Sunday, November 1, 2015

ग ( मटा ३१ अॉगस्ट १५)


( निसटलेल्या खुणा)

ग तू मला नेमकी कुठे भेटलीस? ह्याचा मी जेव्हा जेव्हा शोध घ्यायला जातो तेव्हा तेव्हा मला सगऴयात अाधी अाठवतात त्या तू निसटल्याच्या खुणा. पाहिजे त्या क्षणाला खुप शोधाशोध करुन न सापडणारी पण एखाद्या अवचित वेळी नकळत जुन्याशा पुस्तकपानातुन जाळीदार सच्छील पिंपळपानासारखी गरगरत खाली येणारी तू नेमकी कधी भेटलीस ?, कुठे भेटलीस ? का भेटलीस ? ह्याचा मी जेव्हा जेव्हा शोध घ्यायला जातो तेव्हा तेव्हा मला सगऴयात अाधी अाठवतात त्या तू निसटल्याच्या खुणा.

अगदी लहानपणी , टॅह्यॅपणात रडतांना दोन श्वासांमध्ये उर धपापायचा अाणि झोळी वर टांगलेल्या फिरकी सोबत डोळे गरगरायचे , त्यानंतरच्या तासंतासाच्या अोल्या हुंदक्यांनी मान टाकल्यानंतरच्या अचानकशा पहिल्या घोटात सापडलीस कि त्या घोटातुन अालेल्या दचकण्यात सापडलीस कि त्यानंतरच्या झोपेत सापडलीस? शोध अजुन चालु अाहे. 
नंतर कधीतरी पुन्हा सापडलीस तेव्हा मी नाकळत्या कुशीतल्या वयात होतो. सायकलच्या प्रवासात डबलसीट बसलेलल्या अाईच्या कुशीत असतांना तिच्या कानाच्या डुलणा-या डूलेमध्ये , डूलेमधल्या चिमुकल्या घुंगराच्या लगबगीत तू पुन्हा सापडलीस. पण परतीप्रवासाला रित्या कानावर असलेल्या लालनिळ्या वळांमधुन , डूल नसलेल्या कानाच्या रंध्रामधुन निसटलीस ते निसटलीसच.
पुन्हा भेटलीस तेव्हा मी गावी माळरानावर हुंदडत होतो. तिथल्या रानाशेणातल्या वासात भटकत होतो. रानफुलं गोळा करत होतो.त्या फुलांच्या किरमीजी रंगात तू भेटत गेलीस. अचानक रानभैरी अाभाळ झाकोळुन अालं अाणि गचांडी धरुन झोडपावा तसा पाऊस अाला. सैरावैरा धावतांना एका धनगर बाबानं घोंगडीखाली घेतलं अाणि टेकाडावरच्या तुटक्या देवदगडाच्या गाभा-यात अाडोशाला बसवलं. तिथे कुंद गाभा-यातल्या उदबत्तीच्या अंधारवासामध्ये धनगराच्या दाढीघोंगडीचा मेंढीवास मिसळला. धनगरबाबा म्हणाला ‘पाहु हातात काये ?” मी मुठ उघडली तर अाधीचा रानफुलांचा कुस्कर होता. धनगरबाबा म्हणाला “ या फुलांस्नी काय म्हंता मायती का ? “ मी थरथरत्या अोल्या देहाने नाही म्हणालो. धनगरबाबा म्हणाला “ सितेची अासवं “. कड्डाड् वीजेचा कल्लोळ झाला.मी गप्पदिशी डोळे मिटले. तू तेव्हा निसटलीस परत.

एकदा अशीच तुळसकट्ट्याजवळ भिंगाने कागदं जाळत बसण्याची दुपार. “तुळशीला किड लागलीय बरं.ती उपटुन घे. उद्या वाड्यावरुन अाणुन दुसरी लाऊ” नंतर उरली ती जेवणावळी उरकल्यानंतर टम्म भरलेल्या पोटाची सुस्तावलेली दुपार.अाम्ही पेंगाळलो पण बायकांचा रामरगाडा चालु होता. बांगड्यांच्या येरझा-याच्या नादामध्ये जात्याची घरघर सुरु झाली अाणि जात्याचा खालचा दगड जणू माझी छाती अाहे असं दडपण येऊ लागलं.तू तिथे सापडलीस. जरावेळाने पलीकडे काकणाच्या तालावर ताकाची फेसाळ घुसळण चालु झाली. घुसळणीमुळे नसलेल्या झोक्यावर मला पडल्या पडल्या कोणीतरी जोजवतंय असं भासत राहिलं.तू तिथे सापडलीस. संध्याकाळी गोठ्यात कंकण सळसळीत कुणीतरी धारा काढत होतं तिथं तू सापडलीस. चुलीच्या जाळाशी थापलेल्या भाकरीच्या पिठांची वादळं राखेसोबत गरगरायची तिथे तू सापडली. त्याच रात्री सवयीने दुसरा घास ठेवायला तुळशीजवळ अालो अाणि तिथल्या तुळस नसलेल्या खळग्यात तू पुन्हा निसटलीस.

नंतर थोडं मोठं झालो तेव्हा पावसात कागदाच्या बोटीत, वहीतुन अस्ताव्यस्त फाडलेल्या पानांच्या उरलेल्या चुरगळीत सापडलीस. सायकलीच्या निसटल्या चैनीत , तिस-या दिवशी नखात अडकलेल्या ग्रिसच्या काजळीत सापडलीस. पहिल्यांदा जमलेल्या शिट्टीत, रात्री येळंमाळं शिट्टी वाजवतो म्हणुन अाजीने मारलेल्या टपलीत सापडलीस.एकदा रानात सापडलेल्या किड्याच्या शेपटाला दोरी लाऊन हॅलीकॉप्टर म्हणुन उडवण़्यात दोरी सकट तो किडा सकाळी कोळी जाळ्यात सापडला तिथं तू परत हरवलीस.

मधल्या काळात चहाकपाच्या गोल शिक्कयात , दोन बोटांमधल्या धुरातुनही भेटत राहिलीस तू. नंतर  कुणाकडुन काहीतरी हिसकवल्या गेल्यानंतरच्या विद्रोहातही तू भेटलीस. नाकारल्या, टाळल्या गेलेल्या दु:खातही मी म्हणत राहिलो कि “ त्यांना तर कुठेतरी रमायचं होतं पण अाता त्यांचा प्रवासपक्षी तुमच्याकडे जपा किंवा उडवुन द्या.एक दिवस माझीही हिच गत होईल त्या अाधी …. घ्या हा माझा उर अाणि मलाही माझ्या हक्काचा सूरा एकदाचा देऊन टाका." तेव्हा तू निश्चयाने भेटलीस.त्यावेळी तू निसटल्याची नोंद नाही माझ्याकडे.पण धुरकटल्याची अाहे.

मग काळाने घात केला अाणि अापण मोठे झालो. कुणीतरी डोळ्यात पाहिलं अाणि काळजात भरती अोहोटी झाली. मग त्याच कोणीतरी कायमचा निरोप घेतला तेव्हा अावेगाने भिडली अाणि तू सापडली परत. मग सावरीच्या झाडाची पांढरी म्हातारी जशी हळुहळु उडुन जाते तशी तू अलगद नकळत निसटत राहिलीस.
मोराचा जन्म लांडोराने प्राशान केलेल्या मोराच्या अश्रुने होतो तसं कारुण्यात गवसणा-या चैतन्यासारखी तू भेटली असावी असंही राहुन राहुन वाटतं. पण मोर म्हटलं कि लोकांना मोरपिस अाठवतो अाणि मोरपिस म्हटलं कि कृष्ण. पण मला मात्र कृष्ण म्हटलं कि रानावनात हरवलेलं,निसटलेलं एक मोरपीस शोधणारा मोरच अाठवतो. हि अजुन एक निसटल्याची खुण.

पण ह्या गवसण्या निसटण़्याच्या लपंडावात……. ग ‘कविते’ तू मला नेमकी कुठे भेटलीस?' ह्याचा मी जेव्हा जेव्हा शोध घ्यायला जातो तेव्हा तेव्हा मला सगऴयात अाधी अाठवतात त्या तू निसटल्याच्या खुणा.

- प्राजक्त २९/ १०/१५

म.टा. मैफल







No comments:

Post a Comment

अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...