Friday, September 25, 2015

बॅकबेंचर्स : १० शार्पशुटर ( सामना २६ सप्टेंबर १५)

वर्गात गणपतीची प्रतिष्ठापना हा शाळेतला दरवर्षी उत्सव असे. अाईने बनवलेल्या चवदार स्वैपाकात ताटाच्या कडेला मीठासारखा कार्यानुभव नावाचा एक अत्यंत दुर्लक्षित विषय होता. तो दुर्लक्षित का अाहे हे मला अजुन तरी कळालं नाही. 'करा अाणि स्वत:च्या चुकांपासुन शिका' इतकं खोल तत्वज्ञान शिकवणारा विषयाला शाळेने दिलेली अशी वागणुक मला कधीच अावडली नाही. तर अामचे कार्यानुभवचे मास्तर होते. त्याच्याकडे ह्या उत्सवाचा कारभार असायचा. मग जस जसा उत्सव जवळ यायचा तसा पोरांचा सरांकडे 'मास्तर, यंदा काय करायचं?" असा धोशा चालु व्हायचा. एकदा वर्ग चालु असतांना कुणीतरी शिक्षक बाहेरुन जाता जाता मास्तरांना म्हणाले " मग गणपती बसवताय ना यंदा ? रिटायरमेंटची तारिख अाधी अाहे कि नंतर ?"
अामचे मास्तर म्हणाले "अाहे अाहे काळजी नको" मग राग गिळावा तसे डोळे मिटुन त्यांनी दिर्घ श्वास घेतला अाणि अाम्हाला म्हणाले  "कसंय बाळांनो, एक लक्षात घ्या गणपती 'बसवायचा' नसतो. प्रतिष्ठपना असते त्याची. बसवायला तो काही अट्टल गुन्हेगार नाही कि त्याला तुम्ही चौकशीसाठी दहा दिवस बसवाल"
दरवर्षी अामचा गणपती मास्तरांनी स्वत: हाताने बनवलेला असायचा. सजावटीला मास्तर सांगायचे "हा तर डावी कडुन उजवीकडे , लाल , हिरवा ,जांभळा , पिवळा, केशरी असे रंग घ्या अाणि पताके बनवा. अापण काय करतो अाहोत? का करतो अाहोत ? याकडे ते नेहमी लक्ष द्यायला सांगायचे. "भानावर....भानावर.....भानावर..... फक्त सांगितलं म्हणुन करु नका. अाधी लक्षात घ्या. हे असंच का करायचं." हे त्यांच नेहमीच वाक्य. हेच मास्तर शाळेतल्या नाटकाचे दिग्दर्शक असायचे. तालमीच्या पहिल्या दिवशीच त्यांच पहिलं वाक्य " अापण अाजपासुन नाटक 'उभं' करतो अाहे. नाटक 'बसवत' नाही अाहोत.कळलं?" मास्तरांमुळेच तेव्हापासुन 'भानावर' राहुन काम करायचं शिकलो. सरांचा मागच्या बेंचवर भारी जीव असायचा. एकदा गणिताच्या मास्तरिण बाई गप्पा मारतांना म्हणाल्या " बाई ! हे मागच्या बेंचवाल्यानी उच्छाद मांडलाय. अाळशी नुसते " तेव्हा मास्तर म्हणाले होते " बेंचनुसार स्कॉलरपणाचे निकष ठरलेले असतात यावर माझा विश्वास नाही. तुम्ही म्हणता तसा तो ठेवायचा झाला तर माझ्या वर्गात पुढचे स्कॉलर पोरं , बॅकबेंचर असतात. अाणि बॅकबेंचर्स हे स्कॉलर. एकदम शार्प. " वर्गात मागच्या पोरांना ते शार्पशुटर म्हणायचे. एकदा गणपती अारती चालु होती.मुख्याध्यापक माईकवर अारती म्हणत होते. अाणि सगळे जण त्याच्या मागे म्हणत होते. सगळे शिक्षक उपस्थित होते. अामच्या बेंच जवळच मागे मराठीच्या मास्तरिण अाणि अामचे कार्यानुभवचे मास्तर उभे होते. मास्तरिण बाई हळुच म्हणाल्या " काय बाई अशुद्धपणा साहेबांचा. संकष्टी पावावे नसतं संकटी पावावे अाहे ते काsssय ?. दाश्रामाचा म्हणजे काय असतं ? दास रामाचा अाहे ते.काsssय ? अाणि हिरे जडित मुकूट अाहे पानाचा विडा नाही तोबरा भरायला.काsssय ?" मास्तरिण बाईंचा काsssय ? मजेशीर असायचा. अामचे मास्तर हसले अाणि म्हणाले "जाऊ द्या हो. विठ्ठलाच्या अारती मध्ये ' असो नसो भाव अालो तुझिया ठाया' पण म्हटलं कि त्यांनी. श्रद्धेत काय व्याकरण पाहता". अारती झाली. कर्पुर अारती सुरु झाली. मी अाणि अामचे मास्तर सगऴयात शेवटी होतो. अामच्या पुढे मास्तरिण बाई मास्तरिण बाईंनी स्वत: भोवती फेरा मारुन 'घालीन लोटांगण' केलं. मी सरांना कानात काहीतरी सांगण्यासाठी खाली वाका अशी खुण केली. मी म्हणालो " मास्तर ,घालीन 'लोटांगण' अाहे ते घालीन 'प्रदक्षिणा नव्हे , काsssय ? " मास्तरांनी टाळी दिली अाणि दिलखुलास हसुन म्हणाले " बिलकुल शार्पशुटर !!! "


- प्राजक्त २० सप्टेंबर १६




No comments:

Post a Comment

अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...