Friday, September 18, 2015

वैकुंठवारी ( मटा मैफल १९ / ०९/१५ )

मरण प्रत्येकाच्या वाट्याला येतं पण 'जगणं' येतंच असं नाही. ह्या विचारांची कुशी घेऊन माझी 'ती' रात्र पेंगुळली.
अाजाराला नातवंडा-पतवंडांसारखं जोजवत ९२व्या वर्षी अाजी गेली. ती रात्र.  अाजी जाता जाता पांडुरंगाला जाब विचारत गेली. 'का इतके दिवस वाट पहायला लावतोय हा?, ह्याला काही कमी केलं होतं का मी?'  तिच्यासकट सगळ्यांना ठाऊक होतं कि तीची यात्रा कधीही थांबेल. पण ती गेलीही अगदी सगळ्याच्या बेसावध क्षणी. तिच्या स्वभाव धर्मानुसार तीने शेवटच्या क्षणी एक हक्काचा श्वास मागुन समोरच्या अोलसर भिंतीवर लावलेल्या पांडुरंगाला अाणि 'तिच्या आधीच निरोप घेतलेल्या विठ्ठलाला' हात जोडुन निरोप घेतला असेल.
अाताशा गावी रहायचा विषय जवळ जवळ संपल्यातच जमा होता. लहानपणी महिनोंमहिने इथे रहिल्याचं अाठवतं. पण जसं जसं मोठे झालो तसं तसं वेळ,व्याप,अावड बदलत गेली अाणि गावाची भेट 'वन-डे रिटर्न' झाली. पण अजुनही इथे अालो कि
अंधा-या पाय-या चढुन वर शेण सारवलेल्या माडीवर जाण्याची इच्छा होते. तिथल्या दिड फुटी उंची च्या खिडकीतुन बघत घोंगडीवर तासनतास लोळत बसावसं वाटतं. माडीच्या कौलांमधुन येणारी तिरीप हळुहळु सरकत भिंतीवरच्या मारुतीच्या जुनाट फोटोवरच्या फाडलेल्या छातीतुन अाशिर्वाद देणा-या राम-सीतेवर यायचा अाणि माझ्या बाळबोध अंगावर अाध्यात्मिक काटा यायचा. तेव्हा वाटायचं काय ही जादु अाहे ? 'देव अाहे देव अाहे म्हणतात ते हेच' मग तो कवडसा तिथुन सरकला कि उशीवर यायचा. मग उगाच उशीवर दणके द्यायचा खेळ सुरु व्हायचा अाणि धुळकणांचा बॅले बघत कधी झोप लागायची कळायचं पण नाही.
अापण जितकं जास्त निसर्गाच्या सान्निध्यात येऊ तितक्या अापल्या समाधानाच्या व्याख्या  सोप्प्या होत जातात. खुप काही मागत बसण्याच्या ऎवजी अापल्या इच्छा अाहे त्यात समाधान मानतात हे मला तिथेच रात्री अंगणात बाजेवर पडल्या पडल्या जाणवलं.  बोचणारा गारठा, घुप्प अंधारी रात्र, दुर मारोतीच्या देवळातुन येणा-या भजनाचे पुसट स्वर, शेण सारवलेलं अंगण, सुतळ्यांनी कसलेल्या बाजेवर डोक्यामागे हात बांधुन अाभाळावरच्या चांदण्यांचं झुंबर पहात बसलो होतो. कुठे फोर-फाईव्ह स्टार हॉटेलची गुबगुबीत झोप असेल तर असोत पण ह्या लक्षावधी स्टार्स खाली झोपायची सर कुठे नाही. तितक्यात एक तारा 'माग रे, इच्छा माग' म्हणत तुटला. तेव्हा काहीही न मागता फक्त हलकं हसल्याचं अाणि कुस बदलुन समोर गोठ्यात अावडत्या वासराच्या गळ्यातली घंटा ऎकत झोपी गेल्याचं अाठवतं. ह्याच त्या समाधानच्या बदलत्या व्याख्या.
ह्याच अाठवणी घेऊन परत अाजी निर्वतल्याच्या दिवशी गावाकडे रहायची वेळ अाली.
गावाकडच्या कौलारु, शेण सारवल्या घरापासुन रात्री मिणमिणत्या बत्तीप्रकाशात तिचा 'शेवटचा प्रवास' सुरु झाला. तीनेक किलोमीटरची अंत्ययात्रा, मी एक खांदेकरी. सकाळी हातात पुजापरडी घेऊन नदीला वळसा घालत ज्या वाटेची उतरंड तीला कोतुळेश्वराच्या राऊळापर्यंत न्यायची त्याच वाटेवरचा तीचा शेवटचा प्रवास.ज्या वाटेने तीचा रोजचा दिवस उगवायचा त्याच वाटेवर तीची मावळण होत होती. प्रवास सुरु झाला. ग्यानबा-तुकाराम, पांडुरंग-हरी-विठ्ठल-माऊली, अशा जयघोषात. ठरावीक रामानामा ऎवजी वारक-यांचा जो 'राम' अाहे त्यांचं नाम घेत संथ गतीने तीचा प्रवास सुरु होता.अनवानी पायाला टोचणा-या कच्च्या वाटेत,बत्तीच्या धुरात, विठुनामात अाजीला दिलेल्या माझ्या उजव्या खांद्याच्या कळेपेक्षा तीच्या विरहाची कळ जास्त होती. हिच कळ म्हणजे रुख्माईला सलणार अठ्ठावीस युगांचं दु:ख असेल का ? चालतांना घामाची गारट धार पाठीवरुन सापासारखी वळवळत गेली.मानेला कळ म्हणुन क्षणभर अाभाळाकडे पाहिलं तेव्हा पुढून फेकलेले मुरमूरे तोंडावर पडले. चांदण्या बघत विचार अाला, अापल्या प्रवासाला अशाच चांदण्या दिसतील, असेच मुरमुरे तोंडावर पडतील, जाणीव नसेल इतकंच.  तडतडत्या अग्नीशिखांमध्ये 'शेवटचा प्रवास' संपला. जो मी शेवटच्या बाकावरुन बघावा तसा शेवटच्या बाजुला खांदा देत बघितला.
परतीला पायाखालची टोचणी अाता सवयीची झाली होती. घर जवळ अालं तेव्हा अंगणात वाट बघणारी लोकं होती. चरायला गेलेली गुरांची परतीची वाट पाहतात तशी.कडुनिंबाचं पान चघळत शेवटच्या प्रवासात अाम्ही तिच्या अाठवणींच्या कुरणात चरणारी गुरंच तर होतो.
वारी निघावी असा तिचा शेवटचा प्रवास. वारीच ती. नामघोष तोच, तिथेही इथेही. तिथेही शेवट वैकुंठ अाणि इथेही वैंकुंठच, तिथे ही पांडुरंग भेटणार अाणि इथेही अाधीच वर वाट बघणारा 'तिचा विठ्ठल' भेटणार.
ब्याण्णव वर्ष सरली. एक वारी संपली. 


- प्राजक्त २४ अॉगस्ट २०१५



No comments:

Post a Comment

अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...