Friday, September 18, 2015

बॅकबेंचर्स : ९ पिशाच्च पिवळे (१९ सप्टेंबर १५)


ताप अाला ? मग समोरच्याचं वाक्य असतं. "काळजी घेरे बाबा" पण जर कावीळ झाली असेल तर विषय तिथेच संपत नाही. जसं समोरच्याला तुम्हाला कावीळ झाल्याचं कळतं अर्धवट गुंगीत , गळालेल्या अवस्थेत तापाने फणफणले असतांना पुढिलप्रमाणे सुचना येऊ लागतात.
लोणावळ्याला जा पहाटे सहाच्या अात जा बरका. अाता लोणावळ्याला पहाटे सहाच्या अात जा म्हणजे निघा कितीला ? बरं अाजारी अाहे हा मुद्दा लक्षात घेतलाय का कुणी. अाडगावला जा तिथे एक बाबा काळं सरबत देतो. काविळ मेलीच म्हणुन समजा. भेंडा फॅक्टरीला जा तिथे एकजण नाकात अौषध देतो. मग तुम्हाला सर्दी होते तुम्ही रात्रभर शिंकत राहतात. पाठ टेकवायची नाही. परत कावीळ होत नाही. अरे पण त्राण नाही अंगात पाठ टेकवायची नाही काय. गंगेवर जा तिथे एक मावशी अाहे त्या दह्यामध्ये अौषध देतात हो पण पहाटे सहालाच जा. मला एक कळत नाही पहाटे सहा वाजेला काय अनन्यसाधारण महत्व अाहे. कावीळच्या मुख्य लक्षणात पिवळेपणा नंतर त्राण जाणे ,मरणाचा थंडी-ताप येणे हे अाहे मग पहाटे कुठे जायला लावताय हे लोकं? पण एक खरं कि ह्या सुचना सांगणा-यांचा तुमच्यावर अातोनात  जीव असतो. काळजी अाणि प्रेमापोटी ह्या तिरपांगड्या सुचना येत असतात.
कावीळ म्हटलं कि परत एकदा शाळेचा शेवटचा बेंच अाठवतो. एकदा कावीळ झाल्यावर शेवटच्या बेंचवरच्या चार पोरांना उठवुन मागे झोपायला सांगितलं होतं मोरेबाईंनी. घरुन कुणी येऊ पर्यंत मागच्या बेंचवर पडल्या पडल्या मोरेबाईंचा बालभारतीचा वर्ग ऎकला होता. बाई कविता शिकवत होत्या. अाणि जाता येता डोक्याला हात लाऊन "निघालिय अाई हां , येतेच अाहे अाराम कर " असं म्हणत होत्या. कविता गदिमांची....शेजा-यांचे शूर शिपाई ,सिमारेषा पुसुनी पायी ,लूटू पाहती तुमची अाई , त्या ढोंगांच्या मुसक्या बांधा, भ्याडा हाती भरा चुडा...लढा वीरहो लढा लढा.. गदिमांच्या शब्दांनी छत बघता बघता ,चिमण्या कोप-यात घरटं बनवतांना दिसत होत्या. अाणि शब्द होते लढा वीर हो लढा लढा.
बाईंनी हाताची बोटं पाहिली " बाई ग पिवळे पिवळे झालेय, थांब हा राजा थोडं येतच असेल अाई " कविता शिकवण चालु होतं.
मी लहान होतो. कावीळ प्रकार नविन होता. तेव्हा एकक्षणी वाटलं होतं झालं माणुस मरतांना असंच होत असेल. अापण मरणार अाता. पण गदिमाच्या शब्दांनी अाणि मोरेबाईंच्या अावाजाने तग धरायला मदत केली. कविता संपताच अाई अाली अाणि मी अाठवडाभर दवाखान्यात हजेरीला होतो. सलाईनचा एक एक थेंब बघतांना एकच गोष्ट अाठवायची शाळेतल्या मागल्या बेंचवर झोपलेलो अाहे अाणि बाईं ताप तपासत गदिमांच्या कवितेचं शेवटचं कडवं म्हणताय.:
 रणमर्दांनो तुमच्या पाठी , मारीत मारीत मरणासाठी, उभा भारतीय चाळीस कोटी, हटवा मागे पिशाच्च पिवळे , उडु द्या तोफा धडधडा...... लढा वीर हो लढा लढा.
- प्राजक्त 



No comments:

Post a Comment

अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...