सगळ्यात शेवटच्या दगडावर बसुन राधी कान्ह्याबद्दल विचार करायची. “सगळाच दोष कृष्णावर कसा टाकायचा ना ? काही गोष्टी घडायच्या थोडीच टळतात. अाणि खरंतर सगळे म्हणतात कि तो देव अाहे , त्याला सातासमुद्रापलीकडंच जिथल्या तिथं बसुन कळतं , त्याला भविष्यही दिसतं , विश्व व्यापुनही श्रीशिल्लक उरणारा असा अाहे तो. पण असं असतं तर त्या दिवशी यमुनेवर सोबत जातांना त्याला लागलेली ठेच कशी चुकवता नाही अाली ? तो दगड कसा नाही दिसला ? सातासमुद्रापलीकडंच दिसणा-याला सातव्या वळणावरच दिसु नये ? मी त्याची बासरी गुलमोहराच्या उत्तरेकडच्या वडाच्या ढोलीत लपवली अाहे हे कळायला त्याला शोधा शोधा का करावी लागली ? कसंय कि एखाद्याला सगळ्यांनीच धीट म्हटल्यावर थोडासा निधडं व्हावं लागतं तसं झालं असेल त्याचं ।
कारण स्वत:च स्वत:ला विचारुन विचारुन थकलेल्या कृष्णाला मी अगतिक होऊन कुशीत रडतांना पाहिलंय । तो खेळिया असेलही पण डबडबत त्याच्या गालांवरुन अोघळणा-या पाण्याची चव मला खेळवु नाही शकत। कारण कुणी रोपटं जमीनीत लावुन 'इथं पुर्वीपासुन कशी हिरवळ अाहे' असं सांगुन फसवु शकतं पण त्याच्याच खोलात गेलं तर सगळं खरं-खोटं कळेल, कारण तुम्ही वरचेवर रोपटं लावु शकतात पण रोपट्याची मुळं कुणी खोलवर पसरवु नाही शकतं । म्हणुनच कान्हा जगाला फसवु शकतो मला नाही । देव केल्यावर देवागत वागावं लागतं म्हणुन त्याला मला सोडुन जावं लागलं असेल।
ज्यांना दिवस सोबत नेत नाही आणि रात्र सोबत देत नाही अशांची संध्याकाळ होतो कृष्ण.
आणि मग संध्येकडे कुणी वेळचं बंधन घालतं का? प्रत्येक येणा-या लाटेचं परतणं येण्याआधीच ठरलेलं असतं पण म्हणुन किना-यावरच्या रेतीनं भिजणं थांबवावं का?
तो मला एकदा म्हणालाही होता "लोक मला असामान्य म्हणतात. मी आज तुला सांगतो मी आहे असामान्य. म्हणजे अतिसामान्य आहे मी.
स्वभावगुणाच्या सर्वात वरच्या थराचा स्वभावच माझ्याठायी आहे. म्हणजे थोडा आनंदी, काहीसा ख़ुश होणं नाही येत मला. मी होतो आनंदी. ज़रा वाईट होणं मला ठाऊक नाही मी होतो फक्त दुखी. सगळ्यात वरच्या थराचा स्वभाव. कुणी चांगलं वाटणं म्हणजे म्हणजे माझ्यालेखी फक्त प्रेम."
- प्राजक्त १२ डिसेंबर १५
दै सामना
No comments:
Post a Comment