुन नववीत ढकलं होतं तेव्हा मास्तरीण बाई म्हणाल्या होत्या अाता तरी अाभ्यास करशील ना रे ? मी तुझ्याघरी नाही सांगणार हं . त्यांचा मुलाने मागच्याच महिन्यात नापास व्हायच्या भितीने अात्महत्या केली हे मला नंतर कळालं. नापास वरुन अाठवलं पुढच्या अाणि मधल्या बेंचवरचे अभ्यासात पुढे असतात म्हणुन अायुष्यात पण पुढे असतात पण मागच्या बेंचवरचे अभ्यासात जरी मागे असले तरी अायुष्यात मागे कधीच नसतात.
Subscribe to:
Post Comments (Atom)
अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)
मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...
-
1) Shripad Deshpande : काही-काही गोष्टी लहानपणापासून माझी तंद्री लावणाऱ्या. म्हणजे गरम गरम कातळावर तांब्याच्या पेल्यातून पाणी सोडलं त...
-
जिंदगीभर कोइ गम तो ढो ता नही जख्म धो भी लेगा की दर्द धोता नही खुदको कोस कर कहा मैने अपने अापसे इसकदर कोइ अपनी जान खोता नही ...
No comments:
Post a Comment