Friday, May 16, 2014

कांड्या

"........ श्शक् श्शक् ! ते तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट अाहे का ? " 
अाधीच चार जणांच्या जागेवर पाच जण रिक्षात बसावे तसे एडजस्ट होत माझा रेल्वे प्रवास चालु होता. सोबतच्या मित्रांपासुन दुर मला कसेबसे सिट मिळाले त्यात "किच्चेने किच्चेने ! देखने मै क्या जाता हय , देखने का पैसा नय " असं सांगणारा माणुस नाकासमोर वडाच्या पारंब्या लटकाव्या तशा कि-चैनच्या पारंब्या लटकवत होता. अाणि त्यात हा असा एकाचा प्रश्न. मी हो म्हणालो तर म्हणाला " ते भिंड ते जळगाव किती अंतर अाहे बघता का ? भिंड मध्यप्रदेश मधलं ... " मी प्रयत्न केला पण प्रवासामुळे सिग्नलमध्ये व्यत्यय येत होता. मी म्हणालो " थोडा वेळ लागेल सिग्नल प्रोब्लेम अाहे." तो म्हणाला " कांड्या नाहीए का ? बरं तेवढं कांडी अाली की बघुन सांगा ." थोडावेळ टोकावर टेकुन टेकुन माझ्या बुडाने " अाता बास्स " म्हटले म्हणुन मग मी पाय( किंवा बुड) मोकळे करायला दारामध्ये जाऊन उभा राहिलो.
"कांड्या अाल्या का?" मी जवळ जवळ दचकुन खाली दरीत उडीच मारायचा बाकी होतो.तोच माणुस परत तोच प्रश्न घेऊन उभा होता.मी खिशातुन मोबाईल काढुन पाहिला 'कांड्या' नव्हत्या. मग अाम्ही दोघं नुसतेच दारावर उभे राहिलो अाणि तो म्हणाला " माझा लहाना भाऊ अाहे. तो शिक्षक अाहे पण हे इलेक्शन डयुटीसाठी गेला होता तिकडे भिंडला. काल निघाला म्हणे अाठ रात्री वाजता अाता जवळपास रात्रीचे नऊ होत अाले पण घरी पोचला नाही.फोन बंद अाहे.खराब झाला म्हणाला होता शेवटंच बोलणं झालं तेव्हा.काळजी वाटतेय. ११ दिवसांनी लग्न काढलंय त्याचं. " समोरुन भरधाव रेल्वे गेली अाणि त्याच्या ह्या खुलाशाने अाणि समोरच्या रेल्वेमुळे नखशिखांत हादरलो. मी परत मोबाईल काढुन एक निष्फळ प्रयत्न केला.
मी विचारलं " कोण कोण असतं घरी ?" तो अजुन बोलत होता "सरकारचं काय कळत नाही कशाला पाठवता शिक्षक लोकांना इतक्या लांब लांब ?" तो माणुस तंद्रीत होता मी परत विचारलं " कोण कोण असतं घरी?" त्याने ऎकलं की नाही ठाऊक नाही पण तो बोलतंच होता "मी कारकुन अाहे एका खाजगी कंपनीत . वडिल चालतांना शुद्धीत नसायचे त्यामुळे बोटधरुन चालायला कुणी नाही शिकवलं. गुडघे फुटतंच शिकलो. अाई सकाळी दोघांना रांगेत बसवुन गुडघ्यांना मलमपट्टी करायची. पाठीशी एक भाऊ अाणि एक बहिण. मी मोठा असल्याने मलाच कितेकदा त्यांचा बाप व्हावं लागलं. नंतर एकदा बाप कायमचा नाहीसा झाला अाणि अाई गेली. मग मला अाई पण व्हाव लागलं.

बाप होणं सोपं होतं...किंवा पुढे होणारच असं कुठे तरी माहिती होतं पण सालं आई कसा होऊ. मोठा असलो तरी म्हणावी तितकी आई माझ्या वाट्याला कधी आलीच नाही.
लहान असतांना झाप्या मधुन उजेडाचा तुकडा पसरायचा घरात मग मी खाट घेऊन जायचो तिथे आणि ती उब कवटाळुन झोपुन जायचो. उठल्यावर तो उबेचा तुकडा दुर वर कुठेतरी कौलाच्या खुटीवर लटकलेला असायचा. बस तितकीच झोपेच्या गुंगीत जितकी आई वाट्याला आली तेवढी.
कोणाला आई म्हणटल्यावर चंद्रासारखा गोल अंबाडा आठवत असेल ,कोणाला रुपया इतकं कपाळ कुंक आठवत असले.कुणाला दुलईची उब आठवत असेल. पण मला ना आई म्हण्टलं की फ़क्त कानाजवळ बांगड्यांची खुळखुळ ऐकु येते. झोपेच्या गुंगीत तितकीच आई आली वाट्याला.मला थापटणारी. तिच्याकडे पहावं म्हटंल तर "मिटा डोळे..मिटा" म्हणायची.
लहान होतो तर मांजरीच्या पिलासारखा घुटमळायचो तिच्या भोवती...पण मग चुलीचा धुर झाला की मग तुळशीला पाठ टेकवुन स्वैंपाक घरात डोकावुन बघायचो...डोळ्यात पाणी येईस्तोवर. नाही रडलो नाही कधी मी .ते धुर जास्त असायचा ना.
आईच्या पदराला धरुन चालंल की आई म्हणायची.. "काय रे नुसता पदराशी ? लहान राहिला का तू आता ? मोठ्यासारखं वागायला शिक अाता"
एकदा शाळेत निरोप आला मला. मी शाळेची पिशवी सोडुन घरी पळालो तर लहान बहिण आईची साडी घालुन नुसती हसत होती.उगाचच... आणि घराच्या आत बाहेर गर्दीच गर्दी.गर्दी भागुन आत शिरलो तर तुळशीचं पान ओठाशी धरुन आई निजलेली दिसली.
बहिण हसत हसत आली आणि आईच्या पदराशी खेळायला लागली...
त्या दिवशी तिला पहिल्यांदा आणि शेवटंच मारतांना मी म्हणालो.... "काय गं नुसतं पदराशी ? लहान राहिली का तू आता ? मोठ्यासारखं वागायला शिक अाता."

तितक्यात माझं स्टेशन अालं. गाडी दहा मिनीटं थांबणार होती. मी गाडीतुन उतरल्यावर दोन गोष्टी केल्या.
पहिली गोष्ट, प्लॅटफॉर्मवर थोडा जास्त वेळ रेंगाळलो अाणि मोबाईलवर शोधुन त्याला म्हणालो "दादा, ८५० किमी अाहे साधारण. म्हणजे निदान उद्या सकाळी ११/१२ पर्यंत यायलाच पाहिजे.काळजी नका करु"
अाणि 
दुसरं गोष्ट, " हां ,पोचलोय स्टेशनवर. येतोच १५ मिनीटात घरी" .घरी फोन केला.

- प्राजक्त 

(दै सामना १७।०५।२०१४ )
http://epaper.saamana.com/Details.aspx?id=49382&boxid=111926796 ) 

No comments:

Post a Comment

अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...