Friday, December 25, 2015

बॅकबेंचर्स : २३ निबंध ( सामना २६ डिंसेबर )

तो पावसाळा अाला कि कागदी होड्या वाटायचा , हिवाळा अाला कि इवलुश्शे हातमोजे वाटायचा, उन्हाळा अाला कि छोट्याशा टोप्या वाटायचा. कुणी ते हसत हसत घेतसे , कुणी प्रश्न नजरेने बघतसे ,कुणी घाबरुन त्याला टाळत असे , कुणी त्याला तुच्छतेने झिडकारत असे पण त्याचा हा नित्यक्रम चालुच होता. पांढरी स्वच्छ दाढी पांढरे अस्ताव्यस्त केस, तेल नसल्याने भुरकट भुरकट. पांढरा स्वच्छ सदरा , भटकुन अाताशा धुरकट धुरकट. 
एकदा असं झालं , एेन उन्हाळात पाऊस अाला . बिचा-याची धांदल उडाली.. मग त्याने छोट्या टोप्यांना पालथं करुन होड्या म्हणुन वाटल्या. नंतर असं झालं एेन हिवाळ्यात रांजण उलथावं तशी उन्हं सांडली त्याने हातमोज्यांची विण उसवुन टोपी केली. एकदा तर एेन पावसाळ्यात कोरडी ठाक थंडी पडली. मग त्याने त्याच्याकडच्या सगळ्या कागदी होड्या शेकोटीत भस्म केल्या अाणि त्याभोवती शेकत बसला.
माणसांच ठिक होतं पण अाता ऋतुंचा पण भरवसा नाही ह्या विचाराने तो व्यथित होता. त्याच्या जवळच्या पोटलीत तो अाताशा तिनही वस्तु जपुन ठेवत असतो. कोणी सांगावं कधी कोणता ऋतु सुरु होईल.
हळुहळु त्यांचा ह्या सगळ्यावरचा विश्वास उडु लागला. आणि फक्त कागदी होड्या बनवण्याचा सपाटा सुरु केला. एक होडी तर खरीखुरी बनवली. आणि तेच घर. दिवसभर त्याच बसायचा. रात्री होडी उपडी करुन त्याखाली झोपायचा. येणाजाणा-यांच्या लेखी तो वेडा होताच, आता ठार वेडा झाला. मग त्याने कुठल्या तरी मरणासन्न अवस्थेत पडलेल्या एका कुत्र्याच्या छोट्या पिल्लाचा जीव वाचवला.आणि आपल्या घासातला घास त्याला काढुन दिला . नंतर एखाद्या नाक्यावरच्या जाहीरातीतल्या पोस्टरवर दिसावं तितकं ते पिलू गुटगुटीत दिसु लागलं. आता तो , त्याच्या होड्या आणि कुत्र्याचं पिलु असे तिघं नांदत होते. त्या कुत्र्याचं नावं ठेवलं हेत पृथ्वी, सगळ्या कागदी होड्यांवर एकच शब्द लिहला होता. ग्लोबल वाॅर्मिंग ग्लोबल वाॅर्मिंग. ग्लोबल वाॅर्मिंग.
" हि मागच्या बाकाची पोरं म्हणजे अगदीच डॅंबिस आहे. आता हा पहा , असा कधी निबंध असतो? ग्लोबल वाॅर्मिंग विषय दिला होता."
मॅडमने त्या बॅकबेंचरच्या निबंधाला शून्य मार्क दिले .



Friday, December 18, 2015

बॅकबेंचर्स : २२ अखिल अाटपाट साहित्य संमेलन

तर झालं असं कि अाटपाट नगरात मराठी साहित्य संमेलन येऊ घातलं होतं. त्या निमित्ताने अध्यक्षांसोबत छोटेखानी चर्चासत्र अायोजित झालं. नगरात मी साहित्यिक असल्याची दबकी चर्चा होती. म्हणुन मला तिथे बोलवलं. चर्चासत्र सुरु झाले. अापापले प्रश्न विचारा असा एक अावाज अाला. सर, तुमचे साहित्य क्षेत्रातले योगदान काय? अध्यक्षश्री वदले " कित्येक साहित्य संमेलानात मी वक्ता म्हणुन गेलोय ,परिसंवादात सहभागी होतो, अनेक साहित्यिकांचे प्रश्न अाणि मुळ म्हणजे साहित्याच्या मुळप्रवाहात नसलेले ज्वलंत प्रश्नांना अाणण्यासंदर्भात मी विचारप्रबोधन करतो" ( माझे कान एेकलेल्या गोष्टींची टोटल लावत बसलेले) दुसरा प्रश्न : सर, तरुणांना मराठी साहित्याकडे वळवण्यासाठी काय करतो अाहोत ? " "तरुण ही अाजची शक्ती अाहे ,तरुणांचे प्रश्न ज्वलंत अाहे पण तरुणांना शेतक-यांचे प्रश्न माहित अाहे का ? का वंचित अाहे शेतकरी ? खेड्यातील साहित्य कुठे अाहे ? ( माझा मेंदू एेकलेल्या गोष्टींची सुसुत्रता लावत बसलेला ) तिसरा : सर, अचानक राजकारणातुन साहित्य क्षेत्रात यावंस का वाटलं ? " माझं मन नेहमीच हळवं होतं, अामचे श्रेष्ठी नेहमीच म्हणतसे कि पंत ,तुम्ही बुवा फारच हळवे. म्हणुन अाम्ही साहित्यात अालो. ( माझ्या मेंदूतले दोन्ही, डावे अाणि उजवे लोब्स् शहारले) चौथा प्रश्न : सर ,तुमची मराठी साहित्या समृद्धीसाठी पुढिल उपाययोजना काय ?  " शेतकरी कुठे अाहे ? शेतातली अोल कुठे अाहे ? शेताच्या वंचना कुठे अाहे ? कुठे अाहे मातीचं संचित ? अामच्या पक्षा....अापलं ते हे अामच्या साहित्य संमेलनाच्या नियामक मंडळाने काही ठोस पावलं उचलायचे ठरवले अाहे ते अाम्ही उचलुच पण सांस्कृतिक विण कशी अाणखी घट्ट होईल तेही अाम्ही बघु , इतकेच नाहीतर सांस्कृतिक अस्पृश्यता म्हणुन जी काही ह्या साहित्याला किड लागु पाहतेय त्याचं अाम्ही समुळ उच्चाटन करु अाणि त्यासाठी भरघोस निधीची मागणी अाम्ही केली देखील अाहे" ( माझा कानातुन रक्त येतंय का हे मी हळुच चपापलं )
पाचवा प्रश्न : तुमचा अावडता साहित्यिक कोण ? " अापल्या नांगराच्या लेखणीने जो जमिनीच्या पानावर सुंदर काव्य लिहतो तो प्रत्येक शेतकरी माझा अावडता साहित्यिक अाहे ( मी बसल्या बसल्या खुर्चीचा कापुस उकरला) चला चहा घेऊ या ! असं म्हणत ह्या चर्चासत्र नावाच्या लघुकथेचा शेवट झाला. अाणि हे सगळं मी तिथेच 'शेवटच्या खुर्चीवर' बसुन फक्त टिपत होतो. गेल्या तासाभरात नवोदित अप्रकाशित लेखकांचं भांबावले पण संमेलन कसं सोडवेल ?,  ज्यांच्या जिवावर साहित्य पसरतंय त्या प्रकाशकांची मदत कशी करता येईल ? काळाच्या पडद्या अाड जाणारं कुठेही लिखित नसलेलं लोकसाहित्याचं काय ? ह्याचा पुसट उल्लेख कुठेही अाला का हा विचार मी शेवटच्या खुर्चीवर करतच राहिलो.


- प्राजक्त (दै सामना )
१५ डिसेंबर १५

बॅकबेंचर्स : २१ राधागूज ( दै सामना )

सगळ्यात शेवटच्या दगडावर बसुन राधी कान्ह्याबद्दल विचार करायची. “सगळाच दोष कृष्णावर कसा टाकायचा ना ? काही गोष्टी घडायच्या थोडीच टळतात. अाणि खरंतर सगळे म्हणतात कि तो देव अाहे , त्याला सातासमुद्रापलीकडंच जिथल्या तिथं बसुन कळतं , त्याला भविष्यही दिसतं , विश्व व्यापुनही श्रीशिल्लक उरणारा असा अाहे तो. पण असं असतं तर त्या दिवशी यमुनेवर सोबत जातांना त्याला लागलेली ठेच कशी चुकवता नाही अाली ? तो दगड कसा नाही दिसला ? सातासमुद्रापलीकडंच दिसणा-याला सातव्या वळणावरच दिसु नये ? मी त्याची बासरी गुलमोहराच्या उत्तरेकडच्या वडाच्या ढोलीत लपवली अाहे हे कळायला त्याला शोधा शोधा का करावी लागली ? कसंय कि एखाद्याला सगळ्यांनीच धीट म्हटल्यावर थोडासा निधडं व्हावं लागतं तसं झालं असेल त्याचं ।
कारण स्वत:च स्वत:ला विचारुन विचारुन थकलेल्या कृष्णाला मी अगतिक होऊन कुशीत रडतांना पाहिलंय । तो खेळिया असेलही पण डबडबत त्याच्या गालांवरुन अोघळणा-या पाण्याची चव मला खेळवु नाही शकत। कारण कुणी रोपटं जमीनीत लावुन 'इथं पुर्वीपासुन कशी हिरवळ अाहे' असं सांगुन फसवु शकतं पण त्याच्याच खोलात गेलं तर सगळं खरं-खोटं कळेल, कारण तुम्ही वरचेवर रोपटं लावु शकतात पण रोपट्याची मुळं कुणी खोलवर पसरवु नाही शकतं । म्हणुनच कान्हा जगाला फसवु शकतो मला नाही । देव केल्यावर देवागत वागावं लागतं म्हणुन त्याला मला सोडुन जावं लागलं असेल। 
ज्यांना दिवस सोबत नेत नाही आणि रात्र  सोबत देत नाही अशांची संध्याकाळ होतो कृष्ण.
आणि मग संध्येकडे कुणी वेळचं बंधन घालतं का? प्रत्येक येणा-या लाटेचं परतणं येण्याआधीच ठरलेलं असतं पण म्हणुन किना-यावरच्या  रेतीनं भिजणं थांबवावं का? 
तो मला एकदा म्हणालाही होता "लोक मला असामान्य म्हणतात. मी आज तुला सांगतो मी आहे असामान्य. म्हणजे अतिसामान्य आहे मी. 
स्वभावगुणाच्या सर्वात वरच्या थराचा स्वभावच माझ्याठायी आहे. म्हणजे थोडा आनंदी, काहीसा ख़ुश होणं नाही येत मला. मी होतो आनंदी. ज़रा वाईट होणं मला ठाऊक नाही मी होतो फक्त दुखी. सगळ्यात वरच्या थराचा स्वभाव. कुणी चांगलं वाटणं म्हणजे म्हणजे माझ्यालेखी फक्त प्रेम."

- प्राजक्त १२ डिसेंबर १५ 
दै सामना

बॅकबेंचर्स :२० ग ( दै सामना ५ डिसेंबर १५)

 तू मला नेमकी कुठे भेटलीस?' ह्याचा मी जेव्हा जेव्हा शोध घ्यायला जातो तेव्हा तेव्हा मला सगऴयात अाधी अाठवतात त्या तू निसटल्याच्या खुणा. थोडं मोठं झालो तेव्हा पावसात कागदाच्या बोटीत, वहीतुन अस्ताव्यस्त फाडलेल्या पानांच्या उरलेल्या चुरगळीत सापडलीस. सायकलीच्या निसटल्या चैनीत , तिस-या दिवशी नखात अडकलेल्या ग्रिसच्या काजळीत सापडलीस. पहिल्यांदा जमलेल्या शिट्टीत, रात्री येळंमाळं शिट्टी वाजवतो म्हणुन अाजीने मारलेल्या टपलीत सापडलीस.एकदा रानात सापडलेल्या किड्याच्या शेपटाला दोरी लाऊन हॅलीकॉप्टर म्हणुन उडवण़्यात दोरी सकट तो किडा सकाळी कोळी जाळ्यात सापडला तिथं तू परत हरवलीस.
मधल्या काळात चहाकपाच्या गोल शिक्कयात , दोन बोटांमधल्या धुरातुनही भेटत राहिलीस तू. नंतर  कुणाकडुन काहीतरी हिसकवल्या गेल्यानंतरच्या विद्रोहातही तू भेटलीस. नाकारल्या, टाळल्या गेलेल्या दु:खातही मी म्हणत राहिलो कि “ त्यांना तर कुठेतरी रमायचं होतं पण अाता त्यांचा प्रवासपक्षी तुमच्याकडे जपा किंवा उडवुन द्या.एक दिवस माझीही हिच गत होईल त्या अाधी …. घ्या हा माझा उर अाणि मलाही माझ्या हक्काचा सूरा एकदाचा देऊन टाका." तेव्हा तू निश्चयाने भेटलीस.त्यावेळी तू निसटल्याची नोंद नाही माझ्याकडे.पण धुरकटल्याची अाहे.
मग काळाने घात केला अाणि अापण मोठे झालो. कुणीतरी डोळ्यात पाहिलं अाणि काळजात भरती अोहोटी झाली. मग त्याच कोणीतरी कायमचा निरोप घेतला तेव्हा अावेगाने भिडली अाणि तू सापडली परत. मग सावरीच्या झाडाची पांढरी म्हातारी जशी हळुहळु उडुन जाते तशी तू अलगद नकळत निसटत राहिलीस.अाणि पुन्हा बोटाला धरुन घेऊन गेलीस ते शेवटच्या बाकावर.
मोराचा जन्म लांडोराने प्राशान केलेल्या मोराच्या अश्रुने होतो तसं कारुण्यात गवसणा-या चैतन्यासारखी तू भेटली असावी असंही राहुन राहुन वाटतं. पण मोर म्हटलं कि लोकांना मोरपिस अाठवतो अाणि मोरपिस म्हटलं कि कृष्ण. पण मला मात्र कृष्ण म्हटलं कि रानावनात हरवलेलं,निसटलेलं एक मोरपीस शोधणारा मोरच अाठवतो. हि अजुन एक निसटल्याची खुण.
पण ह्या गवसण्या निसटण़्याच्या लपंडावात……. ग ‘कविते’ तू मला नेमकी कुठे भेटलीस?' ह्याचा मी जेव्हा जेव्हा शोध घ्यायला जातो तेव्हा तेव्हा मला सगऴयात अाधी अाठवतात त्या तू निसटल्याच्या खुणा. 


- प्राजक्त दै सामना 
५ डिसेंबर

अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...