Saturday, July 1, 2017

अाषाढ दृष्टांत (मटा लेख )

दिवस अाषाढीचा. वर्ष अाजचं, कदाचित चार वर्षापुर्वीचं, पन्नास वर्षापुर्वीचं ,किंवा जे तुम्हाला सोयीचं वाटेल ते.
शेकडो कोसांची पायपीट, हजारो दिंड्या, कोट्यावधी पाऊलं तुडवत, अब्जावधी नामस्मरणाचे मोहोळ ज्या दिवसासाठी ज्या क्षणासाठी अलंकापुरीत येऊन थबकले त्यांना अाणखी थोडं ताटकळत बसावं लागलं कारण राज्याचे मा.मुख्यमंत्री साहेब राज्यातर्फे अाणि राज्याच्या समस्त जनते तर्फै ‘शासकीय महापुजा’ करायला अाले होते. प्रसन्न मुद्रेच्या शासकिय दांपत्यांच्या चेह-यावर सकाळी लवकर उठल्याचा शीण अाणि प्रवासामुळे डोळ्यात अालेलं तारवटलेपण दोन्ही मेकअपच्या अाड झाकल्या गेलं होतं.
गाभा-यात प्रवेश करण्याअगोदर साहेबांच्या सेक्रेटरीने साहेबांकडे एक मळकट, सेलोटेपने चिकटवलेला जीर्ण कागद सरकवला. साहेबांनी फक्त नजरेनं ‘काये?’ विचारलं. सेक्रेटरी कानात खुसफुसला “ दर्शनपुजेनंतरचा मुख्यमंत्र्यांचा ‘न्युज बाईटे’ सर तो. साहेब चमकलेच “ हा असा?” सेक्रेटरी उद्गगारला “दिंडी इतकीच जुनी परंपरा अाहे साहेब ती. बाईट मध्ये बदल नसतो होत. प्रोटोकॉलच्चे तसा” अाता प्रोटोकॉलचा दांडा अाडवा केल्यामुळे साहेबांना थोडं वाकावच लागलं. तत्पुर्वी झेड सिक्युरिटीवाल्यांनी अाधी गाभा-यात जाऊन सगळी सिक्युरिटी चेक केली. तुकोबांनी ज्याच्यासाठी “करिसी आमुचा सांभाळ । तूं रे माउली स्नेहाळ” असे लिहुन ठेवलेय त्या पांडुरंगाच्या गाभा-यात सगळं सुरक्षीत अाहे ह्याची खात्री झाल्यावर झेड सिक्युरिटीवाल्यांनी हिरवा कंदील दिला अाणि साहेब गाभा-यात अाले.
साहेब गाभा-यात अाल्यानंतर लगबग सुरु झाली.. काही तरुण पुजारी लोकांनी अदबीने नमस्कार केला, काही अनुभवी पुजा-यांनी अापल्या ज्युनिअर पुजा-यांवर प्रौढी मिरवायला नुसतंच स्मित करुन ‘असे लई पाहिले’ अशा अविर्भावात ‘इथे उभे रहा, तिथे उभे रहा’ अशा नम्रपणे सुचना केल्या. साहेबांनी अाणि ताईसाहेबांनी नम्रतेने त्या स्विकारल्या. सर्व सोपस्कर भक्तिभावात पार पडले. जिथे जिथे अावश्यक तिथे तिथे ताईसाहेब साहेबांच्या हाताला हात लावत होत्या. जिथे जिथे अावश्यक तिथे तिथे साहेब अाचमन करत कधी पाणी डोळ्याला लावत होते तर कधी ‘हस्त प्रक्षाल्य’ म्हटलं कि पाणी बाजुल जमिनीवर सोडुन देत होते. गंध-टिळा, अबीर-बुक्का, महावस्त्र, तुळसचाफ्याच्या माळा असं सगळं सगळं काही झालं. साहेबांनी सवयीने मनगटाकडे पाहिले. सकाळचे ९ वाजुन ९ मिनीट झाले होते. साहेबांनी लीनपणे विटेवर डोकं टेकवलं. 
.,…अाणि जेव्हा साहेबांनी डोकं वर उचललं तेव्हा अाजुबाजुला अचानक पुर्ण शुकशुकाट होता. ताईसाहेब नाही, सेक्रेटरी नाही,  पुजारी नाही, गर्दी नाही. साहेबांनी बाहेर अंदाज घेतला तर भाविकांची झुंबड नाही, झेड सिक्युरिटी नाही. अात्ता होते अाणि अाता नाही ? असं कसं? 
साहेबांनी अात वळुन पाहिलं तेव्हा गाभा-यात फक्त एक काळीसावळी वृद्ध व्यक्ती होती. पांढरा धोतर, सदरा, पांढरट भुरके विस्कटलेले केस, वेशीवरच्या पिंपळाखाली गप्पा ठोकायला चार म्हातारी टाळकी बसतात अगदी तसाच. चेह-यावर चौ-यांशी लक्ष सुरकुत्या. पण चेह-यावर विलक्षण समाधान अाणि डोळे म्हणजे जणू काय खोल देवडोह. साहेब म्हणाले “बाबा कोण अापण? कुठं गेले सगळे?”.  बाबा म्हणाला “ हां चालंल , बाबा पण चालंल. त्यात काय इतकं !” . साहेब म्हणाले “ सगळे कुठे गेले अचानक?” बाबा म्हणाला “ तुम्हाला जरा चक्कर अाली हुती. वैद्य येऊन पाहुन गेल्ये. समदे त्यांनला सोडायला बाहिर गेल्याती अान थोडायेळ विश्राम घेयला सांगुन गेल्याती वैद्यबुवा. येतील इतक्यात. मी हाय तुमच्या दिमतीला, येत्याती चार दहा मिन्टात सगदे.”  साहेबांचा मनातला शीण जरा कमी झाला. परत एकदा बाहेर पाहुन अचानक सगळे भाविक गेले कुठे असं विचारावंसं वाटलं त्यांना पण राज्याचा मुख्यमंत्री चक्कर येऊन पडला म्हणुन सगळी जागा इव्हॅक्युएट केली असेल असं स्वत:च पुटपुटले ते. खरंतर बाबाने जे सांगितलं त्यांनंतर अनेक प्रश्न पडायला पाहिजे होते पण बाबाच्या वाणीत इतकी शाश्वती होती कि त्यांनी सांगितल्यानंतर फार प्रश्न विचारणं रास्त नाही वाटलं साहेबांना. “काय म्हणतंय पीकपाणी?” साहेबांनी दौ-यावर असलेल्या शेतक-याला सवयीने काहीतरी विचारावं तसं विचारलं. “चाल्लंय, सायेब” साहेबांनी उगाच सदरा सारखा केला अाणि सवयीचं हसले. बाबा म्हणाला “तुमी दरवर्षी इठ्ठलाकडं ‘बळीचं राज्य येऊ दे, पाऊसपाणी भरपूर पडु दे’ हे असं सगळं खरंच मागतेत काय?” साहेब अात्मविश्वासाने म्हणाले “ हो मग ! अर्थातच. एकदम मनोभावे. पण का असं का विचारलं?.”  बाबा म्हणाले “न्हाई अापलं सहज.”
अचानक एखादी लिफ्ट बंद पडावी अाणि लिफ्टमध्ये असलेल्या दोन अनोळखी लोकांना बोलायला समान विषय नसावे. तसं चाललं होतं सगळं. अाजुबाजुला बरंच अवघडलेपणाचं मळभ दाटलं होतं. 
मग बाबांनीच परत विषय घेतला “म्हंजे देवबिव नाहीच ब्वा.सब झुठ !” साहेब जरा चिडलेच “ असं कसं म्हणता तुम्ही?” बाबा म्हणाले “राग अालाय का ? बरं देव अासंल पण मंग हा ईठ्ठल वगैरे देवात काही दम नसावा कि काय जणू?” साहेब अाणखी वैतागले “ बाबा अहो, त्याच्याच मंदीरात उभे राहुन त्याला काय नको नको ते बोलताय ? हे पहा तुम्ही नास्तिक असण्याला माझा विरोध नाही. लोकशाहीत सगळ्यांना सगळे हक्क असतात. पण निदान माझ्या समोर माझ्या देवाला काही बोलु नका. अशाप्रकारे अास्तिकांच्या भावना दुखवू नये. समाजाने घालुन दिलेले माणुसकीचे संकेत असतात ते.”
बाबांना साहेबांच्या अभ्यासु प्रत्युत्तराचं नवल वाटलं. बाबा म्हणाले “ अाहो पण वर्षानुवर्ष त्येच साकडं घालताय. तरी का सुधरं ना शेतक-यांची अाबाळ? हे पहा ,येक तं तुमच्या साकड्यात तरी दम नै किंवा तुमच्या देवात तरी. काहीतरी एक नसल्याशिवाये का हा खेळखंडोबा ? ” अाता साहेब वैतागलेच “हे पहा अामचे साकडे बेंबीच्या देठापासुन सत्य अाहे अाणि अामचा देवावरही अामची शंभर टक्के श्रद्धा अाहे. हे पहा निसर्गाच्या अवकृपेचा काही भरवसा नसतो. अाणि अामच्या यंत्रणेतही काही लुपहोल्स असतील अाम्ही नकार देत नाही.”  परत एकदा अाजुबाजुला डोकावुन साहेबांनी कुणी येतंय का ह्याचा अंदाज घेतला. गाभा-याच्या समोरचं ग्रील बंद दिसतं असल्याने साहेबांनी ‘बाहेर जाण्यात काही हाशिल नाही’ हे अाधीच लक्षात घेतलं होतं. 

बाबा “निसर्गाचं ठिक अाहे पण देवावर श्रद्धा ठेऊन यंत्रणेतले लुपहोल्स मिटतील? बरं अाता ब्वा जर पाऊस न्हाईच अाला तर दुष्काळाचा इव्हेंट कराला दौरे निंगतील. मग विरोधातले बी अापापल्या पद्धतीने दुष्काळ साजरा करतील. मला येक कळं ना झालंय कि दुष्काळ कै वादळ-गिदळ थोडीच असतंय अचानक येला. ते येतांना अंदाज देतंय, कोप-यावर अालेलं दिसतंय , दारावर अालेलं बी दिसतं अान मंग घरात ठाण मांडुन बसलेलं पण दिसतं. मंग अचानक पाहुणे अाल्यासारखी पळापळ कशापाय हुती हो?  बरं अगदी सालाबादाप्रमाणे अगदी दोन-चार वर्षात एखांदा दुष्काळ येतोच कि अो ! दुष्काळनिवारण म्हंजी मोडल्याली पिकं उभी करणं न्हाई, मोडलेली माणसं उभी करणं म्हंजी दुष्काळनिवारण,  हे कधी करणार तुमी? योजना-योजना करत कोटीने पैका अोतला कि दुष्काळनिवारण हुतंय व्हय ? उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिशी रातीची प्हाट अाणि प्हाटेची सकाळ हुते पण तरी बी तुम्हाला जर एबी फॉर्म मिळाला नाही तर कसं गुदमरलेपण येतंय ? तसं हुतं काढणीच्या अाधीच पिकांची माती होतांना जेव्हा शेतकरी बघतो. तुमाला निदान येगळे मार्ग तरी असत्यात पण त्याच्याकडं तेवढा येकंच जमिनीतुन उगवायचा मार्ग.” साहेबाला जरा अारसा पाहिल्यासारखं अोशाळवाणं झालं. बाबानी काखेतलं बोचकं काढलं. गाठ उघडली. “या जरा मिरची भाकरी घेऊ जराशीक. शुगरबिगर अासंल ना? वेळ पाळावी लागते म्हणं त्याला” अाता साहेब अाणि बाबा जमिनीवर फतकल मारुन न्याहारीला बसले. बाबांनी एक बुक्की मारली अाणि एक कांद्याची फोड साहेबांकडे सरकवली. जेवता जेवता बाबा बोलतच होते. “सगळ्यात अाधी काही गैरसमज तुमी काढुन टाका बरं, सायेब. पहिलं असं कि ‘बळीराजाच्या घामाच्या सुगंधाने फुललेली जमिन वगैरे बोलणं बंद कराय सांगा सगळ्यांना. कोणत्याच घामाला सुगंध नसतोय. लोकायच्या कष्टीपणाला चांदण्यांचं रुपक देऊन बोथट कहाला करत्या सगळे? दुसरं म्हणजे अाभाळातल्या चांदण्यांखाली पहुडलेला बळीराजा वगैरे हा रॉमेंटीसिझम बी पुसुन टाका. उघड्या अाभाळात चांण्या पाहुन कोणत्याच शेतक-याला बरं वाटत नसतंय. चांण्या दिसल्या ह्याचा अर्थ म्हंजी अाभाळात ढग नाही असा होतो म्हाराजा ! जमिनीच्या पोटात स्वप्न पेरल्यानंतर जर वरती ढग नसेल तर शेतक-याच्या पोटात खड्डा नाई तं काय पडंल?  तितक्यात अनेक लोकांची कुजबुज एेकु यायला लागली. बाबानी साहेबांना खिडकीजवळ अाणलं अाणि म्हणाला “ ते पहा रांगेत वाट पाहणारे वारकरी. काय वाटतं ह्या दिंड्या, ह्या वा-या म्हणजे भक्तिरसाचा अोतप्रोत संगम बिंगम अाहे? तर नाही !  जातिवंत दु:खांचे तांडे अाहेत त्ये, सायेब. ल्हानपणी छडी उगारलेल्या मास्तरासमोर अापण डोळे गच्च मिटुन उभे रायचो. ते डोळ्यांचं मिटणं म्हंजे छडीचा त्रास वाचावा किंवा कमी व्हावा ह्या भाबडेपणात अालेलं असतं. बी जमिनीत पेरुन पाऊस येईल हे स्वप्न पहात पंढरीला मार्गस्थ होणं म्हंजे तसलंच डोळ्याचं मिटणं असतंय सायेब. पांढ-या पेहरावातला ढगाळ गावक-याचा दिंडीत करडा वारकरी हुतो अान पंढरीत काळ्या पांडुरंगासोबत काळाभोर ढग बरसायचे स्वप्न पाहतोय. एक एक नक्षत्रांचे दान कोरडं पडायला लागलं कि शेतक-यांच्या विश्वासाच्या सोंगट्या दुस-याच्या घरात सरकत नाहीत. अान अशा सोंगट्यांना परतणं माहीत नसतंय. अाणि परतणं माहीत नसलेलं पाखरु विजेच्या हायवॉल्टेज तारेत स्वत:ला झोकुन देतंय. एक सांगु? एकदा अाषाढी एकादशी चुकवाच अाणि अलिकडचे एखादे रिंगणातले खेळ पहायला जा साहेब कधीतरी. सगळे पाश सुटल्याच्या भ्रमात, सगळी कर्ज, सगळी देणी फिटल्याच्या अाभासात वेडावुन नाचत असतात सगळे.  ‘भीमा’सारखे बलदंड दु:ख पुढ्यात असुनही फक्त शेकडो कोसावरचा चंद्र पाहुन त्याचं भागतं असा भोळसट माणुस अाहे ह्यो. उगाच भीमा नदीला पंढरपुराच्या वळणापुरती चंद्रभागा म्हणत्यात का? अापल्याकडं बारा वर्षातुन एकदा कुंभमेळा हुतो अान लोकं अमृतबिमृतात पापं मोकळी करत्यात. केवढा ढोलगाजा तेचा? चंद्रभागा हेच दरवर्षाला करतीय दरवर्षाला. काढा कडवट अासंल तर पाणी घालुन कडवटपणा कमी करतेत. वारी म्हणजे एकट्यातली कडवट कळ दिंडीत फिकी करायची प्रक्रिया हाय सायेब, इतकंच.”  साहेब म्हणाले” बाबा खरंय पण कसंय कि अडचणी येतात, प्रश्नही खुप अाहे पण खरी अडचण हि अाहे कि अापण देव नाही ते पटकन सोडवायला, थोडावेळ लागतोच ना ? ” 
बाबा हसला म्हणाला “ एक करा सायेब कि एकदा हेलिकॅप्टर ने नाही रस्त्याने या पंढरीला अाणि इतके वर्ष झाले राज्याच्या ‘अाराध्य बिराध्य दैवताच्या’ पंढरपुराकडे येणारे महामार्ग अजुनही एकपदरी अाणि खड्डेदार अाहे त्याचं काहीतरी करा अाधी. अाणि हो  देव असाया हातात चक्र , खांद्यावर धनुक्ष, डोसक्यामागं वलय ,अाजुबाजुला गदा ,शंख असल्याचा फील असाय पाहिजे अासं काही नसतं सायेब. तुमी निस्ती कमरेवर हात ठेवलेली यंत्रणा जागी करा. अान सायेब , एकदा मनापासुन डोळे मिटा अाणि पायाच्या अंगठ्याने खालची जमीन चापसा…… पायाला विट लागली कि समजा देव झालेच तुमी. फक्त कमरेचे हात तेवढे हालवले कि मिळवलं. यू का मी ? जरा पाहुन येतो इतका येळ का झाला ते ?”  साहेबांनी भारावुन विचारलं “ काय करतात बाबा ? शेतीबिती अाहे का ? काही मदत लागली तर कळवा” बाबा म्हणाले “ शेतीगिती काय नाय अापली, मदतगिदत पण नको. अापल्याला तुमच्या सल्लागार समितीवर ठेवता का?” बाबा म्हातारं बोळकं अाणि साहेब खुप दिवसांनी निरागस खळखळुन हसले. बाबाने परत निरोप घेतला. साहेबांनी भारावल्या मनाने त्यांना संमती दिली अाणि नमस्काराला डोकं झुकवलं.  
साहेबांनी टेकवलेलं डोकं वर घेतलं तेव्हा अाजुबाजुला प्रचंड गजबज होती, ताईसाहेब, सेक्रेटरी, पुजारी, झेड सिक्युरिटी सगळे अाहे तसेच होते. साहेबांनी सवयीनं मनगटाकडे पाहिलं. सकाळचे ९ वाजुन ९ मिनीट अाणि दोन सेकंद झाले होते. 


दुस-या दिवशी अनेक पेपरला हेडलाईन होत्या. “मुख्यमंत्र्यांचं पांडुरंगाकडे साकडं, सुजलाम सुफलामचं मागणं, बळीराजाचं राज्य येऊ दे, पाऊस पडू दे अाणि राज्यावरचं अवर्षणाचं सावट दूर करायची मागणी”

१   जुले २०१७

No comments:

Post a Comment

अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...