Friday, July 21, 2017

ग्राहकहो (ललित)

नाही समजलं ? बरं वेगळ्या पद्धतीने सांगतो. म्हणजे असं बघा कि समजा…..म्हणजे समजा हं ! जर एखादी गाडी बघणे, तीच्या बद्दलचे फायदे कळाल्यावर अासक्ती निर्माण होणे मग ती विकत घेणे अाणि त्यात जाऊन बसणे. हि प्रक्रिया जर ‘जन्म’ असेल तर….
…तर ग्राहकहो, तुम्ही जन्माला आलात तेथेच गंडवला गेला आहात. जन्म म्हणजे अाता एका गाडीत बसल्याचे जे तुम्हाला जाणवते अाहे, त्या गाडीत ज्यात तुम्हाला उत्तम मायलेज, कमीत कमी इंधन, कमी मेंटेनन्स अाणि भरपुर लक्झरीअस अाणि अारामदायी म्हणुन बसवलं अाहे. ती अाता पुढील चौ-यांशी लक्ष फेरे इथेच घुटमळत राहणार अाहे. गाडीची कंपनी देह, काया किंवा शरीर ह्या नावानेही तिला अोळखतात. नावं जरी वेगळाली असली तरी मालक एकच असतो. बाहेर जरा वाकुन पाहिलं, खरं तर वाकुनच पहावं लागेल कारण एकदा गाडीत अाल्यानंतर गाडीच्या बाहेर येणं अाता शक्य नाही. जास्तीत जास्त ह्या गाडीतुन त्या गाडीत महत्प्रयासाने जाता येईल पण इतकंच. कारण गाडीबाहेर येण्यासाठीचे कष्ट तुम्हाला झेपणारे नाहीत. तर, जरा वाकुन पाहिलं तर एक लक्षात येईल कि गाडीला जी चार चाकं अाहेत तो मुळातच भ्रम अाहे. अगदीच निरखुन पाहिलं तर चारही चाकांच्या कंपनीचा मेक तुम्हाला दिसेल. भास, भ्रम, मिथ्या, माया. हि गाडी ह्या चाकांच्या सहाय्याने कुठेतरी घेऊन जात अाहे असा तुम्हाला सतत भ्रम होत राहिलं. मात्र कुठेतरी जाणारे तुम्ही कुठेही पोहोचण्याची शाश्वती नाही. पण हे तुम्हाला कळणार नाही. हो, पण हे तुम्हाला ‘कळणारच’ नाही असंही नाही. तर ग्राहकहो, तुम्ही जन्माला आलात तेथेच गंडवला गेला आहात.
ग्राहकहो, ह्या गाड्या ज्यांना मेंटेनन्स कमी अाहे असं सांगितलं गेलं होतं त्यांला सतत सजवण्याचा तुम्हाला मोह होत राहिल. कुठे न नेणा-या चाकांमध्ये हवेचा दाब सतत सारखा ठेवावा लागेल. रेडिएटर मधलं पाणी, इंजिनमधलं अॉईल सगळ्यांची लेवल सतत तपासत रहावी लागेल. काहीही कारण नसतांना डॅशबोर्डवरची धुळ साफ करणा-या चालकासारखे तुम्ही पुन्हा पुन्हा कपडा मारत रहाल. मळकट कपड्यामुळे तेच साफ केलेलं तेच धुळकण पुन्हा तिथेच सुटल्याने सफाई केल्याचा फक्त भास तुम्हाला सतत होत राहिल. मुळातच ह्या सर्व कामांमध्येच तुम्ही इतके गुंतलेले रहाल कि ग्राहकहो, तुम्ही जन्माला आलात तेथेच गंडवला गेला आहात हे तुमच्या ध्यानीमनीही येणार नाही.
ग्राहकहो, कधी कधी असंही होईल कि हे सगळंच रहाटगाडगं असह्य होईल मग काच भरुन पाणी येईल मग वायपर वायपर सावरुन परत तयार रहावं लागेल. वाटलं तर एकट्याने प्रवास करत रहा. वाटलं तर अाणखी काही सहप्रवासी घ्या. प्रवासात हवे ते संगीत लावत रहा. हि ‘हवी ती’  मुभा दिलेली असली तरी तुम्ही अाधी बालगीते नंतर काही उथळ गाणी नंतर संथ गाणी अाणि नंतर भक्तीगीतंचं एेकणार अाहात. पण ह्याचा क्रम बदलुन पहायला हरकत नाही. पण नियम असल्यासारखं तुम्ही तोच क्रम पाळत रहाल. मग कधीतरी गाडीचा एखादा लाला बीप वाजुन ‘अलर्ट’ वाजेल किंवा गाडीच्या फायरिंगमध्ये नॉकींग जाणवेल. मग उगाच थोडं इकडं तिकडं पाहिल्यावर तुमच्या हाताला एक ‘युजर्स मॅन्युअल’ लागेल. ज्याला काही लोक धर्मग्रंथही म्हणतील. मग त्यात तसं तसं सांगितल्याप्रमाणे वागत राहिल्यावरही सगळं काही ठिक झाल्याची अाशा तग धरुन राहिलं. पण तरीही तुमचा एखादा कोपरा रिता रिता जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण हे उघड उघड बोलण्याचं धाडसंही नाही. एव्हाना काचेतुन दुसरा गाडीवाला तुम्हाला हेही सांगायचा प्रयत्न करेल कि ‘ते’ नव्हे ‘हे’ माझ्याकडे असलेलं मॅन्युअल वाच. कारण तुझ्याकडे असलेलं मॅन्युअल तद्दन फालतु अाहे. ते एेकुन तुम्ही तीनच गोष्टी करा. एक तर खुल्या दिलाने त्याचं एेका, किंवा दुसरं म्हणजे दुर्लक्ष करा किंवा तिसरं म्हणजे ‘गाडी मॉडेल वेगळे असल्याने त्या त्या मॉडेल ने ते ते मॅन्युअलच वाचावे त्यात गैर नाही’ हे सामंजस्याने त्या चालकाला कळवा. परंतु ह्या तिनही गोष्टीसोडुन हुज्जत घालायला जाल तर अपघाताशिवाय हातात काहीही येणार नाही. मुळात कुठेही न जाणा-या गाडीचं मॅन्युअल वाचणंच विरंगुळ्याचं काम असल्याने त्यावरुन हुज्जत वगैरे घालणं हे किती महद् वेडगळपणाचं अाहे ह्याची कल्पना तुम्ही कराच. बरं इतकं असुनही गाडी सोडुन जाण्याचा विचारही तुमच्या अासक्तग्रस्त मनात येणार नाही. मुळात गाडी हेच सर्वस्व अाहे अाणि ह्या गाडीची सजावट म्हणजेच अायुष्याचा खरा अर्थ अाहे हेच तुम्ही मानत रहाल. पण गाडी सोडुन देण्यात खरा अर्थ दडलाय हे कळेपर्यंत खुप वेळ झालेला असेल. मुळात गाडी प्रवेश करणेच एक छल होता म्हणजेच ग्राहकहो, तुम्ही जन्माला आलात तेथेच गंडवला गेला आहात.

ग्राहकहो, कधी गाडी हळुवार चाललेली असेल तेव्हा वाटेल ‘अाहाहा हाच तो प्रवास!’ , कधी असंही जाणवेल कि रस्त्यात प्रचंड खाचखळगे अाहे. मग त्यामुळे मानेत उसण भरेल, मणक्याचे हाड मोडेल, शेवटी शेवटी गाडी उताराला लागेल तेव्हा अातापर्यंतचा सगळा प्रवास झरझर समोरुन उलगडत जाईल. पण लक्षात घ्या , हि गाडी ह्या चाकांच्या सहाय्याने कुठेतरी घेऊन जात अाहे असा तुम्हाला सतत भ्रम होत राहिलं. मात्र कुठेतरी जाणारे तुम्ही कुठेही पोहोचण्याची शाश्वती नाही. म्हणुन ग्राहकहो, तुम्ही जन्माला आलात तेथेच गंडवला गेला आहात हे लक्षात घ्या.
- प्राजक्त २१ जुलै २०१७

Thursday, July 6, 2017

औरंगाबाद एकनाथ रंगमंदिराला सांस्कृतिक अनास्थेचा विंचू चावला.


विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला हो ऽऽ ! 
हा विंचू चावल्यावर 'काय मी करु?' अशी निदान विचारणा तरी होते. मग एकनाथ बुवा कोणता विंचू चावल्यावर काय उतारा घ्यायचा ते सांगतात.
पण औरंगाबादच्या 'संत एकनाथ नाट्यमंदीराच्या' ढिसाळ नियोजनाचा आणि सांस्कृतिक अनास्थेचा विंचू कितेक रंगकर्मींना चावुन झाला. चावलेल्यांनी बोंबाबोंब करुन ठणाणा करुन झाले. पण उतारा सोडाच निदान 'कोण बोंबलतोय' ह्याकडे साधे ढुंकूनही पहाण्याचे धारीष्ट्य औरंगाबाद महानगरपालिकेकडे नसावे हे अगम्य अाहे.
प्रशांत दामलेंनी मागे ह्याच रंगमंदिराच्या मोडक्या व्यवस्थेचे फोटो टाकले होते. पण हाविंचुचावापालिकेला इतका सवयीचा झाला असावा कि विंचवाच्या ह्या विषाची पालिकेच्या निबर शरीराला सवय झाली असावी. ह्या विषाबद्दल पालिकेच्या शरीरात आताअॅन्टीरेझिसटन्सी’ तयार झाली आहे.
दामलेंनी एकदा नाशिकच्या कालिदास बाबत हेच केले होते. पण तिथली यंत्रणा खडबडून जागी झाली आणि काही कोटी रुपये पालिकेने मंजुर करुन आता जुलै २०१७ पासुन कालिदास रंगमंदिर नुतनीकरणासाठी बंद होत आहे. ह्यात दामलेंची रंगभुमीविषयची अास्था अाहेच पण स्थानिक रंगकर्मी, महत्वाची वृत्तपत्रे यांनी हा विषय एेरणीवर घेतल्यामुळे हे शक्य झाले. अाणि अर्थात नाशिक पालिका यंत्रणेने हि टिका जिव्हारी लावुन घेतली अाणि लागलीच कामाला लागले हेही नसे थोडके. 

नाशिक पालिका जागी झाली कारण ती झोपली होती. औरंगाबाद पालिका झोपेचं सोंग घेत असावी अशी दाट शंका येते.

'हंडाभर चांदण्या'च्या प्रयोगाच्या निमीत्ताने हा अनुभव आला. प्रवेशालाच जाहिरातीसाठी बोर्ड ठेवण्याच्या जागेपासुनच आबाळ सुरु होते. आत गेल्यावर सगळीकडे धुळीचं साम्राज्य. संडास बाथरूममधली दुर्गंधी, बॅसिनचे भांडे गायब, दुस-या ठिकाणी बेसिन होते पण नळ गायब, मोढे-लेव्हल्सची दुर्दशा तर अफाट, पाण्याचे मशिन धुळखात, नाटकासाठी लागणारे साधे टेबल-खुर्ची उपलब्ध नाही, प्रकाशयोजना हा प्रकार रंगमंदिरात प्रयोगासाठी आवश्यक असतो हेच ह्यांना ठाऊक नसावे की काय अशी शंका येण्याइतपत भीषण परिस्थिती आहे. पर्यायी बाहेरुन प्रकाशयोजना मागवावी लागते पण ती पुरवणारे पण निव्वळ कामचलाऊ अाणि मद्दड, त्यात परत रंगमंदिराच्या वायरीच्या जंजाळात शॉर्टसर्किट, चालु प्रयोग अंधार झाल्यामुळे थांबावावा लागणं आणि स्टेजवर शिडी(घोडा) आणुन वायरींगच्या जाळ्यातुन दुरुस्ती करणे आणि पुन्हा 'पाॅज' वर असलेले नाटक सुरु होणे हे नाट्यमंदीरासाठी किती लाजिरवाणे आहे अाणि नाटकाच्या फ्लोसाठी किती किळसवाणे अाहे. एखादे मांजर चालू नाटकात राजरोसपणे शतपावली करत रंगमंचावर फिरत असते. मनपाच्या शाळेतले तांदळांचे गोदाम आहे कि रंगमंदीराचे ग्रीनरुम? अशी बकाल अवस्था. खुर्च्यांचा पत्ताच नाही, जमिनीवर फतकल घालुन बसा अाणि करा मेकअप.

असे असुनही हि अडथळ्याची शर्यत पार करत नाटकानंतर औरंगाबादकरांनी उभे राहुन मानवंदना दिली. एक स्थानिक ज्येष्ठ रंगकर्मीं ताईंनी सर्वांसमक्ष 'रंगकर्मी म्हणुन हे नाटक पहाता आलं हे भाग्य आहे पण औरंगाबादकर म्हणुन नाट्यगृहामुळे तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल लाज वाटते.’ असे जाहिर उद्गार काढले.
एका स्थानिक नाट्यकर्मीला समस्त औरंगाबादकरांतर्फे बाहेरुन येणा-या संघाची रंगमंदिरच्या आबाळतेमुळे जाहीर माफी मागावी लागते हे एका शहरासाठी किती दुर्देवी आहे. प्रयोगानंतर प्रत्येक रसिक येऊन कौतुक करत होता पण एकनाथच्या दुरावस्थेबद्दल शहराचा नागरिक म्हणुन खजिल होत उसासे सोडत होता.

'
किती वर्षापासुन पालिका एकाच पक्षाकडे आहे' असं काही बोललं तर मग त्याला राजकिय स्वरुप प्राप्त होईल. पण ते ही वास्तव आहे. इतकी वर्ष शहराच्या सांस्कृतिक उत्थानासाठी रंगमंदीरांचे रुपडे पालटण्यापेक्षा शहराच्या नामकरणावर शक्ती खर्च करण्यात वाफा दवडणा-यांकडुन फार अपेक्षा ठेवणे उचित नाही.
शहराची एक सांस्कृतिक भुक असते जी पुर्ण झाल्यास शहराचे बौद्धीक कुपोषण वाढायला लागते. शहरातले रंगकर्मी, नाट्यरसिक ह्यांना आवाज बुलंद करण्याची गरज आहे.
समाजाला मनोरंजनातुन प्रबोधन करणारे आणि भारुडं लिहणा-या, एकनाथांचा वारसा सांगणा-या शहराला आणि रंगमंदीराला हे दिवस यावे हे अनाकलनीय आहे.
औरंगाबाद नाट्यरसिकांनी दिलेल्या प्रतिसादाला नमन. त्यांचा हा रंगमंदिराच वनवास लौकर संपो हि संत एकनाथाकडे प्रार्थना.

एकनाथ रंगमंदिर म्हणत असेल ...
विंचू चावला वृश्चिक चावला अनास्थेचा विंचू चावला तम घाम शहरासी आला धृ॥
पंचप्राण व्याकुळ झाला त्याने माझा प्राण चालिला सर्वांगाचा दाह झाला १॥
पालिका इंगळी अति दारुण मज नांगा मारिला तिने सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची २॥
ह्या विंचवाला उतारा आळसगुण मागे सारा इच्छाशक्ती लावा अंगारा विंचू इंगळी उतरे झरझरा ३॥

कर्म उतारा देऊन अवघा सारिला आळसगुण किंचित राहिली फुणफुण शांत केली जनार्दने ४॥

- प्राजक्त २६ जुन २०१७

Saturday, July 1, 2017

अाषाढ दृष्टांत (मटा लेख )

दिवस अाषाढीचा. वर्ष अाजचं, कदाचित चार वर्षापुर्वीचं, पन्नास वर्षापुर्वीचं ,किंवा जे तुम्हाला सोयीचं वाटेल ते.
शेकडो कोसांची पायपीट, हजारो दिंड्या, कोट्यावधी पाऊलं तुडवत, अब्जावधी नामस्मरणाचे मोहोळ ज्या दिवसासाठी ज्या क्षणासाठी अलंकापुरीत येऊन थबकले त्यांना अाणखी थोडं ताटकळत बसावं लागलं कारण राज्याचे मा.मुख्यमंत्री साहेब राज्यातर्फे अाणि राज्याच्या समस्त जनते तर्फै ‘शासकीय महापुजा’ करायला अाले होते. प्रसन्न मुद्रेच्या शासकिय दांपत्यांच्या चेह-यावर सकाळी लवकर उठल्याचा शीण अाणि प्रवासामुळे डोळ्यात अालेलं तारवटलेपण दोन्ही मेकअपच्या अाड झाकल्या गेलं होतं.
गाभा-यात प्रवेश करण्याअगोदर साहेबांच्या सेक्रेटरीने साहेबांकडे एक मळकट, सेलोटेपने चिकटवलेला जीर्ण कागद सरकवला. साहेबांनी फक्त नजरेनं ‘काये?’ विचारलं. सेक्रेटरी कानात खुसफुसला “ दर्शनपुजेनंतरचा मुख्यमंत्र्यांचा ‘न्युज बाईटे’ सर तो. साहेब चमकलेच “ हा असा?” सेक्रेटरी उद्गगारला “दिंडी इतकीच जुनी परंपरा अाहे साहेब ती. बाईट मध्ये बदल नसतो होत. प्रोटोकॉलच्चे तसा” अाता प्रोटोकॉलचा दांडा अाडवा केल्यामुळे साहेबांना थोडं वाकावच लागलं. तत्पुर्वी झेड सिक्युरिटीवाल्यांनी अाधी गाभा-यात जाऊन सगळी सिक्युरिटी चेक केली. तुकोबांनी ज्याच्यासाठी “करिसी आमुचा सांभाळ । तूं रे माउली स्नेहाळ” असे लिहुन ठेवलेय त्या पांडुरंगाच्या गाभा-यात सगळं सुरक्षीत अाहे ह्याची खात्री झाल्यावर झेड सिक्युरिटीवाल्यांनी हिरवा कंदील दिला अाणि साहेब गाभा-यात अाले.
साहेब गाभा-यात अाल्यानंतर लगबग सुरु झाली.. काही तरुण पुजारी लोकांनी अदबीने नमस्कार केला, काही अनुभवी पुजा-यांनी अापल्या ज्युनिअर पुजा-यांवर प्रौढी मिरवायला नुसतंच स्मित करुन ‘असे लई पाहिले’ अशा अविर्भावात ‘इथे उभे रहा, तिथे उभे रहा’ अशा नम्रपणे सुचना केल्या. साहेबांनी अाणि ताईसाहेबांनी नम्रतेने त्या स्विकारल्या. सर्व सोपस्कर भक्तिभावात पार पडले. जिथे जिथे अावश्यक तिथे तिथे ताईसाहेब साहेबांच्या हाताला हात लावत होत्या. जिथे जिथे अावश्यक तिथे तिथे साहेब अाचमन करत कधी पाणी डोळ्याला लावत होते तर कधी ‘हस्त प्रक्षाल्य’ म्हटलं कि पाणी बाजुल जमिनीवर सोडुन देत होते. गंध-टिळा, अबीर-बुक्का, महावस्त्र, तुळसचाफ्याच्या माळा असं सगळं सगळं काही झालं. साहेबांनी सवयीने मनगटाकडे पाहिले. सकाळचे ९ वाजुन ९ मिनीट झाले होते. साहेबांनी लीनपणे विटेवर डोकं टेकवलं. 
.,…अाणि जेव्हा साहेबांनी डोकं वर उचललं तेव्हा अाजुबाजुला अचानक पुर्ण शुकशुकाट होता. ताईसाहेब नाही, सेक्रेटरी नाही,  पुजारी नाही, गर्दी नाही. साहेबांनी बाहेर अंदाज घेतला तर भाविकांची झुंबड नाही, झेड सिक्युरिटी नाही. अात्ता होते अाणि अाता नाही ? असं कसं? 
साहेबांनी अात वळुन पाहिलं तेव्हा गाभा-यात फक्त एक काळीसावळी वृद्ध व्यक्ती होती. पांढरा धोतर, सदरा, पांढरट भुरके विस्कटलेले केस, वेशीवरच्या पिंपळाखाली गप्पा ठोकायला चार म्हातारी टाळकी बसतात अगदी तसाच. चेह-यावर चौ-यांशी लक्ष सुरकुत्या. पण चेह-यावर विलक्षण समाधान अाणि डोळे म्हणजे जणू काय खोल देवडोह. साहेब म्हणाले “बाबा कोण अापण? कुठं गेले सगळे?”.  बाबा म्हणाला “ हां चालंल , बाबा पण चालंल. त्यात काय इतकं !” . साहेब म्हणाले “ सगळे कुठे गेले अचानक?” बाबा म्हणाला “ तुम्हाला जरा चक्कर अाली हुती. वैद्य येऊन पाहुन गेल्ये. समदे त्यांनला सोडायला बाहिर गेल्याती अान थोडायेळ विश्राम घेयला सांगुन गेल्याती वैद्यबुवा. येतील इतक्यात. मी हाय तुमच्या दिमतीला, येत्याती चार दहा मिन्टात सगदे.”  साहेबांचा मनातला शीण जरा कमी झाला. परत एकदा बाहेर पाहुन अचानक सगळे भाविक गेले कुठे असं विचारावंसं वाटलं त्यांना पण राज्याचा मुख्यमंत्री चक्कर येऊन पडला म्हणुन सगळी जागा इव्हॅक्युएट केली असेल असं स्वत:च पुटपुटले ते. खरंतर बाबाने जे सांगितलं त्यांनंतर अनेक प्रश्न पडायला पाहिजे होते पण बाबाच्या वाणीत इतकी शाश्वती होती कि त्यांनी सांगितल्यानंतर फार प्रश्न विचारणं रास्त नाही वाटलं साहेबांना. “काय म्हणतंय पीकपाणी?” साहेबांनी दौ-यावर असलेल्या शेतक-याला सवयीने काहीतरी विचारावं तसं विचारलं. “चाल्लंय, सायेब” साहेबांनी उगाच सदरा सारखा केला अाणि सवयीचं हसले. बाबा म्हणाला “तुमी दरवर्षी इठ्ठलाकडं ‘बळीचं राज्य येऊ दे, पाऊसपाणी भरपूर पडु दे’ हे असं सगळं खरंच मागतेत काय?” साहेब अात्मविश्वासाने म्हणाले “ हो मग ! अर्थातच. एकदम मनोभावे. पण का असं का विचारलं?.”  बाबा म्हणाले “न्हाई अापलं सहज.”
अचानक एखादी लिफ्ट बंद पडावी अाणि लिफ्टमध्ये असलेल्या दोन अनोळखी लोकांना बोलायला समान विषय नसावे. तसं चाललं होतं सगळं. अाजुबाजुला बरंच अवघडलेपणाचं मळभ दाटलं होतं. 
मग बाबांनीच परत विषय घेतला “म्हंजे देवबिव नाहीच ब्वा.सब झुठ !” साहेब जरा चिडलेच “ असं कसं म्हणता तुम्ही?” बाबा म्हणाले “राग अालाय का ? बरं देव अासंल पण मंग हा ईठ्ठल वगैरे देवात काही दम नसावा कि काय जणू?” साहेब अाणखी वैतागले “ बाबा अहो, त्याच्याच मंदीरात उभे राहुन त्याला काय नको नको ते बोलताय ? हे पहा तुम्ही नास्तिक असण्याला माझा विरोध नाही. लोकशाहीत सगळ्यांना सगळे हक्क असतात. पण निदान माझ्या समोर माझ्या देवाला काही बोलु नका. अशाप्रकारे अास्तिकांच्या भावना दुखवू नये. समाजाने घालुन दिलेले माणुसकीचे संकेत असतात ते.”
बाबांना साहेबांच्या अभ्यासु प्रत्युत्तराचं नवल वाटलं. बाबा म्हणाले “ अाहो पण वर्षानुवर्ष त्येच साकडं घालताय. तरी का सुधरं ना शेतक-यांची अाबाळ? हे पहा ,येक तं तुमच्या साकड्यात तरी दम नै किंवा तुमच्या देवात तरी. काहीतरी एक नसल्याशिवाये का हा खेळखंडोबा ? ” अाता साहेब वैतागलेच “हे पहा अामचे साकडे बेंबीच्या देठापासुन सत्य अाहे अाणि अामचा देवावरही अामची शंभर टक्के श्रद्धा अाहे. हे पहा निसर्गाच्या अवकृपेचा काही भरवसा नसतो. अाणि अामच्या यंत्रणेतही काही लुपहोल्स असतील अाम्ही नकार देत नाही.”  परत एकदा अाजुबाजुला डोकावुन साहेबांनी कुणी येतंय का ह्याचा अंदाज घेतला. गाभा-याच्या समोरचं ग्रील बंद दिसतं असल्याने साहेबांनी ‘बाहेर जाण्यात काही हाशिल नाही’ हे अाधीच लक्षात घेतलं होतं. 

बाबा “निसर्गाचं ठिक अाहे पण देवावर श्रद्धा ठेऊन यंत्रणेतले लुपहोल्स मिटतील? बरं अाता ब्वा जर पाऊस न्हाईच अाला तर दुष्काळाचा इव्हेंट कराला दौरे निंगतील. मग विरोधातले बी अापापल्या पद्धतीने दुष्काळ साजरा करतील. मला येक कळं ना झालंय कि दुष्काळ कै वादळ-गिदळ थोडीच असतंय अचानक येला. ते येतांना अंदाज देतंय, कोप-यावर अालेलं दिसतंय , दारावर अालेलं बी दिसतं अान मंग घरात ठाण मांडुन बसलेलं पण दिसतं. मंग अचानक पाहुणे अाल्यासारखी पळापळ कशापाय हुती हो?  बरं अगदी सालाबादाप्रमाणे अगदी दोन-चार वर्षात एखांदा दुष्काळ येतोच कि अो ! दुष्काळनिवारण म्हंजी मोडल्याली पिकं उभी करणं न्हाई, मोडलेली माणसं उभी करणं म्हंजी दुष्काळनिवारण,  हे कधी करणार तुमी? योजना-योजना करत कोटीने पैका अोतला कि दुष्काळनिवारण हुतंय व्हय ? उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिशी रातीची प्हाट अाणि प्हाटेची सकाळ हुते पण तरी बी तुम्हाला जर एबी फॉर्म मिळाला नाही तर कसं गुदमरलेपण येतंय ? तसं हुतं काढणीच्या अाधीच पिकांची माती होतांना जेव्हा शेतकरी बघतो. तुमाला निदान येगळे मार्ग तरी असत्यात पण त्याच्याकडं तेवढा येकंच जमिनीतुन उगवायचा मार्ग.” साहेबाला जरा अारसा पाहिल्यासारखं अोशाळवाणं झालं. बाबानी काखेतलं बोचकं काढलं. गाठ उघडली. “या जरा मिरची भाकरी घेऊ जराशीक. शुगरबिगर अासंल ना? वेळ पाळावी लागते म्हणं त्याला” अाता साहेब अाणि बाबा जमिनीवर फतकल मारुन न्याहारीला बसले. बाबांनी एक बुक्की मारली अाणि एक कांद्याची फोड साहेबांकडे सरकवली. जेवता जेवता बाबा बोलतच होते. “सगळ्यात अाधी काही गैरसमज तुमी काढुन टाका बरं, सायेब. पहिलं असं कि ‘बळीराजाच्या घामाच्या सुगंधाने फुललेली जमिन वगैरे बोलणं बंद कराय सांगा सगळ्यांना. कोणत्याच घामाला सुगंध नसतोय. लोकायच्या कष्टीपणाला चांदण्यांचं रुपक देऊन बोथट कहाला करत्या सगळे? दुसरं म्हणजे अाभाळातल्या चांदण्यांखाली पहुडलेला बळीराजा वगैरे हा रॉमेंटीसिझम बी पुसुन टाका. उघड्या अाभाळात चांण्या पाहुन कोणत्याच शेतक-याला बरं वाटत नसतंय. चांण्या दिसल्या ह्याचा अर्थ म्हंजी अाभाळात ढग नाही असा होतो म्हाराजा ! जमिनीच्या पोटात स्वप्न पेरल्यानंतर जर वरती ढग नसेल तर शेतक-याच्या पोटात खड्डा नाई तं काय पडंल?  तितक्यात अनेक लोकांची कुजबुज एेकु यायला लागली. बाबानी साहेबांना खिडकीजवळ अाणलं अाणि म्हणाला “ ते पहा रांगेत वाट पाहणारे वारकरी. काय वाटतं ह्या दिंड्या, ह्या वा-या म्हणजे भक्तिरसाचा अोतप्रोत संगम बिंगम अाहे? तर नाही !  जातिवंत दु:खांचे तांडे अाहेत त्ये, सायेब. ल्हानपणी छडी उगारलेल्या मास्तरासमोर अापण डोळे गच्च मिटुन उभे रायचो. ते डोळ्यांचं मिटणं म्हंजे छडीचा त्रास वाचावा किंवा कमी व्हावा ह्या भाबडेपणात अालेलं असतं. बी जमिनीत पेरुन पाऊस येईल हे स्वप्न पहात पंढरीला मार्गस्थ होणं म्हंजे तसलंच डोळ्याचं मिटणं असतंय सायेब. पांढ-या पेहरावातला ढगाळ गावक-याचा दिंडीत करडा वारकरी हुतो अान पंढरीत काळ्या पांडुरंगासोबत काळाभोर ढग बरसायचे स्वप्न पाहतोय. एक एक नक्षत्रांचे दान कोरडं पडायला लागलं कि शेतक-यांच्या विश्वासाच्या सोंगट्या दुस-याच्या घरात सरकत नाहीत. अान अशा सोंगट्यांना परतणं माहीत नसतंय. अाणि परतणं माहीत नसलेलं पाखरु विजेच्या हायवॉल्टेज तारेत स्वत:ला झोकुन देतंय. एक सांगु? एकदा अाषाढी एकादशी चुकवाच अाणि अलिकडचे एखादे रिंगणातले खेळ पहायला जा साहेब कधीतरी. सगळे पाश सुटल्याच्या भ्रमात, सगळी कर्ज, सगळी देणी फिटल्याच्या अाभासात वेडावुन नाचत असतात सगळे.  ‘भीमा’सारखे बलदंड दु:ख पुढ्यात असुनही फक्त शेकडो कोसावरचा चंद्र पाहुन त्याचं भागतं असा भोळसट माणुस अाहे ह्यो. उगाच भीमा नदीला पंढरपुराच्या वळणापुरती चंद्रभागा म्हणत्यात का? अापल्याकडं बारा वर्षातुन एकदा कुंभमेळा हुतो अान लोकं अमृतबिमृतात पापं मोकळी करत्यात. केवढा ढोलगाजा तेचा? चंद्रभागा हेच दरवर्षाला करतीय दरवर्षाला. काढा कडवट अासंल तर पाणी घालुन कडवटपणा कमी करतेत. वारी म्हणजे एकट्यातली कडवट कळ दिंडीत फिकी करायची प्रक्रिया हाय सायेब, इतकंच.”  साहेब म्हणाले” बाबा खरंय पण कसंय कि अडचणी येतात, प्रश्नही खुप अाहे पण खरी अडचण हि अाहे कि अापण देव नाही ते पटकन सोडवायला, थोडावेळ लागतोच ना ? ” 
बाबा हसला म्हणाला “ एक करा सायेब कि एकदा हेलिकॅप्टर ने नाही रस्त्याने या पंढरीला अाणि इतके वर्ष झाले राज्याच्या ‘अाराध्य बिराध्य दैवताच्या’ पंढरपुराकडे येणारे महामार्ग अजुनही एकपदरी अाणि खड्डेदार अाहे त्याचं काहीतरी करा अाधी. अाणि हो  देव असाया हातात चक्र , खांद्यावर धनुक्ष, डोसक्यामागं वलय ,अाजुबाजुला गदा ,शंख असल्याचा फील असाय पाहिजे अासं काही नसतं सायेब. तुमी निस्ती कमरेवर हात ठेवलेली यंत्रणा जागी करा. अान सायेब , एकदा मनापासुन डोळे मिटा अाणि पायाच्या अंगठ्याने खालची जमीन चापसा…… पायाला विट लागली कि समजा देव झालेच तुमी. फक्त कमरेचे हात तेवढे हालवले कि मिळवलं. यू का मी ? जरा पाहुन येतो इतका येळ का झाला ते ?”  साहेबांनी भारावुन विचारलं “ काय करतात बाबा ? शेतीबिती अाहे का ? काही मदत लागली तर कळवा” बाबा म्हणाले “ शेतीगिती काय नाय अापली, मदतगिदत पण नको. अापल्याला तुमच्या सल्लागार समितीवर ठेवता का?” बाबा म्हातारं बोळकं अाणि साहेब खुप दिवसांनी निरागस खळखळुन हसले. बाबाने परत निरोप घेतला. साहेबांनी भारावल्या मनाने त्यांना संमती दिली अाणि नमस्काराला डोकं झुकवलं.  
साहेबांनी टेकवलेलं डोकं वर घेतलं तेव्हा अाजुबाजुला प्रचंड गजबज होती, ताईसाहेब, सेक्रेटरी, पुजारी, झेड सिक्युरिटी सगळे अाहे तसेच होते. साहेबांनी सवयीनं मनगटाकडे पाहिलं. सकाळचे ९ वाजुन ९ मिनीट अाणि दोन सेकंद झाले होते. 


दुस-या दिवशी अनेक पेपरला हेडलाईन होत्या. “मुख्यमंत्र्यांचं पांडुरंगाकडे साकडं, सुजलाम सुफलामचं मागणं, बळीराजाचं राज्य येऊ दे, पाऊस पडू दे अाणि राज्यावरचं अवर्षणाचं सावट दूर करायची मागणी”

१   जुले २०१७

अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...